Home Blog Page 90

आरोपी कृष्णा आंधळेला घेऊन येतो असं सांगत आ.सुरेश धस,खा. बजरंग सोनवणेंना गंडवले!

0

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. नेमका याचाच फायदा घेत एकाने खा. बजरंग सोनवणे यांना फसवले. त्यानंतर याच व्यक्तीने भाजप आमदार सुरेश धस यांनाही गंडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आ.सुरेश धस यांनीच हा प्रकार अन्नत्याग करणाऱ्या मस्साजोगकरांसमोर माध्यमांना दिली होती. एकाने कृष्णा आंधळे हा माझ्यासोबत आहे, त्याला कारने घेऊन येण्यासाठी मला पाच हजार रुपये पाठवा, असा फोन धस यांना केला होता. कृष्णा आंधळे हा सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील महत्वाचा धागा असल्याने धस यांनी कुठलीही शहानिशा न करता संबंधित व्यक्तीला पाच हजार रुपये पाठवले. तसेच नगरमधील एका हाॅटेलमध्ये या फोन करणाऱ्या व्यक्ती आणि आरोपी कृष्णा आंधळे यांची वाट पहात साडेचार तास थांबले होते.
शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरेश धस नगरमधून निघून गेले होते, असे धस यांनी सांगितले. विशेष म्हणजे याच व्यक्तीने खासदार बजरंग सोनवणे यांनाही फोन करून आरोपी कृष्णा आंधळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, त्याला घेऊन येण्यासाठी आॅनलाईन पैसे टाका असे सांगितले.खा. सोनवणे यांनीही संबंधित व्यक्तीला पैसे पाठवले होते. पण नंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्याही लक्षात आले होते. बापूराव बारगजे असे गंडवणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याचे धस यांनी सांगितले.या व्यक्तीची माहिती आपण आष्टी आणि बीडच्या पोलीस अधिक्षकांना दिली होती. दोन-पाच रुपयासाठी अशी फसवणूक करणाऱ्या औलादीही असतात, असा संताप धस यांनी व्यक्त केला आहे.

दरोडेखोरांचा जामखेडमध्ये धुमाकूळ ; 3 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज लंपास

0

जामखेड — शहरापासून दोन किमी अंतरावरील साकत फाट्याजवळील एका घरावर एका महिलेसह सात ते आठ दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून घरातील 8 तोळे सोने व 71 हजार रुपयांचे रोख असे एकूण 3 लाख 22 हजार 750 रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे या दरोड्यात एका महिलेचा समावेश असून घटनास्थळी पोलिसअधीक्षक राकेश ओला यांनी भेट दिली आहे. दरोड्याच्या घटनेने जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली अशी की, जामखेड शहरापासून दोन किमी अंतरावरील बीड रोड येथील साकत फाट्याजवळ फिर्यादी महिला प्रतिक्षा शंकर रोकडे (वय 19) राहते. बुधवार दि 26 रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी एका महिला दरोडेखोरासह सात ते आठ दरोडेखोर आले. यावेळी सोबत असलेल्या आरोपी महिलेने फिर्यादी यांचे दार वाजवत आवाज दिला की ‘ताई दार उघड’ त्यामुळे फिर्यादी महिलेस आपलेच कोणी आले असल्याचे वाटल्याने त्यांनी दार उघडले.

घराचे दार उघडताच घरामध्ये स्कार्फ बांधलेल्या महिलेसह चोरटे आत शिरले. यानंतर चोरट्यांनी किचनमधील सामानाची उचकापाचक केली. तसेच चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून सोने व रोख रक्कम लुटली . यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा वरच्या मजल्यावर रहात असलेल्या गायत्री किसन जाडकर यांच्या घराकडे वळवला. यावेळी घराला कुलुप असल्याने चोरट्यांनी दार तोडुन घरातील रोख रक्कम व सोने चोरुन नेले. अशा प्रकारे दोन्ही घरातील एकुण 2 लाख 51 हजार रुपयांचे आठ तोळे सोन्याचे दागिने व 71 हजार 750 रु रोख असा एकुण 3 लाख 22 हजार 750 रुपयांचा ऐवज लंपास केला.

या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. दरोडा पडला असल्याची माहिती फिर्यादी यांनी फोनवरून जामखेड पोलीसांना दिली यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी आले. मात्र तोपर्यंत दरोडेखोर पळुन गेले. घटनास्थळी सकाळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, जामखेड पोलीस स्टेशनचे सपोनि सोनवलकर, सपोनि वर्षा जाधव मॅडम व जामखेड व अहील्यानगर चे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने भेट दिली.

