बीड — देश प्रेम, संस्कार, त्याग, समर्पण हा कथित देखावा असल्याचे चित्र भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा कारभार पाहिल्यानंतर उघड होतं. याच संस्कार समर्पणाचं पीक चांगलं यावं यासाठी संघाने मशागतीसाठी हातात घेतलेलं “खुरप” च संस्थेच्या अंगलट आलं.कथित संघ विचारधारेच पीक नष्ट करून भ्रष्टाचाराचं तन फोफवायला मदत करू लागलं.परिणामी “अमर“वेलाने संघाचं पीक असं झाकोळून टाकलं की तेच संस्थेचा “नाथ” (स्वामी) बनलं. यामध्ये झाकोळून गेलेल्या संघाच्या विचार पिकाला “प्रभाकर“(सूर्य) कधी दिसणार की अशीच बजबजपुरी कायम राहून ते नष्ट होणार का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
रक्ताचं पाणी करून अनेकांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना करत त्याचा वटवृक्ष बनवला. संघ विचारधारेनुसारच त्यांनी याची जोपासना केली. मात्र काळ कोणताही एक सारखा राहत नसतो असं म्हणतात त्याचप्रमाणे
सध्याची संस्थेची परिस्थिती पाहिली तर हा सगळा साळसूदपणाचा पांघरलेला बुरखा तर नव्हता ना? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे. हा बुरखा “खुरपे” प्रेमात अडकून टर टरा फाटल्याचं पाहायला मिळत आहे.
“सह्याद्री माझा” ने नीट पेपर फुटी प्रकरणात घडलेल्या खळबळजनक घटनांचा विचार केला तर शिक्षण क्षेत्रात तळागाळापासून ते वर पर्यंत किती बरबटलेली लोक आहेत याचा भांडाफोड करण्याचा छोटासा प्रयत्न सुरू केला आहे. संघ विचारधारेच्याच भाशिप्र मंडळाची बोगस इंग्रजी शाळा चालवत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा लातूरच्या रेनीसन्स सीबीएसई इंग्लिश स्कूल चा अध्यक्ष असलेला बालरोग तज्ञ डाॅ. मनोज शिरुरे याला नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने ताब्यात घेतलं अन् संघ विचारधारा नुसतीच संस्काराच्या देश प्रेमाच्या गप्पा मारते का हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या संस्थांचं वानगी दाखल उदाहरण देखील आमच्या हाती आलं.
सन 2022 -23 मध्ये भाशिप्र संस्था संचलित अंबाजोगाई अंतर्गत येणाऱ्या माजलगाव मधील सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयात ई.5 वी ते 10 वी च्या प्रवेश केलेल्या 612 विद्यार्थ्यांकडून 15 हजार रुपये डोनेशनच्या नावाखाली खंडणी वसुली करण्यात आली. हा आकडा 91 लाख 80 हजार इतका होता.
या प्रकरणात माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांनी लक्ष घातल्यानंतर कारवाई करण्यात आली. माजलगाव पं स चे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्या तक्रारीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गू.र.नं 142/2022 नुसार कलम 384,34 भा दं वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत 1 लाख 76 हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे, सहशिक्षक सदाशिव ढगे, परमेश्वर आदमाने, कमलाकर झोडगे यांच्यावर हे प्रकरण संस्थेचा स्थानिक समन्वय समितीचा कार्यवाह “अमरनाथ खुरपे” याच्या सांगण्यावरून चांगलेच शेकले गेले. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान हे आरोपी जामिनावर सध्या तरी बाहेर आहेत. बरं विशेष म्हणजे जमा केलेला असा काळा पैसा संस्थेच्या खात्यावर कुठेही जमा केला जात नाही तो स्वतःच्या तुंबडी भरण्यासाठीच वापरला जातो. “आपण सगळे भाऊ भाऊ जमा झालेली रक्कम वाटून खाऊ“असा मूलमंत्र जपत आजही अनेक भ्रष्टाचाराची लफडी भाशिप्र संस्थेत होताना दिसून येत आहेत.
दरम्यान एवढं मोठं प्रकरण उघडकिस येऊन महाराष्ट्रात गाजलं संघ संस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तरी देखील आजही सिद्धेश्वर विद्यालयातील भ्रष्टाचाराचा मुख्य सूत्रधार भाशिप्र संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी विराजमान आहे. हे भ्रष्टाचाराचे प्रकरण उजेडात येऊन जवळपास चार वर्षाचा कालावधी होत आहे. तरीदेखील संस्थेने कुठलीच कारवाई केली नाही.परिणामी पौर्णिमेच्या “चंद्र”कलेप्रमाणे भ्रष्टाचाराचा हा ‘कांत’ आपली पाळे “मूळे” खोलवर रुजवत “खुरपे” हातात घेऊन “अमर”वेलीच्या छायेत संघसंस्काराचं पीक उध्वस्त करत आहे.
त्याच्याच अखत्यारीत अजूनही बिनधास्त हे गोरखधंदे राजरोस सुरू आहेत. यावरूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्याग समर्पण देश प्रेम संस्कार हे शब्द फक्त लोकांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी आहेत काय? सिद्धेश्वर विद्यालयात झालेला भ्रष्टाचार माहित असूनही कमीत कमी न्यायालयातून निर्दोष सुटेपर्यंत तरी नैतिकता म्हणून आरोपी सदस्याची पदावरून हकालपट्टी का केली गेली नाही? पैशापुढे संघ विचारधारेत देखील नैतिकता राहिली नाही काय? कष्टाने उभा केलेली संस्था बांडगुळच खाऊन जाणार का? भाशिप्र संस्था भ्रष्टाचार मुक्त व्यवस्थेचा सूर्योदय कधी पाहणार? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

