Home Blog Page 6

कॅरेक्टर खराब करण्याची धमकी देणाऱ्याची एस. पीं. नी पाठराखण केली! त्याच बळवंतने लाच घेत खाकी डागाळून टाकली

0

बीडचंद्रकांत गोसावी यांच्या कार्यकाळात पवनचक्की कंपन्यांचे पाय चाटण्यात मग्न असतांना न्याय मागणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला अय शहाणपणा करू नको सातबारा दाखव नाहीतर कॅरेक्टर खराब करून टाकेल बेट्या अशी धमकी देताना चा दत्तात्रय बळवंत याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बळवंत ची पाठराखण केली होती. तोच बळवंत जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा हजाराची लाच घेताना जेरबंद केला. शेतकऱ्याला धमकी दिली  त्याच वेळी एस.पी .नी कारवाई केली असती तर आज खाकी डागाळली नसती असा सुर आता उमटू लागला आहे..

 

नेकनूर चे ठाणेदार राहिलेल्या चंद्रकांत गोसावी यांच्या कार्यकाळात पोलीस यंत्रणा ही फक्त जनतेसाठी नसून पवनचक्की कंपन्यांसाठी काम करत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. अवैध धंद्यांसोबतच पवनचक्क्या सौर कंपन्या यांच मोकळ कुरण लुटायला भेटलं होतं. या विरोधात प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठवून देखील पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी त्यांची पाठराखण करण्याची भूमिका घेतली. परिणामी कानडी घाट येथील विद्युत टावर उभारणी करत असताना मावेजा मागणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाला अय शहाणपणा करू नको सातबारा दाखव नाहीतर कॅरेक्टर खराब करून टाकेल बेट्याऽऽ! असा धमकी देताना चा कॉन्स्टेबल दत्तात्रय बळवंत याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी कर्तव्यदक्ष‌ म्हणवणारे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत बळवंत वर कारवाई करतील अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात होती. मात्र या उलट घडल्या गेलं. बळवंतची ठाणेदारासह पोलीस अधीक्षकांकडून पाठराखण केली गेली.

शेतकरी ही पोलीस यंत्रणा ही पवनचक्की कंपन्यांसाठीच काम करणारी आहे असा एस पी नी दिलेला अप्रत्यक्ष संदेश समजून मुकाट अन्याय सहन करत गेली.
ज्या बळवंतची पाठराखण पोलीस अधीक्षकांपासून ठाणेदार पर्यंत केल्या गेली त्याच बळवंत च कॅरेक्टर किती खराब आहे हे दिसून आलं.येळंब येथील एका व्यक्तीचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता. अपघातग्रस्त रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयताच्या मुलाने अपघात विम्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी अंमलदार दत्तात्रय बळवंत याच्याकडे केली होती. त्यावेळी कागदपत्रे देण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्याने केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अंमलदार बळवंत दत्तात्रय यास लाच घेताना जालना एसीबीचे उपाधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली रंगेहात पकडले.दरम्यान ही कारवाई शनिवारी दुपारी नेकनूर पोलीस ठाणे परिसरात करण्यात आली. याप्रकरणी दत्तात्रय बळवंत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसीबीच्या या कारवाईनंतर पोलीस अधीक्षकांनी शेतकऱ्याच्या मुलाला धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई केली असती तर आज बीड पोलिसांची खाकी डागाळली नसती असा सूर नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील जनतेतून उमटू लागला आहे.

