Home Blog Page 18

लिंबागणेश चा राष्ट्रीय महामार्गावर “मृत्यूचा सापळा”; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

0

बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी वर कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांनी गतिरोधक व सुरक्षा उपायांची मागणी केली आहे.

मृत्यूचा सापळा’ पुन्हा ठरला घातक; नागरिकांकडून गतिरोधक व सुरक्षा उपायांची मागणी

लिंबागणेश —  बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे राष्ट्रीय महामार्ग 548 डी वर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. भालचंद्र विद्यालय परिसरात कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. 15 मे) रोजी रात्री सुमारे पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास टाटा कंपनीची विस्टा कार (क्र. MH 05 AX 0388) आणि हिरो स्प्लेंडर दुचाकी (क्र. MH 44 AA 6226) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नेकनूर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार विठ्ठल राठोड आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालय, बीड येथे हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेले दुचाकीस्वार बबन काशिनाथ लगास आणि ज्ञानदेव विष्णू लगास (दोघे रा. चिखलबीड, ता. जि. बीड) असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे चिखलबीड गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग 548 डी वरील लिंबागणेश परिसरात वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेषतः भालचंद्र विद्यालय परिसरात वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने हा भाग ‘अपघातप्रवण झोन’ बनला आहे. येथे तातडीने गतिरोधक बसविणे, वेगमर्यादा फलक उभारणे, रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था सुधारणे आणि वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सात महिन्यांपासून मुलगी बेपत्ता; हतबल पालकांचा एसपी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

0

बीड —  जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात एका दाम्पत्याने अंगावर पेट्रोल-डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील हे जोडपे आपल्या १६ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी गेल्या सात महिन्यांपासून पोलिसांकडे हेलपाटे मारत आहे. मात्र अद्याप मुलीचा शोध लागला नसल्याने हताश झालेल्या आई-वडिलांनी अखेर टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.


माहितीनुसार, सात महिन्यांपूर्वी एका तरुणाने या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. परंतु इतका कालावधी उलटूनही मुलगी सापडलेली नाही. यामुळे संतप्त आणि निराश झालेल्या पालकांनी वारंवार पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. मात्र पोलिसांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शुक्रवारी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात या दाम्पत्याने अंगावर पेट्रोल-डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्यांना रोखले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून बेपत्ता मुलीचा शोध नेमका कधी लागणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.

बीडमध्ये मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला; ‘स्वयंघोषित गोरक्षकांवर गुन्हे दाखल करा’ची मागणी

0

बीड —  शहरातील मोमीनपुरा भागात पोलिसांच्या कारवाईदरम्यान स्वयंघोषित गोरक्षकांनी घरांची कुलपे तोडून दहशत निर्माण केल्याचा आरोप करत ऑल इंडिया जमियतुल कुरैश संघटना आणि मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

शुक्रवारी झालेल्या या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख मुजीब, जेष्ठ नगरसेवक मोईन मास्टर, गटनेते फारुक पटेल, खुर्शीद आलम, भागवत तावरे यांच्यासह अनेक नगरसेवक व समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, ११ मे २०२६ रोजी मध्यरात्री पेठ बीड पोलिसांनी मोमीनपुरा परिसरात कारवाई केली. या कारवाईत कथित गोरक्षकांनाही सहभागी करून घेण्यात आले. संबंधितांनी अनेक घरांची कुलपे तोडली, घरात घुसून दबाव टाकला आणि संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. महिला व लहान मुले उपस्थित असतानाही संबंधितांनी आक्रमक वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी कारवाईचे व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. या व्हिडिओंमुळे बीडमधील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा इशाराही शिष्टमंडळाने दिला.
शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना सांगितले की, गोवंश हत्या बंदी कायद्याला विरोध नसला तरी त्या कायद्याच्या आडून खासगी स्वयंघोषित गोरक्षकांना सहभागी करून घेत पोलिसांनी केलेली कारवाई आक्षेपार्ह आहे. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित गोरक्षकांसह त्यांना कारवाईत सहभागी करून घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी.

सना मलिक यांच्याकडेही मागणी

कुरेशी समाजाच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी सकारात्मक भूमिका घेतली होती. त्याचप्रमाणे बीड प्रकरणातही आमदार सना मलिक यांनी लक्ष घालावे, अशी विनंती शेख मुजीब यांनी केली.

शब्बीर मामूंसारखा गोरक्षक कोण?”

हिंदू-मुस्लिम सलोखा वाहक भागवत तावरे यांनी यावेळी परखड भूमिका मांडताना, “शिरूरचे पद्मश्री शब्बीर मामू यांच्यासारखा खरा गोरक्षक कोण आहे?” असा सवाल उपस्थित केला. धर्माच्या नावावर तेढ निर्माण करून समाजातील सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकाराने बीडमध्ये उभारले जाणार मोकाट कुत्र्यांसाठी निवारा केंद्र

0

नसबंदी व लसीकरण मोहिमेला गती;५० लाखांचा निधी मंजूर

बीड —  शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर अखेर मोठी आणि दिलासादायक कारवाई सुरू झाली आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आ. विजयसिंह पंडित यांनी पुढाकार घेत मोकाट कुत्र्यांच्या निवारा केंद्रासाठी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. हा निधी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.


शहरातील धानोरा रोडवरील पंढरी नगरी परिसरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आ. विजयसिंह पंडित यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत ठोस निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

राजीव गांधी चौकाजवळ उभारले जाणार निवारा केंद्र

नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत, राजीव गांधी चौक परिसरात मोकाट कुत्र्यांसाठी आधुनिक निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रात कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण आणि आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

पालिका प्रशासनाला तातडीच्या सूचना

आ. विजयसिंह पंडित यांनी नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, मुख्याधिकारी शैलेश फडसे आणि पालिका पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत तातडीने मोहिम राबवण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या निर्देशानंतर पालिकेने शहरात नसबंदी आणि लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे.
पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, खंडेश्वरी रोड परिसरात आतापर्यंत ५०० हून अधिक मोकाट कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता शहरभर विशेष शोध मोहिम राबवून पुढील कारवाई केली जाणार आहे.

नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण

शासनाच्या निर्देशानुसार यापूर्वीच कारवाई होणे अपेक्षित असताना दुर्लक्ष झाल्याची टीका होत होती. मात्र आता नव्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आ. विजयसिंह पंडित शहर विकासासाठी “ॲक्शन मोड”मध्ये असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची बदली; धाराशिवची नवी जबाबदारी

0

बीड — मागील तीन वर्षांपासून बीड जिल्ह्यात कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले  सचिन पांडकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांची धाराशिव येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी बीडमध्ये कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बीडमध्ये रुजू होण्यापूर्वी सचिन पांडकर यांनी मुंबई येथे मानवी हक्क अभियान विभागात पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी त्यांची बीड जिल्ह्यात बदली झाली होती. या काळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनेक संवेदनशील घटनांमध्ये त्यांनी संयमाने आणि प्रभावीपणे परिस्थिती हाताळत प्रशासनाला स्थैर्य दिले.


शांत ,संयमी, मितभाषी आणि लोकाभिमुख अधिकारी अशी ओळख असलेल्या पांडकर यांनी बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेचा जनतेशी संवाद अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यातील विविध गुन्हेगारी घटनांमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका आणि प्रशासनातील समन्वय यामुळे त्यांना नागरिकांमध्ये विशेष लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं समाधान करण्याचं कसब त्यांनी बीडमध्ये पणाला लावलं होतं. त्यामुळे त्यांची बीड मधील कार्य सेवा कायम संस्मरणीय राहणार आहे.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक काळ सेवा देणाऱ्या अप्पर पोलीस अधीक्षकांपैकी एक म्हणून त्यांची नोंद घेतली जात आहे. त्यांच्या बदलीनंतर आता बीडमध्ये नवीन अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

भूसंपादन मावेजा घोटाळा : तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक न्यायालयीन कोठडीत

0

बीड —  जिल्ह्यातील बहुचर्चित भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेला तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यास शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना २९ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.


