Home Blog Page 185

बीडची जागा शिवसेनेलाच सुटणार — अर्जुनराव खोतकर

0
बीड — शिवसेना नेते संसदरत्न खासदार  डॉ श्रीकांत शिंदे यांचा बीड विधानसभा संवाद दौरा विजयाकडे घेऊन जाणारा ठरला पाहिजे. बीड मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि सध्या सर्वात जास्त अनुकूल परिस्थिती आहे त्यामुळे बीडची जागा शिवसेनेलाच सुटणार यात शंका नाही.जिल्हा प्रमुखामध्ये अनिलदादा जगताप मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू आहेत. दादांच्या कार्य पद्धतीवर शिंदे साहेबांचा विश्वास आहे. दादांना शिंदे साहेबांकडे विशेष आदर सन्मान आहे. आपल्याकडे दोन माहीने राहिलेत. येणारे दोन माहीने पक्षाला द्या. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करा. बीड मतदार संघावर आपली चांगली पकड आहे, आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत त्यामुळे येणारी निवडणुका आपल्याला मोठ्या ताकदीने लढावी लागणार आहे असे प्रतिपादन शिवसेना उपनेते तथा मराठवाडा संपर्कनेते अर्जुन खोतकर यांनी केले.
 संसदरत्न खा. डॉ श्रीकांत शिंदे  यांचा येत्या 8 ऑक्टोबर रोजी बीड विधानसभा संवाद दौरा मेळावा संपन्न होणार आहे. याच अनुषंगाने काल दि. 5 ऑक्टोबर 2024 रोजी दु. 3.00 वाजता दरम्यान बीड शहरातील हॉटेल ग्रँड यशोदा येथे शिवसेना उपनेते तथा मराठवाडा संपर्कनेते अर्जुनजी खोतकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी बैठक पडली.
या बैठकीमध्ये अर्जुनजी खोतकर साहेब यांनी खा. डॉ श्रीकांत शिंदे साहेब बीड मतदार संघात पहिल्यांदा येत असून त्यांच्या संवाद दौरा मेळाव्या बाबत महत्वपूर्ण सूचना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, येणारा काळ शिवसेनेचा आणि शिवसैनिकांच्या भगव्याचा असून महाराष्ट्रावर भगवा फडकविण्यासाठी एकजूट होऊन ताकदीने विधानसभा निवडणूक लढवायची असल्याचे सांगितले. बीडची जागा ही शिवसेनेची आहे व ती शिवसेनेलाच सुटेल यात शंका नाही असे त्यांनी सांगितले.
          या दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख  अनिलदादा जगताप आणि जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले व दोघांनी मिळून बीड मतदार संघात शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी समस्या अर्जुनराव खोतकर यांच्यासमोर मांडल्या. या बैठकीसाठी बीड जिल्हा शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, सर्व अंगीकृत संघटनेचे आजी- माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी घेणाऱ्या नाही देणाऱ्या पक्षात आहे- अनिलदादा जगताप
 खूप दिवसांपासून अन्याय सहन करतोय. प्रत्येकवेळी मला थांबवण्यात आले व माझा पाय ओढण्यात आला. मात्र आता मी आता घेणाऱ्या नाही देणाऱ्या पक्षात आहे.
बीड मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. कार्यकर्त्याला मोठं करण्यची, त्यांना ताकद देण्याची दानत मुख्यमंत्री शिंदे साहेबांमध्ये आहे व शिंदे साहेबांचा आशीर्वाद, विश्वास आणि पाठबळ माझ्यासोबत आहे म्हणून मला यावेळी कसलीच चिंता राहिली नाही. शिवसैनिकांनो, अफवांवर विश्वास ठेऊ नका बीडची जागा शिवसेनेलाच सुटणार आहे. त्यामुळे कामाला लागा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांनी बीड विधानसभा संवाद दौरा पूर्व नियोजन बैठकीत आपल्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना केले.

आरक्षणासाठी जीवन संपविणाऱ्या तरुणाच्या कुटुंबाचे जरांगेंनी केले सांत्वन

0

बीड — सरकार आरक्षण देत नाही म्हणून बीड येथील एका तरुणाने आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण सरकार देत नाही सरकार शब्द पाळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून अर्जुन कवठेकर या तरुणाने गळफास घेतला आहे.

या घटनेने खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी तरुणाच्या पीडीत कुटुंबियांची मनोज जरांगे यांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे. आणि असे आततायी पाऊल न उचलण्याच आवाहन केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार टाळाटाळ करीत आहे. या संदर्भात मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषण केलेले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. परंतू सरकारने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरकारच्या चालढकलीला कंठाळून मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नाही, सरकार शब्द पाळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून अर्जुन कवठेकर या तरुणांना आज गळफास घेऊन जीवन संपविले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या पीडीत कुटुंबाचे मनोज जरांगे पाटील यांनी आज भेट घेऊन त्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे.

मराठा आरक्षणासाठी जीवन संपविणाऱ्या कवठेकर यांच्या कुटुंबाचे मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देत सांत्वन केले. यावेळी पीडीत कुटुंबाल अश्रु अनावर झाले. यावेळी जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले की बाबांनो आत्महत्या करू नका मी आरक्षण देईन, असे आवाहन तरुणांना केले. कोणीही आत्महत्या करू नका मी आरक्षण देण्यास समर्थ आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले. अर्जुन कवठेकर या तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही जबाबदार आहेत. आता मी त्यांना सोडणार नाही.आता आरक्षण देत कसे नाहीत हे मी पाहतो.मात्र तरुणांनी आत्महत्या करून कुटुंब उघड्यावर आणू नये असे आवाहन म्हणून जरांगे पाटील यांनी केले आहे.

चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम शिक्षक पकडला; माजलगाव बंद

0

माजलगाव — शहरातील अंगणवाडीत पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केलेला शिक्षक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला असून चार दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे. दरम्यान उद्या माजलगाव शहर बंद ठेवून मोर्चा काढण्यात येणार आहे.

माजलगाव मधील एका शाळेच्या आवारात भरणाऱ्या अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. पीडित चिमुकली घटना घडल्यानंतर आजारी पडली तिला दवाखान्यात नेले असता उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या ही बाब लक्षात आली होती. त्यांनी याची कल्पना पालकांना दिल्यानंतर पालकांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. ज्याने हे नीच कृत्य केले आहे त्याला ओळखत असल्याचे तिने सांगितले. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पीडित चिमुकलीला फोटो दाखवल्यानंतर तिने आरोपीस ओळखले. दरम्यान पोलिसांनी फरार आरोपी राहुल वायखिंडे (मूळ रा. ब्रह्मगाव ता.कोपरगाव जि.अहील्यानगर)याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर सर्वसामान्य जनतेत रोष व्यक्त केला जात असून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी माजलगाव शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी कडकडीत बंद पाळून शहर पोलीस ठाणे व तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुकबधीर,गतीमंद पंचवीस वर्षीय मुलीवर चौघांचा बलात्कार; दोघांना अटक

0

आष्टी — मूकबधिर व गतिमंद 25 वर्षीय मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून दोन जण अद्याप फरार आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सपोनि मंगेश साळवे यांना 25 वर्षीय गतीमंद मुलीवर बलात्कार झाल्याची गोपनीय माहिती फोनवरुन मिळाली. सपोनि साळवे यांनी तात्काळ पोउपनि देवदास सातव, पोलीस अंमलदार सुदाम पोकळे यांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी पीडित मुलीसह तिच्या आई वडीलांना पोलिस ठाण्यात आणून घडलेल्या घटनेची माहिती देऊन तक्रार नोंदवणे बाबत सांगीतले. मात्र पीडितेच्या आई-वडीलांनी तक्रार देण्यास नकार दिला. या घटनेची माहिती सपोनि साळवे यांनी पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कमलेश मिना यांना दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिडीतेची वैद्यकीय तपासणी करुन सरकार तर्फे पोउपनि देवीदास सातव यांच्या फिर्यादीवरुन अंभोरा पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून अवघ्या दोन तासात दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळून गजाआड केले. उर्वरित फरार दोघांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आल्याची माहिती अंभोरा पोलिसांनी दिली आहे.

पावसाची परतीच्या दिशेने वाटचाल — हवामान विभाग

0

पुणे — राजस्थानमधून सरासरीपेक्षा सात दिवस उशिराने परतीचा प्रवास सुरू करणाऱ्या मोसमी पावसाने महाराष्ट्रातून मात्र नियोजित वेळेत परतीचा प्रवास सुरू केला आहे. शनिवारी (५ ऑक्टोबर) नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मोसमी पाऊस माघारी फिरला आहे.

हवामान पोषक राहिल्यास नियोजित वेळेत म्हणजे १० ऑक्टोबरपर्यंत मोसमी वारे राज्यातून माघारी परतण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण राजस्थानमधून सरासरी १७ सप्टेंबर रोजी मोसमी पावसाचा माघारीचा प्रवास सुरू होतो. मात्र यंदा सात दिवस उशिराने २४ सप्टेंबरपासून माघारीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर एक दिवस २४ सप्टेंबरपर्यंत माघारीचा प्रवास सुरू राहिला. राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतून मोसमी पाऊस माघारी फिरला होता. त्यानंतर मोसमी पावसाचा परतीचा प्रवास रेंगाळला. त्यानंतर दोन तारखेला पुन्हा काही भागांतून मोसमी पाऊस माघारी फिरला, दोन ऑक्टोबरपर्यंत मोसमी पावसाने लेह, लडाख, जम्मू-काश्मीर, दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांतून माघार घेतली होती. चार ऑक्टोबरपर्यंत पुन्हा मोसमी पावसाचा परतीचा प्रवास रेंगाळला. आज, शनिवारी (५ ऑक्टोबर) रोजी आणखी काही भागातून मोसमी पावसाने माघार घेतली आहे. संपूर्ण गुजरात,

उत्तराखंडसह मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधून मोसमी पावसाने माघार घेतली आहे. राज्यातील नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मोसमी पावसाने माघार घेतली आहे.

महाराष्ट्रातून माघारीचा प्रवास सुरू झाला आहे. राज्यातून सरासरी पाच ऑक्टोबर रोजी मोसमी पावसाची माघारीची प्रक्रिया सुरू होते आणि १० ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मोसमी वारे पूर्णपणे माघारी जातात. यंदा नियोजित वेळेत मोसमी पावसाचा माघारीचा प्रवास सुरू झाला आहे. पोषक हवामान राहिल्यास १० ऑक्टोबरपर्यंत माघारीचा प्रवास पूर्ण होण्याचा अंदाज आहे. अगदीच माघारीचा प्रवास लांबला तर १५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मोसमी पाऊस पूर्णपणे माघारी जाण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, हवामान विभागाने रविवारी (६ ऑक्टोबर) संपूर्ण कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.

ऐतिहासिक, प्राचीन वास्तूंचे नुकसान केल्यास मिळणार “ही” शिक्षा

0

मुंबई — राज्यातील प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांच्या तुरूंगवासाची तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अशा वास्तूंना हानी पोहचवून त्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी ही तरतूद करण्यात येत आहे.

सध्या, महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पूराण वस्तूशास्त्र विषयक स्थळे व अवशेष नियम १९६० (१९६१चा महाराष्ट्र अधिनियम क्र.१२) मधील तरतुदींनुसार तीन महिन्यांपर्यंत तुरुंगावस किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. १९६० सालापासून या दंडात वाढ झालेली नाही. या कायद्यात कठोर तरतुदींचा आवश्यकता आहे. केंद्र शासनाच्या १९५८च्या अधिनियमातील सुधारणांशी सुसंगत अशा तरतूदी करणे आवश्यक असल्याने हा वाढीव शिक्षेचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

शरद पवारांची नवी रणनीती; बीड जिल्ह्यातील इच्छुकांच्या झाल्या मुलाखती

0

पुणे –मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याने लोकसभेला आरक्षणाच्या मागणीचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणावर बसला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही मराठवाड्यात उमेदवार निवडीसाठी मोठी रणनीती आखल्याचे सांगितले जात आहे.आज बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत पुण्यात शरद पवार स्वत:मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेताना दिसले आहेत. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराशी शरद पवार स्वत: चर्चा करत आहेत. शरद पवार यांच्या कार्यपद्धत पाहिली तर त्याच्यासाठी कुणी लहान किंवा मोठा नाही. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. त्या प्रत्येकाशी शरद पवार स्वत: भेटणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. सर्वांचे ऐकूण घेतल्यानंतरच ते कुणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय घेतील, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.आज बजरंग सोनावणे यांच्या मतदारसंघातील उमेदवारीसाठी मुलाखती घेतल्या. ज्या ज्या ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षांचे आमदार- खासदार आहेत, त्यांची मते विचारात घेऊनच निर्णय घेतले जाणार आहेत. पण ज्यांनी ज्यांनी इच्छुक म्हणून अर्ज केलाय त्यांचाही मानसन्मान होणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालनामधून आंदोलनाला सुरुवात केली. त्यावेळी आंतरवली सराटीत उपोषणस्थळी लाठीमार झाला, त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पसरले. लोकसभा निवडणुकीत महायुतीला त्यांचे गंभीर परिणाम पाहायला मिळाले. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे बीडमध्ये पंकजा मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

38 बिर्याणी हाऊस वर पोलिसांची छापेमारी; साडेचार लाखाची दारू जप्त

0

बीड — जिल्ह्यातील 38 बिर्याणी हाऊस वर पोलिसांनी आज छापेमारी करत साडेचार लाख रुपयाची अवैध दारू जप्त केली. गेल्या अनेक दिवसापासून विनापरवाना दारू विक्री केली जात होती.

बीड शहर व जिल्ह्यात चालु असलेल्या बिर्याणी हाऊस मध्ये अवैधरित्या दारु विक्री तसेच ग्राहकांना अवैधरीत्या दारु पिण्यासाठी बिर्याणी हाऊस चालकांकडुन जागा उपलब्ध करुन दिल्या जात होती.याची गोपनिय माहीती बीड पोलीसांना मिळाली होती. त्यावरुन पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगाळ यांनी 4 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील बिर्याणी हाऊसवर छापे टाकुन करवाया करण्याच्या सुचना सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी व अंमलदारांमार्फत पोलीस ठाणे हद्दीतील 38 बिर्याणी हाऊसवर छापे टाकुन एकुण 4 लाख 43 हजार 155 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याप्रकरणी विनापरवाना अवैध दारु कब्जात बाळगणे, विक्री करणे तसेच विनापरवाना ग्राहकांना दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन देवुन गुत्ता चालवणे या कृत्यांसाठी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत एकुण ३८ गुन्हे दाखल करण्यात आले असुन एकुण 38 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहा. पोलीस अधीक्षक धिरजकुमार बच्चु, सहा. पोलीस अधीक्षक कमलेश मिना, उपविभागीय पोलीस अधिकारी बीड, विश्वांभर गोल्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई निरज राजगुरु, उपविभागय पोलीस अधिकारी अंबाजोगई अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.शितलकुमार बल्लाळ, शिवाजी बंटेवाड, मारुती खेडकर, एस.एम जाधव, मजहर सय्यद, बालक कोळी, प्रशांत महाजन, विनोद घोळवे, रामराव पडवळ, संभाजी ढोणे, सपोनि. मधुसुदन घुगे, सोमनाथ नरके, मंगेश साळवे, भार्गव सपकाळ, अमन शिरसट, अनिल खोडेवाड, भाऊसाहेब वाघमोडे, मच्छिद्र शेंडगे, अनमोल केदार, राजकुमार ससाणे व पोलीस अंमलदार यांच्या मदतीने यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली आहे.

तरुणांना रोजगार मिळवून देणाऱ्या अभ्यासक्रमासाठी आग्रही -डॉ.योगेश क्षीरसागर

0

नाळवंडी येथे भाऊसाहेब डावकर यांच्या पुढाकारातून ४० शाळांना संगणक वाटप

बीड — देशभरात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. स्पर्धेच्या युगात आपल्या विद्यार्थ्यांना टिकायचे असेल तर दर्जेदार शिक्षण देणे काळाची गरज बनली असून ती आपली जबाबदारी आहे. आपल्या शिक्षण संस्थांमध्ये तरुणांना रोजगार मिळवून देणारे विविध अभ्यासक्रम आणण्यासाठी आपण कायम आग्रही असतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहे.

बीड तालुक्यातील नाळवंडी येथील निवासी आश्रमशाळेत शुक्रवारी (दि.५) जिल्हा परिषद गटातील ४० शाळांना संगणक संच वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.योगेश क्षीरसागर हे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ॲड.राजेंद्र राऊत हे होते. व्यासपीठावर अरुण लांडे, सुधीर काकडे, पंचायत समितीचे माजी सदस्य अच्युतराव शेळके, नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर सिद्दीकी, युवा नेते अशोक वाघमारे, माजी नगरसेवक रमेश चव्हाण, सुनिल सुरवसे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम कातांगळे, माजेद कुरेशी, सरपंच भारत कानडे, सरपंच रवी गंगावणे, सरपंच तेजाब चव्हाण, अशोक वैद्य, बाबासाहेब शिंदे, शाम राऊत, बाळासाहेब डोळस, संजय काळे, बाळराजे राठोड, भगीरथ बांडे, मिलिंद ठोकळ, अभिमान गुंदेकर, प्रा.अमोल घुमरे, बाळू आमटे आदींची उपस्थिती होती.

डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, माझे सहकारी भाऊसाहेब डावकर यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकी म्हणून खाजगी कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून ४० संगणक संच जिल्हा परिषद शाळांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच तांत्रिक शिक्षण मिळेल. त्यातून विद्यार्थी अभ्यासू होतील. बीड विधानसभा मतदारसंघात स्व.केशरकाकू क्षीरसागर यांनी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा आणली. या क्षेत्रात अलीकडे अमुलाग्र बदल झाले आहेत. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि रोजगार मिळवून देणारे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आपण कायम आग्रही असतो, असेही डॉ.क्षीरसागर म्हणाले. यावेळी भाऊसाहेब डावकर यांचा सत्कार करून मान्यवरांनी नाळवंडी जिल्हा परिषद गटातील ४० शाळांना संगणक संच वितरित केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस दलात खांदेपालटाला सुरुवात!

0

बीड –निवडणुकांच्या अनुषंगाने बीड पोलीस दलात फेरबदल केले जाऊ लागले आहेत. चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी नारायण एकशिंगे यांना बदलण्यात आले असून आष्टी पोलीस ठाण्याचा कारभार शरद भुतेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

चकलांबा पोलीस ठाण्याचे वादग्रस्त प्रभारी नारायण एकशिंगे यांना हटवून त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेतून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना नियुक्त करण्यात आले आहे.नारायण एकशिंगे यांना वाचक उपविभागीय गेवराई येथे हलवण्यात आले आहे.आष्टी पोलीस ठाण्याच्या प्रमुखपदी असलेल्या सोमनाथ जाधव यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांना नियंत्रण कक्षात हलवण्यात आले आहे. त्यांच्या जागी शरद भुतेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी हे आदेश काढले.