बायपासवरील उड्डाणपूल व सर्व्हिस रोडची कामे युद्धपातळीवर ; आ.क्षीरसागरां कडून पाहणी

0
डिसेंबर २०२६ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे आ.संदीप क्षीरसागर यांचे निर्देश
 बीड — बीड शहरा जवळील बायपास मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि स्लीप सर्व्हिस रोडच्या कामांची आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. प्रलंबित असलेली ही कामे आता प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले असून, डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
केंद्र सरकार आणि आयआरसीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बीड शहरात प्रवेश करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज चौक व महालक्ष्मी चौक येथे उड्डाणपूल, तसेच बीड-इमामपूर, बीड-नाथापूर आणि बीड-परळी मार्गांना जोडणारे स्लीप सर्व्हिस रोड असणे आवश्यक होते. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चुकीच्या नियोजनामुळे ही कामे रखडली होती. या दुर्लक्षामुळे बायपासवर झालेल्या अपघातांत आतापर्यंत १३ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका क्र. ११७६/२०२४ दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका मान्य करत २५ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजी महाराज चौक व महालक्ष्मी चौक येथे उड्डाणपूल, तसेच बीड-इमामपूर, बीड-नाथापूर व बीड-परळी मार्गांवर स्लीप सर्व्हिस रोड उभारण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर आता छत्रपती संभाजी महाराज चौक आणि महालक्ष्मी चौक येथील उड्डाणपूल तसेच इतर मार्गांवरील स्लीप सर्व्हिस रोडची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. आ.क्षीरसागर यांनी या कामांची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच १२ किलोमीटर लांबीच्या बायपास मार्गावर उर्वरित भागातही ५.५ मीटर रुंदीचा सर्व्हिस रोड मंजूर करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.बीडकरांच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी जनतेच्या हक्काचा संघर्ष कायम ठेवणार असल्याचे आ.क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे वैभव अबाधित राहणार; पुलापेक्षा स्मारकाची उंची अधिक ठेवण्याचे निर्देश
महालक्ष्मी चौक येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसर हा बीड शहराच्या अस्मितेशी जोडलेला आहे. या परिसरातूनच उड्डाणपूल जाणार असल्याने, स्मारकाच्या गौरवाला आणि वैभवाला कोणत्याही प्रकारे बाधा पोहोचू नये, अशा विशेष सूचना आ.संदीप क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची ही उड्डाणपुलापेक्षा अधिक असावी, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केल्या आहेत. विकासकामे महत्त्वाची असली, तरी इतिहास, संस्कृती आणि प्रेरणास्थानांचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून बीडच्या गौरवशाली वारशाच्या संवर्धनासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आ.क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.

देशाच्या अन्नसुरक्षेची व्यवस्था अदानीच्या हातात ? संयुक्त किसान मोर्चाच्या आरोपाने खळबळ

0

नवी दिल्लीकेंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व्यवस्थेचे खासगीकरण करून मोठ्या उद्योग समूहांना फायदा पोहोचवण्यासाठी सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा गंभीर आरोप संयुक्त किसान मोर्चाने (SKM) केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (JPC) मार्फत चौकशी करण्याची मागणी मोर्चाकडून करण्यात आली आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या आरोपानुसार, भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) “हब अँड स्पोक” धान्य साठवणूक (सायलो) योजनेअंतर्गत अदानी अॅग्री लॉजिस्टिक्स लिमिटेड आणि लीप इंडिया फूड अँड लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन खासगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कंत्राटे देण्यात आली आहेत. 134 पैकी तब्बल 110 कंत्राटे या दोन कंपन्यांच्या वाट्याला गेली असून त्यांची एकूण किंमत सुमारे 16,500 कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मोर्चाच्या म्हणण्यानुसार, देशातील धान्य साठवण क्षमतेपैकी 77.5 टक्के क्षमता या दोन कंपन्यांच्या नियंत्रणाखाली गेली आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा व्यवस्थेवर मक्तेदारी निर्माण होण्याचा धोका वाढल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

मे 2022 मध्ये एफसीआयने पूर्वीच्या मक्तेदारीविरोधी अटी हटवल्यानंतर करारांचे स्वरूप बदलण्यात आले. करारांचा आकार वाढविणे, तांत्रिक अनुभवाची अट शिथिल करणे आणि रिव्हर्स ऑक्शन प्रक्रिया बंद करणे यामुळे काही मोजक्या कंपन्यांना फायदा झाला, असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. पहिल्या टप्प्यातील 80 पैकी 70 करार अदानी समूहाला मिळाल्याचा दावाही करण्यात आला आहे.

याशिवाय राष्ट्रीय मालमत्ता मुद्रीकरण योजनेअंतर्गत केंद्रीय वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) आणि राज्य वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (SWC) यांच्या 1,500 हून अधिक गोदामांचे 30 वर्षांसाठी खासगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मोर्चाने म्हटले आहे. तसेच 1962 चा वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन कायदा रद्द करण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काही खासगी प्रकल्पांच्या अपयशाचा परिणाम शेतकरी आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर होत असल्याचे सांगत पंजाबमधील काही प्रकल्पांबाबत लीप इंडियाला कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याचा उल्लेखही मोर्चाने केला आहे.

संयुक्त किसान मोर्चाने केंद्र सरकारकडे अदानी आणि लीप इंडियाला देण्यात आलेले सर्व एफसीआय सायलो करार स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट पूर्ण होईपर्यंत स्थगित करण्याची मागणी केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करावी, धान्य साठवण क्षेत्रातील कथित मक्तेदारीची चौकशी करावी आणि एफसीआयची सार्वजनिक स्वरूपातील भूमिका कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, सरकारने 15 दिवसांत समाधानकारक उत्तर न दिल्यास 17 जून रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत देशव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा संयुक्त किसान मोर्चाने दिला आहे.

मराठा समाजासाठी मोठा निर्णय; OBC प्रमाणे 8 शैक्षणिक सवलती लागू, आंदोलकांच्या वारसांनाही मदत

0

मुंबईमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. आंदोलकांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी, मृत आंदोलकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC प्रवर्गाप्रमाणे विविध शैक्षणिक सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.


मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे रोजी भर उन्हात बेमुदत उपोषण सुरू केले होते. सरकारकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी सुमारे 14 तासांनंतर उपोषण स्थगित केले. यावेळी सरकारला मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर सरकारने मराठा समाजासाठी सलग महत्त्वाचे निर्णय जाहीर केल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या पात्र वारसांना एमआयडीसीमध्ये (MIDC) अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला. तसेच विविध आंदोलनांतील उर्वरित 34 मृत आंदोलकांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी 3 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती आणि योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये एकूण 8 महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश आहे.

मराठा समाजाला मिळणाऱ्या 8 प्रमुख सवलती

1) शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती

दहावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना OBC विद्यार्थ्यांप्रमाणे शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार.

2) चालक व वाहक प्रशिक्षण योजना

रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मराठा समाजातील युवकांसाठी विशेष मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार.

3) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती

इयत्ता 9 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांना मिळणारी विशेष शिष्यवृत्ती योजना मराठा समाजासाठीही लागू करण्यात आली आहे.

4) शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती

विविध व्यावसायिक आणि शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येणार.

5) परराज्यातील शिक्षणासाठी लाभ

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी इतर राज्यांतील अनुदानित किंवा विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार.

6) सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पात्रता

OBC विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शैक्षणिक सुविधा आणि योजनांप्रमाणेच सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मराठा विद्यार्थी पात्र राहतील.

7) संस्थास्तरावरील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही लाभ

CAP प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांवर किंवा संस्थास्तरावर प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सवलती मिळतील.

8) भविष्यातील OBC सवलती आपोआप लागू

भविष्यात OBC प्रवर्गासाठी जाहीर होणाऱ्या नवीन शैक्षणिक सवलती आणि योजनांचा लाभ स्वतंत्र आदेशाशिवाय मराठा समाजालाही मिळणार आहे.

