Home Blog Page 2

१८ जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट; मंगळवारी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय?

0

मुंबई —  राज्यातील अनेक भागांत पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात आली आहेत. कमी पावसामुळे राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पिकांची स्थिती, नुकसानीचे प्रमाण, पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती याचा प्रशासनाकडून सध्या सविस्तर आढावा घेतला जात आहे.

संबंधित १८ जिल्ह्यांकडून सोमवारपर्यंत सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना मदत आणि आवश्यक उपाययोजनांबाबत सरकारकडून निर्णय होण्याची शक्यता आहे.

या १८ जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती

अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि नंदुरबार या १८ जिल्ह्यांचा दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मात्र, या सर्व जिल्ह्यांतील परिस्थिती एकसारखी नाही. पावसाचे प्रमाण, भौगोलिक परिस्थिती, पिकांची अवस्था आणि नुकसानीची तीव्रता यामध्ये फरक आहे. त्यामुळे जिल्हानिहाय अहवालाच्या आधारेच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

उपग्रहाद्वारे पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन

पिकांचे अचूक नुकसान निश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून पारंपरिक पाहणीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. उपग्रह छायाचित्रे आणि डिजिटल प्रतिमांच्या माध्यमातून पिकांची सद्यस्थिती तपासली जात आहे.

सध्या प्राथमिक सर्वेक्षण सुरू असून जिल्ह्यांचे सविस्तर अहवाल आल्यानंतर पिकांच्या नुकसानीचे अधिक स्पष्ट चित्र समोर येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे नुकसान निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मराठवाड्यात सोयाबीन, कापूससह खरीप पिकांना फटका

मराठवाड्यातील अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत पावसाच्या खंडाचा खरीप पिकांवर परिणाम झाला आहे.

या भागात सोयाबीन, कापूस, हळद, उडीद आणि मूग या पिकांवर पावसाअभावी परिणाम झाला आहे. पावसाने उघडीप दिल्याने पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता असून काही भागांत उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे.

बीडसह तीन जिल्ह्यांत चाऱ्याची चिंता

पिकांसोबतच पशुधनासाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. बीड, धाराशिव आणि जालना जिल्ह्यांत चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

पावसाअभावी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाली असून पशुपालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे पिकांच्या नुकसानीसोबतच चाऱ्याच्या उपलब्धतेबाबतही स्वतंत्र अहवाल मागविण्यात आला आहे.

विदर्भातील कापूस, सोयाबीन, तुरीवर परिणाम

विदर्भातील नागपूर, अमरावती, वाशीम, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही पावसाच्या कमतरतेचा खरीप पिकांना फटका बसला आहे.

या जिल्ह्यांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, उडीद आणि मूग या पिकांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक आढाव्यात समोर आले आहे. पावसातील खंडामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सोलापूर, नंदुरबारमध्येही परिस्थिती चिंताजनक

सोलापूर आणि नंदुरबार जिल्ह्यांतही पावसाअभावी परिस्थिती गंभीर बनली आहे. सोलापूरमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे कांदा लागवड क्षेत्रात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांचाही दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी जिल्हानिहाय अहवाल

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियोजन भवन येथे आढावा बैठक घेतली. त्यानंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून १८ जिल्ह्यांतील परिस्थितीची माहिती घेतली.

पिकांचे नुकसान, पाण्याची उपलब्धता, चाऱ्याची स्थिती आणि आवश्यक उपाययोजनांचा समावेश असलेला सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मंगळवारी काय निर्णय होणार?

सोमवारपर्यंत जिल्हानिहाय अहवाल सरकारकडे प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या १८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी सरकार कोणती मदत जाहीर करणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

नुकसानीचे अंतिम मूल्यांकन आणि जिल्हानिहाय अहवालाच्या आधारे मदत, पाणी आणि चाऱ्यासंदर्भातील पुढील उपाययोजना निश्चित होणार आहेत.

