बीड — “लाडाचा किडा अन् शेजाऱ्याला पिडा” अशी स्थिती पोलीस अधीक्षकांनी सोकवून ठेवल्यामुळे बीड शहर ठाणे प्रमुखाची झाली आहे. कायद्याचं तत्वज्ञान फक्त पीडितांना शिकवायच कसं यात मास्टरकी झाल्याने पोलीस प्रशासनाच “सद् रक्षणाय खलनिग्रहणाय”हे ब्रीद वाक्य अक्षरशः उलटवून टाकला आहे. परिणामी दोषी असलेल्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करायला पळवाटांचा आधार घेतला गेला. छाया पांचाळ मृत्यू प्रकरणात शितल कुमार बल्लाळ यांच्या केबिनमध्ये ठिय्या द्यावा लागला.शेवटी एस पी.नवनीत कावत यांच्या आदेशानंतर कारवाईच्या लेखी आश्वासनाने आंदोलनाचा तिढा अखेर काही काळ काळ होईना सुटला.
बीड जिल्हा रुग्णालयात वर्षभरापूर्वी प्रसुती दरम्यान डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे अतिरक्तस्राव होऊन तडफडून मृत्यूमुखी पडलेल्या मयत छाया पांचाळ प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी बीड शहर पोलिस ठाण्यात किष्किंधा पांचाळ, बाळासाहेब मोरे पाटील व मयत छाया पांचाळ यांच्या कुटुंबीयांनी दिवसभर ठिय्या आंदोलन केले. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवर चढून आंदोलन केले गेले. त्यावेळी गुन्हे दाखल करण्याचा आश्वासन देऊन आंदोलकांच्या तोंडाला पान पुसली. त्यानंतरही वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला नाही.असं म्हणत बीड शहर पोलीस ठाण्यात बल्लाळ यांच्याच केबिनमध्ये सुरू केलेलं आंदोलन स्थगित करायला भाग पाडलं. त्यानंतर लातूरच्या वैद्यकीय टीमचा अहवाल प्राप्त झाला यामध्ये छाया पांचाळ यांच्या प्रसूती दरम्यान केल्या गेलेल्या उपचारामध्ये हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात शितल कुमार बल्लाळ यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर अंबाजोगाईच्या डॉक्टरांचा अहवाल मागवण्यात आला. या अहवालामध्ये असलेल्या चिल्लर त्रुटीचा हवाला देत मृत्यू प्रकरणास जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांना वाचवण्याचं काम शितल कुमार बल्लाळ यांनी प्रामाणिकपणे केलं. ही बाब पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देखील मान्य केली. पण त्या त्रुटीची बसलेली पाचर निघालीच नाही.
बीड शहर पोलीस ठाण्यात आंदोलकांना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात येईल अशी धमकी बल्लाळ यांनी दिली. बस स्थानकासमोर सुरू असलेल्या अवैध धंद्यावाल्यांपाशी शेळपटपणे वागणारे हे महाशय इथे मात्र आंदोलकावर खाकीची जरब बसवण्यात सरसावलेले पाहायला मिळाले. सध्याच्या स्थितीत “खलरक्षणाय सद् निग्रहणाय” असं ब्रीद तयार करून शहर पोलीस ठाण्याचा कारभार ते हाकत असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.शितल कुमार बल्लाळ यांच्या संशयास्पद वागणुकीचाच परिणाम आंदोलकांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. शेवटी दुर्दैवाने पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांना छाया पांचाळ मृत्यू प्रकरणातील आंदोलनात हस्तक्षेप करावा लागला. या प्रकरणात आंदोलक बाळासाहेब मोरे, किश्किंदा पांचाळ, अशोक येडे व मयत छाया पांचाळ यांच्या कुटुंबीयाशी व्यक्तिगत चर्चा करून पंधरा दिवसाच्या आत वरिष्ट स्तरावर पत्रव्यवहार करून व मी स्वतः लक्ष देऊन न्याय देण्यासाठी प्रयत्न करील असा आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिलं. त्यांच्या आदेशावरून वादग्रस्त पोलीस अधिकारी शितल कुमार बल्लाळ यांनी लेखी दिल्यामुळे हे आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आले.

