Home Blog Page 3

परळी पोलिसांचा धर्मापुरीत छापा;20 किलोहून अधिक गांजा जप्त, दोघांवर गुन्हा

0

परळी — तालुक्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात धर्मपुरी मध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 20 किलो 340 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे बाजारमूल्य 9 लाख 77 हजार 320 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख बाबुलाल शेखलाल अत्तार (वय 55) आणि वसीम बाबुलाल अत्तार, दोघेही रा. धर्मापुरी, ता. परळी, यांच्या राहत्या घरातून ही कारवाई करण्यात आली. धर्मापुरी परिसरात अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 11 जून रोजी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला.
छाप्यामध्ये घरात ठेवलेल्या एका पांढऱ्या पोत्यात उग्र वास येणारा हिरवट रंगाचा पदार्थ आढळून आला. तपासणी व वजन केल्यानंतर तो 20 किलो 340 ग्रॅम गांजा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तात्काळ गांजा जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी धनराज जारवाल यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 274/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपी आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचा आरोप असून त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायदा 1985 च्या कलम 20 आणि 29 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक एम. ए. सय्यद करीत असून अंमली पदार्थांच्या साखळीचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

घरकुल लाभार्थ्यांच्या नावाने वाळूवर दरोडा ? चौकशी अहवालानंतर जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये

0

बीड —  शासनाच्या घरकुल योजनांतील लाभार्थ्यांना मोफत वाळू पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या नावावर शंभर कोटीचे सिंडिकेट चालवले जात असल्याचा आ. विजयसिंह पंडित यांनी पर्दाफाश केला. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली . त्यानंतर  जिल्हाधिकारी  विवेक जॉन्सन यांनी महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणात गेवराई आणि पाटोदा तालुक्यातील 16 गावांमध्ये कार्यरत असलेल्या 50 हून अधिक तलाठी, मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज विभागामार्फत 10 जून रोजी जारी करण्यात आलेल्या नोटिशीनुसार, शासनाच्या घरकुल लाभार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या मोफत वाळू वितरण प्रक्रियेत गंभीर त्रुटी, कर्तव्यातील कसूर, हलगर्जीपणा आणि देखरेखीचा अभाव आढळून आला आहे.
चौकशी समिती आणि नियुक्त पथकाच्या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या वाळूचे अभिलेख व्यवस्थित ठेवण्यात आले नसल्याचे, लाभार्थ्यांच्या मोबाईलवर आलेल्या OTP चा अधिकृत वापर झाला की नाही याची खातरजमा करण्यात आलेली नसल्याचे तसेच शासनाकडून मंजूर झालेली वाळू प्रत्यक्ष घरकुल बांधकामाच्या ठिकाणी पोहोचली की नाही याची तपासणी करण्यात आलेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय काही ठिकाणी लाभार्थ्यांची दिशाभूल करून त्यांच्या मोबाईलवरील OTP मिळवून शासनाने विनामूल्य दिलेली वाळू एजंटामार्फत इतरत्र वळविण्यात आल्याचे आणि अवैध वापर झाल्याचे प्रकार चौकशीत उघड झाले आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक दक्षता घेतली नसल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
धुमेगाव, इरगाव, गंगावाडी, बेलगाव, बागपिंपळगाव, इटकूर, एरंडगाव, जातेगाव, बेलगुडवाडी, उमापूर, गढी, किनगाव, म्हाळस पिंपळगाव, धोंडराई, राक्षसभुवन आणि भायाळा या गावांतील संबंधित कर्मचारी या कारवाईच्या कक्षेत आले आहेत. याबरोबरच अतिरिक्त वाळूचे उत्खन करून त्याचे साठे तयार करणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या जागेत अवैध साठा आढळून आला, त्या जमीनमालकांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे वाळू माफिया आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना 12 जून रोजी समक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.
घरकुल लाभार्थ्यांसाठी असलेल्या जनकल्याणकारी योजनेत झालेल्या या प्रकारामुळे शासनाची प्रतिमा मलिन झाल्याचे प्रशासनाचे मत असून या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शाळा लांब? आता विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

0

मुंबई — महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या शिक्षणाचा हक्क (RTE) कायद्याच्या तरतुदींनुसार विद्यार्थ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील दुर्गम ग्रामीण भाग तसेच घराजवळ शाळा उपलब्ध नसलेल्या शहरी भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी वाहतूक भत्ता देण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर होणार असून शैक्षणिक गळती रोखण्यास मोठी मदत मिळणार आहे.

राज्यातील अनेक दुर्गम भागांमध्ये विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी मैलोनमैल पायी प्रवास करावा लागतो. वाहतुकीच्या सुविधांचा अभाव, खराब रस्ते आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात किंवा अर्ध्यावर शिक्षण सोडतात. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

RTE कायद्यानुसार वाहतूक भत्त्याची तरतूद

केंद्र शासनाच्या RTE कायद्यातील २०११ मधील तरतुदींच्या अनुषंगाने राज्य शासनाने विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अथवा वाहतूक भत्ता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून निश्चित अंतराच्या परिसरात शाळा उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांना हा लाभ दिला जाणार आहे.

कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ?

शासनाने वर्गनिहाय अंतराचे निकष निश्चित केले आहेत.
इयत्ता १ ली ते ५ वी : वस्तीपासून १ किलोमीटरच्या आत शाळा नसलेले विद्यार्थी.
इयत्ता ६ वी ते ८ वी : वस्तीपासून ३ किलोमीटरच्या आत शाळा नसलेले विद्यार्थी.
इयत्ता ९ वी व १० वी : वस्तीपासून ५ किलोमीटरच्या आत शाळा नसलेले विद्यार्थी.
या निकषांमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वाहतूक भत्ता अथवा वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शैक्षणिक गळती रोखण्यास मदत

या निर्णयामुळे दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः शाळा लांब असल्यामुळे शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाचणार असून त्यांना नियमित शिक्षण घेणे अधिक सोपे होणार आहे.
शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार असून राज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत करणार आहे.

कुटेवाडीतील विवाहितेची आत्महत्या नव्हे तर हत्याच ! अखेर सत्य उलगडलं

0

बीड —  तालुक्यातील कुटेवाडी येथे 23 वर्षीय विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात सासरच्यांनीच धारदार शस्त्राने वार करून विवाहितेची हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पती, सासरा आणि सासू यांच्याविरोधात खुनासह पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पती व सासऱ्याला अटक करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कुटेवाडी येथील संध्या किसन घुले (वय 23) हिचा विवाह 20 मे 2022 रोजी पवन आसाराम कुटे याच्याशी झाला होता. विवाहावेळी चार लाख रुपये हुंडा आणि एक तोळे सोने देण्यात आले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच संध्याचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
सासरच्यांकडून “तू काळी आहेस, तुला स्वयंपाक करता येत नाही, पांढऱ्या पायाची आहेस” अशा शब्दांत सतत अपमान केला जात होता. तसेच ऑटो रिक्षा खरेदीसाठी माहेराहून दोन लाख रुपये आणण्याची मागणीही केली जात होती. या छळाला कंटाळून संध्या काही काळ माहेरी राहिली होती. मात्र दीड वर्षांच्या मुलाच्या भवितव्याचा विचार करून नातेवाईकांनी तिची समजूत काढत पुन्हा सासरी पाठवले होते.
दरम्यान, 8 जून रोजी संध्याची चप्पल घराजवळील विहिरीच्या परिसरात आढळून आली. यानंतर सासरच्या मंडळींनी तिच्या माहेरच्या नातेवाईकांना माहिती दिली. विहिरीत शोध घेतला असता संध्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.
जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनापूर्वी मृतदेहाची पाहणी करण्यात आली असता तिच्या डोक्याच्या मध्यभागी आणि बाजूला धारदार शस्त्राने वार केल्याच्या गंभीर जखमा आढळल्या. तसेच हात-पायांवरही मारहाणीच्या खुणा असल्याचे निदर्शनास आले. यामुळे हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत माहेरच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात पती पवन कुटे, सासरा आसाराम कुटे आणि सासू यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती आणि सासऱ्याला अटक केली असून फरार सासूचा शोध सुरू आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.