या प्रकरणात १५४ लवाद आदेशांच्या माध्यमातून तब्बल २४१ कोटी ६२ लाख रुपयांचा वाढीव मावेजा मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या घोटाळ्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी भूसंपादन सतीश धुमाळ यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली होती.
त्यानुसार महसूल विभागातील अधिकारी, कंत्राटी कर्मचारी तसेच काही वकिलांसह एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान एसआयटीकडून तांत्रिक पुरावे, संगणकीय नोंदी आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. या तपासातून तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक याचा सहभाग समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.
यानंतर गुरुवारी रात्री लातूर येथून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. पुढील तपासासाठी न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या कालावधीत एसआयटीने संबंधित संचिका, लॅपटॉप, संगणक तसेच मोबाईल रेकॉर्डिंगची तपासणी केली. तसेच पाठक यांच्या आवाजाचे नमुनेही तपासासाठी घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान न्या. एस. आर. शिंदे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अविनाश पाठक याला २९ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून सुरू असून भूसंपादन मावेजा घोटाळ्यात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

21 जूनला होणार पुनर्परीक्षा; पेपरफुटी प्रकरणानंतर NTA ची मोठी घोषणा

0

NTA ने NEET UG 2026 पुनर्परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. 21 जून रोजी परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. पेपरफुटी प्रकरणानंतर मोठा निर्णय.

स्टॅलिन यांची मोदींकडे NEET बंद करण्याची मागणी

नवी दिल्ली —  नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency )अर्थात NTA ने NEET UG 2026 पुनर्परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर केली असून, ही परीक्षा रविवार 21 जून 2026 रोजी घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात निर्माण झालेल्या संताप आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घोषणा करण्यात आली.


NTA ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती देताना स्पष्ट केले की, re-NEET साठी विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मे 2026 मध्ये भरलेला अर्ज, निवडलेले परीक्षा केंद्र आणि उमेदवारीची माहिती याच आधारे पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही. याशिवाय आधी भरलेले परीक्षा शुल्क परत दिले जाणार असल्याची माहितीही NTA कडून देण्यात आली.

NEET Admit Card पुन्हा जारी होणार

NTA च्या माहितीनुसार, पुनर्परीक्षेसाठी नवीन प्रवेशपत्र (Admit Card) जारी करण्यात येईल. विद्यार्थ्यांना ते अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे.
अधिकृत वेबसाइट : neet.nta.nic.in

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक

काल रात्री उशिरा केंद्रीय शिक्षण मंत्री Dharmendra Pradhan यांच्या निवासस्थानी जवळपास दोन तास उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांवर चर्चा झाली.
बैठकीला उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी, शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, NTA चे महासंचालक अभिषेक सिंग, Central Board of Secondary Education चे अध्यक्ष राहुल सिंग तसेच KVS आणि NVS चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

NEET 2026 पेपरफुटीचा मोठा खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, NEET UG 2026 पेपरफुटीचे मूळ महाराष्ट्रातील नाशिक येथे असल्याचे समोर आले आहे. ही गेस पेपर साखळी हरियाणा, राजस्थान, बिहार, केरळ, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे.
अहवालानुसार, WhatsApp आणि Telegram ग्रुपवर 400 हून अधिक प्रश्न असलेली संभाव्य प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती. त्यातील जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयातील 120 हून अधिक प्रश्न मूळ पेपरशी जुळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

स्टॅलिन यांची मोदींकडे मोठी मागणी

एम के स्टालिन (M. K. Stalin ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांना पत्र लिहून NEET मधून 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी तात्पुरती सूट देण्याची मागणी केली आहे.
त्यांनी NMC कायदा 2019 मधील कलम 14 मध्ये बदल करण्यासाठी अध्यादेश आणण्याची मागणी करत, राज्य सरकारांना बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देण्याचा अधिकार द्यावा, असे म्हटले आहे.
स्टॅलिन यांनी पत्रात म्हटले की, “अत्यंत केंद्रीकृत परीक्षा पद्धतीमधील संरचनात्मक दोष पुन्हा एकदा उघड झाले आहेत. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे.”

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

🕳️.    पुनर्परीक्षेसाठी नवीन अर्ज करण्याची                 गरज नाही
🕳️.    जुनी नोंदणीच वैध राहणार
🕳️.   अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार            नाही
🕳️.    नवीन Admit Card जारी होणार
🕳️.   परीक्षा 21 जून 2026 रोजी होणार

इंधन दरवाढीचा मोठा फटका! पेट्रोल-डिझेल 3 रुपयांनी महाग, CNG दरातही वाढ

0

मध्य पूर्वेतील तणावामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात 3 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. CNG दरातही 2 रुपयांची वाढ झाली असून आजपासून नवे दर लागू झाले आहेत.

देशभरात इंधन दरवाढ लागू; सामान्यांच्या खिशाला झळ

नवी दिल्ली — मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता थेट भारतातील नागरिकांवर दिसू लागला आहे. देशात आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रती लिटर 3 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली असून, सीएनजीच्या दरातही प्रती किलो 2 रुपयांची वाढ लागू करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या वाहतूक खर्चात मोठी वाढ होणार आहे.


राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीचा नवा दर 79.09 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दिल्ली-एनसीआरसह देशातील विविध शहरांमध्येही नवे दर लागू करण्यात आले आहेत.
मोदींच्या आवाहनानंतर दरवाढीचे संकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांनी ऊर्जा बचतीचे आवाहन केल्यानंतर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) आणि आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांनी इंधन दरवाढीचे संकेत दिले होते.
तेल कंपन्यांवरील आर्थिक दबाव सातत्याने वाढत असल्याने दरवाढ जास्त काळ रोखता येणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी अखेर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात वाढ जाहीर करण्यात आली.
इराण-अमेरिका तणावाचा भारतावर परिणाम
सध्या मध्य पूर्वेत सुरू असलेल्या इराण-अमेरिका तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक गॅसच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.
भारत जवळपास 60 टक्के नैसर्गिक गॅस आयात करतो. आयातीचा खर्च वाढल्याने आयजीएल आणि एमजीएलसह विविध गॅस कंपन्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव खर्चाचा बोजा अखेर ग्राहकांवर टाकावा लागत असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.
तेल कंपन्यांना मोठा आर्थिक फटका
सरकारच्या माहितीनुसार, तेल कंपन्यांना डिझेलवर प्रती लिटर सुमारे 20 रुपयांचे तर पेट्रोलवर प्रती लिटर 10 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत होते. कच्च्या तेलाचा पुरवठा घटल्याने आणि आयात खर्च वाढल्याने कंपन्यांवरील दबाव आणखी वाढला आहे.
यामुळे आगामी काळात महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, वाहतूक, अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तूंच्या किंमतींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

पत्रकार महेश वाघमारे यांना मातृशोक

0

बीड —  जेष्ठ पत्रकार महेश वाघमारे यांच्या मातोश्री श्रीमती मालतीबाई माधवराव वाघमारे वय 88 वर्ष यांचे आज बीड येथील निवासस्थानी दि 14 रोजी पहाटे 4 वाजता  निधन झाले त्याचा अत्यंविधी आज 5 वाजता अमर धाम मोंढा रोड,बीड येथे करण्यात आला

श्रीमती मालतीबाई माधवराव वाघमारे या मूळ रा अंबड येथील असून त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे,
जुन्या पिढीतील धार्मिक वृत्तीच्या श्रीमती मालतीबाई वाघमारे अंबड मध्ये मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून परिचित आहेत,
काही महिन्यापूर्वीच मोठे चिरंजीव प्रसिद्ध निवेदक स्व मंगेश वाघमारे यांचे निधन झाले,त्यांनतर त्या बीड येथे पत्रकार महेश वाघमारे यांच्या निवासस्थानी राहत होत्या,आज अचानक पहाटेच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या अंत्यविधीला समाजातील विविध स्तरातील प्रतिष्ठित  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाघमारे कुटुंबियांच्या दुःखात “सह्याद्री माझा ” परिवार सहभागी आहे

“खलरक्षणाय सद् निग्रहणाय” हाच “शितल” मंत्र; आरोपींना पाठीशी घालायचं एवढंच अवगत तंत्र 

