Home Blog

तलाव भूसंपादन घोटाळा : तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अव्वल कारकून श्रीनिवास मुळे, यांच्यावर कारवाईची टांगती तलवार!

0

उच्च न्यायालयाचा दणका; चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर – भूसंपादन घोटाळ्यातील संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करा : डॉ. गणेश ढवळे

बीड —  जिल्ह्यातील मेंगडेवाडी (ता. पाटोदा) येथील तलाव भूसंपादन प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहारामुळे तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अव्वल कारकून श्रीनिवास मुळे तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि वकील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बनावट कागदपत्रे, खोटे अहवाल व बनावट सही-शिक्क्यांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून १ कोटी ४६ लाख ३५ हजार ७७७ इतक्या रकमेचा अपहार करण्यात आला असून, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

या प्रकरणी प्रशासनाने कारवाई टाळल्याने शेतकरी बाबासाहेब रावसाहेब मेंगडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात रिट याचिका क्रमांक १८०४/२०२६ दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर भूसंपादन प्रशासनाने सखोल चौकशी करून २९ मे २०२६ रोजी आपला अहवाल बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता निर्माण झाली असून महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

मेंगडेवाडी तलाव भूसंपादनातील कथित गैरव्यवहार

पाटोदा तालुक्यातील मौजे मेंगडेवाडी येथील गट क्रमांक १०० मधील बाबासाहेब मेंगडे यांची सुमारे दीड एकर जमीन गाव तलाव क्रमांक ५ (लमाणतळ) प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. नियमानुसार प्रत्यक्ष संयुक्त मोजणी होणे आवश्यक असताना ती न करताच कार्यालयात बसून बनावट मोजणी अहवाल तयार करण्यात आला. त्यानंतर खोट्या सही-शिक्क्यांच्या आधारे अंतिम निवाडा करून शासनाची १.४६ कोटींहून अधिक रक्कम परस्पर हडप करण्यात आली.

या प्रकरणी डॉ. गणेश ढवळे यांनी मेंगडे कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन तलावाची स्थळ पाहणी करून कागदपत्रांची पडताळणी करून त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

भूसंपादन घोटाळ्यात मोठे रॅकेट कार्यरत”

डॉ. गणेश ढवळे यांनी बीड जिल्ह्यात भूसंपादनातील अशा प्रकारचे मोठे रॅकेट कार्यरत असुन केवळ मेंगडेवाडीच नव्हे तर जिल्ह्यातील इतर भूसंपादन प्रकरणांचीही सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संपूर्ण रॅकेट नेस्तनाबूत करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, तक्रारदार शेतकरी बाबासाहेब मेंगडे यांनीही बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अपहाराची रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर सादर झालेल्या चौकशी अहवालावर आता जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकसभेत परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यातील दुरुस्ती विधेयक मंजूर

0

नवी दिल्ली —  देशभरात वारंवार उघड होणाऱ्या पेपरफुटी आणि परीक्षा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आणखी कठोर भूमिका घेतली आहे. ‘द पब्लिक एक्झामिनेशन्स (प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स) (अमेंडमेंट) बिल, 2026’ हे विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर झाले. या दुरुस्तीमुळे केवळ दोषींवरील शिक्षाच कठोर होणार नाही, तर तपास आणि न्यायप्रक्रियाही निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारली जाणार आहे.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी संसदेत विधेयक मांडताना सांगितले की, गेल्या काही वर्षांत विविध राष्ट्रीय स्पर्धा आणि भरती परीक्षांतील पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे विद्यमान कायद्यात अधिक प्रभावी आणि वेळबद्ध तरतुदी करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती.

दुरुस्तीतील महत्त्वाच्या तरतुदी

प्रत्येक राज्यात पेपरफुटी प्रकरणांच्या तपासासाठी स्पेशल टास्क फोर्स (STF) स्थापन करण्यात येणार.
तपास निश्चित कालमर्यादेत पूर्ण करणे बंधनकारक.
प्रकरणांच्या जलद निकालासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना.
संघटित पेपरफुटी रॅकेटवर अधिक कठोर कारवाई.
परीक्षा घेणाऱ्या संस्थांची जबाबदारी आणि पारदर्शकता वाढविण्यावर भर.

शिक्षेत मोठी वाढ

नव्या तरतुदीनुसार, वैयक्तिक स्तरावर पेपरफुटी किंवा परीक्षा गैरप्रकार करणाऱ्यांना पाच वर्षांपर्यंत कारावास आणि ₹10 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. तर संघटित रॅकेट चालवणाऱ्यांना दहा वर्षांपर्यंत कारावास आणि ₹1 कोटीपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद आहे. गैरप्रकारातून मिळालेल्या आर्थिक फायद्याची वसुलीही केली जाणार आहे.

कोणत्या परीक्षांना लागू होणार?

हा कायदा केंद्र सरकार किंवा अधिसूचित संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या सार्वजनिक परीक्षांना लागू राहणार आहे. यात UPSC, SSC, RRB, IBPS, NTA तसेच केंद्र सरकार अधिसूचित करेल त्या इतर भरती आणि प्रवेश परीक्षांचा समावेश आहे.

राज्यसभेची मंजुरी बाकी

लोकसभेची मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक आता राज्यसभेत मांडले जाणार आहे. दोन्ही सभागृहांची मंजुरी आणि राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर हा सुधारित कायदा देशभर लागू होईल.

शाळांसाठी नवे अन्नसुरक्षा नियम; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी तुकाराम मुंढे यांची मोठी मोहीम

0

सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र’ अभियान सुरू; कँटीन, मध्यान्ह भोजन, वसतिगृहातील जेवणावर एफडीएची कडक नजर

मुंबई — राज्यातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सकस आणि पोषणमूल्यांनी समृद्ध आहार मिळावा यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर ‘सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय, खासगी, अनुदानित तसेच कोणत्याही शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांना एकसमान अन्नसुरक्षा नियम लागू होणार आहेत.

राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांमध्ये सुमारे दोन कोटी विद्यार्थी शिक्षण घेत असून, प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळणे हा मूलभूत हक्क असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.

नवीन नियमांनुसार शाळेतील कँटीन, मध्यान्ह भोजन पुरवठादार, वसतिगृहातील मेस तसेच अंगणवाडीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अन्न पुरवणाऱ्या सर्व संस्थांकडे एफएसएसएआय (FSSAI) चा वैध परवाना असणे अनिवार्य करण्यात आले आहे. परवानाधारक पुरवठादारांकडूनच अन्नसामग्री खरेदी करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी आहाराच्या सवयी विकसित करण्यासाठी शाळेच्या ५० मीटर परिसरात जास्त चरबी, मीठ आणि साखरयुक्त (HFSS) पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच अशा पदार्थांच्या जाहिरातीही शाळांच्या परिसरात करता येणार नाहीत.

या नियमांची अंमलबजावणी करण्याची प्राथमिक जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापनावर सोपविण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक शाळेत ‘ईट राईट स्कूल’ संकल्पना राबविणे बंधनकारक करण्यात आले असून, वर्षातून किमान दोन वेळा एफडीएकडून अन्नाची तपासणी केली जाणार आहे. अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जाणार असून, प्रत्येक शाळेत फूड सेफ्टी बोर्ड लावणे आणि फूड सेफ्टी सुपरवायझरची नियुक्ती करणेही आवश्यक राहणार आहे.

शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वयंपाकगृह आणि अन्नसुरक्षेच्या सर्व निकषांचे पालन करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या मोहिमेत शिक्षण विभाग आणि समाजकल्याण विभाग सक्रिय सहभाग घेणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

पंकजा मुंडेंचा वाढदिवस: गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप; माऊली ग्रुप व राजेश चरखा यांचा सामाजिक उपक्रम

0

माऊली ग्रुप व राजेश चरखा माध्यमातून विद्यार्थ्यांना केली मदत

दुर्गादास लांब यांच्या माध्यमातून बनकरंजा जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रमाचे आयोजन

केज — ना. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब, ( मंत्री महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन व पर्यावरण वातावरणीय बदल ) यांच्या वाढदिवसानिमित्त आगळ्यावेगळ्या आणि स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत, बीड येथील राजेशजी चरखा ( कोषाध्यक्ष, बीड शहर ) , महादेव नागरगोजे ( तालुका सरचिटणीस बीड ), अमोल वडकिले , कंडू कटले , संतोष गवळी , भालचंद्र कुलकर्णी, सुरेश खराटे , दुर्गादास लांब , यांच्या माध्यमातून ना. पंकजाताई यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना दप्तर (स्कूल बॅग) बनकरंजा जिल्हा परिषद शाळा तालुका केज या ठिकाणी मोफत वाटप करण्यात आले.

सध्या महागाईच्या काळात गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी लागणारे साहित्य खरेदी करणे कठीण जाते. हीच बाब लक्षात घेऊनदप्तर वाटप कार्यक्रमाचे आयोजन बनकरंजा येथे दुर्गादास लांब यांच्या माध्यमातून करण्यात आले

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक कुरवडे सर प्रमुख पाहुणे राजेश चरखा यांच्यासह बीड येथील माऊली ग्रुप चे सर्व पदाधिकारी व बनकरंजा गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते यांच्या राजेश चरखा व माऊली ग्रुप बीड यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा बनकरंजा ता. केज येथील 190 विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले याप्रसंगी गावातील विष्णू शंकर नागरगोजे, यांच्यासह गावातील व परिसरातील नागरिक, मान्यवर तथा शाळेतील सर्व शिक्षक, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्य अतिथींनी सांगितले की, “वाढदिवसावर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा अशा सामाजिक उपक्रमांतर्गत गोरगरीब मुलांच्या शिक्षणाला हातभार लावणे हे अत्यंत कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे समाजातील इतर घटकांनाही प्रेरणा मिळेल.”

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रमेश चाटे सर यांनी केले, तर उपस्थित ग्रामस्थ व लहान मुलांनी वाढदिवसानिमित्त ना. पंकजाताई मुंडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

पर्यावरण संवर्धन हीच पंकजाताईंना खरी वाढदिवसाची भेट — डॉ.योगेश क्षीरसागर

0

चौसाळा, शिवणी येथे वृक्षारोपण; पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

बीड  — ना.पंकजाताई मुंडे या महाराष्ट्राच्या पर्यावरण या महत्वपूर्ण खात्याच्या मंत्री आहेत. त्यांच्या आवाहनाला अनुसरून पर्यावरण संवर्धन करणे हीच पंकजाताई मुंडे यांना खरी वाढदिवसाची खरी भेट आहे. वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून भावी पिढ्यांसाठी हरित भविष्य घडविण्याचा संकल्प आहे. प्रत्येक नागरिकाने झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली, तर पर्यावरण रक्षणाची चळवळ अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.

पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड तालुक्यातील चौसाळा येथे सोमवारी (दि.२७) वृक्षारोपण आणि शालेय साहित्य वाटपाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.क्षीरसागर हे बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, जिल्हा सरचिटणीस देविदास नागरगोजे, जिल्हा सचिव शांतीनाथ डोरले, माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत फड, शहर मंडळ प्रमुख अशोक लोढा, ग्रामीण मंडळ प्रमुख मनोज पाटील, अशोक रसाळ, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौसाळा येथील नवगण शिक्षण संस्था संचलित कला, विज्ञान महाविद्यालयाच्या सुमारे ०.५० हेक्टर परिसरात डॉ.क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून १५ हजार वृक्षांची लागवड करून घनदाट जंगल प्रकल्प साकारण्यात आला आहे. यावेळी माजी सभापती काकासाहेब जोगदंड, गणेश काकडे, इम्रान जागीरदार, लहू नाईकवाडे, प्राचार्य पंडित खाकरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर चौसाळा येथील कै.चांदमल लोढा विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमातही डॉ.क्षीरसागर सहभागी झाले. यावेळी तानाजी थोरात, भीमराव विधाते, चंद्रकांत मुळे, राहुल जोगदंड, गणेश काकडे, विनोद कळासे, अंकुश कळासे, भागवतराव आंधळे, अंकुश गोरे, आप्पा झोडगे आदी उपस्थित होते.

