Home Blog Page 7

लिंबागणेश–अंजणवती मार्गावर २७ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून; अपघाताचा बनाव उघड

0

बीड —  तालुक्यातील लिंबागणेश ते अंजणवती रस्त्यालगत एका २७ वर्षीय तरुणाचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला हा मृत्यू रस्ते अपघातात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, मृताच्या गळ्यावर आढळलेल्या व्रणांमुळे हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले आहे.


मृत तरुणाचे नाव किरण बंडू सोनवणे (वय २७, रा. अंजणवती, ता. जि. बीड) असे असून या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळी महिलांना आढळला मृतदेह

सोमवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास व्यायामासाठी जाणाऱ्या काही महिलांना गणेशमाळ परिसरात रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती पडलेली दिसली. जवळ जाऊन पाहणी केली असता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर ग्रामस्थ आणि पोलिस प्रशासनाला तातडीने माहिती देण्यात आली.
घटनास्थळी एमएच १६ एआर २६६१ क्रमांकाची दुचाकीही आढळून आली होती. सुरुवातीला वादळी वाऱ्यामुळे दुचाकीचा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

अपघाताचा संशय; तपासात उघड झाला खून

घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री परिसरात जोरदार पाऊस व वादळी वारे होते. त्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला असावा, अशी चर्चा होती. मात्र, मृतदेहाची पाहणी आणि पुढील तपासादरम्यान किरण सोनवणे यांच्या गळ्यावर पांढऱ्या रंगाच्या गमछ्याने आवळल्याच्या खुणा आढळल्या.
यामुळे हा अपघात नसून नियोजनपूर्वक खून करून अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.

अज्ञात आरोपींचा शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच नेकनूर व लिंबागणेश पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदन अहवाल व प्राथमिक तपासाच्या आधारे अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू आहे.

परिसरात खळबळ

तरुणाचा खून झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अंजणवती, लिंबागणेश आणि परिसरात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला अपघात समजल्या गेलेल्या घटनेचे खुनात रूपांतर झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.

शेतकरी कर्जमाफीत 55 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार की फक्त 16 लाख शेतकऱ्यांना  लाभ मिळणार ? 

0

मुंबई — राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे. सुमारे 36 हजार कोटी रुपयांच्या या योजनेमुळे 55 लाख 72 हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, योजनेतील अटी आणि पात्रता निकषांमुळे प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना तातडीने लाभ मिळणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सरकारने या योजनेत कर्जमाफी, एकवेळचा समझोता (OTS) आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ असे तीन स्वतंत्र घटक समाविष्ट केले आहेत. योजनेचा शासन निर्णयही जारी करण्यात आला असून त्यामध्ये लाभार्थी आणि अटींचा तपशील स्पष्ट करण्यात आला आहे.

16.48 लाख शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ

योजनेनुसार दोन लाख रुपयांपर्यंत (मुद्दल व व्याजासह) थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले जाणार आहे. राज्यातील अशा 16 लाख 48 हजार शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असून त्यासाठी सरकारवर सुमारे 14 हजार 754 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.

महात्मा फुले कर्जमाफी लाभार्थ्यांमध्ये नाराजी

सन 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने राबविलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख 71 हजार शेतकऱ्यांसाठी सरकारने स्वतंत्र तरतूद केली आहे. या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार असला तरी त्यासाठी 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असलेली संपूर्ण थकबाकी प्रथम भरावी लागणार आहे.

या अटीमुळे अनेक शेतकरी नाराज असल्याचे दिसून येत आहे. विरोधकांनी याला शेतकऱ्यांमधील भेदभाव असल्याचा आरोप केला आहे. यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा लाभ देण्यात आला होता, मग यावेळी वेगळे निकष का लावले जात आहेत, असा सवाल शेतकरी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

दोन लाखांपेक्षा जास्त कर्जदारांना तातडीचा लाभ नाही

दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या सुमारे 2 लाख 90 हजार शेतकऱ्यांना 31 मार्च 2027 पर्यंत दोन लाख रुपयांवरील अतिरिक्त थकबाकी भरण्याची मुदत देण्यात आली आहे. ही रक्कम भरल्यानंतरच त्यांना दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या गटातील शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळणार नाही.

नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन

योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या 23 लाख 63 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, यापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नसल्याचा मुद्दाही चर्चेत आला आहे. या थकीत रकमेचा आकडा सुमारे 5 हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे.

योजना दिलासा की वाद?

महायुती सरकारच्या नव्या कर्जमाफी योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष लाभार्थींची संख्या, जुन्या कर्जमाफी लाभार्थ्यांसाठीच्या अटी आणि मोठ्या थकबाकीदारांसाठी ठेवलेले निकष यामुळे ही योजना वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. आगामी काळात या योजनेची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष लाभ किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो याकडे राज्यभरातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

शाळा 15 जूनपासून ऑफलाईनच सुरू होणार; ऑनलाईन शिक्षणाबाबत शिक्षण विभागाचा मोठा खुलासा

0

मुंबई —  राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीबाबत गेल्या काही दिवसांपासून पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळा उशिरा सुरू होणार का, किंवा यंदाही काही काळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाणार का, अशा विविध चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला होता. मात्र, शिक्षण विभागाने या सर्व अफवांना पूर्णविराम देत नवीन शैक्षणिक वर्ष पारंपरिक ऑफलाईन (प्रत्यक्ष) पद्धतीनेच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून 2026 पासून नियमितपणे सुरू होणार आहे. या नियोजित तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहूनच शिक्षण घ्यावे लागणार आहे.


यंदा ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा निर्णय शासनाच्या विचाराधीन नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्य मंडळाच्या शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुटी देण्यात आली होती. आता सुटीचा कालावधी संपत असून शाळा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

विदर्भातील शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल

विदर्भातील काही भागांमध्ये अद्यापही उष्णतेची तीव्रता कायम असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून तेथील शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. 15 जून ते 29 जून या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळी 7 ते 11.45 या वेळेत भरवल्या जाणार आहेत. त्यानंतर 30 जूनपासून विदर्भासह संपूर्ण राज्यातील शाळा नियमित वेळेनुसार सुरू होतील.
शिक्षण विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, शाळा सुरू होण्याबाबत कोणताही बदल झालेला नसून सर्व शाळांमध्ये 15 जून रोजी पहिली घंटा वाजणार आहे.

मुदतबाह्य लस्सी नष्ट, रिफाईंड सोया तेल जप्त; केज-पाटोदा-माजलगावात अन्न विभागाची कारवाई

0

बीड — जिल्ह्यात भेसळखोर, मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्रेते आणि प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी धडक मोहीम सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार 25 मे 2026 पासून जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून अनेक ठिकाणी छापेमारी करून अन्नपदार्थांचे नमुने आणि मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे.

या मोहिमेदरम्यान केज तालुक्यातील विविध आस्थापनांची तपासणी करून मिठाईचे दोन नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. पाटोदा तालुक्यातील दोन दूध संकलन केंद्रांवर तपासणी करून दूधाचे दोन नमुने प्रयोगशाळेसाठी जप्त करण्यात आले. तर माजलगाव येथे 71 किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला.

याशिवाय शिरूर शहरात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई करत 158 किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे 24 हजार 806 रुपये असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, बीड तालुक्यातील वासनवाडी येथील एका लस्सी उत्पादन केंद्रावर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तपासणीदरम्यान मुदतबाह्य अन्नपदार्थांचा वापर करून लस्सीचे उत्पादन सुरू असल्याचे आढळले. यावेळी 102 लिटर लस्सीचा साठा ताब्यात घेऊन जागेवरच नष्ट करण्यात आला. नष्ट करण्यात आलेल्या मालाची किंमत सुमारे 8 हजार 125 रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

अन्न सुरक्षा विभागाने घेतलेले सर्व नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांविरोधातही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 30 मे रोजी बीड शहरातील एका पानटपरीवर छापा टाकून तब्बल 2 लाख 60 हजार 570 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर 31 मे रोजी तलवडा येथील पानटपरीवरून 5 हजार 392 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तसेच 2 जून रोजी वडवणी येथील एका किराणा दुकानातून 23 हजार 580 रुपयांचा गुटखा जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासन विभागाने आगामी काळातही भेसळयुक्त अन्नपदार्थ, मुदतबाह्य वस्तू आणि प्रतिबंधित पदार्थ विक्रेत्यांविरोधात नियमित धाडसत्र सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. या सलग कारवायांमुळे जिल्ह्यातील भेसळखोर आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मनोज जरांगे यांच्या मागण्यांवरून नवीन वाद; 12 जूनला OBC समाज रस्त्यावर उतरणार

0

मुंबई — मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने त्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, ओबीसी प्रमाणपत्रधारकांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या मुद्द्यावर ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.


ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना 12 जून रोजी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची घोषणा केली. जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत कथित बोगस दाखल्यांना मान्यता देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेंडगे म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकार त्यांच्या सर्व मागण्या मान्य करत आहे. मात्र, या प्रक्रियेत ओबीसी समाजाच्या अधिकारांवर गदा येत असल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाली आहे. त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका करत, काही निर्णयांमुळे ओबीसी समाजात नाराजी असल्याचे सांगितले.


यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागितली असून, ओबीसी समाजाची भूमिका ऐकून घेण्याची मागणी केली आहे. तसेच, कुणबी नोंदींच्या आधारे मिळालेल्या प्रमाणपत्रांचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवलेल्या व्यक्तींच्या प्रकरणांचा न्यायालयीन मार्गाने पाठपुरावा करण्याचा इशाराही दिला.
मराठा आरक्षण, कुणबी नोंदी आणि जात पडताळणी प्रमाणपत्र या मुद्द्यांवरून राज्यातील सामाजिक व राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काळात सरकारची भूमिका आणि विविध समाजघटकांच्या प्रतिक्रिया याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

परळीत २६ किलो गांजासह पावणेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत ;एलसीबी ची कारवाई

0

बीड —  स्थानिक गुन्हे शाखेने परळीमध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. परळी येथील रामनगर भागात एका घरावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल २६ किलो २५८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ७ लाख ८७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.


मंगळवारी (दि. २ जून) दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळीतील रामनगर भागात राहणारा संशयित राहुल राजू मोहिते (वय २६ वर्षे) याच्या घरावर अचानक छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना घरात लपवून ठेवलेला २६ किलो २५८ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह एकूण ७ लाख ८७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी राहुल मोहिते याच्याविरुद्ध परळी पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई बीड एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखालील पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचन, उपनिरीक्षक दीपक राठोड, सफौ बालाजी दराडे, अंमलदार रामचंद्र केकान, गोविंद भताने, सचिन आंधळे, प्रल्हाद भताने, पुरुषोत्तम काळे, शीतल घुगे, पंडित पांचाळ, कैलास कोलमवाड, शुभम घुले आणि महिला पोलीस अंमलदार भोसले आदींनी केली.

जुगार अड्ड्याला विरोध करणाऱ्या महिलेला अमानुष मारहाण; रंजेगावातील घटनेने खळबळ

0

बीड — बीड जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरातील रंजेगाव येथे जुगार अड्ड्याला विरोध करणाऱ्या एका महिलेला अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका कथित जुगार अड्ड्यामुळे शाळकरी मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगत संबंधित महिलेने त्याला विरोध केला होता. याच कारणावरून काही जणांनी तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


पीडित महिलेच्या आरोपानुसार, आरोपींनी प्रथम तिच्या घरावर दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर निखिल आबूज आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांनी महिलेला बेदम मारहाण केली. हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर सध्या बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्ल्यादरम्यान महिलेच्या दोन लहान मुलांनाही आरोपींनी धक्काबुक्की करत फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत मुलांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात आरोपींचे  वाल्मीक कराड सोबत संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी आणि वाल्मीक कराड यांचे फोटोही समोर आले आहेत. मात्र, याबाबत अधिकृत यंत्रणेकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीनंतर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, वृत्त लिहिपर्यंत आरोपींना अटक झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

चौसाळा बायपासवर पहाटे थरारक पाठलाग; डिझेल चोरी करणारी 5 जणांची टोळी पोलिसांनी पकडली

0

चौसाळा —  राज्यात संभाव्य इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना नेकनूर पोलिसांनी मोठी कारवाई करत डिझेल चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. चौसाळा बायपास परिसरात पहाटेच्या सुमारास संशयित वाहनाचा थरारक पाठलाग करून नेकनूर पोलिसांनी आरोपींना पकडले. या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, इराण-इराक आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी डिझेल आणि इतर इंधनाचा साठा करण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर डिझेल चोरी करून त्याची अवैध विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.


या माहितीच्या आधारे मंगळवारी (दि. २ जून) पहाटे चौसाळा बायपास परिसरात पोलिसांनी सापळा रचला. पोलीस निरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रामनाथ पुंडे आणि पोलीस शिपाई विलास घुले यांनी संशयित वाहनाचा पाठलाग केला. काही अंतरापर्यंत सुरू असलेल्या थरारक पाठलागानंतर पोलिसांनी वाहन अडवून पाचही संशयितांना ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, डिझेल वाहतुकीसाठी वापरली जाणारी साधने आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास चौसाळा पोलीस करीत आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला हिरवा कंदील; 36,585 कोटींची तरतूद

0

मुंबई —  राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (2 जून) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळण्याची शक्यता असून 65 लाखांहून अधिक कर्जखाती या योजनेच्या कक्षेत येणार आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” मंजूर केली असून यासाठी तब्बल 36 हजार 585 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

आचारसंहितेमुळे घोषणेला विलंब

सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे या निर्णयाची अधिकृत घोषणा तातडीने केली जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर सरकारकडून योजनेची अधिकृत अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

फडणवीसांनी दिले होते संकेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच कर्जमाफीबाबत महत्त्वाचे संकेत दिले होते. सरकार 30 जूनपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. यासंदर्भात राष्ट्रीयकृत बँकांशी चर्चा पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले होते.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ

राज्य सरकार केवळ कर्जमाफीच नव्हे तर नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देणार आहे. अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर निधी देण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचे सांगितले जात आहे.

समितीच्या अहवालानंतर निर्णय

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी विशेष समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, राज्य सरकारचा सहकार विभाग लवकरच कर्जमाफीच्या अटी व शर्तींबाबत सविस्तर परिपत्रक जारी करणार असून त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम प्रक्रिया सुरू होणार आहे.

सह्याद्री माझा इफेक्ट : TET घोटाळ्यानंतर शासन सतर्क; उत्तीर्ण शिक्षकांची माहिती तातडीने मागवली”

0

मुंबई — बीडसह राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अनेकांना कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आले आहे. इतकंच नाही तर भ्रष्टाचाराची पाळे”मुळे” खोलवर रुजवत “चंद्र”कला दाखवणाऱ्या दलालाने
टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अनेकांकडून पैसे उकळत तुंबडी भरल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची सविस्तर माहिती महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्हा परिषदांकडून तातडीने मागवली आहे. आगामी साप्ताहिक बैठकीत मुख्य सचिवांकडून या विषयाचा आढावा घेतला जाणार असल्याने संबंधित माहिती आज दुपारी ४ वाजेपर्यंत शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
बीडमध्ये शालार्थ आयडी घोटाळा, पदभरती घोटाळा, थकीत वेतन घोटाळा, टीईटी प्रमाणपत्र घोटाळा मोठ्या प्रमाणावर होऊन कोट्यावधीची आर्थिक उलाढाल यातून झाली. अनेकांनी “चंद्र” प्रकाशात भ्रष्टाचाराचे आपणच “कांत” आहोत हे दाखवत भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” घट्ट रोवली. या घोटाळ्याची एक एक प्रकरण “सह्याद्री माझा” उजागर करत असताना शिक्षण प्रशासन देखील खडबडून जाग होऊ लागला आहे.
बीड जिल्ह्यात टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अनेक शिक्षक केलेल्या घोटाळ्यामुळे किंवा त्यांच्यावर दाखल झालेल्या फसवणुकीसारख्या गंभीर फौजदारी गुन्ह्यामुळे कायमस्वरूपी परीक्षेसाठी प्रतिबंधित करण्यात आलेले आहेत. अनेकांनी भ्रष्टाचारी “बबड्या“च्या भूलथापांना बळी पडत शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा मोजला. हे सगळे शिक्षक नावाजलेल्या संस्थांमधून शासनाचा पगार बिनधास्त उचलत आहेत. थोडक्यात भ्रष्टाचाराला आणखी एक संधी उपलब्ध होत आहे. याच सगळ्या बाबींचा विचार करून ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकारी ज्योत्स्ना अर्जुन यांनी एक जून रोजी 2026 रोजी पत्र जारी केले आहे. त्या पत्रानुसार, सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना आवश्यक माहिती पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शासनाने जिल्हा परिषदांकडून खालील माहिती मागवली आहे:

🕳️. • टीईटी (TET) उत्तीर्ण शिक्षकांची एकूण                 संख्या
🕳️•  टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची टक्केवारी
• 🕳️ शिक्षकांनी टीईटी परीक्षा द्यावी व ती      उत्तीर्ण व्हावी यासाठी जिल्हा स्तरावर राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा तपशील

राज्यातील शिक्षकांच्या गुणवत्तावाढीसाठी टीईटी परीक्षा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे टीईटी पात्र शिक्षकांची सद्यस्थिती, जिल्हानिहाय प्रगती आणि प्रशासनाने केलेले प्रयत्न यांचा सखोल आढावा घेण्यासाठी शासनाने ही माहिती मागविल्याचे समजते.

दरम्यान, शासनाच्या या आदेशामुळे सर्व जिल्हा परिषदांमध्ये माहिती संकलनाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून संबंधित विभागांकडून आकडेवारी अंतिम करण्यात येत आहे.