Home Blog Page 16

आता जिल्हा परिषद शाळांमध्येच भरतील अंगणवाडीचे वर्ग

0

पुणे —  राज्यातील पूर्वप्राथमिक शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करत शैक्षणिक वर्ष २०२६-२७पासून जिल्हा परिषद शाळांमध्ये अंगणवाडीचे वर्ग भरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना जारी केल्या आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, जिल्हा परिषद शाळांमध्ये आवश्यक वर्गखोल्यांव्यतिरिक्त अतिरिक्त आणि सुस्थितीत असलेली वर्गखोली अंगणवाडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


राज्यात सध्या १ लाख १० हजारांहून अधिक अंगणवाड्या कार्यरत आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत पूर्वप्राथमिक शिक्षणाला औपचारिक शिक्षण व्यवस्थेत समाविष्ट करण्यात आले असून, ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘आधारशिला बालवाटिका १, २ आणि ३’ हा नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे.
मात्र, बहुतांश अंगणवाड्या शाळांपासून वेगळ्या ठिकाणी असल्याने लहान मुलांच्या शिक्षण प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अंगणवाड्या आणि प्राथमिक शाळा एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार भविष्यात पूर्वप्राथमिक शिक्षणाचे वर्ग प्राथमिक शाळांशी जोडणे आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे ४२ हजार अंगणवाड्या आधीच शाळांच्या परिसरात कार्यरत आहेत. आता स्वतःची स्वतंत्र जागा नसलेल्या अंगणवाड्यांना अतिरिक्त वर्गखोली उपलब्ध असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करून अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले की, “पूर्वप्राथमिक ते दुसरीपर्यंतचे वर्ग एकाच ठिकाणी असणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अधिक उपयुक्त ठरेल. त्यामुळे अतिरिक्त वर्गखोली असलेल्या शाळांमध्ये अंगणवाड्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.”

महाराष्ट्रात नावलौकिक होईल असे वैभवशाली मराठा भवन उभे करू  — धनंजय मुंडे

0

परळीतील मराठा भवन मराठा समाजाची उन्नती,सामाजिक सलोखा व एकतेचे मंदिर ठरेल – आ. धनंजय मुंडे

परळी — हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याला अभिप्रेत अशा प्रकारची सामाजिक एकोप्याची संस्कृती महाराष्ट्राची आहे.परळी शहरात व मतदारसंघात हीच सामाजिक सलोखा व एकतेची ताकद वर्षानुवर्षे आपल्या पाठीशी राहिलेली आहे. जात, धर्म,, पंथ या पलीकडे जाऊन कायमच आपण राजकारणात काम केले आहे. महाराष्ट्रात नावलौकिक होईल अशा प्रकारचे देखणे व वैभवशाली मराठा भवन आपल्या या परळीत आपण उभे करू आणि या माध्यमातून सबंध महाराष्ट्राला सामाजिक एकतेचा संदेश देऊ. या दृष्टीने परळीत उभे राहणारे मराठा भवन हे सामाजिक उन्नती बरोबरच अठरापगड जातीच्या एकतेचे मंदिर ठरेल असा विश्वास माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

 आ.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मराठा भवन उभारणीसाठी तब्बल 28 गुंठे जागा विकत घेऊन वैद्यनाथ मंदिर च्या परिसरात, अतिशय मुख्य रस्त्यावरील ही जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून सकल मराठा समाजाची ही भावना व मागणी लक्षात घेऊन स्वतः लक्ष घालत आ.धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या औचित्यावर सकल मराठा समाजाला मराठा भवन उभारणीसाठी ही जागा हस्तांतरित केली. मराठवाड्यात तालुकास्तरावर स्वतंत्रपणे उभे राहणारे हे पहिलेच मराठा भवन ठरणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने याबद्दल आ.धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने मराठा युवा मंचच्या वतीने परळी वैजनाथ येथे आज आ.धनंजय मुंडे, नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी आणि या मागणीचा पाठपुरावा करणाऱ्या मराठा सेवकांचा कृतज्ञता समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मराठा भवन उभारणीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल मराठा युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष बालासाहेब कडबाने यांच्या वतीने आ. धनंजय मुंडे, नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी, मराठा सेवक सेवकराम जाधव, देवराव लुगडे महाराज, नितीन शिंदे, शिवाजी देशमुख ,दिलीप माने त्याचबरोबर ही जागा देणाऱ्या राजेंद्र सोनी तसेच माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकार, नगरपरिषदेचे गटनेते वैजनाथ सोळंके, मराठा समन्वयक प्रा. शंकर कापसे आदींचा हृदय सत्कार करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना आ. धनंजय मुंडे यांनी सांगितले की, एक लोकप्रतिनिधी या नात्याने हे आपले कर्तव्य आहे . आपल्या हृदयापासून मराठा भवन हे मोक्याच्या ठिकाणी आणि अतिशय दर्जेदार व वैभवशाली व्हावे ही आपली कायमच भूमिका होती. नगरपरिषदेच्या अनेक खुल्या जागा या मराठा भवन साठी उपलब्ध होत्या मात्र महाराष्ट्रात नावलौकिक होईल अशा प्रकारचे सामाजिक उत्थनाचे हे मंदिर योग्य जागेवरच उभे राहिले पाहिजे ही आपली भूमिका होती. त्या दृष्टीने वैद्यनाथ मंदिर परिसरातीलच जागा नाथ प्रतिष्ठानच्या वतीने विकत घेतली.या ठिकाणी आता सुसज्ज व वैभवशाली मराठा भवन उभे राहणार आहे. मराठा भवन मध्ये समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुला मुलींचे वसतीगृह, शिकवणी क्लासेस, अभ्यासिका, नोकरी मार्गदर्शन केंद्र आदी विद्यार्थी कलागुण विकसित करण्यासाठीचे उपक्रम या भवन मधून राबवण्यात येणार आहेत. उद्योग, व्यवसाय मार्गदर्शन, व्यवसायातील बारकावे, येणारी आव्हाने, उद्योजक, व्यावसायिकांचे परिचय मेळावे आदी आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वधू-वर परिचय मेळावे, सामूहिक विवाह कार्य, शिक्षण, आरोग्य, कौटुंबिक, सामाजिक ,व्यावसायिक यासह अनेक विषयावर प्रबोधन मार्गदर्शन मिळावे आयोजित करण्यासाठी मराठा भवन उपयुक्त ठरणार आहे. सर्व गुणसंपन्न पिढी घडविण्याच्या दृष्टिकोनातून ही वास्तू एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी पुढे बोलताना आ.मुंडे यांनी सांगितले की, राजकारणात काम करत असताना आपण कधीही जात ,धर्म पंथ याचा लवलेशही लागू दिला नाही. मध्यंतरीच्या काळात हा सामाजिक समतोल बिघडवणाऱ्या काही घटना घडल्या, त्या आडून आपल्याला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र आपण याविषयी कधीही व्यक्त झालो नाही. याचे कारण आपल्याला याची जाणीव आहे की गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात काम करत असताना 18 पगड जाती समूहाची हीच ताकद मला लढण्याची शक्ती देत आली आहे. मध्यंतरीच्या काळात जे काही झाले ते झाले, ते सहन केले मात्र सामाजिक विस्कटलेली घडी आपल्याला पुन्हा एकदिलाने,एकजुटीने आणि सामाजिक सलोख्यातून उभी करावी लागणार आहे.त्यादृष्टीने संबंध महाराष्ट्राला या सामाजिक एकतेचा संदेश देणारे परळीतील मराठा भवन हे प्रतीक ठरेल. सर्वांच्या योगदानातून अतिशय वैभवशाली मराठा भवन आपण उभे करू. त्याचबरोबर सामाजिक सलोखा, सामंजस्य आणि शिवरायांच्या स्वराज्याला अभिप्रेत अशी सामाजिक संरचना अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनीच कटिबद्ध राहावे असे आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी केले.

यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा सेवक देवराव लुगडे महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .रविंद्र जोशी यांनी तर आभार प्रदर्शन शंकर कापसे यांनी केले.या कार्यक्रमास राजकीय सामाजिक कार्यकर्ते मान्यवर प्रतिष्ठित नागरिक व परळीतील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भर रस्त्यात तरुणीने तोंडात मारली; अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या

0

परळी (बीड) —  परळी तालुक्यातील मोहा परिसरात अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सार्वजनिक ठिकाणी तरुणीने‌ युवकाच्या तोंडात मारल्याच्या अपमानानंतर युवकाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यूपूर्वी तरुणाने आपल्या वडिलांना केलेल्या फोनमुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

