शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटला; परीक्षा रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांनी SIT चौकशीचे आदेश दिले

मुंबई —  महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 चा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर 28 जून रोजी होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ही राज्यातील 1028 केंद्रांवर घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, 27 जून रोजी पहाटे भिवंडी परिसरात काही व्यक्तींकडे टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांची माहिती असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रश्नपत्रिकेची पडताळणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित व्यक्तींकडे असलेल्या माहितीतील काही प्रश्न हे टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे समोर आले.
या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर; SIT चौकशीचे आदेश

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ठाण्याचे सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांना सूचना देत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांमध्ये चिंता

टीईटी परीक्षा ही शिक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा मानली जाते. पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द झाल्याने हजारो परीक्षार्थींमध्ये नाराजी आणि चिंता निर्माण झाली आहे. यापूर्वीही विविध परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे राज्यात मोठी चर्चा झाली होती. आता टीईटी पेपरफुटी प्रकरणामुळे पुन्हा एकदा परीक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बीड मधील टीईटी परीक्षा घोटाळ्याचा काय?

बीड जिल्ह्यातही गेल्या अनेक दिवसापासून शिक्षक पात्रता घोटाळा होत आलेला आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अनेक शिक्षकांना अपात्र ठरविण्यात आला असलं काहीजणांवर गुन्हे दाखल असले तरी या प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यासह संस्थाचालकांचे हितसंबंध जोडले गेलेले असल्याने कधी कारवाई झाली नाही. दरम्यान टीईटी पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे या पेपर फुटीचे धागेदोरे बीड पर्यंत पोहोचण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातील जाणकार वर्तवित आहेत. अशाच प्रकारे यापूर्वी फुटलेल्या पेपरच्या माध्यमातून अनेक जण पास झाले असल्याचं सांगितलं जात आहे. बीडमध्ये टीईटी पात्रता परीक्षेत संदर्भात पसरलेल्या भ्रष्टाचाराच्या “चंद्र”कळानी पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटले असून स्वतःला भ्रष्टाचारातले “कांत” समजणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. बीड मधील शिक्षक पात्रता परीक्षेत संदर्भात एस आय टी ने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles