Home Blog Page 10

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा निर्णायक इशारा; ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण

0

जालना — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत निर्णायक लढ्याची घोषणा केली आहे. ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. या उपोषणादरम्यान ते अन्न, पाणी घेणार नसून पायात चप्पलही घालणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला असून आता आरपार लढण्याची वेळ आल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. गेल्या तीन वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना सरकार केवळ चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.


जरांगे पाटील म्हणाले, “आता मागे हटण्याचा प्रश्नच नाही. मराठा समाजातील तरुणांचे भविष्य अंधारात गेले आहे. जर या आंदोलनादरम्यान उष्माघाताने माझा मृत्यू झाला, तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण राज्य सरकार जबाबदार असेल.”

उपोषणस्थळी मराठा समाजाने येऊ नये

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला भावनिक आवाहन करत उपोषणस्थळी गर्दी करू नये, असे सांगितले. उपोषणासाठी फक्त पत्रकारांना बसण्यासाठी छोटा मंडप उभारण्यात येणार असून स्वतः मात्र ते उघड्या उन्हातच बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“देशात आजवर कुठेही न झालेल्या स्वरूपाचे हे आंदोलन असेल. सरकार मराठा समाजाला संभ्रमात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता कठोर भूमिका घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही,” असे ते म्हणाले.

सरकारवर गंभीर आरोप

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सातारा गॅझेट, मराठा-कुणबी नोंदी आणि आरक्षणासंदर्भातील प्रलंबित निर्णयांवर सरकारवर जोरदार टीका केली. एका महिन्यात माहिती देण्याचे आश्वासन देऊनही दहा महिने उलटले तरी कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्याप मागे घेण्यात आले नाहीत, मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचे सरकार सांगते; मात्र त्यासंदर्भातील एकत्रित शासन निर्णय (GR) काढला जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

१९६७ पासून मराठा समाजावर अन्याय”

मराठा समाजावर १९६७ पासून सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी सरकारला जाब विचारला. आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलने, न्यायालयीन लढाया आणि विविध मार्गांनी संघर्ष करूनही समाजाला अपेक्षित न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
“मराठा समाज फक्त मतांसाठीच हवा आहे का? समाजाचे झालेले नुकसान कोण भरून काढणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

आंदोलन अधिक तीव्र होण्याचा इशारा

कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत जरांगे पाटील यांनी सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. अन्यथा मराठा आरक्षण आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून ३० मेपासून सुरू होणाऱ्या या आमरण उपोषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

28 दिवसांत तपास पूर्ण; नसरापूर बालिका अत्याचार-खून प्रकरणाला वेग

0

पुणे — नसरापूर येथील अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड झाली असून आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात विशेष न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आरोपीविरुद्धच्या गंभीर आरोपांची दखल घेत पुढील खटला नियमितपणे चालवण्याचे निर्देश दिले.


या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते. त्यानंतर अवघ्या 28 दिवसांच्या कालावधीत आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे या संवेदनशील प्रकरणातील सुनावणी आता वेगाने पुढे जाणार आहे.
फास्ट ट्रॅक न्यायालयात आरोपी भीमराव कांबळे याला प्रथमच हजर करण्यात आले.

सुनावणीदरम्यान शवविच्छेदन अहवाल (PM Report), वैद्यकीय तपासण्या आणि इतर महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. मात्र बचाव पक्षाकडून आरोप खोडून काढणारे कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत. त्यानंतर न्यायालयाने आरोपीविरोधात आरोप निश्चित केले.

या महत्त्वाच्या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर, मूळ तक्रारदार पक्षाचे वकील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल तसेच तपास अधिकारी न्यायालयात उपस्थित होते.
न्यायालयाने या प्रकरणाची रोज सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला असून संपूर्ण कार्यवाही ‘इन-कॅमेरा’ पद्धतीने होणार आहे. त्यामुळे पीडितेची ओळख आणि गोपनीयता कायम राखली जाणार आहे.
दरम्यान, आरोपी भीमराव कांबळे याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 103(1), 64, 65(2), 74, 137(2), 140(1) तसेच पोक्सो कायदा 2012 अंतर्गत कलम 4, 6, 8 आणि 12 अन्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने आता या सर्व आरोपांना मान्यता देत खटल्याच्या पुढील सुनावणीचा मार्ग मोकळा केला आहे.
या प्रकरणातील जलद तपास, वेगवान चार्जशीट आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जायकवाडी धरणातील हक्काच्या पाण्यासाठी बैलगाडी मोर्चात सहभागी व्हा — डॉ. गणेश ढवळे

0

बीड — जायकवाडी धरणातील मराठवाड्यासह बीड जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लोकल आंदोलनाच्या वतीने शुक्रवार दि.२९ रोजी जिल्हा स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय असा बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चात शेतकरी, शेतकरी पुत्र तसेच शेतकऱ्यांविषयी संवेदना असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले आहे.

डॉ. ढवळे म्हणाले की, दुष्काळाचे सावट असलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वारंवार आस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा खोऱ्यातील २५ टीएमसी पाणी देण्यास पश्चिम महाराष्ट्रातील नेते टाळाटाळ करत आहेत. मराठवाडा, विशेषतः बीड जिल्हा, सिंचनाच्या मोठ्या अनुशेषाला सामोरे जात आहे.

कोकणातील १६८ टीएमसी अतिरिक्त पाणी नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्याकडे वळविण्याचे नियोजन असून, हे काम नियोजित वेळेत पूर्ण करून बीड जिल्ह्यातील शेतीला पाणी मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच गोदावरी–सिंदफणा नदीजोड प्रकल्प तातडीने राबवून त्यासाठी सर्व्हे करण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

यासोबतच कोकणातून येणाऱ्या १६८ टीएमसी पाण्यातून बीड जिल्ह्याला किती पाणी देता येईल, याचा स्वतंत्र सर्व्हे करावा. गेवराई तालुक्यातून जाणारा उजवा कालवा आणि माजलगाव धरणातून जायकवाडी धरणाला मिळणारे पाणी पूर्ववत करण्यात यावे, अशा मागण्याही त्यांनी मांडल्या.

या सर्व मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. गणेश ढवळे यांनी केले आहे.

मुलगा आणि सावत्र आईच्या प्रेम प्रकरणाचा दुर्दैवी अंत

0

बीड — समाजाची चौकट मोडून एकत्र आलेल्या सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधांचा अत्यंत दुर्दैवी शेवट झाला आहे.बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर आपल्या प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने देखील रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे केज आणि अंबाजोगाई परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील सोनी जवळा येथील रहिवासी असलेले साहेबराव पवार वय 40 वर्ष यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्यांनी चार वर्षांपूर्वी अनिता नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले. पहिला संसार तुटला म्हणून साहेबराव पवार यांनी दुसरा संसार थाटला. मात्र अनितासोबत संसार सुरू असतानाच साहेबराव यांचा पहिल्या पत्नीचा मुलगा अनिल साहेबराव पवार (21) याचे आपल्या सावत्र आईशी (अनिता) प्रेमसंबंध जुळले. हे सूत इतके टोकाला गेले की, काही दिवसांपूर्वी अनिल आणि अनिता हे दोघे घरातून थेट तेलंगणा राज्यात पळून गेले आणि संसार थाटला.

दुसरी पत्नी आणि आपला मुलगा दोघेही बेपत्ता झाल्याने साहेबराव पवार यांनी अंबाजोगाई येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत तांत्रिक तपासाच्या आधारे फोन ट्रॅप केला. साहेबराव पवार आणि पोलिसांनी तेलंगणा गाठून अनिता आणि अनिल या दोघांनाही ताब्यात घेतले. मात्र घरी आल्यावर आपले अनैतिक संबंध आता सगळ्यांना समजले आहेत, या भीतीपोटी आणि नैराश्यातून अनिल याने विषारी औषध प्राशन केले. या घटनेमुळे अनिल याची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र चार दिवसांच्या उपचारानंतरही अनिलची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनेने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण गावात शोककळा पसरली. याचदरम्यान, सावत्र आई अनितालाही तीव्र धक्का बसला. आपल्या प्रियकराच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने अनिताने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यंकटराव डावळे सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या एका शासकीय शिरीषच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळताच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष डॉक्टर धपाटे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टर धपाटे त्यांनी तत्परता दाखवत तत्काळ पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक कांदे व मंगेश भोले हे तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. यानंतर अनिताची डेड बॉडी तपासणीसाठी स्वराती रुग्णालयात पाठवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस अत्यंत गांभीर्याने करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

भाशिप्र मधील भ्रष्टाचाराची पाळे “मुळे”;एका “किशोर” ने केले प्रशासन बुळे

0

बीड — शासनाने प्रतिनियुक्त्या बंद केलेल्या असताना देखील गेल्या पंधरा वर्षापासून वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकात ठाण मांडून बसलेला वरिष्ठ लिपिक “किशोर खडकीकर” नावाचा महाभाग शिक्षण माफिया चंद्रकांत मुळे चा घरगडी म्हणून काम बघू लागला आहे. यातूनच भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” खोलवर रुजण्यास मदत झाली आहे. परिणामी शिक्षण विभागातील इत्यंभूत माहिती मुळेला पुरवली जाते . याच किशोरच्या मदतीने भविष्य निर्वाह निधी घोटाळा, शालार्थ आयडी, थकीत वेतन घोटाळा असो हे करणं माफीयाला सोपं गेलं
“भाशिप्र” मधील कर्मचारी जिल्हा परिषदेचा उंबरठा ओलांडण्याची हिंमत करत नाही. यातून संस्थेतील कर्मचाऱ्यांचं संपूर्ण स्वातंत्र्य हिरावल्या गेलं आहे. आशा कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे.


खायचं कणगी ला अन् गायचं इरल्याला” अशी पद्धती शिक्षण विभागातील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकातील वरिष्ठ लिपिक किशोर खडकीकर हा गेल्या पंधरा वर्षापासून प्रतिनियुक्तीचा आधार घेऊन एकाच खुर्चीवर गोचीडासारखा चिटकून बसलेला आहे. मूळ पदस्थापना त्याची आंबेजोगाई येथे आहे. जिल्हा परिषदेचा कर्मचारी असला तरी चंद्रकांत मुळे चा घरगडी म्हणून “प्रामाणिक” काम करताना त्याने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. का ओलांडणार नाही? त्याला कारणही तसेच आहे. बायको मुळेच्याच संस्थेत बेकायदेशीर शिक्षक भरती झालेली आहे. मग काय सावरकर मध्ये “आओ जाओ घर तुम्हारा” म्हणत पगारी पुरता संस्थेत पाय ठेवला जातो. मग इतकी सुविधा मिळाली तर थोडी संस्थाचालकाची चापलूसी केली तर ‌ बिघडलं कुठं?
इथेच खरी भ्रष्टाचाराची मूळ मेख मारली गेली. शालार्थ आयडी घोटाळा किशोरच्या मदतीने यातूनच उदयाला आला. 2012 पासून शिक्षक भरती बंद झाली. त्यानंतर शासनाने 2017 मध्ये शिक्षक आणि कर्मचारी यांचे आयडी जनरेट करण्यास सांगितले. मात्र तसे न करता 2024 मध्ये ते जनरेट केले गेले. शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या 2012 पासून दाखवण्यात आल्या. हा ऑनलाइन झालेल्या खेळातच ते नागडे झाले. सर्व प्रकार उघडकीस आला. यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांपासून ते शेवटच्या चपराशा पर्यंत सगळेच भ्रष्टाचारात सामील झाले. विशेष म्हणजे बेकायदेशीर भरती झालेल्या या लोकांना वेतनही सुरळीत सुरू झाले. त्याकरिता बोगस कागदपत्रांचा आधार घेतला गेला, शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश खोट्या साह्या करून वापरले गेले. यासाठी त्यांच्या लेटर पॅड चा देखील वापर करण्यात आला नाही.तसेच संस्थेचे लेटर पॅड देखील वापरले गेले नाही

एवढेच नाही तर तत्कालीन संस्था संचालकाच्या सह्या देखील कॉपी-पेस्ट करून साध्या कागदावर डकवण्यात आल्या. हा सगळा कागदपत्रांचा काळाबाजार करून काढलेले आदेश संबंधित शिक्षक कर्मचाऱ्यास दिले गेलेच नाहीत. ते शिक्षण माफीयाने स्वतःच्या बुडाखाली दाबून ठेवले की संचिकेसह गायब केले. हे अनभिज्ञ आहे.ही झालेली बेकायदेशीर भरती, संस्था जाहिरात ,मुलाखत ,रोस्टर बिंदूनामावली, आरक्षण संस्था ठराव न घेताच बनावट कागदा पत्रांचा आधार घेतला गेला.संस्था कायदेशीर घटनेचे शिस्तबद्ध शिस्तप्रिय रीतीने अनुपालन शिस्तपालन काटेकोरपणे केले गेले नाही.या सर्व कर्मकांडात किशोर खडकीकरनेच मोलाचा सहभाग नोंदवला.थकीत वेतन घोटाळा झाला त्याची पूर्णतः जबाबदारी शाळेचे संस्था संचालक
शाळेचे मुख्याध्यापक शाळेचे वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक प्राथमिक माध्यमिक दोन्ही शिक्षण अधिकारी असे मराठवाडा मधील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था मधील सर्वजण
दोन्ही विभागाचे शिक्षण उपसंचालक आणि ज्या त्या जिल्ह्याचे वेतन अधीक्षक प्राथमिक आणि माध्यमिक अधिकारी कर्मचारी,दलाल ,आका ,माफिया ज्या त्या जिल्ह्याचे जिल्हा कोषागार अधिकारी आणि एसबीआय बँक इथून सगळे थकीत वेतन घोटाळा सुरू झाला. हा सगळा कारभार संघटित गुन्हेगारीचाच आहे.मोकोका कायद्याच्या चौकटीत बसणारा गुन्हा आहे सगळा पुरावा वेतन अधीक्षक यांनी लपवून ठेवला आहे ‌मुख्य सूत्रधार हेच आहेत हे सर्व पुरावे ऑनलाईन वेब साईटमूळे उघडे झाले. या गुन्ह्यांचा मुख्य कणा हे वेतन अधीक्षक आहेत त्यांनी देखील यामध्ये आपले योगदान दिलं.
इतकच नाही तर जि.प.ची पायरी चढायची देखील हिम्मत भाशिप्र च्या कर्मचाऱ्यांची होत नाही. पायरी चढली कीच याची सगळी माहिती चंद्रकांत मुळे पर्यंत पोहोचते लगेच दुसऱ्या दिवशी कारणे दाखवा नोटीस कर्मचाऱ्यांना दिली जाते. मुळे च्या हाताचा खेळणं बनलेला खडकीकर शिक्षण विभागात हेरगिरीचं प्रामाणिकपणे काम करतो.
एखादी किशोर खडकीकर सारखी व्यक्ती प्रतिनियुक्तीच्या नावाखाली खुर्चीला पंधरा वर्षापासून कशी चिटकून बसू शकते? प्रतिनियुक्तीच नाहीतर खुर्चीवर बसून नंगा नाच कसा करू शकते? प्रति नियुक्तीचा नियम बंद असताना हे कसे घडते? जि प चे सीईओ जतिन रहमान यांनी नुकतेच प्रतिनियुक्ती आदेश रद्द केले. पण त्यांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवण्यात आली काय? हे आदेश खडकीकर ला लागू होत नाहीत काय? खडकीकर जिल्हा परिषदेचा जावई आहे काय? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

बीड जिल्ह्यातील कथित थकीत वेतन घोटाळ्यात शिक्षण विभाग, वेतन अधीक्षक संबंधित संस्था व इतर घटकांतील काही अधिकारी-कर्मचारी यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्यांनी शासनाचा फार मोठ्या प्रमाणात आयकर न भरता शासनाची आर्थिक फसवणूक, आर्थिक अनियमितता जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर केली असून त्या महसूल कर नुकसान झाल्याच्या आरोपांची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत निष्पक्ष तपासणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

अंबाजोगाई घरफोडी प्रकरण उघड; सराईत गुन्हेगारासह तीन जण ताब्यात

0

बीड — अंबाजोगाई शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि अंबाजोगाई शहर पोलिसांना यश आले असून, सराईत गुन्हेगारासह दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी सुमारे 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई येथील प्रभाकर रघुनाथ मुंडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. 13 मे 2026 ते 18 मे 2026 दरम्यान घडलेल्या या घरफोडीत सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. याप्रकरणी 19 मे रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 182/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305, 331(3) आणि 331(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास अंबाजोगाई शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. दरम्यान, 27 मे रोजी एलसीबीच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर घरफोडीचा गुन्हा अंबाजोगाईतील सराईत गुन्हेगार शिवम जनक कसबे (रा. सैनिक कॉलनी, मोरेवाडी, ता. अंबाजोगाई) आणि त्याच्या दोन साथीदारांनी केला आहे.

माहितीच्या आधारे पोलिसांनी यशवंतराव चव्हाण चौक परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर चोरीस गेलेल्या मालापैकी 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले. जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत 1.50 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे करीत आहेत.

पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी शरद जोगदंड तसेच एलसीबी आणि अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली.

शेतकरी रुग्णवाहिकांना विनाविलंब इंधन पुरवठा करा – आ.संदीप क्षीरसागर 

0

काळाबाजार करणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी 

बीड — जिल्ह्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या गंभीर परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी तसेच अत्यावश्यक सेवा मोठ्या अडचणीत सापडल्या असून, या पार्श्वभूमीवर आ. संदीप क्षीरसागर यांनी आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेतसविस्तर निवेदन दिले. इंधनाचा सुरळीत पुरवठा, पेट्रोल पंपांवरील काळाबाजार रोखणे, शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी
उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
   सध्या जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेलचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी इंधन साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आ.क्षीरसागर यांनी प्रशासनाने कठोर पावले उचलून नागरिकांना नियमित व सुरळीत इंधन पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी केली. विशेषतः शेतकरी वर्ग सध्या शेतीच्या महत्त्वाच्च्या कामांमध्ये व्यस्त असून, ट्रॅक्टर, पंप व शेतीच्या यंत्रांसाठी डिझेल उपलब्ध न झाल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्राधान्याने इंधन उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित विभागांना द्यावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना वेळेत इंधन मिळाले नाही तर शेतीची मोठी हानी होऊ शकते. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे आ.क्षीरसागर यांनी म्हटले आहे. यावेळी पेट्रोल पंप चालकांकडून होत असलेल्या काळाबाजाराचाही मुद्दा त्यांनी ठळकपणे मांडला. काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने इंधन विक्री केली जात असल्याच्या तक्रारी वाढत असून, अशा प्रकारांना तात्काळ आळा घालावा व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. संकटाच्या काळात जनतेची अडवणूक करणाऱ्यांना प्रशासनाने कोणतीही सवलत देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच रुग्णवाहिकांना विनाविलंब पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत आ.क्षीरसागर यांनी विशेष लक्ष वेधले. आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी धावणाऱ्या रुग्णवाहिकांना अनेक ठिकाणी इंधनासाठी अडचणी निर्माण होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे कोणतीही अडवणूक न करता रुग्णवाहिकांना तातडीने इंधन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चंदन पठाण यांना ‘यंग जर्नलिस्ट ऑफ द इयर 2026’ पुरस्कार जाहीर

0

बीड — गेल्या दोन दशकांपासून पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लेखणीचा दरारा निर्माण करणारे आणि बीड शहरातील प्रसिद्ध दैनिक ’सिटीझन’चे कार्यकारी संपादक चंदन पठाण यांना यंदाचा अत्यंत मानाचा यंग जर्नलिस्ट ऑफ द इयर 2026 पुरस्कार जाहीर झाला आहे. ’साप्ताहिक युवा लोकमित्र’ वृत्तपत्राच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि 6 व्या वर्षात पदार्पण सोहळ्याचे औचित्य साधून ’युवा लोकमित्र परिवार’च्या वतीने या पुरस्काराची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

साप्ताहिक युवा लोकमित्र’तर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व आदर्शवत कामगिरी करणार्‍या कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. पुरस्कार निवड समितीने पत्रकारिता क्षेत्रातील निष्पक्ष, निर्भीड आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी चंदन पठाण यांच्या नावावर एकमुखाने शिक्कामोर्तब केले आहे.चंदन पठाण हे गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय कार्यरत आहेत. सामान्य

जनतेचे प्रश्न प्रशासनासमोर मांडणे, सामाजिक समस्यांना वाचा फोडणे आणि बीड जिल्ह्याच्या विकासात्मक मुद्द्यांवर सातत्याने प्रकाश टाकणे ही त्यांच्या पत्रकारितेची प्रमुख वैशिष्ट्ये राहिली आहेत. दैनिक ’सिटीझन’चे कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी अनेक नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन केले असून, तरुण पिढीमध्ये पत्रकारितेची नवी ऊर्जा निर्माण केली आहे. त्यांच्या याच प्रदीर्घ अनुभवाला आणि तरुण सुलभ उत्साहाला दाद म्हणून त्यांना ’यंग जर्नलिस्ट ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.

हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा येत्या शनिवार, 20 जून 2026 रोजी संध्याकाळी 06:00 वाजता ’ताज पॅलेस’, कादरपुरा, बार्शीनाका, बीड येथे अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे.

चंदन पठाण यांनी आपल्या 20 वर्षांच्या पत्रकारितेत नेहमीच तत्त्वांना आणि जनहिताला प्राधान्य दिले. दैनिक सिटीझनच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेचा एक वेगळा दर्जा निर्माण केला आहे. त्यांच्यासारख्या अभ्यासू आणि ऊर्जावान संपादकाचा सन्मान करताना युवा लोकमित्र परिवाराला अत्यंत अभिमान वाटत आहे असे साप्ताहिक युवा लोकमित्रचे संपादक शेख ताहेर जाफर यांनी म्हटले आहे.

पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल चंदन पठाण यांच्यावर पत्रकारिता क्षेत्रातून, विविध राजकीय नेत्यांकडून, सामाजिक संघटनांकडून आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत

आहे.

केजमध्ये मोठी पोलिस कारवाई : कत्तलीच्या उद्देशाने ठेवलेली ८ गोवंश जनावरे जप्त

0

केज (बीड) : बीड जिल्ह्यातील केज शहरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना बांधून ठेवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी विशेष पथकाने तातडीने कारवाई करत तब्बल ८ जनावरे जप्त केली असून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत , अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहायक पोलीस अधीक्षक श्री. वेंकटराम  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २७ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस अधीक्षक श्री. वेंकटराम यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, केज येथील विशेष पथकाने तातडीने छापा टाकला.


या कारवाईदरम्यान भागवत बारीकराव पारवे (रा. केज) आणि नौशाद उस्मान कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, केज) हे गोवंश जातीच्या बैल व गाय अशा एकूण ८ जनावरांना कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचे आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या जनावरांची अंदाजे किंमत १ लाख ६३ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी पोलीस हवालदार राजू रुपचंद वंजारे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र पशु संरक्षण सुधारणा अधिनियम १९७६ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, पोलीस हवालदार बालासाहेब डापकर, धोंडीराम मोरे, राजू वंजारे, विशाल क्षीरसागर आणि विकास चोपणे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

नात्याला काळीमा : 60 वर्षीय आजोबा आणि चुलत भावाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

0

नेकनूर — आजोबा – नात, भाऊ- बहीण या नात्याला काळीमा फासणारी घटना नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घडली. साठ वर्षीय आजोबाने पंधरा वर्षाच्या अल्पवयींन नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. हे कमी की काय म्हणून पिडीतेचा चुलत भाऊ देखील मुलीवर वारंवार अत्याचार करत असल्याची बाब समोर आल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी आजोबा व चुलत भाऊ यांच्यावर पोक्सो ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एका गावात आजोबा आज्जी सोबत राहणाऱ्या पंधरा वर्षाच्या मुलीचे आई-वडील बाहेरगावी कामाला निघून गेलेले आहेत. सध्या शाळेला सुट्ट्या असल्याने आज्जी आणि इतर भावंडे शेतात शेळ्या चारण्यासाठी निघून गेले. मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून आजोबांनी ती जेवण करत असतानाच तिला बळजबरीने ओढून नेले  तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना घडल्यानंतर दोन चार दिवसांनी पोटात दुखू लागल्याने हॉस्पिटल मध्ये गोळ्या औषधं घेतली पण फरक पडला नाही. पुन्हा डॉक्टर कडे गेल्यावर महिला डॉक्टरांनी विश्वासात घेऊन विचारल्यावर पिडीतेने आपबीती सांगितली. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. याप्रकरणी.नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक म्हणजे पीडिता शेळ्या चरण्यासाठी गेली असता. तिचा चुलत भाऊ हा शेळ्या चारण्यासाठी पीडीता गेल्यानंतर  शेतामध्ये जबरदस्ती लैंगिक संबंध ठेवत होता.असा उल्लेख देखील तक्रारीत करण्यात आला आहे. हा प्रकार  फक्त तिच्या एकटी सोबतच झाला नाही तर इतर लहान बहिणी सोबतही चुलत भाऊ असाच अत्याचार करत होता असा देखील तक्रारीत उल्लेख आहे. चुलत भावाने घरात कोणीही नाही अस पाहून एका दिवशी बळजबरीने अत्याचार केला. त्यामुळे आजोबा आणि चुलतभावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.