महाविद्यालयीन लिपिकाचे अपहरण; दोन तास बेदम मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

0

परळी — बँकेच्या कर्जाच्या जामीनीवरून तसेच पैशांच्या जुन्या व्यवहारातील वादातून एका महाविद्यालयीन लिपिकाचे अपहरण करून त्यांना लाकडी काठ्या आणि बेल्टने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना परळी शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

्मिळालेल्या माहितीनुसार, परळी येथील लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेले अनिल बाबुराव पत्की यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीतील माहितीनुसार, त्यांची आरोपी वैजनाथ यादव याच्याशी अनेक वर्षांपासून ओळख होती. दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाले होते. पत्की यांनी घेतलेले एक लाख रुपये परत केल्यानंतरही यादव आणखी चार लाख रुपयांची मागणी करत होता. तसेच यादवने घेतलेल्या बँक कर्जाच्या जामीनकीतून आपले नाव काढून घेण्यासाठी पत्की सातत्याने पाठपुरावा करत होते. याच कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.

पैशांचा हिशोब करण्याच्या बहाण्याने नेले

मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वैजनाथ यादव याने पैशांचा हिशोब पूर्ण करण्याचे कारण सांगून अनिल पत्की यांना दुचाकीवर बसवून काळरात्री देवी मंदिर परिसरात नेले. तेथे आधीच उपस्थित असलेल्या दोन अनोळखी साथीदारांसह त्याने पत्की यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली.

लाकडी काठी आणि बेल्टने मारहाण

आरोपींनी पत्की यांना लाकडी काठी आणि बेल्टच्या साहाय्याने पाठीवर, डोक्यावर आणि पायावर मारहाण केली. तसेच आरडाओरडा केल्यास किंवा पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सुमारे दोन तास हा मारहाणीचा प्रकार सुरू होता.

मोबाईलमधील सिमकार्ड काढून मोबाईल गायब

मारहाणीनंतर आरोपींनी पत्की यांच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून घेतले आणि मोबाईलही गायब केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जखमी अवस्थेत पत्की यांनी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेची गंभीर दखल घेत परळी शहर पोलिसांनी वैजनाथ यादव आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध अपहरण, मारहाण व धमकीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन गडूवार करत आहेत.

वडिलांच्या मित्राकडूनच मुलीवर 4 महिने लैंगिक अत्याचार; माजी सरपंचा विरुद्ध गुन्हा दाखल

0

आष्टी — तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. वडिलांचाच मित्र असलेल्या माजी सरपंच नवनाथ आयंदे याने अल्पवयीन मुलीवर चार महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडितेला दिवस गेल्याने हे प्रकरण समोर आले. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ आयंदे आणि पीडितेचे वडील मित्र आहेत. त्यामुळे आरोपीचे पीडितेच्या घरी व शेतात सतत येणे-जाणे होते. पीडित तरुणी 12 वी झालेली असून वडिलांना शेतीकामात मदत करत होती.

साधारण चार महिन्यांपूर्वी पीडिता शेतात केळीला पाणी देत असताना आरोपीने तिच्या शेतात येऊन पैशाचे आमिष दाखवले व जबरदस्तीने अत्याचार केला. नकार देऊनही आरोपीने वारंवार अत्याचार केल्याने पीडितेच्या पोटात दुखू लागले. वडील व मावस भावाने तिला माजलगाव येथील खासगी दवाखान्यात नेले. सोनोग्राफीत ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी तिला तात्काळ सरकारी दवाखान्यात पाठवले.

वडिलांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पीडितेने नवनाथ आयंदे याने जबरदस्ती केल्याचे सांगितले. या प्रकरणी प्रथम माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तो पुढील तपासासाठी आष्टी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. आष्टी पोलीस अधिक तपास करत आहेत.

शालार्थ आयडी घोटाळा: मी तर एसआयटीचा भावड्या; पैसे गोळा करण्यासाठी बबड्याच्या अशाही वावड्या

0

बीड — राज्यात सध्या गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” खणून काढण्याचं काम एस आय टी करत आहे. समितीमध्ये प्रामाणिक अधिकाऱ्यांची शासनाने नियुक्ती केलेली असताना देखील आरएसएस विचारधारेने मांडीवर घेतलेल्या बबड्या अर्थात “चंद्रा” (अती शहाणा) ने यामध्ये देखील कसे “कांत” आहोत याचा परिचय दिला एसआयटीतील अधिकाऱ्यांशी माझे संबंध असून ती मॅनेज करण्यासाठी पैसा द्यावाच लागेल अशा वावड्या उडवत अनेक शिक्षकांना गंडा घातल्याचं सांगितलं जात आहे.
भाशिप्र संस्थेच्या माध्यमातून देश हित ,संस्कार यासारख्या कथित गप्पा मारणाऱ्या आरएसएस विचारधारेने मांडीवर घेतलेला “बबड्या” ने आपली गुण उधळायला सुरुवात केली. “वाण नाही पण गुण लागला” याच म्हणीचा प्रत्यय इथे देखील संचालक मंडळातील सदस्यांच्या बाबतीत खरा ठरला. मग काय “एकमेका साह्य करू अवघे धरू कुपंथ” असं म्हणत “चंद्रा“च्या कलेप्रमाणे भ्रष्टाचार पोसण्यास मदत केली. वेतन घोटाळा असो की शालार्थ आयडी घोटाळा, जमीन घोटाळा अथवा संस्थेच्या नावाखाली मान्यता नसताना बोगस इंग्रजी शाळा सुरू करत पालकांना लुटत देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ मांडला.
यासारख्या गोष्टीवरच हे प्रकरण थांबलं नाही तर शासनाने शालार्थ आयडी घोटाळ्यात नियुक्त केलेल्या एसआयटीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल? एसआयटी कडे संशयाने पाहिले जाईल अशी कृती करण्यास देखील त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपूर विभागात एस आय टी ने केलेल्या कारवायांनी अनेक भ्रष्टाचारी शिक्षण संस्था चालकासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, मुख्याध्यापक शिक्षक यांना जेलची हवा खावी लागत आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे तपासाला लागणारा विलंब बीडच्या शिक्षण संस्थांमध्ये पाळे”मुळे” पसरवत भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या सध्या तरी फायद्याचा ठरला. आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. कुणातच तितका दम नाही. असं म्हणत एस आय टी बाबत अनेक वावड्या (अफवा) पसरवण्याच काम भ्रष्टाचारी टोळीचा “कांत” बनलेल्या “बबड्या” ने केलं. बरं एसआयटीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित देखील केलेलं आहे.अशावेळी एस आय टी चे कारवाई झाकोळून टाकण्याच काम केलं गेलं.

यामध्ये एस आय टी आपण मॅनेज केली. त्यासाठी मोठी रक्कम मोजली अशी वावडी उठवत भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवणाऱ्या “प्रसार माध्यमांची” देखील दिशाभूल केली. त्यामुळे पाहिजे तितका आवाज प्रसार माध्यम उठवताना सध्या तरी दिसत नाहीत.
सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये एसआयटी शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करत आहे. चौकशीला सामोरे जाताना अनेकांना छ.संभाजीनगरच्या चकरा माराव्या लागत आहेत. हे वास्तव चित्र असताना एस आय टी ला बदनाम करताना “बबड्या” ने मात्र वावडीच्या जीवावर प्रत्येक शिक्षकाकडून पैसा उकळत कोट्यावधी रुपयाची कमाई केल्याचं सांगितलं जात आहे.

आष्टीत दिवसाढवळ्या घरफोडी; नामांकित वकिलाच्या घरातून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

0

आष्टी — बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात दिवसाढवळ्या झालेल्या धाडसी घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आष्टी-डोईठाण रस्त्यालगत बेलगाव शिवारातील एका नामांकित वकिलाचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलगाव येथील ज्येष्ठ वकील व शेतकरी आदिनाथ गुलबराव पोकळे (वय ६५) हे आपल्या कुटुंबासह आष्टी-डोईठाण मार्गावरील शेतातील घरात वास्तव्यास आहेत. ६ जून रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ते आणि त्यांची पत्नी मीनाक्षी पोकळे शेतात लिंबे तोडण्यासाठी गेले होते.

