मुंबई — राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीबाबत गेल्या काही दिवसांपासून पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळा उशिरा सुरू होणार का, किंवा यंदाही काही काळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाणार का, अशा विविध चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला होता. मात्र, शिक्षण विभागाने या सर्व अफवांना पूर्णविराम देत नवीन शैक्षणिक वर्ष पारंपरिक ऑफलाईन (प्रत्यक्ष) पद्धतीनेच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून 2026 पासून नियमितपणे सुरू होणार आहे. या नियोजित तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहूनच शिक्षण घ्यावे लागणार आहे.

यंदा ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा निर्णय शासनाच्या विचाराधीन नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्य मंडळाच्या शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुटी देण्यात आली होती. आता सुटीचा कालावधी संपत असून शाळा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
विदर्भातील शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल
विदर्भातील काही भागांमध्ये अद्यापही उष्णतेची तीव्रता कायम असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून तेथील शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. 15 जून ते 29 जून या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळी 7 ते 11.45 या वेळेत भरवल्या जाणार आहेत. त्यानंतर 30 जूनपासून विदर्भासह संपूर्ण राज्यातील शाळा नियमित वेळेनुसार सुरू होतील.
शिक्षण विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, शाळा सुरू होण्याबाबत कोणताही बदल झालेला नसून सर्व शाळांमध्ये 15 जून रोजी पहिली घंटा वाजणार आहे.