त्यानंतर शिवणी येथील धम्मभूमी महाविहार परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाऊनाना सुरवसे, भगीरथ बांडे, उद्धव म्हेत्रे, अशोक वैद्य, नामदेव म्हेत्रे, महादेव नागरगोजे, आयोजक शाम राऊत, बाळासाहेब डोळस यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. याच उपक्रमाचा भाग म्हणून परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचेही वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि शैक्षणिक प्रोत्साहन अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ना. पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

पुढील वर्षी नेतृत्वासोबतच वृक्षांचाही वाढदिवस साजरा करूया-शंकर देशमुख

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हाभर वृक्षारोपण करण्यात आले. आता पर्यावरण मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्तही त्याच उत्साहाने हरित उपक्रम राबविले जात आहेत. झाडे लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांचे संगोपन करणेही आवश्यक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने लावलेल्या झाडाची जबाबदारी स्वीकारून ते जगविले पाहिजे. पुढील वर्षी नेतृत्वाबरोबरच लावलेल्या वृक्षांचाही वाढदिवस साजरा केला पाहिजे. अशा सातत्यपूर्ण प्रयत्नातून पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ अधिक बळकट होईल, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी व्यक्त केले.

घरगुती वादातून मुलानेच केली वडिलांची हत्या; वडवणी तालुक्यात खळबळ

0

वडवणी — वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे घरगुती वादातून एका मुलानेच आपल्या ७० वर्षीय वडिलांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या वृद्ध वडिलांवर मुलाने विटेने हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे चिंचवण गावासह परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
मृताचे नातू शुभम फुलचंद कोठुळे (वय २०, रा. चिंचवण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी फुलचंद श्रीकिसन कोठुळे याच्याविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

वाद मिटविण्यासाठी गेले अन् जीव गमावला

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २७) सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास कोठुळे कुटुंबात घरगुती कारणावरून वाद सुरू होता. यावेळी कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य श्रीकिसन भागोजी कोठुळे (वय ७०) यांनी वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, याच कारणावरून संतप्त झालेल्या फुलचंद कोठुळे याने “तुम्ही आमच्या भांडणात सारखे का पडता?” असे म्हणत अंगणातील वीट उचलली आणि वडिलांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जोरदार वार केले.
या हल्ल्यात श्रीकिसन कोठुळे गंभीर जखमी झाले. डोक्याला व चेहऱ्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

नातवाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

घटनेनंतर मंगळवारी (दि. २८) शुभम कोठुळे यांनी वडवणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी फुलचंद श्रीकिसन कोठुळे याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ११५(२) आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडवणी पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, कौटुंबिक वादाचे नेमके कारण, घटनेमागील पार्श्वभूमी आणि इतर पुराव्यांचा तपास केला जात आहे.

CJP आंदोलनानंतर E20 ची ठिणगी! वाहनधारकही रस्त्यावर; दिल्लीत सरकारविरोधात तीन मोठी आंदोलने

