Home Blog Page 2

इमामपूर रोडवरील अवैध उत्खननावर तहसीलदारांची धडक कारवाई; 2 हायवा जप्त

0

बीड — नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. बीड शहरालगतच्या इमामपूर रोड परिसरातील डोंगर भागात सुरू असलेले अनधिकृत गौण खनिज उत्खनन महसूल पथकाने उघडकीस आणले आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत उत्खननातून गौण खनिज वाहतूक करणारे दोन हायवा ताब्यात घेण्यात आले असून संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

इमामपूर रोडवरील डोंगर भागात सुरू होते उत्खनन

इमामपूर रोड परिसरातील डोंगराळ भागात काही दिवसांपासून माती, मुरूम आणि इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. शासनाच्या परवानगीशिवाय सुरू असलेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी महसूल पथकासह अचानक घटनास्थळी धडक दिली.
पाहणीदरम्यान डोंगर भागात उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाची कारवाई सुरू होताच काही जणांनी घटनास्थळावरून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र महसूल पथकाने तत्परता दाखवत गौण खनिज वाहतूक करणारे दोन हायवा ताब्यात घेतले.

वाहनांची तपासणी; कागदपत्रांची पडताळणी

कारवाईनंतर संबंधित वाहनचालक आणि व्यक्तींची चौकशी करण्यात आली. उत्खननासाठी आवश्यक परवानगी, वाहतूक परवाने आणि इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महसूल पथकाची महत्त्वाची भूमिका

या कारवाईत नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, मंडळ अधिकारी अनिल तांदळे, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत कुलकर्णी, हरिदास काकडे, सचिन एरंडे, तफेदार दिनेश माने तसेच गणेश चव्हाण यांनी सहभाग घेतला.
महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून शासनाच्या गौण खनिज संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन कठोर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डोंगर उत्खननामुळे पर्यावरणाला धोका

डोंगर आणि टेकड्या या परिसरातील नैसर्गिक जलसंधारण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अनधिकृत उत्खननामुळे मातीची धूप, जलस्रोतांवर परिणाम आणि पर्यावरणीय असमतोल निर्माण होण्याचा धोका वाढतो.
विशेषतः दुष्काळप्रवण बीड जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मोठ्या वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची हानी, धुळीचे प्रमाण आणि अपघाताचा धोका वाढत असल्याने नागरिकांकडूनही अशा कारवायांची मागणी होत होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईला वेग

बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या समन्वयातून, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या पाठपुराव्याने तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या देखरेखीखाली जिल्ह्यात गौण खनिजांच्या अवैध उत्खननावर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाई सुरू आहे.
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी स्पष्ट केले की, शासनाची परवानगी न घेता करण्यात येणारे कोणतेही उत्खनन बेकायदेशीर असून अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
इमामपूर रोडवरील ही कारवाई केवळ दोन हायवा जप्त करण्यापुरती मर्यादित नसून नैसर्गिक संपत्तीच्या संरक्षणासाठी प्रशासनाने दिलेला कठोर इशारा मानला जात आहे.

37 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित? रोहित पवारांचे पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरूच

0

पंढरपूर — राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफी योजनेतील अटींवरून राजकीय वातावरण तापले आहे. या अटींमुळे राज्यातील तब्बल ३७ लाखांहून अधिक शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे शुक्रवारपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी (१३ जून) आंदोलनाचा दुसरा दिवस असून, त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या कर्जमाफी परिपत्रकातील दोन अटी शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या ठरत आहेत. २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच लाभ देण्याची अट तसेच प्रोत्साहन अनुदानासाठी २०२५-२६ आणि २०२६-२७ मधील पीक कर्ज भरण्याची अनिवार्यता या अटी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, शुक्रवारी रात्री प्रशासनाच्या शिष्टमंडळाने रोहित पवार यांच्याशी अनेकदा चर्चा केली. पंढरपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांनी मध्यस्थी करत कृषिमंत्री आणि सहकार मंत्र्यांशी फोनवरून चर्चा घडवून आणली. मात्र या चर्चेतून अद्याप कोणताही अंतिम तोडगा निघालेला नाही.

“२०१९ च्या कर्जमाफीशी संबंधित जाचक अट सरकारने मागे घेण्याबाबत सार्वजनिक घोषणा करावी, त्यानंतरच आंदोलन स्थगित करण्याचा विचार करू,” अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे.

शनिवारी सकाळी डॉक्टरांच्या पथकाने आंदोलनस्थळी येऊन रोहित पवार यांच्या प्रकृतीची तपासणी केली. मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवण्यावर ते ठाम आहेत.

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ स्वीकारणार लष्करप्रमुखपदाची जबाबदारी

0

नवी दिल्ली — भारतीय लष्कराच्या नेतृत्वात मोठा बदल होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारतीय लष्कराच्या पुढील प्रमुखपदी (Chief of Army Staff) नियुक्ती जाहीर केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 30 जून 2026 रोजी धीरज सेठ हे लष्कराची धुरा स्वीकारतील.
राष्ट्रपतींनी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली असून, पदभार स्वीकारताना त्यांना ‘जनरल’ पदावर बढती देण्यात येणार आहे. त्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2028 पर्यंत असणार आहे.

कोण आहेत लेफ्टनंट जनरल धीरज सेठ?

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे भारतीय लष्करातील अत्यंत अनुभवी अधिकारी मानले जातात. 1986 मध्ये त्यांची भारतीय लष्कराच्या आर्मर्ड कॉर्प्स (रणगाडा रेजिमेंट) मध्ये नियुक्ती झाली. त्यांनी पुण्यातील खडकवासला येथील प्रतिष्ठित नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) मधून लष्करी शिक्षण घेतले आहे.
जवळपास चार दशकांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी लष्करातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. कमांड, ऑपरेशनल आणि प्रशासकीय स्तरावर त्यांचा मोठा अनुभव आहे.

रणांगणापासून उच्च नेतृत्वापर्यंतचा प्रवास

धीरज सेठ यांनी टँक रेजिमेंट, आर्मर्ड ब्रिगेड तसेच जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमांशी संबंधित महत्त्वाच्या तुकड्यांचे नेतृत्व केले आहे. त्यांनी भारतीय लष्करातील सुदर्शन चक्र कोअरचे नेतृत्वही केले आहे.
यानंतर त्यांनी दिल्ली एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) म्हणून काम पाहिले. या काळात राष्ट्रीय कार्यक्रम, लष्करी उपक्रम आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचे नियोजन त्यांनी केले.

सदर्न कमांडचे नेतृत्व आणि मोठ्या लष्करी मोहिमा

लष्कराचे उपप्रमुख (Vice Chief of Army Staff) पद स्वीकारण्यापूर्वी धीरज सेठ यांनी पुणे येथील सदर्न कमांडचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम सीमेवरील महत्त्वाचे लष्करी सराव आणि ऑपरेशनल नियोजन करण्यात आले.
त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या अंगोला मोहिमेतही सेवा बजावली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवामुळे त्यांच्या लष्करी कारकिर्दीला अधिक व्यापक दृष्टिकोन मिळाला आहे.

परदेशातील लष्करी प्रशिक्षण

भारतातील प्रशिक्षणासोबतच धीरज सेठ यांनी फ्रान्स आणि अमेरिकेतील प्रतिष्ठित लष्करी संस्थांमध्येही प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी फ्रान्समधील पॅरिस येथे Defence Services Command and General Staff Course पूर्ण केला आहे. तसेच नवी दिल्लीतील National Defence College मधून उच्चस्तरीय लष्करी शिक्षण घेतले आहे.

चार दशकांच्या अनुभवासह लष्कराची नवी जबाबदारी

धीरज सेठ यांच्या नियुक्तीकडे भारतीय लष्करातील अनुभवी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. विविध युद्धजन्य परिस्थिती, कमांड जबाबदाऱ्या आणि धोरणात्मक भूमिकांचा अनुभव असलेले धीरज सेठ आता देशाच्या लष्कराची सर्वोच्च जबाबदारी स्वीकारणार आहेत

5 कोटी खंडणीसाठी अपहरण; एलसीबी पथकाने अमरावतीतून सोडवले , चार आरोपी अटकेत

0

परळी — परळी औष्णिक विद्युत केंद्र परिसरातून अपहरण झालेल्या 54 वर्षीय व्यक्तीची स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने शिताफीने सुटका केली आहे. पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून या प्रकरणातील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दि. 4 जून 2026 रोजी रात्री 1.30 ते 2 वाजण्याच्या सुमारास परळी औष्णिक विद्युत केंद्र परिसरातून तुकाराम पंढरीनाथ मुंडे (वय 54, रा. संगम, ता. परळी वै., जि. बीड; सध्या थर्मल कॉलनी, परळी) यांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 266/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 137(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले.
या पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मारुती सुझुकी कंपनीची एक गाडी संशयास्पद आढळून आली. या वाहनाचा सीसीटीव्हीच्या आधारे माग काढत तपास पथक अमरावतीपर्यंत पोहोचले.
अमरावती येथे तपास करत असताना अपहरण झालेल्या तुकाराम मुंडे आणि आरोपींची माहिती मिळवण्यात आली. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी तुकाराम मुंडे यांना अमरावती जिल्ह्यातील हिंगणघाट येथे डोळ्यावर पट्टी बांधून सोडून दिले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सुरक्षित ताब्यात घेतले.
तपासात हे अपहरण पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात सचिन नारायण वंजारे, संतोष नारायण वंजारे (दोघे रा. परळी), अल्केश विष्णुजी अवजाडे आणि शुभम राजू पिंपळकर (दोघे रा. मंगरूळ चावला, जि. अमरावती) यांचा सहभाग असल्याचे समोर आले.
यातील संतोष नारायण वंजारे याला पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर उर्वरित आरोपींचा नागपूर, मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली येथे शोध घेण्यात आला. परळी ग्रामीण पोलिसांनी सचिन वंजारे, अल्केश अवजाडे आणि शुभम पिंपळकर यांनाही अटक केली आहे.
सध्या सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.

गौळणबाई चाटे यांचे निधन

0

केज — तालुक्यातील होळ येथील गौळणबाई नानाभाऊ चाटे यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी (दि.११) मध्यरात्री निधन झाले.

मृत्यूसमयी त्यांचे वय ७८ वर्षे होते. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. उपचारादरम्यान राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर होळ येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. होळ येथील ग्रामपंचायत अधिकारी संजय चाटे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बीड: आदित्य फार्मसी कॉलेजचा नवा लफडा; मूळ शैक्षणिक कागदपत्रे रोखल्याची विद्यार्थ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

0

बीड —  प्रत्येक वर्षी सारडा यांच्या आदित्य शिक्षण संस्थेचे नवनवे कारनामे उघड होताना पाहायला मिळते. राज्यातून वेगवेगळ्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची छळवणूक कशी करायची यामध्ये या संस्थेचा हात कोणीही धरू शकत नाही. याचं एक मोठे उदाहरण पुन्हा एकदा समोर आला आहे.आदित्य फार्मसी कॉलेज बीड महाविद्यालयाने आपली मूळ शैक्षणिक कागदपत्रे परत न केल्याचा आरोप करत विद्यार्थ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. चक्रे अर्जुन अप्पासाहेब (रा. कुक्कडगाव, ता. जि. बीड) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज देत महाविद्यालयाच्या कारभाराची चौकशी करून कागदपत्रे तात्काळ परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांना डी. फार्मसी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता. मात्र महाविद्यालयाच्या चुकीमुळे त्यांचा प्रवेश बी. फार्मसी विभागात झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. संबंधित अभ्यासक्रमात रस नसल्याने त्यांनी प्रवेश रद्द करण्यासाठी महाविद्यालयाकडे अर्ज केला होता. मात्र चार महिने उलटून गेले तरीही प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

विद्यार्थ्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रवेशावेळी पडताळणीसाठी जमा केलेली १० वी, १२ वीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र यासह इतर मूळ कागदपत्रे महाविद्यालयाकडे जमा केली होती. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही ही कागदपत्रे परत देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मूळ कागदपत्रे रोखण्याचा अधिकार नाही” — विद्यार्थ्याचा दावा

तक्रारदाराने आपल्या अर्जात विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) च्या नियमांचा दाखला देत विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे महाविद्यालयाने स्वतःकडे ठेवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच विश्वासाने दिलेली कागदपत्रे परत न करणे हे कायदेशीरदृष्ट्या गंभीर बाब असल्याचा दावा देखील केला आहे.

या प्रकारामुळे पुढील शिक्षण, शासकीय योजना आणि आवश्यक प्रशासकीय कामांमध्ये अडचणी निर्माण झाल्याचे विद्यार्थ्याने नमूद केले आहे.

स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप

महाविद्यालयाच्या कारभारामुळे आपण महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याचा आरोपही विद्यार्थ्याने केला आहे. झालेल्या आर्थिक आणि शैक्षणिक नुकसानीची भरपाई मिळावी तसेच संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील केली आहे.

विद्यार्थ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच पोलीस अधीक्षक  आणि शिक्षण विभागाकडेही तक्रारीची प्रत दिली आहे.

गुटखा माफियांवर आता थेट मकोका; संपूर्ण नेटवर्कवर एफ डी ए ची नजर

0

मुंबई — राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंडे यांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोठ्या कारवाया सुरू असतानाच आता गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध व्यापाराविरोधात प्रशासनाने आणखी कठोर पाऊल उचलले आहे.

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा व्यापार करणाऱ्या संघटित टोळ्यांवर आता थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) १९९९ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तुकाराम मुंडे यांनी राज्यातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले असून, केवळ गुटखा विक्रेत्यांवरच नव्हे तर या संपूर्ण साखळीवर कारवाई केली जाणार आहे.

उत्पादकापासून विक्रेत्यापर्यंत सर्वांवर कारवाई

गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पानमसाला आणि इतर प्रतिबंधित पदार्थांचे:

🕳️.      उत्पादन करणारे

🕳️.      साठवणूक करणारे

🕳️.       वाहतूक करणारे

🕳️.       पुरवठादार

🕳️.        घाऊक विक्रेते

🕳️.         किरकोळ विक्रेते

🕳️.         गोदाम चालक

हे सर्व FDA च्या रडारवर असणार आहेत.

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यापार जर संघटित पद्धतीने केला जात असेल तर तो संघटित गुन्हा मानला जाईल आणि पात्र प्रकरणांमध्ये मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल.

लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त

आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली FDA कडून विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त आणि प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे.

तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू

अवैध गुटखा विक्री, साठवणूक किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थांबाबत नागरिकांनी प्रशासनाला माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

FDA कडून स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रतिबंधित पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी आता कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

घरफोडी-चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एलसीबीची कारवाई, दारू चोरीसह घरफोडीचा गुन्हा उघड

0

बीड  — जिल्ह्यातील विविध घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सुरू केलेल्या समांतर तपासात मोठे यश मिळाले आहे. चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल चोरी प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील घरफोडीचा गुन्हाही उघडकीस आणण्यात आला आहे.


चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 167/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 305, 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेवराई रोडवरील सूरज बिअर बार अँड परमिट रूम येथे अज्ञात चोरट्यांनी खिडकी तोडून विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या तसेच गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली होती.
या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. यावेळी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर चकलांबा रोडवरील महार टाकळी परिसरात सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये
कार्तिक विरसिंग नागपुरे (रा. मुंढवा, पुणे), आदित्य मयूर जाधव (रा. मांजरी, पुणे) आणि हर्षवर्धन मोहन रेड्डी (रा. केशवनगर, पुणे) यांचा समावेश आहे.
चौकशीदरम्यान आरोपींनी या चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली असून, इतर साथीदारांसह गुन्हा केल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना चकलांबा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हा रजि. नं. 153/2026 कलम 331(4) भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल घरफोडी प्रकरणाचाही स्थानिक गुन्हे शाखेने तपास केला.
तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि स्थानिक पातळीवरील चौकशीच्या आधारे एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीस गेलेला सुमारे 80 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने,जोगदंड,पठाण,  गित्ते,  घोडके व  मराडे यांनी केलेली आहे तसेच चकलांबा येथील कारवाई पोउपनि  श्रीराम खटावकर, पोउपनि  शेखर औटे,  राहुल शिंदे, आनंद मस्के, बबन सलगर, अशफाक सय्यद, अश्विनकुमार सुरवसे,  सिद्धेश्वर मांजरे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? दिल्लीतील हालचालींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

0

मुंबई —  देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरण करण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होण्याची शक्यता असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना अचानक दिल्लीला बोलावण्यात आल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही दिल्लीला पाचारण करण्यात आल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दिल्लीला रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच शरद पवार यांनी दिला होता. मात्र काही कारणांमुळे त्यावर निर्णय होऊ शकला नव्हता. देशातील संविधानिक व्यवस्था आणि धर्मनिरपेक्ष विचारांच्या संरक्षणासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पटोले म्हणाले की, भाजपविरोधात मजबूत राजकीय पर्याय उभा करण्यासाठी विविध धर्मनिरपेक्ष पक्ष काँग्रेससोबत येण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेसमधून वेगळे झालेले पक्ष पुन्हा एकत्र येण्याची गरज व्यक्त केली आहे. भाजपला प्रभावी आव्हान द्यायचे असेल तर शरद पवार यांनी पुढाकार घेऊन विरोधी मतांचे एकत्रीकरण करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या चर्चांवर सावध भूमिका घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसकडून कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी विलिनीकरणाबाबत अंतिम निर्णय शरद पवारच घेतील, असे सांगितले.

सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी काही दिवसांत दिल्लीतील बैठका आणि वरिष्ठ नेत्यांच्या चर्चांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ब्रम्हगाव हनुमान मूर्ती विटंबना प्रकरणातील आरोपी जेरबंद

0

बीड — चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्रम्हगाव येथे हनुमान मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि चकलांबा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गुरुवारी रात्री आरोपीला ब्रम्हगावमधूनच ताब्यात घेतले.

गेल्या 28 मे रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने गावातील हनुमान मंदिरातील मूर्तीला मांसाचा तुकडा चिकटविल्याचा प्रकार घडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून संबंधित वस्तू जप्त केली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड तसेच चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. यावेळी गावकऱ्यांना शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले होते.

घटनेनंतर गावात हनुमान मूर्तीचा अभिषेक आणि महाआरती करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेत अखेर आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. पुढील तपास सुरू आहे.