पाटोदा बसस्थानकातील चोरीचा छडा; महिला आरोपी ताब्यात, 13.97 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पाटोदा —  बसस्थानक परिसरात महिलेच्या बॅगेतून चोरीला गेलेले लाखोंचे सोने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. चोरीच्या या प्रकरणाचा समांतर तपास करताना पोलिसांनी महिला आरोपीला चुंबळी फाटा येथून ताब्यात घेतले. तिच्याकडून 8 तोळे 4 ग्रॅम सोने आणि 10 हजार रुपये रोख, असा एकूण 13 लाख 97 हजार 160 रुपये किमतीचा संपूर्ण चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पाटोदा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गु.र.नं. 0261/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत होते.

तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत चोरीच्या गुन्ह्यातील महिला आरोपी सोजर सुरेश भोसले (वय 45, रा. पारनेर, ता. पाटोदा, जि. बीड) ही चोरीचे सोने विक्री करण्याच्या उद्देशाने चुंबळी फाटा येथे थांबली असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीची खात्री करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचांसमक्ष चुंबळी फाटा येथे कारवाई केली. यावेळी महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान तिच्याकडून 4 तोळे 4 ग्रॅम सोने आणि 10 हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले.

तपासात उर्वरित चोरीचा मुद्देमालही हस्तगत झाल्याने या गुन्ह्यातील 8 तोळे 4 ग्रॅम सोने आणि रोख 10 हजार रुपये असा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. या कारवाईमुळे पाटोदा बसस्थानकातील चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला आहे.

ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकात पोलीस हवालदार सोमनाथ गायकवाड, अशोक दुबाले, बाळासाहेब सानप, आनंद मस्के, महिला पोलीस हवालदार स्वाती मुंढे, चंद्रकला नागरगोजे, पोलीस अंमलदार अशफाक सय्यद, मनोज परजणे, अश्विनकुमार सुरवसे आणि चालक पोलीस अंमलदार सिद्धार्थ मांजरे यांचा सहभाग होता.

कोकणासाठी १३०० लालपरी रवाना; मराठवाड्यात ‘सुखाचा प्रवास’ गर्दीत हरवला!

0

बीड — गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने मराठवाड्यातील तब्बल १ हजार ३०० एसटी बस मुंबई-ठाणे परिसराकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम मराठवाड्यातील नियमित एसटी वाहतुकीवर झाला असून ग्रामीण आणि लांब पल्ल्याच्या मार्गावरील बसफेऱ्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत. परिणामी अनेक बसस्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असून बस मिळविण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः धावपळ सुरू झाली आहे. प्रवासासाठी गाडीचे उपलब्ध नसल्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातच दुपट्ट तिप्पट पैसे देऊन गावी पोहोचावे लागत आहे.

कोकणातील गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरातून मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी जातात. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून दरवर्षी जादा बसचे नियोजन केले जाते. यंदाही त्यासाठी विविध विभागांतून बस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र, मराठवाड्यातून १३०० बस बाहेर गेल्याने स्थानिक एसटी वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या नियोजनानुसार बीडमधून सर्वाधिक ३१०, छत्रपती संभाजीनगरमधून ३०७, धाराशिवमधून २०८, लातूरमधून २०५, जालन्यातून १२०, परभणीतून ११० आणि नांदेडमधून ४० बस कोकणातील गणेशोत्सवासाठी पाठविण्यात येणार आहेत.

या बस बाहेर गेल्याने मराठवाड्यातील नियमित वाहतुकीच्या तब्बल २९ लाख ३२ हजार किलोमीटरच्या फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. ग्रामीण भागातील तसेच लांब पल्ल्याच्या प्रमुख मार्गांवरील बसफेऱ्या ३० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांची गैरसोय

एसटीच्या फेऱ्या कमी झाल्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसत आहे. बस उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना दोन ते तीन किलोमीटर पायी चालत शाळेत जावे लागत आहे. काही ठिकाणी खासगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी नियमित भाड्याच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत.

ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवासी आणि रुग्णांचीही मोठी गैरसोय होत आहे. बसस्थानकांवर गर्दी वाढल्याने उपलब्ध बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे ‘एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास’ या घोषणेऐवजी सध्या प्रवाशांना गर्दीच्या प्रवासाचा सामना करावा लागत आहे.

१३०० बस कुठून जाणार?

विभाग पाठविण्यात येणाऱ्या बस
बीड ३१०
छत्रपती संभाजीनगर ३०७
धाराशिव २०८
लातूर २०५
जालना १२०
परभणी ११०
नांदेड ४०
एकूण १,३००

मराठवाड्यातील किती किलोमीटरच्या फेऱ्यांवर परिणाम?

मराठवाड्यातून बस बाहेर गेल्याने एकूण २९ लाख ३२ हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द/कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विभागनिहाय नियोजनानुसार बीडच्या ८ लाख २५ हजार, छत्रपती संभाजीनगरच्या ९ लाख ३५ हजार, धाराशिवच्या ५ लाख, लातूरच्या ६६ हजार, नांदेडच्या १ लाख ३१ हजार आणि परभणीच्या ४ लाख ७५ हजार किलोमीटरच्या फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.

दरम्यान, जालना विभागातून पाठविण्यात येणाऱ्या १२० बसपैकी २५ बससाठी जळगाव विभागातील चालकांची मदत घेण्यात येणार आहे. वाहतूक आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालय मुंबई, तसेच नाशिक आणि नांदेड विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

कोकणातील गणेशोत्सवासाठी पाठविण्यात आलेल्या बस आपापल्या आगारात परतल्यानंतरच मराठवाड्यातील नियमित बससेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत ग्रामीण आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना एसटीच्या कमी झालेल्या फेऱ्यांचा फटका सहन करावा लागणार आहे.

अंबाजोगाईत स्लॅब भरताना विजेचा धक्का; दोन कामगारांचा मृत्यू

0

अंबाजोगाई — शहरातील मुख्य रस्त्यावर पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या तीन मजली इमारतीच्या बांधकामादरम्यान स्लॅब भरताना विजेचा तीव्र धक्का लागून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (१२ सप्टेंबर) दुपारी एकच्या सुमारास घडली. यशवंत (खंडू) कोंडीराम वाघमारे (वय ३३) आणि बबन चंद्रकांत वाघमारे (वय ५०), दोघेही रा. मंगळवार पेठ, चांभार गल्ली, अंबाजोगाई अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य रस्त्यावरील भिसे यांच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरू असताना काँक्रीट मिक्सर मशीनच्या सहाय्याने स्लॅब भरण्यात येत होते. याच परिसरातून ३३ केव्ही तसेच स्ट्रीट लाईटच्या विद्युत वाहिन्या गेल्या आहेत.

स्लॅब भरण्याचे काम सुरू असताना दोन्ही कामगारांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. त्यांना गंभीर अवस्थेत तातडीने स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

या घटनेमुळे ऐन सणासुदीच्या काळात अंबाजोगाई शहरावर शोककळा पसरली आहे. रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवार आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले. नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

यशवंत उर्फ खंडू वाघमारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. साधारण दीड वर्षापूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. घरातील कर्त्या पुरुषाचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

बबन वाघमारे हे कुशल वाहनचालक म्हणून परिचित होते. वाढत्या महागाईत कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी ते सुट्टीच्या दिवशी सेंट्रिंगचे कामही करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी स्लॅबचे काम सुरू होते, त्या परिसरातून विद्युत वाहिन्या गेल्यामुळे काम सुरू करण्यापूर्वी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता का आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. या दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहे, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, काँक्रीट मशीनचा चालक विश्वनाथ चव्हाण (रा. झारखंड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

आष्टी बसस्थानकातील विश्रांती कक्षात काय घडलं? एसटी चालकाच्या मृत्यूने हळहळ

0

आष्टी — कर्ज फेडण्याची चिंता, सावकारांकडून पैशांसाठी होणारा सततचा तगादा आणि मर्यादित वेतनात कुटुंबाचा खर्च भागविण्याची आर्थिक कसरत, या विवंचनेतून आष्टी एसटी आगारातील चालकाने जीवन संपवल्याची घटना घडली. अन्सार हबीब शेख (वय ४६, रा. साबलखेड) असे मृत चालकाचे नाव आहे.

शेख हे आष्टी एसटी आगारात चालक म्हणून कार्यरत होते. रात्रीच्या सुमारास आष्टी बसस्थानकातील विश्रांती कक्षात ते मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एसटी कर्मचाऱ्यांसह परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

शेख हे काही काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत होते. कर्जाची परतफेड करण्याची चिंता त्यांना सतावत होती. त्यातच कर्जाच्या पैशांसाठी सावकारांकडून वारंवार होणारा तगादा आणि कमी वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला होता.

कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूमागील आर्थिक व्यवहार आणि इतर कारणांचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. आष्टी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

भरधाव ट्रकच्या धडकेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू

0

बीड — बीड ते नवगण राजुरी मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या अपघातामुळे नवगण राजुरी गावावर शोककळा पसरली आहे.

या भीषण अपघातात कैलास टूले, अक्षय शिंदे आणि ऋषिकेश फुलझळके यांचा मृत्यू झाला. तिघेही दुचाकीवरून आपल्या गावी परतत असताना बीड-नवगण राजुरी मार्गावरील उकंडा फाट्याजवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघे मित्र दुचाकीवरून प्रवास करत असताना समोरून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर नवगण राजुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पुलाच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा अभाव?

दरम्यान, अपघातस्थळी सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक दिशादर्शक फलक आणि रेडियमची व्यवस्था नसल्याने अपघात घडला, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

या अपघाताला नेमकी कोणती कारणे कारणीभूत ठरली, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

गेवराईत जुगार अड्ड्यावर धाड; 14 जण ताब्यात, 6.72 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

गेवराई गेवराई शहरालगत जतेगाव रोड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत यांच्या पथकाने रात्री धडक कारवाई केली. 10 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत 14 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, रोख रक्कम, 14 मोबाईल आणि 8 दुचाकी असा एकूण 6 लाख 72 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे जतेगाव रोडवरील एका ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला.

यावेळी काही इसम गोलाकार बसून जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत राम चव्हाण, सय्यद फय्याज, अशोक भावले, संतोष नेवाळे, शेख तौफीक, अशोक धापसे, जमील शेख, जमील कुरेशी, गणेश चव्हाणकर, कृष्णा खरात, अमित पाडाळे, शेख आवेज, संतोष पाटील आणि करण नराडे यांना ताब्यात घेतले.

कारवाईत विविध कंपन्यांचे 14 मोबाईल फोन, 8 मोटारसायकली आणि रोख रक्कम असा एकूण 6,72,540 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, 1887 मधील कलम 12 (अ) अन्वये गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बीड नवनीत, अपर पोलीस अधीक्षक समीर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई अनिल यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत यांच्या पथकाने केली.

जरांगे मुंबईला निघणार की थांबणार? हायकोर्टाच्या निर्णयानंतर आता पुढचं पाऊल काय?

0

मुंबई —  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सलग १४ दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आता मुंबईकडे कूच करणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. जरांगेंना मुंबईत येण्यापासून किंवा आझाद मैदानात आंदोलन करण्यापासून रोखण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या संभाव्य मुंबई आंदोलनाचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, मुंबईत आंदोलन करण्यासाठी पोलिसांची रीतसर परवानगी घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मुख्य न्यायमूर्ती महेश त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. कोणत्याही नागरिकाला शांततेत आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार आहे. केवळ मागील आंदोलनात काही अनुचित प्रकार घडले म्हणून यावेळी सरसकट आंदोलनाला प्रतिबंध करता येणार नाही, अशी भूमिका न्यायालयाने स्पष्ट केली.

मागील आंदोलनाचा दाखला देत विरोध

मनोज जरांगे पाटील यांच्या संभाव्य मुंबई दौऱ्याला आणि आझाद मैदानातील आंदोलनाला विरोध करणारी याचिका निलेश डहाणूकर आणि राजेश दळवी यांनी दाखल केली होती. मागील मराठा आंदोलनादरम्यान दक्षिण मुंबईत मोठी गर्दी झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला.

गेल्या वर्षीच्या आंदोलनाच्या वेळी आझाद मैदान रिकामे करण्यासाठी अखेर उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला होता, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र, मागील घटनेच्या आधारावर यावेळी नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर थेट गदा आणता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करता येणार नाही

हायकोर्टाने जरांगेंच्या आंदोलनावर सरसकट बंदी घातलेली नाही. मात्र, मुंबईत येऊन आंदोलन करायचे असल्यास पोलिसांची रीतसर परवानगी घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जरांगेंसमोर आता आंदोलनासाठी कायदेशीर परवानगी घेण्याचा मार्ग खुला आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांनी आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका कायम ठेवली आहे. १२ सप्टेंबरनंतर कोणत्याही क्षणी मुंबईकडे रवाना होण्याचा इशाराही त्यांनी यापूर्वी दिला आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या निर्णयानंतर जरांगे पुढील पाऊल काय उचलतात, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

१४ दिवसांच्या उपोषणामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर

सलग १४ दिवसांपासून उपोषण सुरू असल्याने मनोज जरांगे यांच्या आरोग्याची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचनाही न्यायालयाने प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे एकीकडे मुंबई आंदोलनाचा कायदेशीर मार्ग खुला झाला असताना दुसरीकडे जरांगेंच्या प्रकृतीचा प्रश्नही प्रशासनासमोर महत्त्वाचा ठरला आहे.

आता जरांगे पाटील पोलिसांची परवानगी घेऊन मुंबईकडे रवाना होणार की आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवणार, याकडे मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

भारत पांढरेंची कारवाई; नेकनूर पोलिसांना आता जाग येणार का ?

0

बीड —  प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या साठ्यावर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या पथकाने मांजरसुंबा परिसरात धडक कारवाई करत ₹5 लाख 18 हजार 628 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ₹2 लाख 68 हजार 628 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आणि सुमारे ₹2 लाख 50 हजारांची स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली. याप्रकरणी भाऊसाहेब राम पडुळे (रा. औरंगपूर, ता. जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 9 सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भारत पांढरे यांच्या पथकाने मांजरसुंबा परिसरात संशयित चारचाकी वाहनाची तपासणी केली. वाहनामध्ये प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आल्यानंतर पंचांसमक्ष जप्ती करण्यात आली. प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील संबंधित कलमांसह भारतीय न्याय संहितेतील कलम 123, 223, 274 आणि 275 अन्वये नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारत पांढरे यांच्या पथकाला माहिती मिळते; स्थानिक पोलिसांना का नाही?

या कारवाईनंतर नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाणे प्रमुख मंगेश साळवे यांच्या कार्यक्षेत्रात गुटखा, अवैध दारू आणि इतर अवैध धंद्यांविरोधात स्थानिक पातळीवर अपेक्षित धडक कारवाया का केल्या जात नाहीत, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

नागरिकांमध्ये जनजागृती करणे निश्चितच आवश्यक आहे. मात्र जनजागृतीसोबत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि अवैध धंद्यांवर नियमित कारवाई हीदेखील ठाणे प्रमुखांची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन करून पोलिसांची जबाबदारी संपत नाही.

ठाणे प्रमुख मंगेश साळवे यांची जबाबदारी निश्चित होणार का?

नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईचा विषय निघाला की आता एक प्रश्न थेट पुढे येतो—ठाणे प्रमुख मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांविरोधात प्रत्यक्ष किती कारवाया झाल्या?

कारण एकीकडे भारत पांढरे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळते, ते त्याच हद्दीत पोहोचतात आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करतात; तर दुसरीकडे स्थानिक पोलिसांच्या कारवायांबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यापूर्वी मांजरसुंबा परिसरातील जुगार अड्ड्यावर कारवाई, कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशाची सुटका आणि आता गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्याची कारवाई झाली. या सर्व घटनांमुळे स्थानिक पोलीस ठाणे नेमके कोणत्या पातळीवर काम करत आहे? हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.

आता जनजागृतीसोबत ‘ॲक्शन’ दिसणार का ?

ठाणे प्रमुख मंगेश साळवे यांनी आपल्या हद्दीत अवैध दारू, गुटखा, जुगार आणि इतर अवैध धंद्यांविरोधात प्रभावी कारवाईचा धडाका सुरू करणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई केल्यानंतरच अवैध धंदे उघडकीस येत असतील, तर स्थानिक पोलिसांची गुप्त माहिती यंत्रणा आणि पेट्रोलिंग नेमके किती प्रभावी आहे, याचेही परीक्षण होणे आवश्यक आहे.

नागरिकांनी जागरूक राहावे, अशी जनजागृती सुरूच ठेवावी; परंतु त्याचवेळी अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा धाकही दिसला पाहिजे. ठाणे प्रमुख मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली आता नेकनूर पोलीस खरोखरच ‘ॲक्शन मोड’मध्ये येतात का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अवैध धंद्यांना आळा घालणे ही केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नव्हे, तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाची थेट जबाबदारी आहे. त्यामुळे नेकनूर हद्दीत पुढील काळात होणाऱ्या कारवायांवरून ठाणे प्रमुख मंगेश साळवे यांच्या कार्यपद्धतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या पथकाने केली.

24 तासांत वाहनचोर पकडला; चार दुचाकी जप्त

0

बीड — घरासमोर उभी केलेली स्कुटी चोरीला गेल्याची तक्रार दाखल होताच पेठ बीड पोलिसांच्या डी.बी. पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 24 तासांत अज्ञात आरोपीला अटक केली. आरोपीकडून चोरीची स्कुटी तसेच इतर तीन मोटारसायकली, अशा एकूण चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

इस्लामपुरा, बाबा चौक परिसरातील रहिवाशाने 8 सप्टेंबर 2026 रोजी पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, 7 सप्टेंबरच्या रात्री 11 वाजेपासून 8 सप्टेंबरच्या सकाळी 7 वाजण्यापूर्वी त्यांच्या घरासमोर उभी केलेली पांढऱ्या रंगाची अॅक्सेस स्कुटी (क्र. MH-23-BK-3173) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.

या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 287/2026, कलम 303(2) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच डी.बी. पथकाने अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला 24 तासांच्या आत ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेली अॅक्सेस स्कुटी तसेच आणखी तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. त्यामुळे या कारवाईत एकूण चार दुचाकी वाहने पोलिसांच्या हाती लागली आहेत.

जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये अॅक्सेस स्कुटीसह होंडा युनिकॉर्न आणि दोन होंडा शाईन मोटारसायकलींचा समावेश आहे. या वाहनांच्या चोरीबाबत तसेच आरोपीच्या इतर गुन्हेगारी हालचालींबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत , अपर पोलीस अधीक्षक समीर  आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बीड वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश  यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक मुन्सर , पोलीस हवालदार नितीन  सुभाष , पोलीस अंमलदार विष्णु , पांडुरंग, दिगांबर  आणि अल्ताफ यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मून्सर करीत आहेत.