Home Blog Page 4

छत्रपती मल्टीस्टेट घोटाळा  प्रकरणी दोन संचालक अटकेत, चार दिवसांची पोलिस कोठडी

0

जालना — बीड जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आणखी दोन संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. राजीव सतीश काळे (वय 40, रा. गेवराई, जि. बीड) आणि विठ्ठल पांडुरंग रुचके (वय 47, रा. सिरसदेवी, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या संचालकांची नावे आहेत. न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


आर्थिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती मल्टीस्टेट सोसायटीचे अध्यक्ष संतोष बसवंत भंडारी, संचालक मंडळातील सदस्य आणि व्यवस्थापक यांनी ठेवीदारांना अधिक व्याजदराचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर ठेवी स्वीकारल्या होत्या. मात्र, मुदतपूर्ती झाल्यानंतर ठेवीदारांना त्यांची रक्कम परत न देता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
तपासादरम्यान संतोष भंडारी हे स्वतः ठेवीदारांच्या घरी जाऊन गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करत असल्याचे समोर आले आहे. तसेच संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यात एकूण 21 शाखा कार्यरत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
फिर्यादी आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आतापर्यंत 1 कोटी 31 लाख 44 हजार रुपयांच्या फसवणुकीची नोंद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या दोन्ही संचालकांचा गैरव्यवहारात सक्रिय सहभाग आढळून आल्याने त्यांना सोमवारी ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई जालन्याचे पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी आणि आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी उपअधीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सपोनि मिथुन घुगे, उपनिरीक्षक शैलेश म्हस्के यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे हाताळली.

बीडच्या विकासासाठी आ.संदीप क्षीरसागर यांचा जोरदार पाठपुरावा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

0
मुंबई — बीड शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी मुंबईत शासनाकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. बीड शहरातील अंतर्गत महामार्गाचे रुंदीकरण करणे आणि नगर परिषदेच्या विकासकामांवरील स्थगिती उठवणे या दोन प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी मंगळवारी (दि.९) रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. महामार्ग रुंदीकरणासाठी केंद्रीय निधी उपलब्ध करून देण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीड शहरातील रस्ते विकासावर चर्चा केली.
           सोलापूर–बीड–धुळे हा राष्ट्रीय महामार्ग बीड शहरातून जातो. हा मार्ग बीडच्या व्यापाराचा आणि दळणवळणाचा प्रमुख दुवा आहे. या मार्गावर वाढती वाहतूक, नागरिकांची गैरसोय आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता रस्त्याचे रुंदीकरण व आधुनिकीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्रीय मार्ग निधी कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत या कामाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, या प्रस्तावास विशेष बाब म्हणून तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी आ.क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
         तसेच शहरातील भाजी मंडईच्या मंजूर कामांवरील स्थगिती उठवण्यासाठी आ. क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बीड नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विकासकामांच्या निधीवर सध्या स्थगिती आहे. ही स्थगिती तातडीने उठवण्याची मागणी त्यांनी केली. या निधीतून महात्मा फुले नवीन भाजी मंडई परिसराचे सुशोभीकरण व नूतनीकरण, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील भाजी मंडईचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. निधीअभावी ही कामे रखडली असून सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे संबंधित विभागाला तात्काळ कामे सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
                दरम्यान बीडकरांना चांगले रस्ते, सुरक्षित प्रवास आणि आधुनिक पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. बीडच्या विकासासाठी आवश्यक असलेला प्रत्येक निधी आणि प्रत्येक प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असा विश्वास आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

विहिरीत सापडला नवविवाहितेचा मृतदेह; सासरच्यांवर खुनाचा आरोप

0

बीड. — तालुक्यातील कुटेवाडी येथे 23 वर्षीय नवविवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि. 8) रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर खुनाचा गंभीर आरोप करत संबंधितांना अटक होईपर्यंत शवविच्छेदन करू देणार नसल्याची भूमिका घेतल्याने जिल्हा रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटेवाडी येथील संध्या पवन कुटे (वय 23) या नवविवाहितेचा मृतदेह सोमवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास गावाजवळील एका विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी तो जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाईकांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा करत सासरच्या लोकांवर खुनाचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतरही सासरच्या कुटुंबातील एकही व्यक्ती तेथे उपस्थित नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

यामुळे संतप्त झालेल्या माहेरच्या मंडळींनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक केली जात नाही, तोपर्यंत शवविच्छेदनास परवानगी देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने जिल्हा रुग्णालय परिसरात तैनात करण्यात आले होते. दुपारपर्यंत या प्रकरणी पोलीस आणि प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू होती.

पोलिसांकडून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच घटनेबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.

अग्निवीर जवानाकडून 3 वर्षे लैंगिक शोषण; लग्नाच्या काही दिवस आधी नकार, तरुणीची मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी

0

बीड — परळी तालुक्यातील एका धक्कादायक प्रकरणाने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा आणि न्यायव्यवस्थेतील विलंबाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. विवाहाचे आश्वासन देत तीन वर्षे शारीरिक संबंध ठेवून ऐनवेळी लग्नास नकार दिल्याचा आरोप असलेल्या अग्निवीर जवानाविरोधात गुन्हा दाखल होऊनही अद्याप अटक न झाल्याने पीडित तरुणीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धारूर तालुक्यातील सोनीमोहा येथील भरत तोंडे या अग्निवीर जवानाने विवाहाचे आश्वासन देत एका तरुणीसोबत दीर्घकाळ संबंध ठेवले होते. दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने विवाह निश्चित झाला होता. ६ मे रोजी विवाहसोहळा पार पडणार होता. लग्नासाठी पत्रिका वाटप, खरेदी आणि इतर सर्व तयारी पूर्ण झाली होती.

मात्र, विवाहाच्या काही दिवस आधीच भरत तोंडे याने लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या घटनेनंतर तरुणीने परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून भरत तोंडेसह ११ जणांविरोधात लैंगिक अत्याचार, मानसिक छळ आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होऊन सुमारे एक महिना उलटूनही अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. आरोपी अग्निवीर जवान असल्याने त्याच्याविरोधात कारवाई करण्यास विलंब होत असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडित तरुणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात आपली व्यथा मांडली आहे. “गुन्हा दाखल असूनही आरोपी मोकाट फिरत आहेत. न्याय मिळत नसल्याने माझा न्यायव्यवस्थेवरील विश्वास ढासळत चालला आहे,” असे तिने पत्रात नमूद केले आहे..

या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तातडीने अटक करून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटना, महिला कार्यकर्त्या आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि पुढील तपासात कोणती माहिती समोर येते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

धुळे-सोलापूर महामार्गावर पहाटे दरोडा; महिलांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास 

0

बीड, —  धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडजवळ पहाटेच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक दरोड्याच्या घटनेत अज्ञात तिघांनी चाकूचा धाक दाखवत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हिसकावून नेली. या घटनेत एकूण १ लाख ६९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहाटे प्रवासादरम्यान कार अडवून दरोडा

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ८) पहाटे सुमारे ५.२५ वाजण्याच्या सुमारास आहेरवडगाव शिवारातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. फिर्यादी राहुल उद्धवराव पोहेकर (वय ३०, रा. नवीन मोंढा, जालना) हे आपल्या कुटुंबीयांसह क्रेटा कारमधून (एमएच २१ सीजी ०४००) प्रवास करत होते.

यावेळी अज्ञात तीन आरोपींनी त्यांची कार अडवून चाकूचा धाक दाखवला. आरोपींनी फिर्यादी यांच्या पत्नी, आई आणि मावशी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच पर्समधील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

१.६९ लाखांचा ऐवज लंपास

दरोडेखोरांनी फिर्यादीच्या पत्नीच्या अंगावरील सुमारे ४२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ४५ हजार रुपये रोख रक्कम, मावशीच्या अंगावरील अंदाजे ३१ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने, तसेच आईच्या अंगावरील सुमारे ५० हजार ७५० रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ६९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुकलारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके सक्रिय केली आहेत.

अंजनवती खून प्रकरणाला नवे वळण; मृताच्या पत्नीला अटक, प्रेमसंबंधातून रचला हत्येचा कट

0

बीड —  जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती येथील युवकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता खळबळजनक वळण घेतले आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू असल्याचे भासविण्यात आलेल्या या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा कट उघडकीस आणला असून मृताच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे  तपासात समोर आले आहे. आरोपी सोबत असलेल्या प्रेम संबंधातून हे हत्या प्रकरण घडले असल्याचे निदर्शनास आले आहे.याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली असून न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनवती येथील किरण बंडू सोनवणे यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी लिंबागणेश-अंजनवती मार्गावरील गणेश माळ परिसरात आढळून आला होता. प्रारंभी हा अपघाती मृत्यू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, शवविच्छेदन अहवाल, तांत्रिक तपास आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे किरण सोनवणे यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने तपासाची दिशा बदलत आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान तळोजा-पनवेल परिसरातून दशरथ परदेशी आणि धीरज येडे या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीतून मिळालेली माहिती, तांत्रिक विश्लेषण, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे मृताची पत्नी प्रियांका सोनवणे (वय २५, रा. अंजनवती) हिचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले.

प्रेमसंबंधातून पतीच्या खुनाचा कट?

प्राथमिक तपासात प्रियांका सोनवणे हिचे मुख्य आरोपीसोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या संबंधातून पतीचा कायमचा काटा काढण्यासाठी कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या कटात सक्रिय सहकार्य केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी प्रियांका सोनवणे हिला अटक केली.

तीन दिवसांची पोलीस कोठडी

यापूर्वी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींसह महिला आरोपीच्या अधिक चौकशीसाठी न्यायालयाने तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मंजूर केली आहे. गुन्ह्यामागील नेमके कारण, कटातील इतर संभाव्य सहभागी, तसेच पुराव्यांची साखळी मजबूत करण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट

सोमवारी (दि. ८) सायंकाळी केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांनी नेकनूर पोलीस ठाण्याला भेट देत तपासाचा आढावा घेतला. त्यांनी तपास पथकाला आवश्यक सूचना व मार्गदर्शन केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

शिक्षणक्षेत्राला”चंद्राचे” ग्रहण: संच मान्यता प्रकरणात कारवाईची तयारी; शाळा, मुख्याध्यापक कर्मचाऱ्यांना सुनावणीची संधी

0

बीड — सध्या जिल्ह्यात शिक्षक भरती घोटाळ्याची पाळे”मुळे“उखडण्याचं काम सुरू करण्यात आलं असून एसआयटी चौकशी देखील सुरू आहे.माध्यमिक शिक्षण विभागातील वैयक्तिक संच मान्यता प्रकरणांमध्ये आढळलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक कार्यवाहीची प्रक्रिया गतीमान केली आहे.विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनावणी प्रक्रिया सूरु केली आहे.

बीड जिल्ह्यातील शिक्षक भरती घोटाळा चर्चेचा विषय ठरला असून देशभक्तीचे,संस्कार, त्याग समर्पणाचे कथित धडे देणाऱ्यांच्या संस्था देखील भ्रष्टाचाराच्या पाळ्या “मुळ्यां” नी जखडून टाकत त्या संस्था उध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं आहे. “चंद्रा” (अति शहाणा) माणूस संगतीला घेतला की काय होतं याच्या ज्वलंत उदाहरणाचे धागेदोरे उलगडू लागले आहेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये संच मान्यता घेताना तसेच तुकडी मान्यता घेतांना तत्कालीन संचालकांच्या खोट्या सह्या, शिक्षण अधिकाऱ्यांच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करून साध्या कागदावरच नियूक्तीपत्र दिले गेले.संस्थेचे तसेच शिक्षण विभागातील लेटर हेड(पॅड) वापरणे बंधनकारक असताना तसे केले गेले नाही.यातून लाखोंची कमाई करण्यात आली. मात्र हीच अनियमितता शिक्षण विभागाच्या निदर्शनास आली आहे.

शिक्षण संचालक (मिपा) यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार काही वैयक्तिक मान्यता संचिकांमध्ये प्रथमदर्शनी अनियमितता आढळल्याचे निदर्शनास आले आहे.

या संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनावणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या दि. 23 ऑगस्ट 2017 रोजीच्या परिपत्रकानुसार संबंधित शाळा, व्यवस्थापन, मुख्याध्यापक तसेच कर्मचाऱ्यांना त्यांची भूमिका आणि स्पष्टीकरण सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

प्रशासनाकडून संबंधित प्रकरणांचे चौकशी अहवाल उपलब्ध करून देण्यात आले असून, मुख्याध्यापकांना ते शाळा व्यवस्थापन आणि संबंधित कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुनावणीदरम्यान आवश्यक कागदपत्रांसह संबंधितांना त्यांच्या मान्यतेच्या समर्थनार्थ पुरावे, अभिलेख आणि स्पष्टीकरण सादर करता येणार आहे.

