नवी दिल्ली — देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षामध्ये अनबन पहायला मिळत होती.त्याचे परिणाम आज समोर आले आहे. आम आदमी पार्टीनं काही दिवसांपूर्वी राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरुन हटवलं होतं.
दरम्यान राघव चढ्ढा यांच्यासह आपचे राज्यसभेचे 7 खासदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. आम आदमी पार्टीचे राज्यसभेत एकूण 10 खासदार होते. त्यापैकी 7 खासदार भाजपमध्ये दाखल होत आहेत.
आम आदमी पार्टीच्या खासदारांची यादी
पंजाबमधील खासदार राघव चड्ढा, हरभजन सिंग, अशोककुमार मित्तल ,राजिंदर गुप्ता , संदीप पाठक ,विक्रमजीत सिंग सहानी , संत बलबीर सिंग नवी दिल्लीतील खासदार स्वाती मालीवाल, नरेन गुप्ता, संजय सिंह

भाजपमध्ये गेलेल्या खासदारांची नावं
राघव चड्ढा, राजिंदर गुप्ता , अशोककुमार मित्तल , संदीप पाठक , विक्रमजीत सिंग सहानी , हरभजन सिंग, स्वाती मालीवाल
भाजपासाठी हा राजकीय फायदा मानला जात असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत आणखी नेते पक्षांतर करतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
आम आदमी पार्टीची पहिली प्रतिक्रिया
राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्ष सोडून 7 राज्यसभा खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी या घटनेला भाजपचे ऑपरेशन लोटस आणि अत्यंत घाणेरड्या राजकारणाचा खेळ असल्याचे म्हटले. संजय सिंह म्हणाले की,’आज भाजपने आम आदमी पक्षाचे 7 राज्यसभा खासदार फोडून घाणेरडे राजकारण केले आहे. पंजाबमधील लोक हे कधीही विसरणार नाहीत. पंजाबची जनता यांना कधीच माफ करणार नाही.
हा तर जनतेचा विश्वासघात
पुढे बोलताना संजय सिंह यांनी म्हटले की, राघव चड्डा यांना पक्षाने खासदार आणि आमदार बनवले आणि जनतेनेही त्यांना भरभरून पाठिंबा दिला. मात्र, ते आता भाजपसोबत गेले आहेत. संदीप पाठक यांचा उल्लेख सिंह म्हणाले की, पक्षाने त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आणि राज्यसभेत पाठवले. याशिवाय बलबीर सिंह, अशोक मित्तल, राजेंद्र गुप्ता, स्वाती मालीवाल आणि हरभजन सिंह यांची नावे घेत संजय सिंह यांनी म्हटले की, या सर्वांना जनतेने मोठे केले, पण आता त्यांनी त्याच जनतेचा विश्वासघात केला आहे.




