बीड — मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि जायकवाडी धरणाला कृष्णा खोऱ्यातून २५ टीएमसी पाणी मिळावे या मागणीसाठी बीडमध्ये शुक्रवारी (दि. २९ मे) शेतकऱ्यांनी भव्य बैलगाडी मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. लोकलढा आंदोलनाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात शेकडो शेतकरी, नागरिक आणि पाणी प्रश्नावर काम करणारे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

रखरखत्या उन्हात निघालेल्या या मोर्चादरम्यान आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठवाड्याच्या पाणी हक्कासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. बीड जिल्हा कायम दुष्काळी पट्ट्यात मोडत असून शेतकऱ्यांना दरवर्षी पाणीटंचाई, अवर्षण आणि सिंचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, मराठवाड्याच्या वाट्याचे कृष्णा खोऱ्यातील २५ टीएमसी पाणी देण्याबाबत पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्व सातत्याने टाळाटाळ करत आहे. परिणामी बीडसह संपूर्ण मराठवाड्याचा सिंचन अनुशेष वाढत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

यावेळी आंदोलकांनी कोकणातील अतिरिक्त १६८ टीएमसी पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाड्याकडे वळविण्याचे काम गतीने पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच गोदावरी-सिंदफणा नदीजोड प्रकल्प तातडीने राबवून त्यासाठी सर्वेक्षण सुरू करावे, अशी मागणीही करण्यात आली.
याशिवाय कोकणातून मराठवाड्याकडे वळविण्यात येणाऱ्या पाण्यातून बीड जिल्ह्याला किती पाणी मिळू शकते यासाठी स्वतंत्र सर्वेक्षण करावे, गेवराई तालुक्यातील उजवा कालवा पूर्ववत सुरू करावा आणि माजलगाव धरणातून जायकवाडी धरणाकडे सोडण्यात येणारे पाणी पूर्ववत करावे, अशा विविध मागण्या आंदोलकांनी सरकारसमोर मांडल्या.
हा बैलगाडी मोर्चा जिल्हा क्रीडांगणापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या आंदोलनात कालीदास आपेट, सुशीला मोराळे, भाऊसाहेब जरांगे, समन्वयक दिनेश गुळवे, राहुल लोंढे, अप्पासाहेब महानोर, बाबुराव जेठे, अप्पासाहेब तळेकर, मोहन गुंड, कुलदीप करपे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