सुनावणीची तारीख व वेळ स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. या प्रक्रियेनंतर संबंधित मान्यतांबाबत अंतिम प्रशासकीय निर्णय घेतला जाणार असल्याने शिक्षण क्षेत्रात या प्रकरणाकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे.

दरम्यान, चौकशी समितीचा अहवाल समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हालचाली वाढल्या असून, संबंधित मान्यता प्रकरणांच्या वैधतेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.

महाविद्यालयीन तरुणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार; ब्लॅकमेल करत 3 लाख व साडेनऊ तोळे सोने उकळले

0

अंबाजोगाई — शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आणि त्यानंतर अश्लील फोटो-व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून लाखो रुपये व सोन्याचे दागिने उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील मूळ रहिवासी असलेली 20 वर्षीय तरुणी अंबाजोगाई येथे उच्च शिक्षणासाठी राहत होती. याच दरम्यान तिची ओळख महेश करपे आणि पवन कराड या दोघांशी झाली. ओळखीनंतर आरोपींकडून तिचा सतत पाठलाग आणि त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, एका दिवशी आरोपी महेश करपे याने तरुणीला जबरदस्तीने मंचुरियन खाऊ घातले. त्यामध्ये गुंगी आणणारे पदार्थ मिसळले असल्याने तरुणी बेशुद्ध झाली त्या नंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. नुसता अत्याचारच केला नाही तर अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आला.
त्यानंतर दुसरा आरोपी पवन कराड यानेही पीडितेला गुंगीचे औषध देऊन पुण्यातील एका लॉजमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला . या घटनांदरम्यान आरोपींनी तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ चित्रित केल्याचेही समोर आले आहे.

फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

तक्रारीनुसार, आरोपींनी अश्लील फोटो आणि व्हिडिओ कुटुंबीयांना दाखवण्याची तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेचा मानसिक छळ केला. या दबावामुळे तरुणीने आरोपींना वेळोवेळी सुमारे 3 लाख रुपये रोख रक्कम आणि घरातील साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मात्र, सततच्या धमक्या आणि वाढत्या छळामुळे पीडितेने अखेर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण हकिगत सांगितली.

दोन्ही आरोपी अटकेत

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर विशेष पथकाने कारवाई करत महेश करपे आणि पवन कराड या दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, ब्लॅकमेलिंगचे स्वरूप आणि इतर संभाव्य बाबींचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अधिक मासातील अनोखी घटना! जावयासाठी  अंगठी लपवलेला “धोंडा” मांजराने खाल्ला; मांजराच पोट फाडून काढावा लागला

0

टाकरवण — परिसरातील एका गावात अधिक मासानिमित्त लेक-जावयाच्या स्वागतासाठी सुरू असलेल्या आनंदाच्या वातावरणात एक अजब आणि धक्कादायक घटना घडली. जावयाला भेट म्हणून देण्यासाठी खास पिठाच्या धोंड्यात लपवून ठेवलेली पाच ग्रॅम सोन्याची अंगठी घरातील मांजराने गिळल्याने संपूर्ण कुटुंबाची एकच धावपळ उडाली. अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आणि पशुवैद्यकीय उपचारांनंतर मृत मांजराच्या पोटातून अंगठी बाहेर काढण्यात आली.

जावयासाठी खास तयारी

अधिक मासातील पारंपरिक “धोंडे जेवण” कार्यक्रमासाठी लेक आणि जावयाला सासुरवाडीत आमंत्रित करण्यात आले होते. जावयाचा सन्मान करण्यासाठी सासूबाईंनी पाच ग्रॅम सोन्याची अंगठी एका पिठाच्या धोंड्यात लपवून ठेवली होती. योग्य वेळी ही भेट देण्याचा त्यांचा मानस होता.

मांजराने गिळला अंगठी असलेला धोंडा

घरात पाहुणचाराची लगबग सुरू असतानाच अचानक आलेल्या एका मांजराने अंगठी लपवलेला धोंडाच गिळून टाकला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबातील सदस्यांमध्ये एकच खळबळ उडाली. तातडीने मांजराला पकडून सुरक्षित ठिकाणी बांधण्यात आले.
दरम्यान, जावयाचा जेवणाचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण प्रकाराची माहिती जावयाला देण्यात आली. अंगठी नंतर परत मिळाल्यानंतर देण्याचे ठरवून लेक-जावयाची पारंपरिक बोळवण करण्यात आली.

चार दिवस प्रतीक्षा, पण निष्फळ

अंगठी नैसर्गिकरित्या बाहेर पडेल या आशेने कुटुंबीयांनी मांजरावर चार दिवस लक्ष ठेवले. मात्र, विष्ठेद्वारे अंगठी बाहेर आली नाही. त्यामुळे मांजराला पशुवैद्यकाकडे नेण्यात आले.

उपचारादरम्यान मांजराचा मृत्यू

पशुवैद्यकांनी मांजराला उलटी होण्यासाठी औषधोपचार केले. मात्र, उपचारादरम्यान दुर्दैवाने मांजराचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांच्या संमतीने मृत मांजरावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान मांजराच्या पोटातून सोन्याची अंगठी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली.

परिसरात चर्चेचा विषय

अधिक मासातील जावयाच्या पाहुणचारादरम्यान घडलेली ही अनोखी घटना सध्या टाकरवण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. सोन्याची अंगठी परत मिळाली असली, तरी एका निरपराध प्राण्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी हळहळ व्यक्त केली.

“देशात ३० लाख पदवीधर बेरोजगार; शिक्षण व्यवस्थेविरोधात आंदोलन तीव्र करणार – अभिजीत दीपके”

0

“मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मग पेपरफुटी का नाही?” – अभिजीत दीपके यांचा सवाल

छ. संभाजीनगरदेशातील शिक्षण व्यवस्था गंभीर संकटात सापडली असून दरवर्षी लाखो तरुण पदवीधर बेरोजगार राहत आहेत. सरकारी भरती परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेले आंदोलन हा केवळ ट्रेलर असून आगामी काळात देशभरात अधिक व्यापक आणि तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा कॉकरोच जनता पार्टी (CJP) या डिजिटल चळवळीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पत्रकार परिषदेत दिला.

दीपके म्हणाले की, देशात दरवर्षी सुमारे ५० लाख विद्यार्थी पदवीधर होतात. मात्र त्यापैकी केवळ २० लाखांनाच रोजगार मिळतो, तर उर्वरित ३० लाख तरुण बेरोजगार राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून धर्म आणि राजकारणाच्या मुद्द्यांवर भर दिला जात असताना शिक्षण, रोजगार आणि तरुणांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

NEET आणि CBSE परीक्षांमधील गोंधळाचा उल्लेख करत त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “खासगी क्षेत्रात एखाद्या कर्मचाऱ्याकडून चुका झाल्यास त्याच्यावर तत्काळ कारवाई होते. मग वारंवार पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर किंवा मंत्र्यांवर कारवाई का होत नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यावेळी अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. आम्ही ही मागणी यापूर्वीपासून सातत्याने करत आहोत. पंतप्रधान मोदी हे रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्याबाबत जगभरात चर्चा होतात, मग देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणारी पेपरफुटी का थांबवू शकत नाहीत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशभरात वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून यासाठी केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणीही त्यांनी केली.

आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर आणि आयटी सेलच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचा आरोप करत दीपके म्हणाले की, सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना देशविरोधी ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनात देशाच्या विविध राज्यांतील विद्यार्थी आणि युवक शांततापूर्ण पद्धतीने सहभागी झाले होते, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानावरही त्यांनी टीका केली. महाराष्ट्र हा पुरोगामी, विचारप्रधान आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर उभा असलेला राज्य असल्याचे सांगत आंबेडकरी विचारांचा अवमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले.

हे आंदोलन दिल्लीपुरते मर्यादित राहणार नसून लवकरच महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये युवकांच्या प्रश्नांवर मोठी आंदोलने उभारली जातील. छत्रपती संभाजीनगरमध्येही लवकरच व्यापक आणि शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट संबंध न ठेवता युवकांच्या बळावर हा लढा पुढे नेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.