0

बीड — “लाडाचा किडा अन् शेजाऱ्याला पिडा” अशी स्थिती पोलीस अधीक्षकांनी सोकवून ठेवल्यामुळे बीड शहर ठाणे प्रमुखाची झाली आहे. कायद्याचं तत्वज्ञान फक्त पीडितांना शिकवायच कसं यात मास्टरकी झाल्याने पोलीस प्रशासनाच “सद् रक्षणाय खलनिग्रहणाय”हे ब्रीद वाक्य अक्षरशः उलटवून टाकला आहे. परिणामी दोषी असलेल्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करायला पळवाटांचा आधार घेतला गेला. छाया पांचाळ मृत्यू प्रकरणात शितल कुमार बल्लाळ यांच्या केबिनमध्ये ठिय्या द्यावा लागला.शेवटी एस पी.नवनीत कावत यांच्या आदेशानंतर कारवाईच्या लेखी आश्वासनाने आंदोलनाचा तिढा अखेर काही काळ काळ होईना सुटला.

बीड जिल्हा रुग्णालयात वर्षभरापूर्वी प्रसुती दरम्यान डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे अतिरक्तस्राव होऊन तडफडून मृत्यूमुखी पडलेल्या मयत छाया पांचाळ प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी बीड शहर पोलिस ठाण्यात किष्किंधा पांचाळ, बाळासाहेब मोरे पाटील व मयत छाया पांचाळ यांच्या कुटुंबीयांनी दिवसभर ठिय्या आंदोलन केले. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवर चढून आंदोलन केले गेले. त्यावेळी गुन्हे दाखल करण्याचा आश्वासन देऊन आंदोलकांच्या तोंडाला पान पुसली. त्यानंतरही वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला नाही.असं म्हणत बीड शहर पोलीस ठाण्यात बल्लाळ यांच्याच केबिनमध्ये सुरू केलेलं आंदोलन स्थगित करायला भाग पाडलं. त्यानंतर लातूरच्या वैद्यकीय टीमचा अहवाल प्राप्त झाला यामध्ये छाया पांचाळ यांच्या प्रसूती दरम्यान केल्या गेलेल्या उपचारामध्ये हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात शितल कुमार बल्लाळ यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर अंबाजोगाईच्या डॉक्टरांचा अहवाल मागवण्यात आला. या अहवालामध्ये असलेल्या चिल्लर त्रुटीचा हवाला देत मृत्यू प्रकरणास जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांना वाचवण्याचं काम शितल कुमार बल्लाळ यांनी प्रामाणिकपणे केलं. ही बाब पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देखील मान्य केली. पण त्या त्रुटीची बसलेली पाचर निघालीच नाही.

बीड शहर पोलीस ठाण्यात आंदोलकांना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात येईल अशी धमकी बल्लाळ यांनी दिली. बस स्थानकासमोर सुरू असलेल्या अवैध धंद्यावाल्यांपाशी शेळपटपणे वागणारे हे महाशय इथे मात्र आंदोलकावर खाकीची जरब बसवण्यात सरसावलेले पाहायला मिळाले. सध्याच्या स्थितीत “खलरक्षणाय सद् निग्रहणाय” असं ब्रीद तयार करून शहर पोलीस ठाण्याचा कारभार ते हाकत असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.शितल कुमार बल्लाळ यांच्या संशयास्पद वागणुकीचाच परिणाम आंदोलकांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. शेवटी दुर्दैवाने पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांना छाया पांचाळ मृत्यू प्रकरणातील आंदोलनात हस्तक्षेप करावा लागला. या प्रकरणात आंदोलक बाळासाहेब मोरे, किश्किंदा पांचाळ, अशोक येडे व मयत छाया पांचाळ यांच्या कुटुंबीयाशी व्यक्तिगत चर्चा करून पंधरा दिवसाच्या आत वरिष्ट स्तरावर पत्रव्यवहार करून व मी स्वतः लक्ष देऊन न्याय देण्यासाठी प्रयत्न करील असा आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिलं. त्यांच्या आदेशावरून वादग्रस्त पोलीस अधिकारी शितल कुमार बल्लाळ यांनी लेखी दिल्यामुळे हे आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आले.