बीड — बीड आणि लातूर जिल्ह्यातील खाजगी शिक्षक भरती तसेच थकीत वेतन प्रकरणाची एसआयटी चौकशी योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष इंजि. सादेक इनामदार यांनी केला आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या संस्थाचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण आयुक्त पुणे कार्यालय आणि एसआयटी समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून बीड आणि लातूर जिल्ह्यातील शिक्षक भरती व थकीत वेतन प्रकरणातील कथित अनियमिततेबाबत पुरावे सादर करण्यात आले आहेत. मात्र अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नाही.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, इतर काही जिल्ह्यांमध्ये संबंधित प्रकरणांमध्ये दोषींवर कारवाई करण्यात आली असून, बीड आणि लातूर जिल्ह्यात मात्र केवळ काही अधिकाऱ्यांवरच कारवाई झाली आहे. या प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे.
मोडायची हिंमत नाही बोगस शाळांचे मणके; शिक्षणाधिकारी झालेत संस्थाचालकांचे पानके ?
एसआयटी चौकशीतील काही बाबी संशयास्पद असल्याचा आरोप करत शिक्षण आयुक्त कार्यालयातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संपर्काची चौकशी करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
तक्रारीतील आरोपांची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संस्थाचालक, अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास ३० जून २०२६ रोजी मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा इंजि. सादेक इनामदार यांनी दिला आहे.