मृत तरुणाचे नाव चंद्रहार राजेभाऊ शिंदे असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी दुपारी गावातील करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात एका तरुणीने सर्वांसमक्ष चंद्रहार शिंदे च्या तोंडात मारल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणी अपमान झाल्यामुळे चंद्रहार मानसिक तणावाखाली गेला होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
यानंतर १४ मे रोजी सायंकाळी चंद्रहार शिंदे याने आपल्या वडिलांना फोन करून, “हा माझा शेवटचा फोन आहे,” असे सांगितल्याचे समोर आले. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. मुलाच्या या बोलण्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
कुटुंबीयांनी चंद्रहारचा शोध घेतला असता, चंद्रहार शिंदे हा मौजे करेवाडी शिवारातील मुंगळ्याचा माळ येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी संबंधित तरुणीविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येमागील नेमकी कारणे आणि त्याआधी घडलेल्या घटनांचा तपशील तपासातून समोर येणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सार्वजनिक अपमान, सामाजिक दबाव आणि मानसिक आरोग्य या विषयांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, मानसिक तणावाची लक्षणे वेळेवर ओळखणे आणि संवाद ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मनोज जरांगे पाटील आक्रमक; 30 मेपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण, सरकारला इशारा

0

जालना — मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारत 30 मेपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे.

सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

30 मेपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण

अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारला आता आणखी वेळ दिला जाणार नाही. 30 मेपासून आमरण उपोषण सुरू होणार असून महाराष्ट्रभर आंदोलन उभारले जाईल.”

त्यांनी दावा केला की, राज्यभरातून लाखो मराठा बांधव या आंदोलनात सहभागी होतील. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक उग्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या काय?

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी सरकारसमोर काही महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये –

हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचे थांबवलेले वाटप तातडीने सुरू करावे

आंदोलन सुरू होण्यापूर्वी मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण पूर्ण करावे

कुणबी नोंदी सापडलेल्या 58 लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्यावे

सातारा गॅझेटचा जीआर तातडीने जारी करावा

सातारा, कोल्हापूर आणि पुणे संस्थान गॅझेट संदर्भातील प्रलंबित जीआर 1994 च्या धर्तीवर काढावा

मराठा उपसमिती बरखास्त करावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका

यावेळी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही थेट निशाणा साधला.

ते म्हणाले, “मी फडणवीसांना दोष देत नाही, पण हैदराबादचा जीआर काढल्यानंतरही प्रमाणपत्रांचे वाटप का थांबले? अधिकारी प्रमाणपत्र देत नसतील तर त्याला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत.”

तसेच त्यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करत, “शिंदे साहेबांनी अभियान राबवून प्रमाणपत्र वाटप केले होते. तसेच अभियान फडणवीसांनीही राबवावे,” असे म्हटले.

राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता

मनोज जरांगे पाटील यांच्या नव्या आंदोलनाच्या घोषणेमुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून सरकारची भूमिका काय राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

कृषी वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन; महावितरणची पुनर्रचना जाहीर

0

मुंबई —  राज्यातील कृषी वीजपुरवठा अधिक कार्यक्षम आणि स्वतंत्र पद्धतीने हाताळण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महावितरणच्या पुनर्रचनेची अधिकृत अधिसूचना शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली असून कृषी वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात येणार आहे.

या नव्या निर्णयानुसार, कृषी ग्राहकांच्या वीजपुरवठ्याशी संबंधित सर्व व्यवहार आता ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड’ या नव्या संस्थेकडे सोपविण्यात येणार आहेत. ही योजना १ एप्रिल २०२६ पासून लागू मानली जाणार आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची पुनर्रचना आणि हस्तांतरण योजना २०२६’ अंतर्गत कृषी वीजपुरवठा विभाग महावितरणपासून वेगळा करण्यात येणार आहे. नव्याने स्थापन होणारी संस्था कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र वीज वितरण परवानाधारक म्हणून काम करेल.

ही कंपनी एमएसईबी होल्डिंग कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी असेल. कृषी ग्राहकांची नोंदणी, नवीन वीज जोडण्या, बिलिंग, वीजबिल वसुली, ग्राहक सेवा, अनुदान व्यवस्थापन, लेखांकन तसेच कृषी वीजपुरवठ्याशी संबंधित सर्व व्यवहार या संस्थेकडे सोपविण्यात येणार आहेत.

मात्र वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, उपकेंद्रे, वितरण यंत्रणा आणि इतर पायाभूत सुविधा महावितरणकडेच कायम राहणार आहेत. तसेच औद्योगिक, व्यावसायिक, निवासी आणि बिगर कृषी ग्राहकांना महावितरणकडूनच वीजपुरवठा सुरू राहणार आहे.

नवीन कृषी संस्था ‘डीम्ड डिस्ट्रिब्युशन लायसन्सी’ म्हणून कार्यरत राहील आणि महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियंत्रणाखाली काम करेल. कृषी ग्राहकांसाठी मिळणारी सर्व अनुदाने आणि सबसिडी या संस्थेकडे जमा होणार असून त्यातून वीज खर्च प्रतिपूर्ती आणि महावितरणला सेवा शुल्क दिले जाणार आहे.

राज्य सरकार कृषी संस्थेच्या खेळत्या भांडवलासाठी किमान २,५०० कोटी रुपयांची हमी देणार आहे. तसेच २०२६ ते २०३० या कालावधीसाठी वार्षिक अंदाजे १,५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे महावितरणची विद्यमान कर्जे, बँक दायित्वे, वित्तीय जबाबदाऱ्या आणि वीज खरेदी करार महावितरणकडेच कायम राहणार आहेत. कृषी संस्था केवळ कृषी क्षेत्रासाठी किरकोळ वीजपुरवठादार म्हणून काम करणार आहे.

कृषी व्यवसायाशी संबंधित न्यायालयीन, नियामक आणि कायदेशीर प्रकरणेही नव्या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार या योजनेत बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे राखून ठेवण्यात आला आहे.

धारूरच्या हिंगणी तलावात होडी उलटली; दोन मुलींचा बुडून मृत्यू, गावात शोककळा

0

धारूर —  बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात असलेल्या हिंगणी तलावात शनिवारी सकाळी दुर्दैवी दुर्घटना घडली. तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलींमधील तिघी जणी मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या होडीत बसल्या असताना होडी अचानक उलटली. या दुर्घटनेत दोन अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून एका मुलीला सुदैवाने वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे हिंगणी गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणी येथील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील पलक शामराव पारवे, दिव्या विकास कांबळे, मोहिनी भीमराव पारवे, तन्वी कोंडीराम पारवे आणि जानवी कोंडीराम पारवे या पाच मुली शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तलावावर पोहण्यासाठी गेल्या होत्या.
तलावाच्या काठावर असलेल्या मासेमारीच्या होडीत पलक, दिव्या आणि मोहिनी या तिघी बसल्या. होडी काही अंतर आत गेल्यानंतर अचानक संतुलन बिघडून ती उलटली. त्यामुळे तिन्ही मुली पाण्यात पडून बुडू लागल्या.
मोहिनीला पोहता येत असल्याने ती स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पलक आणि दिव्या यांनी तिला पकडल्याने तिघीही पाण्यात बुडाल्या. तलावाच्या काठावर असलेल्या इतर मुलींनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तिघींनाही पाण्यातून बाहेर काढले.
या घटनेत मोहिनीला शुद्ध आली. मात्र पलक शामराव पारवे (वय १४, रा. हिंगणी) आणि दिव्या विकास कांबळे (रा. कासारवाडी, ता. परळी) यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघींनाही मृत घोषित केले.
या हृदयद्रावक घटनेनंतर हिंगणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे.

लिंबागणेश चा राष्ट्रीय महामार्गावर “मृत्यूचा सापळा”; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

0

बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी वर कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांनी गतिरोधक व सुरक्षा उपायांची मागणी केली आहे.

मृत्यूचा सापळा’ पुन्हा ठरला घातक; नागरिकांकडून गतिरोधक व सुरक्षा उपायांची मागणी

लिंबागणेश —  बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे राष्ट्रीय महामार्ग 548 डी वर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. भालचंद्र विद्यालय परिसरात कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. 15 मे) रोजी रात्री सुमारे पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास टाटा कंपनीची विस्टा कार (क्र. MH 05 AX 0388) आणि हिरो स्प्लेंडर दुचाकी (क्र. MH 44 AA 6226) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नेकनूर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार विठ्ठल राठोड आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालय, बीड येथे हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेले दुचाकीस्वार बबन काशिनाथ लगास आणि ज्ञानदेव विष्णू लगास (दोघे रा. चिखलबीड, ता. जि. बीड) असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे चिखलबीड गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग 548 डी वरील लिंबागणेश परिसरात वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेषतः भालचंद्र विद्यालय परिसरात वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने हा भाग ‘अपघातप्रवण झोन’ बनला आहे. येथे तातडीने गतिरोधक बसविणे, वेगमर्यादा फलक उभारणे, रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था सुधारणे आणि वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सात महिन्यांपासून मुलगी बेपत्ता; हतबल पालकांचा एसपी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

0

बीड —  जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात एका दाम्पत्याने अंगावर पेट्रोल-डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील हे जोडपे आपल्या १६ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी गेल्या सात महिन्यांपासून पोलिसांकडे हेलपाटे मारत आहे. मात्र अद्याप मुलीचा शोध लागला नसल्याने हताश झालेल्या आई-वडिलांनी अखेर टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.


