जंतर मंतर’ सीझन -2 लवकरच; शिक्षणाच्या प्रश्नावर देशव्यापी मोहिमेची घोषणा

नवी दिल्ली — कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ‘जंतर मंतर’ या उपक्रमाचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर ‘जंतर मंतर’चा दुसरा सीझन कधी सुरू होणार, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात होता. त्यावर प्रतिक्रिया देताना दीपके यांनी दुसरा सीझन लवकरच सुरू होईल, असे स्पष्ट केले. मात्र, यावेळी नेमका कोणता मुद्दा केंद्रस्थानी असेल, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिलेली नाही.

दरम्यान, सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी या आगामी मोहिमेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या सीझनमध्ये सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीविरोधात आवाज उठवण्याबरोबरच जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाणार आहे.

‘श्रवण दौऱ्या’तून जनतेचा आवाज ऐकणार

सौरभ दास यांनी सांगितले की, देशभरातील नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ‘श्रवण दौरा’ सुरू करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनापासून या मोहिमेला सुरुवात करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

या मोहिमेत शिक्षणाच्या प्रश्नाला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. पालक आणि नागरिकांनी आपल्या परिसरातील सरकारी शाळांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करावी, शाळांमधील समस्या समोर आणाव्यात आणि आवश्यक सुधारणांसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दास यांनी केले.

सरकारी शाळांच्या स्थितीची पाहणी करण्याचे आवाहन

सरकारी शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती नागरिकांनी जाणून घ्यावी, अशी भूमिका सीजेपीकडून मांडण्यात आली आहे. या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेतील समस्या लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे दास यांनी सांगितले.

देशातील तरुण मोठ्या प्रमाणात सामाजिक प्रश्नांमध्ये जबाबदारी स्वीकारत असून, त्यांच्या सहभागातून भविष्यात ‘विकसित भारत’ घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बैठकीसाठी हॉल मिळवताना दबावाचा आरोप

दरम्यान, अभिजीत दीपके यांनी दिल्लीतील स्वयंसेवकांच्या बैठकीसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. बैठकीसाठी हॉल शोधत असताना अनेक हॉल मालकांनी जागा देण्यास नकार दिला. आपल्यावर दबाव असल्याचे काही हॉल मालकांनी सांगितल्याचा दावा दीपके यांनी केला.

मोठ्या प्रयत्नांनंतर एका हॉलची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, बैठकीच्या दिवशी सकाळी हॉलच्या मालकांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. बैठक होऊ दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आल्याचे दीपके यांनी म्हटले आहे.

या प्रकारामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोपही दीपके यांनी केला. मात्र, या आरोपाची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

‘दिल्ली पोलीस काय करत आहे?’; सीजेपीचा सवाल

या प्रकरणावर सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला. बैठकीसाठी हॉल देणाऱ्या मालकांना कथितरित्या धमक्या दिल्या जात असतील, तर दिल्ली पोलीस याबाबत काय कारवाई करत आहे, असा सवाल त्यांनी केला.

पोलीस यंत्रणा दिल्लीतील सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करणार आहे की केवळ राजकीय दबावाखाली काम करणार, असा प्रश्नही रांका यांनी उपस्थित केला.

आता ‘जंतर मंतर’च्या दुसऱ्या सीझनमध्ये नेमके कोणते मुद्दे मांडले जाणार आणि ‘श्रवण दौऱ्या’च्या माध्यमातून देशभरातील नागरिकांच्या कोणत्या समस्या समोर आणल्या जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles