बीड — जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात कोयत्याने हल्ला करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून जबरी चोरी आणि घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 22 जून 2026 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास राजेंद्र अभिमान नागरे (रा. थेरला, ता. पाटोदा) हे मोटारसायकलवरून बीडकडून आपल्या गावी जात असताना रोहतवाडी शिवारात तीन अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी अडवली. आरोपींनी त्यांच्या खिशातील मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. यावेळी विरोध केल्याने आरोपींनी कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 192/2026 नुसार जबरी चोरी व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच आरोपींनी त्याच दिवशी पाटोदा-बीड रोडवरील थेरला फाटा परिसरातील सिताबाई महादेव सोनवणे यांच्या घर व संतकृपा चहाच्या हॉटेलमध्ये चोरी केल्याचे तपासात समोर आले. चोरट्यांनी घरातील टीव्ही, मोबाईल, सोन्या-चांदीच्या वस्तू असा सुमारे 85 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 189/2026 दाखल आहे.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपींचा शोध
या दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची माहिती मिळवली.
पोलीस अंमलदार बाळू सानप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
माऊली नामदेव पवार (वय 26, रा. इंदापूर)
मयूर ऊर्फ ओंकार नितीन भोसले (वय 22, रा. इंदापूर),आदित्य ऊर्फ बाळा सिद्ध पवार (वय 19, रा. इंदापूर)
या आरोपींकडून चोरीचा मोबाईल, रोख रक्कम, टीव्ही, सोन्याच्या वस्तू तसेच गुन्ह्यात वापरलेला कोयता असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना मुद्देमालासह पाटोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक औदुंबर मस्के करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि श्रीराम खटावकर व पथकातील अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, अर्जुन यादव,राहुल शिंदे, अशफाक सय्यद, मनोज परजणे, अश्वीन सुरवसे, व नितीन वडमारे यांनी केली आहे.