माहितीनुसार, सात महिन्यांपूर्वी एका तरुणाने या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. परंतु इतका कालावधी उलटूनही मुलगी सापडलेली नाही. यामुळे संतप्त आणि निराश झालेल्या पालकांनी वारंवार पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. मात्र पोलिसांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शुक्रवारी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात या दाम्पत्याने अंगावर पेट्रोल-डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्यांना रोखले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून बेपत्ता मुलीचा शोध नेमका कधी लागणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.

बीडमध्ये मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला; ‘स्वयंघोषित गोरक्षकांवर गुन्हे दाखल करा’ची मागणी

0

बीड —  शहरातील मोमीनपुरा भागात पोलिसांच्या कारवाईदरम्यान स्वयंघोषित गोरक्षकांनी घरांची कुलपे तोडून दहशत निर्माण केल्याचा आरोप करत ऑल इंडिया जमियतुल कुरैश संघटना आणि मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

शुक्रवारी झालेल्या या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख मुजीब, जेष्ठ नगरसेवक मोईन मास्टर, गटनेते फारुक पटेल, खुर्शीद आलम, भागवत तावरे यांच्यासह अनेक नगरसेवक व समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, ११ मे २०२६ रोजी मध्यरात्री पेठ बीड पोलिसांनी मोमीनपुरा परिसरात कारवाई केली. या कारवाईत कथित गोरक्षकांनाही सहभागी करून घेण्यात आले. संबंधितांनी अनेक घरांची कुलपे तोडली, घरात घुसून दबाव टाकला आणि संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. महिला व लहान मुले उपस्थित असतानाही संबंधितांनी आक्रमक वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी कारवाईचे व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. या व्हिडिओंमुळे बीडमधील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा इशाराही शिष्टमंडळाने दिला.
शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना सांगितले की, गोवंश हत्या बंदी कायद्याला विरोध नसला तरी त्या कायद्याच्या आडून खासगी स्वयंघोषित गोरक्षकांना सहभागी करून घेत पोलिसांनी केलेली कारवाई आक्षेपार्ह आहे. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित गोरक्षकांसह त्यांना कारवाईत सहभागी करून घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी.

सना मलिक यांच्याकडेही मागणी

कुरेशी समाजाच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी सकारात्मक भूमिका घेतली होती. त्याचप्रमाणे बीड प्रकरणातही आमदार सना मलिक यांनी लक्ष घालावे, अशी विनंती शेख मुजीब यांनी केली.

शब्बीर मामूंसारखा गोरक्षक कोण?”

हिंदू-मुस्लिम सलोखा वाहक भागवत तावरे यांनी यावेळी परखड भूमिका मांडताना, “शिरूरचे पद्मश्री शब्बीर मामू यांच्यासारखा खरा गोरक्षक कोण आहे?” असा सवाल उपस्थित केला. धर्माच्या नावावर तेढ निर्माण करून समाजातील सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकाराने बीडमध्ये उभारले जाणार मोकाट कुत्र्यांसाठी निवारा केंद्र

0

नसबंदी व लसीकरण मोहिमेला गती;५० लाखांचा निधी मंजूर

बीड —  शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर अखेर मोठी आणि दिलासादायक कारवाई सुरू झाली आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आ. विजयसिंह पंडित यांनी पुढाकार घेत मोकाट कुत्र्यांच्या निवारा केंद्रासाठी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. हा निधी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.


शहरातील धानोरा रोडवरील पंढरी नगरी परिसरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आ. विजयसिंह पंडित यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत ठोस निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

राजीव गांधी चौकाजवळ उभारले जाणार निवारा केंद्र

नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत, राजीव गांधी चौक परिसरात मोकाट कुत्र्यांसाठी आधुनिक निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रात कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण आणि आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

पालिका प्रशासनाला तातडीच्या सूचना

आ. विजयसिंह पंडित यांनी नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, मुख्याधिकारी शैलेश फडसे आणि पालिका पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत तातडीने मोहिम राबवण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या निर्देशानंतर पालिकेने शहरात नसबंदी आणि लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे.
पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, खंडेश्वरी रोड परिसरात आतापर्यंत ५०० हून अधिक मोकाट कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता शहरभर विशेष शोध मोहिम राबवून पुढील कारवाई केली जाणार आहे.

नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण

शासनाच्या निर्देशानुसार यापूर्वीच कारवाई होणे अपेक्षित असताना दुर्लक्ष झाल्याची टीका होत होती. मात्र आता नव्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आ. विजयसिंह पंडित शहर विकासासाठी “ॲक्शन मोड”मध्ये असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.