आ.रोहीत पवारांचा सरकारला बीडमधून इशारा
बीड — राज्यातील शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी ही अटी व शर्तीमुळे फसवी ठरत असून, सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी राज्यभर सुरू असलेल्या दौऱ्याच्या निमित्ताने शनिवारी (दि.२७) रोजी त्यांनी बीड येथील राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधींसोबत सविस्तर बैठक घेतली. यावेळी आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. आ.रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, हा संघर्ष कोणत्याही राजकीय लाभासाठी नसून राज्यातील अन्नदात्याला न्याय मिळवून देण्यासाठी आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. आवश्यक वाटल्यास ‘जेल भरो’ आंदोलन देखील करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी सरकारला यावेळी दिला आहे.
आ.रोहित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना दिली जाणारी कर्जमाफी ही प्रत्यक्षात अनेक अटी व शर्तीमुळे निष्प्रभ ठरत आहे. पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करत असताना सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी कर्जमाफीवरील अटी व शर्ती काढून टाकण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही सरकारने त्या आश्वासनाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे, असे त्यांनी सांगितले.
बैठकीदरम्यान शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. कर्जमाफी, पीकविमा, शेतीमालाला हमीभाव, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, वीजपुरवठा आणि शेतीसंदर्भातील इतर प्रश्नांवर कार्यकर्ते व शेतकरी प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या सर्व प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात जिल्हानिहाय दौरे, जनसंवाद आणि आंदोलनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज अधिक बुलंद करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या घामाचा, कष्टाचा, स्वाभीमानाचा आवाज बुलंद करण्यासाठी हा संघर्ष अधिक तीव्र करू- आ.संदीप क्षीरसागर
अन्नदात्यावरच अन्याय होत असेल तर ही गंभीर बाब आहे. शेतकरी राजावरील होत असलेल्या अन्यायाविरुद्ध रोहीत दादांनी आवाज उठवला आहे. हा शेतकऱ्यांचा घामाचा, कष्टाचा आणि स्वाभिमानाचा आहे, आणि हा आवाज बुलंद करण्यासाठी हा संघर्ष अधिक तीव्र करू, असे आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त होताना म्हटले.

