Home Blog

नीट पेपरफुटी प्रकरण : आंदोलन करणाऱ्या अभिजीत दिपकेला जयपूरमध्ये मारहाण

0

जयपूर —  नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशभर आंदोलन करण्याची घोषणा करणारे अभिजीत दिपके यांना जयपूर येथे आंदोलनादरम्यान मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली 6 जून रोजी नवी दिल्ली आणि 11 जून रोजी पुणे येथे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी लखनऊ, जयपूर आणि अमृतसरसह देशातील विविध शहरांमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

जयपूरमध्ये आंदोलनाची तयारी; पोलिसांनी दिली होती सशर्त परवानगी

कॉकरोच जनता पार्टीकडून (CJP) जयपूर येथील शहीद स्मारक परिसरात NEET पेपरफुटी, शैक्षणिक सुधारणा, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र सुरुवातीला पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जयपूर पोलिसांविरोधात निदर्शने केली.

यानंतर पोलिसांनी आंदोलनासाठी सशर्त परवानगी दिल्यानंतर अभिजीत दिपके जयपूरमध्ये दाखल झाले होते.

मंचाकडे जात असताना हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके हे कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून आंदोलनस्थळी मंचाच्या दिशेने जात होते. याचवेळी काही अज्ञात व्यक्ती त्यांच्या जवळ आल्या. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दिपके यांच्या गळ्यातील उपरणे ओढताना आणि त्यानंतर त्यांना मारहाण करताना दिसत आहे.

घटनेनंतर दिपके यांच्या समर्थकांनी संबंधित व्यक्तीला पकडले. काही काळ आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याला विधायकपुरी पोलीस ठाण्यात नेले.

पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेनंतर जयपूर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून मारहाणीच्या प्रकाराबाबत पुढील कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना घटनास्थळावरून हटवण्यात आले.

NEET पेपरफुटी प्रकरण, धर्मेंद्र प्रधान राजीनामा मागणी आणि जयपूरमधील अभिजीत दिपके यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना आता चर्चेचा विषय ठरत आहे.

लाल परीच्या १० टक्के हंगामी भाडेवाढीला एक महिन्याची मुदतवाढ

0

मुंबई —  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) साध्या बससेवांसाठी लागू केलेल्या १० टक्के हंगामी भाडेवाढीला आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे वाढीव एसटी बस भाडेदर आता १५ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (२४.०० वाजेपर्यंत) लागू राहणार आहेत.
उन्हाळी सुट्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रवासी वाहतुकीचे नियोजन आणि महसूल वाढवण्यासाठी एसटी महामंडळाने १५ एप्रिल २०२६ पासून साध्या बससेवांच्या तिकिट दरात १० टक्के हंगामी वाढ लागू केली होती. या वाढीची मुदत १५ जून २०२६ रोजी संपणार होती.


मात्र, इंधनाच्या वाढलेल्या किमती, बस संचालनाचा वाढता खर्च आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झालेली वाढ यामुळे महामंडळावर आर्थिक भार वाढला आहे. हा खर्च लक्षात घेऊन हंगामी भाडेवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साध्या आणि मिडी बसचे दर कायम

एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार साधी बस आणि मिडी बस सेवांसाठी प्रति टप्पा भाडे ११.०५ रुपये कायम राहणार आहे. तसेच प्रवाशांसाठी किमान भाडेही पूर्वीप्रमाणेच राहणार असून:
प्रौढ प्रवासी : १४ रुपये
मुलांचे प्रवासभाडे : ७ रुपये
असे दर लागू राहतील.
एसटी महामंडळाने सर्व विभाग नियंत्रक, प्रादेशिक व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांना या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रवाशांवर परिणाम काय?

हंगामी भाडेवाढीमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना पुढील एक महिना वाढीव दराने प्रवास करावा लागणार आहे. १५ जुलै २०२६ नंतर भाडेवाढीबाबत पुढील निर्णय महामंडळाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून; शेतकरी, आरक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरणार ?

0

मुंबई  — महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधी आणि कामकाजाच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्यपालांच्या मान्यतेनंतर विधिमंडळ सचिवालयाने याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विधानसभेचे, तर दुपारी १२ वाजता विधान परिषदेचे कामकाज सुरू होणार आहे. तीन आठवड्यांच्या या अधिवेशनात राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

शेतकरी प्रश्नांवर सरकारला घेरण्याची तयारी

राज्यातील शेतकरी कर्जमाफीतील अटी, रखडलेली पीक विमा भरपाई, मान्सूनचा विलंब आणि हवामानातील बदलांचा शेतीवर होणारा परिणाम या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील बदलत्या वातावरणीय परिस्थितीमुळे मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या संकटावरही अधिवेशनात चर्चा होऊ शकते.

मराठा-ओबीसी आरक्षण आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा गाजणार

राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा गुंता, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती, बेरोजगारी आणि प्रशासनातील प्रश्न यावरून दोन्ही सभागृहांमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

महत्त्वाची विधेयके मंजुरीसाठी येणार

या अधिवेशनात सरकारकडून अनेक महत्त्वाची विधेयके आणि शासकीय कामकाज मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रस्तावित ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, २०२६’ हे देखील चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात २९ पैकी २७ विधेयके मंजूर करण्यात आली होती. तसेच विधानसभेचे कामकाज १९७ तासांहून अधिक काळ चालले होते. याच धर्तीवर पावसाळी अधिवेशनातही अधिकाधिक शासकीय कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही अधिवेशन प्रभावीपणे चालवण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशन राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि महत्त्वाच्या निर्णयांच्या दृष्टीने लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर तोडगा

0

पंढरपूर —  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सकारात्मक चर्चा झाल्याने रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.

रोहित पवार यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस होता. तीन दिवस उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. शरीरातील बीपी आणि शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. डॉक्टरांनी सलाईन घेण्याचा सल्ला दिला होता; मात्र मंत्री गिरीश महाजन आल्यानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याची भूमिका रोहित पवार यांनी घेतली होती.

दरम्यान, रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास मंत्री गिरीश महाजन आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांनी संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

मंत्री महाजन यांनी सांगितले की, आंदोलन करण्याआधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असती तर चर्चेतून मार्ग काढता आला असता. आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी रोहित पवार आणि शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल. या बैठकीत मागण्यांवर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

यानंतर रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले. पंढरपूरमधील नामदेव पायरी येथे नतमस्तक होऊन त्यांनी उपोषण सोडले.

शाळा सुरू होण्याआधीच पालकांना महागाईचा फटका; वह्या-पुस्तके, स्टेशनरी 25 टक्क्यांनी महाग

0

मुंबई — नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पालकांच्या खिशाला मोठा फटका बसताना दिसत आहे. विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, रंगसाहित्य, स्कूल बॅग आणि इतर शालेय साहित्याच्या किमतीत यंदा मोठी वाढ झाली आहे. अनेक वस्तूंच्या दरात 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने पालकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.


शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. मात्र वाढलेल्या किमतींमुळे अनेक पालकांना आवश्यक वस्तू घेतानाही खर्चाचा ताळमेळ घालावा लागत आहे.

कागद, छपाई आणि वाहतूक खर्च वाढल्याचा परिणाम

यंदा सर्वाधिक दरवाढ वह्या आणि पुस्तकांच्या किमतीत पाहायला मिळत आहे. कागदाच्या वाढलेल्या किंमती, छपाई खर्च आणि वाहतूक खर्च वाढल्याने प्रकाशक आणि विक्रेत्यांनी दर वाढवले आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक प्रकारच्या वह्या 10 ते 25 टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. पुस्तकांच्या किमतीतही वाढ झाल्याने एका विद्यार्थ्याच्या शैक्षणिक साहित्यावरच हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च येत आहे.

पेन, पेन्सिलपासून प्रोजेक्ट साहित्यापर्यंत दरवाढ

फक्त वह्या आणि पुस्तकांपुरतीच ही दरवाढ मर्यादित राहिलेली नाही. पेन, पेन्सिल, इरेजर, शार्पनर, रंगसाहित्य, ड्रॉईंग साहित्य तसेच प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे.
शालेय साहित्याचा पूर्ण संच खरेदी करताना पालकांना अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करावा लागत आहे. विशेषतः दोन किंवा तीन मुलांच्या कुटुंबांवर या वाढलेल्या खर्चाचा मोठा परिणाम होत आहे.

फी, गणवेश आणि वाहतूक खर्चासोबत वाढले आर्थिक ओझे

आधीच वाढत्या महागाईमुळे घरगुती खर्च वाढले आहेत. त्यात आता शालेय साहित्याच्या दरवाढीची भर पडल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
शाळेची फी, गणवेश, वाहतूक खर्च आणि शैक्षणिक साहित्य या सर्व खर्चांचा विचार करता नवीन शैक्षणिक वर्ष अनेक कुटुंबांसाठी आर्थिक आव्हान ठरत आहे.
अनेक पालक आता महागड्या वस्तूंऐवजी कमी किमतीचे पर्याय शोधत असून गरजेपुरतीच खरेदी करण्यावर भर देत आहेत.

पुरुषोत्तमपुरी होडी दुर्घटनेतील महिलांच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

0

माजलगाव —  तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीत भाविकांची वाहतूक करणारी होडी पलटून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून निष्काळजीपणे होडी चालवल्याचा ठपका ठेवत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक मासानिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे यात्रा सुरू असून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. भाविकांना नदीपात्रातून दर्शनासाठी ने-आण करण्यासाठी होडी वाहतूक सुरू होती. मात्र संबंधित होडीत निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

१० जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली दुर्घटना

१० जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात भाविकांनी भरलेली होडी अचानक पलटली. होडीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने अनेक भाविक पाण्यात पडले. या दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा बुडून मृत्यू झाला, तर काही भाविक जखमी झाले.

मृतांमध्ये प्रमिला शेषराव राठोड (वय ५५, रा. बीबी, ता. लोणार, जि. बुलढाणा) आणि कांता ज्ञानदेव आंधळे (वय ५३, रा. कुंभेफळ, ता. सिंदखेड, जि. बुलढाणा) यांचा समावेश आहे.

सुरक्षा सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या नोटिसा आणि सुरक्षाविषयक सूचनांचे उल्लंघन करून धोकादायक पद्धतीने प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी पुरुषोत्तमपुरी नामदेव राजाराम कोकाटे यांच्या फिर्यादीवरून उद्धव बळीराम गायकवाड आणि दुर्गा उद्धव गायकवाड (रा. चागतपुरी, ता. परतूर, जि. जालना) यांच्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.

पंढरपूरमध्ये टेम्पो विहीरीत कोसळून रांजणीतील १४ भाविकांचा मृत्यू

0

माळशिरस (सोलापूर) : म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ घडलेल्या भीषण अपघातात १४ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळला. मृतांमध्ये महिला, पुरुषांसह लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून रांजणी गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविकांचा एक समूह देवदर्शनासाठी गेला होता. त्यांनी सिद्धनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर घरी परतीचा प्रवास सुरू केला होता. मात्र म्हसवड-पंढरपूर मार्गावर माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाच्या हद्दीत हा टेम्पो अचानक अनियंत्रित झाला आणि थेट विहिरीत कोसळला.
अपघाताची माहिती मिळताच तांदूळवाडी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासनाच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले.विहिरीतून आतापर्यंत ८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मृतांमध्ये ४ निष्पाप लहान मुले आणि ४ महिलांचा समावेश विहिरीतून मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

या दुर्घटनेतील मृत सर्व भाविक रांजणी गावातील असल्याचे सांगितले जात असून, काही मृत एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र मृतांची अधिकृत नावे प्रशासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.
या भीषण दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सध्या पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने विहिरीतून उर्वरित मृतदेह आणि वाहन बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

बीड शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; महिला चोरट्या आणि मोबाईल चोरी टोळी पकडली 

0

बीड — बीड शहरातील बस स्थानक आणि विविध भागात महिलांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या टोळ्यांविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बस स्थानकावर महिलांच्या पर्स, दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या दोन महिला आरोपींना रंगेहात पकडल्यानंतर आता महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळणाऱ्या तीन जणांच्या टोळीला देखील पोलिसांनी दोन तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

या सलग कारवायांमुळे बीड शहरातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी प्रभावी पाऊल उचलले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बस स्थानकावर महिलांची पर्स चोरणाऱ्या दोन महिला जेरबंद

बीड बस स्थानकावर मागील काही दिवसांपासून महिला प्रवाशांचे दागिने, मोबाईल आणि पर्स चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांची गंभीर दखल घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने कारवाई केली.

दि. १२ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे दीड ते सव्वादोन वाजण्याच्या दरम्यान एका महिला प्रवासी बसमध्ये चढत असताना दोन महिलांनी गर्दीचा फायदा घेत धक्का देत तिच्या हातातील खाकी रंगाची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला.

मात्र, संबंधित महिलेने आरडाओरडा केल्यानंतर बस स्थानकावरील पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी तत्काळ धाव घेत दोन्ही महिलांना पकडले. त्यांच्याकडून चोरीची रोकड आणि पर्स हस्तगत करण्यात आली.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

गर्दीचा फायदा घेत महिलांना करत होत्या टार्गेट

या महिला चोरट्या सामान्य वेशात गर्दीत मिसळून चोरी करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे लक्ष विचलित करून पर्स, मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरण्याची त्यांची पद्धत होती.

महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावणारी टोळी पकडली

शिवाजीनगर पोलीस हद्दीत दिवसाढवळ्या महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळणाऱ्या तीन मोटरसायकलस्वार चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते.

अवघ्या १५ ते २० मिनिटांच्या अंतराने तीन महिलांचे मोबाईल हिसकावण्यात आले होते.

पहिल्या घटनेत अश्विनी कृष्णा सुर्वे या दीप हॉस्पिटल परिसराकडे जात असताना स्वराज्य नगर कमानीसमोर फोनवर बोलत होत्या. यावेळी मोटरसायकलवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला.

दुसऱ्या घटनेत मिराबाई बाळू मुळीक यांचा सरस्वती विद्यालय परिसरातून जात असताना मोबाईल हिसकावण्यात आला.

तर तिसऱ्या घटनेत के. एस. के. कॉलेजसमोरून जाणाऱ्या एका नर्स महिलेच्या एप्रनच्या खिशातील मोबाईल चोरट्यांनी पळवला.

दोन तासांत पोलिसांनी लावला छडा

घटनांची माहिती मिळताच शिवाजीनगर डीबी पथकाने पाच पथके तयार केली. दोन ठिकाणी नाकाबंदी करत अवघ्या दोन तासांत आरोपींना ताब्यात घेतले.

अटक आरोपी:

1) आवेश खान खाजा शेख (वय २२), रा. कानडी रोड, केज

2) गणेश श्रीराम मुंडे, रा. किल्ले धारूर, बीड

3) ऋषिकेश लक्ष्मण वायबसे (वय १९), रा. कासारी, ता. केज

आरोपींकडून चोरीचे तब्बल ९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मोबाईल चोरी करून त्यांचे पार्ट विक्री करण्याचे काम हे आरोपी करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांची धडाकेबाज कारवाई

ही कारवाई बीड जिल्ह्याच्या प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम आणि शिवाजीनगर पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच महिला पोलीस जमादार मीरा पाटील यांनी तपासात विशेष योगदान दिले.

शिवाजीनगर पोलिसांनी या कारवायांमुळे चोरी करणाऱ्या टोळ्यांना स्पष्ट संदेश दिला असून पुढील काळात अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले

मैंदा ग्रा.पं.मध्ये मनरेगाची कामं कागदावरच ग्रामरोजगार सेवकाची सेवा समाप्त; ग्रामसेवक, सरपंचाची मात्र पाठराखण

0

बीड —  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कामांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्याने बीड तालुक्यातील ग्राम पंचायत मैंदा येथील ग्रामरोजगार सेवकावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ग्रामसेवक, सरपंच, पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक, बीडीओ सह लाभधारकांची पाठराखण करत संबंधित ग्रामरोजगार सेवक दिंगबर गोपिचंद पवार यांची सेवा समाप्त करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या मनरेगा विभागाकडून जारी करून बळीचा बकरा बनवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. 20 मे 2026 रोजी ग्राम पंचायत मैंदा येथे मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी कामाची ठिकाणे आणि संबंधित अभिलेख तपासण्यात आले असता अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.
पाहणीमध्ये शेततलाव आणि फळबाग अशा सहा कामांची प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली असता नमूद ठिकाणी काम अस्तित्वात नसल्याचे आढळून आल्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.
या कामांवर मनरेगा संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात अकुशल व कुशल खर्च दाखविण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष स्थळी काम आढळून न आल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली.
यामध्ये श्रीमती सत्यवती शिवाजी घोरड यांचे शेततलाव व फळबाग, संतोष भारत घुमरे यांचे शेततलाव,  अमोल भारत घुमरे यांचे शेततलाव, रमेश लिंबा पवार यांची फळबाग तसेच श्रीमती अनुसया कांबळे यांची फळबाग या कामांचा समावेश आहे. या कामांमधून 19 लाख 64 हजार रुपये इतकी शासनाची खोट्या कागदपत्रांच्या मदतीने हडपली गेली. या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये ग्रामपंचायतचा सरपंच, ग्रामसेवक,

पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक, बीडीओ सह लाभधारकांनी तसेच ज्या मजुरांच्या नावावर ही रक्कम जमा करण्यात आली. ते देखील या भ्रष्टाचाराला तितकेच जबाबदार आहेत. या सगळ्यांची पाठराखण करत ग्राम रोजगार सेवकाला बळीचा बकरा बनवण्यात आले. झालेल्या भ्रष्टाचाराचा खापर ग्रामरोजगार सेवकाच्या माथी फोडण्यात आलं.
या प्रकरणी ग्रामरोजगार सेवक दिंगबर गोपिचंद पवार यांना 25 मे 2026 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. गटविकास अधिकारी पंचायत समिती बीड यांच्यामार्फत तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र मुदत संपल्यानंतरही संबंधित ग्रामरोजगार सेवकांनी खुलासा सादर केला नाही. तसेच कामातील त्रुटी आणि असमाधानकारक कामकाज लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनरेगा योजनेतील कामांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर जि प चे सीईओ जितेन  रहेमान यांनी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

बालविवाह प्रकरणात नवरदेवावर पॉक्सो ऍक्टने तर आई – वडील, सासू-सासर्‍यावर गुन्हे दाखल

0

माजलगाव — तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह नवरदेव, सासू आणि सासरे अशा पाच जणांविरोधात माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचा विवाह परभणी जिल्ह्यात लावून देण्यात आला होता. दरम्यान, ९ जून रोजी संबंधित मुलीला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने तिला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
वैद्यकीय तपासणीदरम्यान संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी मुलीच्या वयाची पडताळणी केली असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मुलीच्या आई-वडिलांनी बालविवाह लावून दिल्याप्रकरणी तसेच सासू-सासऱ्यांनी विवाहाला सहकार्य केल्याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने आणि ती गर्भवती झाल्याने तिच्या पतीविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे एपीआय सचिन धोरणाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाकडून करण्यात येत आहे.