या प्रकरणी एका महिलेस एकुण सात ते आठ दरोडेखोरांवर जामखेड पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वर्षा जाधव या करत आहेत.

स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर अत्याचार; वैद्यकीय अहवाल आला समोर

0

पुणे — स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बस मध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

या प्रकरणातील मेडिकल रिपोर्टमध्ये पीडित तरुणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं मेडिकल रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. माहितीनुसार, संध्याकाळी ससुन रुग्णालयाने हा वैद्यकीय अहवाल पोलिसांना दिला आहे. या अहवालात आरोपीने पिडितेवर एकदा नाही तर दोनवेळा लैंगिक अत्याचार केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या आरोपी दत्तात्रय गाडे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.तर दुसरीकडे या प्रकरणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी कारवाई करत स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षा रक्षकांचे तत्काळ निलंबन करून तसेच डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करुन एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. 23 सुरक्षा रक्षकांचे तत्काळ निलंबन करून उद्यापासून त्यांच्या जागी स्वारगेट डेपोमध्ये नवीन सुरक्षारक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.
असं आहे संपूर्ण प्रकरण!

पहाटे 5.30 च्या सुमारास पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे अत्याचाराची घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटण्याच्या दिशेने जात होती. बससाठी ती स्वारगेट बस स्थानकावर थांबली असता आरोपी दत्तात्रय गाडे तिकडे आला आणि पीडित तरुणीला स्वारगेट आगारात मधोमध उभी असलेली बस फलटणला जाणार आहे असं सांगितलं. उभी असणारी बस सोलापुरला जाणार आहे आणि मधे बस फलटणला थांबणार आहे. असं त्याने पिडितेला सांगितले.यावेळी तो पीडित तरुणीला ताई- ताई म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बस जवळ आली मात्र बस बंद असल्याने तू टॉर्च लावून आतमध्ये जा. हीच बस काही वेळात फलटणला निघेल असं आरोपीने तरुणीला सांगितलं. त्यानंतर तरुणी बसमध्ये चढली आणि तिच्या पाठीमागे बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे देखील चढला आणि बस बंद केली. त्यानंतर तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आणि तिकडून पळ काढला. तरुणी घाबरल्याने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगितलं नाही. त्यानंतर फलटणला जाण्यासाठी तरुणी दुसऱ्या बसमध्ये बसली आणि तिने हा संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला.

संतोष देशमुख हत्या प्रकरण: मसाजोग ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन मागे

0

केज — सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी मागण्या मान्य कराव्या यासाठी मंगळवार पासून देशमुख कुटुंबीयांसह मसाजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत होते. दरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिलेले लेखी आश्वासनानंतर बुधवारी सायंकाळी सहा वाजता अन्न त्याग आंदोलन मागे घेण्यात आले आहे.मात्र, लेखी आश्वासन दिलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी ग्रामस्थांनी दहा दिवसांची मुदत दिली आहे.

खा.बजरंग सोनवणे, आ.सुरेश धस आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या आंदोलकांनी हस्ते शरबत घेऊन आंदोलन मागे घेतले. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या केल्याप्रकरणी
मसाजोग ग्रामस्थांनी प्रशासनाकडे 9 मागण्याचे निवेदन सादर केले होते. व मंगळवारी सकाळी 10 देशमुख कुटुंबीय व गावाकऱ्यांनी सामूहिक अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. दरम्यान, याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन बुधवारी अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली.दरम्यान, खा बजरंग सोनवणे यांनी आंदोलन स्थळाहून पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना कॉल करुन आंदोलनाचे गांभीर्य सांगितले. 9 पैकी पोलीस अधीक्षक यांच्या कक्षेत येणाऱ्या 4 मागण्या या मस्साजोग ग्रामस्थांचे सविस्तर निवेदन मिळाल्यानंतर 8 दिवसात मंजूर करण्यात येतील, असे लेखी आश्वासनाचे पत्र अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्फत पोलिसअधिक्षकांनी दिले. खा बजरंग सोनवणे आणि आ सुरेश धस हे ही मस्साजोग मध्ये दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आ. धस, खा. सोनवणे या तिघांनीही आंदोलक ग्रामस्थांसोबत चर्चा केली. पोलीस अधीक्षक यांचे आश्वासनाचे पत्र वाचून दाखविल्या. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दहा दिवसाची मुदत देत खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या हस्ते शरबत देऊन अन्नत्याग आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी ॲड. उज्जवल निकम यांची नियुक्ती

0

बीड — मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारच्या विधी व न्याय विभागाकडून या संदर्भातील अधिसूचना निघाल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी माध्यमांना दिली.

या अधिसूचनेनुसार ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मागील महिना ते दीड महिन्यांपासून या प्रकरणात ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी पुढे येत होती. याच प्रमुख एका मागणीसाठी मंगळवारपासून मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले असून, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच ॲड. निकम यांच्या नियुक्तीच्या संदर्भाने अधिसूचना निघाली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: मसाजोग ग्रामस्थांचे अन्न त्याग आंदोलन सुरू

0

बीड — आज धनंजय देशमुख आणि मस्साजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत आहेत. सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाद्वारे हत्येतील सर्व आरोपींना अटक करण्याची आणि कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्येला 77 दिवस उलटून गेले आहेत, आणि या प्रकरणात कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे.

धनंजय देशमुख म्हणाले की, केज पोलिसांच्या तपासात सुरुवातीला असमाधानकारक निष्कर्ष आले होते. त्यांनंतर पोलीस अधीक्षकांसोबत झालेल्या चर्चेत तपासाची असमाधानकारक कार्यशैली उघड झाली, तसेच पोलिसांनी आरोपींना अभय दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

या हत्येच्या पहिल्या दिवशीच ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर वाल्मीक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली, जी धनंजय देशमुख यांच्या आंदोलनामुळे पूर्ण झाली. आता तिसऱ्यांदा ग्रामस्थ आणि धनंजय देशमुख अन्नत्याग आंदोलन करीत आहेत, आणि न्याय मिळवण्यासाठी त्यांनी एल्गार पुकारला आहे.

धनंजय देशमुख यांचे प्रमुख मागणी आहे की, कृष्णा आंधळे याला अटक करून त्याच्या समर्थकांवर कारवाई केली जावी, कारण ते प्राणघातक हल्ले करत आहेत. कृष्णाचे समर्थक अजूनही त्याचे स्टेटस ठेवतात, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. याशिवाय, सरकारकडून सरकारी वकिलांची नियुक्ती करून या प्रकरणाला फास्ट ट्रॅक न्यायालयात न्याय मिळवावा अशी मागणी धनंजय देशमुख आणि मसाजोग ग्रामस्थ यांच्याकडून केली जात आहे.

पीआय गोसावी दरोडेखोरावर सवाई; थरारक कारवाईत दरोडेखोर पकडले

0

नेकनूर — सोलापूर मधील मोहोळ तालुक्यात दरोडे वाट मारी लूटमार करणारे दरोडेखोर बीड जिल्ह्यात असल्याची माहिती सोलापूरच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. दरोडेखोरांच्या मागावर असलेल्या सोलापूर पोलिसांचे पथक केज मध्ये आले. दरम्यान दरोडेखोर नेकनूरच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच नेकनूर पोलिसांशी संपर्क साधला. एपीआय चंद्रकांत गोसावी यांनी तात्काळ नेकनूर चौकात नाकाबंदी केली. पळून जात असलेल्या दोन दरोडेखोरांना थरारक पद्धतीने जेरबंद करण्यात यश मिळवले.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात दरोडे टाकणारे दरोडेखोर बीडच्या दिशेने एमएच २२ ए ३४ ४६ या गाडीने सोलापूर पोलिसांना हुलकावणी देत निघाले होते. दरोडेखोरांच्या पाठलागावर सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस होतेच. केज मधून हुलकावणी देऊन नेकनूर कडे दरोडेखोर निघालेले असताना सोलापूर पोलिसांनी नेकनूर पोलिसांचे संपर्क साधला. ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावी यांनी तात्काळ नेकनूरच्या नुराणी चौकात नाकाबंदी केली. दरोडेखोरांना पळून जाताना अडथळा निर्माण व्हावा अशा पद्धतीने तीनही रस्त्यांना वाहने आडवी लावली. दरोडेखोर भरधाव वेगात आल्यानंतर अडथळ्यातून मार्ग काढत असताना दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांच्या मुस्क्या आवळल्या. दरम्यान ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी पोलीस नाईक सचिन वंजारे पोलीस अंमलदार बाळासाहेब ढाकणे सय्यद अब्दुल्ला सहाय्यक उपनिरीक्षक रेखा मॅडम पोका आशा चौरे होमगार्ड मुतजीब आतार यांनी पार पाडली. पकडलेल्या दरोडेखोरांना सोलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

कांदा पिकात अफूची लागवड; साडेचार किलो अफू जप्त

0

केज — एका शेतकऱ्याने कांद्याच्या पिकात अफूची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर केलेल्या कारवाईत एक लाख 72 हजार रुपयाची साडेचार किलो अफू जप्त करण्यात आली. ही घटना कळंबआंबा येथे उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती अशी की कळंब अंबा येथील शेतकरी उत्तम रंगनाथ मस्के या शेतकऱ्याने शेतात कांद्याची लागवड केलेली आहे. याच कांदा पिकात अफू पिकाची देखील लागवड केली. या संदर्भात युसुफ वडगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाली या माहिती आधारे पोलिसांनी सोमवारी उत्तम मस्के यांच्या शेतात धाड टाकली. असता अफूची झाड मिळून आली. या कारवाईत पोलिसांनी साडेचार किलो अफु जप्त केला. या अफुची किंमत 1 लाख 72 हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी उत्तम मस्के यास पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई नायब तहसीलदार आशा वाघ, पोलीस निरीक्षक शेंडगे, सय्यद अमजद, शिनगारे, घोरपडे, महादेव, राऊत, डोंगरे, चालक गायकवाड यांनी केली आहे.

गुत्तेदार करतोय पुलाचे काम लावून थुंका; शाखा अभियंता ठाकूरच्या मदतीने जनतेला फासतोय बूक्का

0

चौसाळा — चौसाळा नांदूर रोडवर ज्योतिबा नाल्यावरील पुलाच्या डागडुजीचे काम थातुरमातुर करत शासनाच्या तिजोरीला लुटल्याचा चंग गुत्तेदाराने बांधला आहे. पूल खचलेला असला तरी वरच्यावरीच कठडे बांधून रंगरूप आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चौसाळा नांदूर रस्त्यावरील पुलांची डागडुजी करण्यात येत आहे. कोष्टी नाल्यावरील पुलाच्या सिमेंट नळ्या सध्याच्या स्थितीत वाहून गेलेल्या आहेत. हा पूल खचून भगदाड पडली आहेत. या भगदाडामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले असले तरी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे सोयर सुतक नाही. तीच स्थिती जोतिबा नाल्यावरील पुलाची आहे. पूल खचून कठडे कोसळलेले आहेत. दरम्यान या पुलाच्या डागडुजी चे काम सध्या हाती घेतलेले आहे. मात्र हे काम ज्या गुत्तेदाराला दिले आहे. तो गुत्तेदार नुसता थूंक्याला थूंका लावण्याचे काम करत असल्याचं सध्या तरी दिसत आहे. जुने कठडे अर्धा फूट उकरून त्यावरच सेंट्रींग ठोकून थातूरमातूर काम सुरू केलं आहे. ज्या पूलाचा पायाच खचला आहे. त्याला वरच्या बाजूला डागडुजी करून उपयोग काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला बुद्धिवंत अभियंते मिळालेले असल्यामुळे जनतेला मुर्खात काढून शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकायचा आहे की काय असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे. विशेष म्हणजे पुलाचे कठडे अर्धा फूट उकरल्यानंतर त्याखाली काळी मातीच असल्याचं स्पष्ट दिसत आहे. या पुलाचे काम अशा पद्धतीने थातूरमातूरच करायचय तर काळे कागद करून बिल उचलली तरी काय हरकत आहे.असं काम करण्यापेक्षा न केलेलं बरं असं आता जनतेत बोललं जाऊ लागला आहे.
यासंदर्भात शाखा अभियंता संजय ठाकूर यांना संपर्क साधून प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला मात्र ठाकुरी थाटात असलेल्या या अभियंत्याला फोन उचलण्याची तसदी घ्यावी वाटली नाही. कार्यकारी अभियंता तोंडे असे गुत्तेदार हाताशी धरून लोकांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. बोराडेंचा राडा जनतेच्या मुळावर उठणार आहे.
या पुलाचे काम दर्जेदार करण्यात यावं अशी मागणी होऊ लागली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण: ग्रामस्थ मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलन करणार

0

केज — सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी प्रशासनाकडून आपल्याला न्याय मिळत नसल्याने न्याय मिळेपर्यंत देशमुख कुटुंब,महिला व ग्रामस्थांसह मंगळवारी सकाळी 10 वाजल्या पासून महादेव मंदिरासमोर सामूहिक अन्नत्याग आंदोलन सुरु होणार असल्याची घोषणा सोमवारी रात्री 9 वाजता झालेल्या बैठकीत सर्व एकमताने करण्यात आली.

मस्साजोग ग्रामस्थांनी 25 फेब्रुवारी पासून सामूहिक अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांना यापूर्वीच दिले होते. मात्र सोमवारी रात्री 9 पर्यंत प्रशासनाकडून गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत त्यामुळे सामूहिक अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय गावाकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान अन्नत्याग आंदोलन स्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी दिली.