मुंबई — योजना पूर्ण आणि पाणी उपलब्ध असतानाही केवळ महावितरणच्या थकबाकीमुळे नवीन वीज जोडणी मिळत नसल्याने शहराला २० दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे शहरात पाणीटंचाई आहे. पाणीपुरवठा जर २ दिवसांवर आणायचं असेल तर बीड नगरपालिकेला आलेले १५ व्या वित्त आयोगाचे ४८ कोटी महावितरण कडे वळवले तर वीज जोडणी करुन पाणीप्रश्न सुटेल असे म्हणत शहराच्या जिव्हाळ्याचा विषय आ. संदीप क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मांडला आहे.
बीड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वीची माजलगाव बॅकवॉटर योजना सुरू आहे. मात्र शहराची झपाट्याने होत असलेली वाढ ३ लाख लोकसंख्या यामुळे ही योजना पाणीपुरवठा करण्यासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे २०१७ मध्ये २४ टीएमएलटी ची नवीन अमृत अटल योजना मंजूर झाली. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते झाले होते. ती योजना सध्या पूर्ण आहे. मात्र महावितरण कंपनीची थकबाकी असल्याने या योजनेला नवीन वीज कनेक्शन मिळत नाही. याबाबत वारंवार सभागृहात आवाज उठविला आहे. अजितदादा यांना ही याप्रकरणी भेटलो त्यांनी हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी ते सोडविले असते, पण दुर्दैवाने ते आज नाहीत. त्यामुळे पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून अपेक्षा आहेत. तसेच यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने जर नगरपालिकेला दिलेले १५ व्या वित्त आयोगाचे ४८ कोटी वळवून ते महावितरणला दिले तर थकबाकी निल होऊन नवीन वीज जोडणी मिळेल, यामुळे शहराला दोन दिवसांआड पाणी येईल असे आ.क्षीरसागर यांनी म्हटले आहे. यामुळे शासन आता यावर काय पाऊल उचलणार याकडे बीडकरांचे लक्ष लागले आहे.