मराठा आरक्षण आंदोलनानंतर सरकारची मोठी पावले

मराठा समाजासाठी घेतलेल्या या निर्णयांमुळे शिक्षण, रोजगार आणि आर्थिक मदतीच्या क्षेत्रात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारच्या या निर्णयांकडे मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

लग्नानंतर १२ दिवसांत तलाठी तरुणाची आत्महत्या; पत्नीविरोधात गुन्हा दाखल

0

अंबाजोगाई —  शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांत एका २६ वर्षीय तलाठी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात मृत तरुणाच्या आईच्या तक्रारीवरून त्याची पत्नी दीपाली धनंजय कोळी हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मृत तरुणाचे नाव गणेश दत्तू कोळी (वय २६, रा. नांदूर्गा, ता. औसा, जि. लातूर) असे आहे. गणेश हा २०२१ मध्ये राज्य राखीव पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. त्यानंतर त्याने तलाठी भरती परीक्षेची तयारी करून २०२४ मध्ये चंद्रपूर येथे तलाठी पदावर नियुक्ती मिळवली होती.

विवाहानंतर सुरू झाला वाद

माहितीनुसार, गणेश याचा विवाह १३ मे २०२६ रोजी बीड येथील दीपाली धनंजय कोळी हिच्यासोबत मोठ्या उत्साहात पार पडला होता. दीपाली ही अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कार्यरत असल्याचे सांगितले जाते.
लग्नानंतर काही दिवसांतच दीपालीच्या वागणुकीत बदल जाणवू लागल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. ती वारंवार कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याचा संशय गणेशला आला होता. त्यानंतर तिने हे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झाल्याचे सांगत गणेशसोबत राहण्यास नकार दिला आणि अंबाजोगाई येथे परत गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.

बहिणीला फोन करून सांगितली व्यथा

२४ मे रोजी गणेश पत्नीला भेटण्यासाठी अंबाजोगाईतील मोरेवाडी परिसरात गेला होता. त्यानंतर २५ मे रोजी त्याने आपल्या बहिणीला फोन करून पत्नीचे दुसऱ्या युवकासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच संबंधित बाबी डायरीमध्ये लिहिलेल्या असल्याचेही त्याने सांगितल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली.

आईचा गंभीर आरोप

गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी यांनी दिलेल्या तक्रारीत, पत्नीचे कथित प्रेमसंबंध आणि त्यातून झालेला मानसिक त्रास यामुळेच मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वशिष्ठ कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

नेकनूर पोलिसांनी कात टाकली : अपघाती मृत्यूचा बनाव; पोलिसांनी 3 दिवसांत उघड केला खून, 2 आरोपी अटक

0

बीड — चंद्रकांत गोसावी यांच्या कार्यकाळात नेकनुर पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेची लावलेली विल्हेवाट ठाण्याला आलेली मरगळ आता झटकली गेली असून नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका गंभीर आणि संवेदनशील खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत उलगडा करण्यात नेकनूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आरोपींनी हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचा बनाव रचून खून लपविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या शास्त्रोक्त तपास आणि तांत्रिक विश्लेषणामुळे सत्य समोर आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लिंबागणेश — अंजनवती मार्गावरील गणेश माळ परिसरात रस्त्यालगत  किरण बंडू सोनवणे यांचा मृतदेह आढळून आल्याने सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षांमध्ये विसंगती आढळून आल्याने नेकनूर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.

पोलीस अधीक्षक नवनीत कावंत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केज वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने रात्रंदिवस मेहनत घेतली. मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), लोकेशन विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची साखळी मजबूत करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपींनी पुरावे नष्ट करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. मात्र पोलिसांनी आरोपींच्या हालचालींचा बारकाईने मागोवा घेत तांत्रिक माहितीच्या आधारे ते फरार झाल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर विशेष पथके रवाना करण्यात आली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा (LCB) बीड, तळोजा पोलीस स्टेशन पनवेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश येवले व त्यांचे पथक, टेक्निकल सेलचे विकी सुरवसे आणि इतर यंत्रणांचे मोलाचे सहकार्य लाभले. संयुक्त कारवाईत आरोपींचा ठावठिकाणा शोधून त्यांना तळोजा परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणात दशरथ परदेशी (वय 25) आणि धीरज येडे (वय 26), दोघेही रा. अंजनवती, ता. जि. बीड यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी नेकनूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा तपास अधिकारी सपोनि मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली सफौ. संजय गुंड, दत्ता बळवंत, विशाल क्षीरसागर, मन्सूर शेख, गणेश परजने, बाबासाहेब साळुंखे, बालाजी ढाकणे आणि सुधाकर जायभाये यांनी यशस्वीपणे पार पाडली.

कोणताही ठोस सुगावा नसताना आणि अपघाताचा बनाव रचून खून लपविण्याचा प्रयत्न झालेल्या या गुन्ह्याचा अवघ्या 72 तासांत उलगडा करून आरोपींना जेरबंद करण्यात आल्याने नेकनूर पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राजेश बाभूळगावकर यांचे निधन

0

बीड — शहरातील धोंडीपुरा भागातील रहिवासी व वृत्तपत्र विक्रेते राजेश जीवनराव बाभूळगावकर (वय ५१) यांचे गुरुवारी (ता. चार) रात्री निधन झाले.

त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाभुळगावकर कुटुंबीयांच्या दुःखात “सह्याद्री माझा ” परिवार सहभागी आहे

देशात अभूतपूर्व आर्थिक संकट येणार’; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

0

नवी दिल्ली  — लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्याबाबत केलेल्या दोन विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय आदिवासी व्यावसायिक परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी देशासमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहण्याचा इशारा दिला असून, आगामी काळात देशात ‘आर्थिक त्सुनामी’ येऊ शकते, असा दावा केला.

राहुल गांधी म्हणाले की, भारताकडे पूर्वी जागतिक आर्थिक संकटांचा प्रभाव कमी करण्यासाठी सक्षम यंत्रणा होती. मात्र, भाजप सरकारने ही यंत्रणा कमकुवत किंवा निष्प्रभ केल्यामुळे महागाई, वाढत्या किमती आणि आर्थिक अस्थिरता वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे देशासमोर अभूतपूर्व आर्थिक आव्हाने निर्माण होऊ शकतात, असे ते म्हणाले.

देशातील आर्थिक परिस्थिती, वाढती महागाई आणि सामान्य नागरिकांमधील असंतोष यांचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जनतेचा दबाव वाढत असून तो नियंत्रित करण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जाऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही मोठा राजकीय दावा केला. देशातील परिस्थितीमुळे आगामी एका वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून बाजूला होतील, असे विधान त्यांनी केले. तसेच, “आतील यंत्रणांकडून आम्हाला माहिती मिळत आहे,” असेही त्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यांनंतर राजकीय चर्चांना वेग आला असून सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, या विधानांवर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

परळीत मित्रांनीच केला मित्राचा खून; पैशांच्या वादातून हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकला

0

बीड —  जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात घडलेल्या एका खळबळजनक हत्येचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत केला आहे. सुरुवातीला आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त होत असलेल्या या प्रकरणात मृताच्या दोन मित्रांनीच पैशांच्या व्यवहारातून वाद झाल्यानंतर दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदारनगर, परळी वैजनाथ येथील अफजलखान उर्फ तोहीद कैरातीखान पठाण (वय 36) हे 31 मे 2026 रोजी त्यांच्या मित्रांसोबत बाहेरगावी गेले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत. दरम्यान, 1 जून रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळांवर त्यांचा मृतदेह आढळून आला.