0

नवी दिल्ली —  नीट यूजी पेपर लीक प्रकरणावरून झालेल्या CJP आंदोलनाने केंद्र सरकारला मोठा राजकीय धक्का दिला. विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनाची धग अजून ओसरलेली नसतानाच आता E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल हा नवा मुद्दा देशभर पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
यावेळी विद्यार्थी नव्हे, तर वाहनधारक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष आणि वाहतूक संघटना सरकारविरोधात एकवटताना दिसत आहेत. दिल्लीत 31 जुलैपासून 4 ऑगस्टपर्यंत सलग आंदोलनांची घोषणा करण्यात आली असून, E20 धोरणावर केंद्र सरकारला कठीण प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो.
या आंदोलनाची पहिली ठिणगी 31 जुलै रोजी पडणार आहे. सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती तहसीन पूनावाला यांनी इंडिया गेट ते संसद मार्ग असा वाहन मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत इथेनॉल धोरणावर सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
यानंतर 1 ऑगस्ट रोजी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘नॅशनल टाऊनहॉल अगेन्स्ट E20’ आयोजित केले आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमांतून नागरिक सहभागी होऊ शकणार आहेत. CJP आंदोलनाप्रमाणेच लोकांनी एकत्र येऊन सरकारसमोर प्रश्न उपस्थित करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, 4 ऑगस्ट रोजी दिल्लीतील टॅक्सी आणि वाहतूक संघटनांनी संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. E20 इंधनामुळे वाहनांच्या इंजिनवर होणारा परिणाम, देखभाल खर्च आणि व्यावसायिक वाहनचालकांच्या अडचणींबाबत सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी त्यांची मागणी आहे.
एकाच मुद्द्यावर अवघ्या चार दिवसांत तीन मोठ्या आंदोलनांच्या घोषणा झाल्याने E20 वाद आता सोशल मीडियापुरता मर्यादित राहिलेला नाही. CJP आंदोलनाप्रमाणेच या आंदोलनालाही व्यापक लोकसमर्थन मिळाले, तर केंद्र सरकारची कोंडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दिल्लीतील या घडामोडींवर आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्यात संजय गरुड पकडला; कनेक्शन”मुळे”बीडकडे संशयाची सुई; संस्थाचालकांची हळूच निघाली पूंई

0

बीड — राज्यात गाजत असलेल्या तब्बल 160 कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य संशयित शिक्षण संस्थाचालक संजय गरुड याला सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते परिसरातून अटक केली आहे. मात्र या कारवाईपेक्षा अधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे या घोटाळ्याचे बीड कनेक्शन. तपासात समोर आलेल्या धागेदोऱ्यांमुळे बीडमधील काही शिक्षण संस्थाचालक आणि जुन्या शालार्थ मंजुरींची चौकशी वेगाने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून संजय गरुड फरार होता. त्याचा माग काढण्यासाठी नाशिक गुन्हे शाखेचे पथक दोन दिवस सोलापूर परिसरात तळ ठोकून होते. मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नातेपुते येथील ठिकाणी छापा टाकून अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले.

हिंगोणेकरांच्या चौकशीतून उघड झाला गरुडचा ठावठिकाणा

या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांनी चौकशीत महत्त्वाची माहिती दिल्याचे समोर आले आहे. त्याच्या माहितीच्या आधारेच तपास पथकाने संजय गरुडपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
तपासानुसार, हिंगोणेकर यांने अधिकारांचा गैरवापर करून 259 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य वैयक्तिक मान्यता दिली होती. यातील बहुतांश कर्मचारी हे संजय गरुडच्या संस्थांशी संबंधित असल्याचे तपासात उघड झाले आहे.

बीड कनेक्शन ठरतेय तपासाचा केंद्रबिंदू

या घोटाळ्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शशिकांत हिंगोणेकर यांचा बीडमधील कार्यकाळ. त्यांनी 2015 ते 2017 या कालावधीत बीड जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम केले होते. त्यामुळे त्या काळात मंजूर झालेल्या शालार्थ प्रकरणांच्या फाईली आता तपासाच्या रडारवर आल्या आहेत.
हिंगोणेकर यांच्या कबुलीजबाबातून मिळालेल्या माहितीमुळे बीडमधील शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वाढली आहे. तपास यंत्रणा आता बीडमधील काही संस्थाचालक, मंजुरी प्रक्रिया आणि आर्थिक गैर व्यवहारांची पडताळणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बीडमध्ये वाढली धास्ती

याआधी या घोटाळ्यात धुळे येथील संशयित प्रशांत तुळशीराम वाडिले याला अटक करण्यात आली होती. त्याच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिक पोलिसांच्या पथकाला बीड कनेक्शन ची माहिती यापूर्वीच मिळाली आहे . तसेच आरोपी हिंगोणेकर पोलिसांसमोर पोपटासारखा बोलत आहे. त्याच्याच माहितीच्या आधारे पोलीस संजय गरुड पर्यंत पोहोचली. वाडीले आणि हिंगोणेकर या दोघांकडूनही बीड कनेक्शन समोर आल्यामुळे पोलिसांचा रडावर वर बीडचे संस्थाचालक देखील आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थाचालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, तपासाचा फास आणखी आवळण्याची चिन्हे आहेत.

481 पैकी 438 कर्मचारी जळगावचे

तपासात आतापर्यंत 481 संशयित कर्मचारी समोर आले असून त्यापैकी 438 कर्मचारी हे जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे राज्य शासनाची 160 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप असून, संजय गरुड हा या प्रकरणातील सहावा अटक आरोपी ठरला आहे.
संजय गरुडच्या शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेअंतर्गत जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा तालुक्यांतील 15 माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांच्या शालार्थ नोंदींचीही सखोल चौकशी सुरू आहे.

रावसाहेब दानवे यांच्या नातूसह 8 जणांवर 10 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

नाशिक — माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम मुकेश पाटील यांच्यासह आठ जणांविरुद्ध नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीतील शेअर भागीदारीच्या व्यवहारात तब्बल 10 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणामुळे उद्योग आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

फिर्यादी कैलास अहिरे हे नाशिकमधील सातपूर एमआयडीसी परिसरातील एन. व्ही. ऑटो स्पेअर्स प्रा. लि. या कंपनीचे संचालक असून ते भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षही आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, कंपनीवरील आर्थिक अडचणी सोडवून देण्याचे आश्वासन देत कंपनीतील 14 टक्के शेअर्सच्या बदल्यात 25 कोटी रुपयांचा व्यवहार निश्चित करण्यात आला होता.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, या व्यवहाराअंतर्गत सुरुवातीला 14 कोटी 34 लाख 98 हजार रुपये देण्यात आले. मात्र उर्वरित 10 कोटी रुपये देण्यात आले नाहीत. त्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही संबंधितांनी टाळाटाळ केली. तसेच कंपनीचे शेअर्स परस्पर इतरांच्या नावे हस्तांतरित करून फिर्यादीची दिशाभूल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवम मुकेश पाटील (रावसाहेब दानवे यांचा नातू), गिरीश पवार, सतीश अग्रवाल, संजय कतीरा, सुभाष कतीरा, कौस्तुभ लटके, धीरेंद्र प्रसाद आणि मंदार टाकळकर यांच्याविरुद्ध फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणुकीची रक्कम डमी खात्यांद्वारे वळविणे आणि फिर्यादीची दिशाभूल केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. सातपूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सीईटी-टीईटी पेपरफुटीवरून सरकारवर हल्लाबोल; दादा भुसे यांच्या राजीनाम्यासाठी ७ दिवसांचा अल्टिमेटम

0

मुंबई — राज्यातील सीईटी आणि टीईटी परीक्षांतील कथित पेपरफुटी, शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून एनएसयूआय आणि युवक काँग्रेसने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून सात दिवसांच्या आत राजीनामा द्यावा, अन्यथा समविचारी पक्ष आणि विद्यार्थी संघटनांसह राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे अध्यक्ष सागर साळुंखे आणि मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी दिला.

मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिक्षण विभागाच्या कारभारावर टीका करण्यात आली. यावेळी एनएसयूआय आणि युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांची प्रतीकात्मक गुणपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील अपयशाचा उल्लेख करत या गुणपत्रिकेत त्यांना ‘नापास’ घोषित करण्यात आल्याचे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सागर साळुंखे यांनी आरोप केला की, सीईटी आणि टीईटी परीक्षांतील कथित गैरव्यवहारामुळे सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून लाखो पालक मानसिक तणावाखाली आहेत. शिक्षण व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असून शिक्षकांवर विविध शासकीय कामांचा अतिरिक्त भार टाकल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

तसेच नंदुरबारमधील आदिवासी विद्यार्थ्यांची कथित आर्थिक फसवणूक, बोगस नर्सिंग महाविद्यालयांचा वाढता सुळसुळाट, काही महाविद्यालयांकडून आकारले जाणारे अवाजवी शुल्क आणि अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विलंब यांसारखे प्रश्न उपस्थित करत शिक्षण विभागाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी सांगितले की, टीईटी प्रकरणानंतरही सरकारने ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाही. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवहार, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर राज्य सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही एनएसयूआय आणि युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.