सुमारे एका तासानंतर सायंकाळी साडेपाच वाजता घरी परतल्यानंतर त्यांना मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला. संशय आल्याने त्यांनी घरात प्रवेश केला असता बेडरूममधील कपाटाचे लॉकही तोडलेले आढळले. चोरट्यांनी कपाटातील सामान आणि महत्त्वाची कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून दिली होती.

तपासात कपाटातून १ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम, १८ ग्रॅम वजनाचे ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गाठण आणि ४ हजार रुपये किमतीची १ ग्रॅम वजनाची सोन्याची फॅन्सी नथ असा एकूण २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले.

या प्रकरणी आदिनाथ पोकळे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयित व्यक्ती आणि गुन्हेगारांची माहिती तपासली जात आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

बीड : १२ दिवसांच्या बाळाला ठेवून महिलेची कंकालेश्वर कुंडात उडी, मृत्यू

0

बीड  — बीड शहरातील ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर परिसरात बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. १२ दिवसांच्या नवजात बाळाला घरी ठेवून एका महिलेने मंदिर परिसरातील कुंडात उडी घेतल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी आनंद सोळुंके (वय ३९) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या मूळच्या पिंपळगाव कोलते येथील रहिवासी असून सध्या बीड शहरातील साई पार्क अपार्टमेंट येथे माहेरी मुक्कामी आल्या होत्या.
बुधवारी सकाळी त्यांनी कंकालेश्वर मंदिर परिसरातील कुंडात उडी घेतल्याची माहिती समोर आली. घटनेची खबर मिळताच पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह कुंडातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईक आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. महिलेने हे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.
या घटनेने विशेषतः नवजात बाळाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात असून शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

पुरुषोत्तमपुरीत 50 भाविकांनी भरलेली बोट उलटली; एका महिलेचा मृत्यू, अनेक जखमी

0

माजलगाव —  बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. या अपघातात एका महिलेचा पाण्यात बूडून दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. एका अल्पवयीन मुलाचा अद्याप शोध लागलेला नसून बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे.


देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमासानिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर मोठी गर्दी झाली होती. याच दरम्यान नदी पार करण्यासाठी निघालेली भाविकांनी भरलेली बोट मध्यप्रवाहात असताना अचानक असंतुलित होऊन उलटली.

बोटीत 40 ते 50 भाविक

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बोटीत सुमारे 40 ते 50 भाविक प्रवास करत होते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवण्यात आल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात येत आहे. बोट उलटताच सर्व प्रवासी नदीत पडल्याने काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अनेक भाविकांनी स्वतः पोहून किनारा गाठला, तर स्थानिक नागरिक, स्वयंसेवक, मच्छीमार आणि प्रशासनाच्या पथकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत अनेकांना सुरक्षित बाहेर काढले.

दोन महिलांचा मृत्यू

या दुर्घटनेत कांताबाई ज्ञानदेव आंधळे ( वय 68 वर्ष ,रा. कुंबेफळ,ता.सिंदखेड ),प्रणिला शेषेराव राठोड (वय 55, रा. लोणार) यांचा मृत्यू झाला. तर सिंधूबाई अर्जुन मवाळ (वय 75, रा. महागाव, जि. वाशिम) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतर जखमी भाविकांवर माजलगाव येथील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

अल्पवयीन मुलाचा शोध सुरू

दुर्घटनेनंतर प्रशासनाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे. मात्र, एका अल्पवयीन मुलाचा अद्याप शोध लागलेला नसून नदीपात्रात शोधमोहीम सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

घटनेनंतर भाविक आणि स्थानिक नागरिकांनी यात्रेतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. बोटीतून प्रवास करणाऱ्या भाविकांना लाईफ जॅकेट देण्यात आले नव्हते, तसेच प्रवाशांची संख्या नियंत्रित करण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक येत असताना बोट वाहतुकीसाठी पुरेशा सुरक्षाव्यवस्था का करण्यात आल्या नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटींमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

चौकशी आणि कारवाईची मागणी

दुर्घटनेनंतर भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.