घटनास्थळावरील परिस्थिती पाहता सुरुवातीला हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे वाटत होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा बारकाईने तपास सुरू ठेवला. गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती, मृताच्या नातेवाईकांचे जबाब, घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे तपासाची दिशा बदलली.
तपासादरम्यान पोलिसांना अफजलखान पठाण यांची हत्या त्यांच्या मित्रांनीच केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ऋषीकेश परमेश्वर फड (वय 27, रा. सोमेश्वर नगर, परळी) आणि गौरव दीपक व्यास (वय 26, रा. स्नेहनगर, परळी) यांचा शोध सुरू करण्यात आला.
3 जून रोजी हे दोन्ही संशयित परळीत आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी पैशांच्या देण्या-घेण्याच्या कारणावरून अफजलखान पठाण यांची दगडाने मारून हत्या केल्याची कबुली दिली. तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळांवर टाकल्याचेही त्यांनी सांगितले.
यानंतर दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी परळी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार आनंद मस्के, रामचंद्र केकान, सचिन सानप, गोविंद भताने, पोलीस अंमलदार सचिन आंधळे आणि नितीन वडमारे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली. ही मोहीम प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि शिवाजी बंटेवाड, पोउपनि सुशांत सुतळे, आनंद मस्के, रामचंद्र केकान, सचिन सानप, गोविंद भताने, सचिन आंधळे, नितीन वडमारे या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

मस्के इन्फ्रास्ट्रक्चरचा कारभार : वाढवणा-चौसाळा रस्त्याचे निकृष्ट काम, पाच गावांचा संताप; चौकशी न झाल्यास धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोकोचा इशारा

0

बीड — वाढवणा ते चौसाळा (ता. बीड) या दहा किलोमीटर अंतरासाठी सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा आरोप करत पिंपळगाव घाट, वाडवाना, मानेवाडी, माळेवाडी आणि रुईगव्हाण येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या कामाची बाहेरील जिल्ह्यातील स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 494.67 लक्ष रुपये अपेक्षित खर्चाच्या सुरू असलेल्या चौसाळा वाढवाना रस्त्याच काम मस्के इन्फ्रास्ट्रक्चर बीड करीत आहे. या रस्त्यावर टाकण्यात येत असलेला छोट्या खडीचा लेयर इस्टिमेटनुसार नसून अत्यंत कमी जाडीचा आहे. तसेच खडीमध्ये आवश्यक प्रमाणात डांबर न वापरता ऑइलचा अधिक वापर करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे डांबरीकरणाचे काम सुरू असतानाच काही ठिकाणी रस्ता उधळून गेल्याचे दिसून येत आहे.

पहिल्याच पावसात खडीवरील डांबर वाहून गेल्याने अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था पुन्हा मुरूम रस्त्यासारखी झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

याशिवाय चौसाळा परिसरातील पुलालाही मोठे भगदाड पडले असून पावसाळ्यापूर्वीच पूल धोकादायक स्थितीत पोहोचल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुलाला भेट देऊन दर्जेदार काम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र संबंधित ठेकेदार प्रशासन आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या मार्गावरून पाच गावांतील नागरिकांचे दैनंदिन दळणवळण सुरू असल्याने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. खराब रस्त्यामुळे नागरिकांना मणक्याचे विकार, श्वसनाचे त्रास तसेच गंभीर रुग्णांना वेळेत उपचारासाठी नेण्यात अडचणी येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संपूर्ण रस्त्याचे नव्याने दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच योग्य कारवाई न झाल्यास धुळे-सोलापूर महामार्गावर पाचही गावांच्या वतीने भव्य रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल आणि ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनावर पाचही गावांतील नागरिकांच्या मोठ्या संख्येने सह्या करण्यात आल्या आहेत.

आवाज उठवला म्हणून धमक्या

रस्त्याच्या निकृष्ट कामासंदर्भात आवाज उठवणाऱ्या नागरिकांना मस्के इन्फ्रास्ट्रक्चर बीड कडून धमक्या दिल्या जात असल्याचं गावकऱ्यांचा म्हणणं आहे. या धमक्यांनाही आळा घालण्यात यावा व रस्त्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने दर्जेदार करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे