Home Blog Page 23

पाटोदा न.पं.सदस्य अपात्रता प्रकरणात निकालासाठी जिल्हाधिकाऱ्यांना ४ आठवड्यांची मुदत

0

 औरंगाबाद खंडपीठाचे आदेश 

 पाटोदा  — बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाटोदा नगर पंचायत सदस्य अपात्रता प्रकरणाचा निकाल पुढील चार आठवड्यांत जाहीर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. शिवभूषण लक्ष्मणराव जाधव आणि शेख मोबीन शेख हमीद यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले.
ॲड. नरसिंह जाधव यांच्यामार्फत याचिकाकर्ते शिवभूषण लक्ष्मणराव जाधव, शेख मोबीन शेख हमीद यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे (प्रतिवादी क्र. २) दाखल केलेल्या अपात्रता अर्ज क्रमांक १६७/२०२४ आणि अपात्रता अर्ज क्रमांक १६८/२०२४ वर तातडीने निकाल देण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. हा निकाल लवकरात लवकर, शक्यतो दोन आठवड्यांच्या आत लागावा अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली होती.
या प्रकरणावर न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती अजित बी. कडेठाणकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी सूचनांनुसार माहिती दिली की, सदर अर्जावरील निकाल पुढील चार आठवड्यांत घोषित केला जाईल.
न्यायालयाने हे विधान हमीपत्र म्हणून स्वीकारले आणि जिल्हाधिकाऱ्यांना चार आठवड्यांच्या आत निकाल देण्याचे निर्देश देऊन ही रिट याचिका निकाली काढली.
या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. नरसिंह जाधव यांनी काम पाहिले, तर शासनाच्या वतीने एजीपी मिस नेहा बी. कांबळे यांनी बाजू मांडली.

 राजकीय दबाव ; उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित

पाटोदा नगर पंचायतचे दोन सदस्य (१. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बीड- सय्यद अब्दुल्ला २. माजी नगराध्यक्ष पाटोदा- बळी पोटे) या दोघांचे नगरसेवक अपात्रता प्रकरण बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्या दोन वर्षांपासून निकालासाठी प्रलंबित असून या प्रकरणात याचिकाकर्ते हे यापूर्वी देखील उच्च न्यायालयात गेले होते. कुठलाही निकाल राखीव ठेवण्यात आला तर निर्णय जाहीर लवकरात लवकर करणे अपेक्षित असते नसता सदरील निर्णयावर शंका निर्माण होऊ शकते,असे मा सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे असे असतानाही केवळ राजकीय दबाव असल्याने हे प्रकरण निकालासाठी लाल फीतीत अडकवून ठेवण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याचे दिसून येत आहेअसी चर्चा नागरिक करत आहेत
दरम्यान जिल्हा प्रशासन राजकीय दबावाखाली अपात्रतेचे प्रकरणे २ वर्ष लावत असेल व हलगर्जीपणा करत असेल तर सर्व सामान्य जनतेला जिल्हा प्रशासनाकडून काय न्याय मिळणार आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

MPSC मार्फत 1700 तलाठी पदांची भरती ; खासगी कंपन्यांना रामराम

0

मुंबई — राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महसूल विभागातील तलाठी पदांची भरती आता पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून ही भरती प्रक्रिया आता थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राबवली जाणार आहे.

 गैरप्रकारांना आळा बसणार

यापूर्वी तलाठी परीक्षा खासगी कंपन्यांकडून घेतली जात होती. त्यामुळे परीक्षेत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. अनेक वर्षांपासून ही परीक्षा एमपीएससीमार्फत घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून आणि विविध संघटनांकडून केली जात होती. अखेर शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेतला आहे.

 १७०० पदांची मोठी भरती

राज्यातील सुमारे १७०० तलाठी पदांची भरती एमपीएससीमार्फत होणार असून यासाठी सर्व विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय रिक्त पदांचा तपशील मागवण्यात आला आहे. प्रत्येक विभागाने ८ मे २०२६ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 आरक्षण व आकृतीबंध तपासणी

ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार आहेत ‌बिंदू नामावली (Reservation Roster) मागासवर्गीय कक्षाकडून तपासली जाणार आहेत पेसा (PESA) व बिगर पेसा क्षेत्रांसाठी स्वतंत्र मागणीपत्र तयार करण्यात येणार आहे

 लवकरच जाहिरात

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर झाल्यानंतर महसूल विभागाकडून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारीला वेग देणे आवश्यक आहे.

बीड : राष्ट्रीय महामार्गावरील “भेगा” मिटेना अन् प्रशासनाची “टीर ” बडवण्याची हौस फिटेना

0

बीड — जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाला जागोजागी मोठ्या भेगा पडलेल्या असुन या भेगांमध्ये दुचाकी वाहने अडकुन झालेल्या अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असुन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडून दर्जेदार दुरूस्तीसाठी वांरवार निवेदने,आंदोलनाद्वारे पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएससीआरडी आणि जिल्हा प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसतानाच बीड जिल्हा प्रशासन मात्र जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या नावाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्युंच्या प्रमाणात ३३ टक्क्यांची लक्षणीय घट झाली असुन या प्रभावी कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात बीड जिल्हा रस्ते सुरक्षेच्या बाबतीत दुसरा क्रमांक पटकावला असल्याची माहिती देत स्वत:ची टीर बडवुन घेताना दिसत असल्याची संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबाणेशकर यांनी दिली आहे.


बीड जिल्ह्यातुन जाणारे खामगाव ते पंढरपूर, अहमदपूर ते अहिल्यानगर, पैठण ते पंढरपुर आदी राष्ट्रीय महामार्गांवर मोठमोठ्या भेगा पडलेल्या असुन भेगांमध्ये दुचाकीचे चाक अडकुन मागील ४ वर्षात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी बाभळी आल्याने वाहनधारकांना अडथळा येत आहे तर काही ठिकाणी दुभाजकाच्या आजुबाजुला मोठ्या प्रमाणात माती साचल्याने वाहने घसरून पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते यांनी लेखी तक्रारी केल्यानंतर दर्जेदार सिमेंट ब्लॉक कट करून दुरुस्ती करण्याऐवजी डांबरीकरण करून रस्त्याच्य भेगा थातुरमातुर बुजवण्यात येत असुन जिल्हा प्रशासनाचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे बोलले जाते.

रस्ते सुरक्षा समितीच्या अध्यक्ष आणि सचिवांच्या आदेशाला कंत्राटदारांकडून केराची टोपली

रस्ते सुरक्षासारख्या गंभीर विषयावर आयोजित केलेल्या बैठकीला व्हिडिओ कान्फरन्सद्वारे उपस्थित न राहिलेल्या सदस्यांबाबत जिल्हाधिका-यांनी तिव्र नाराजी व्यक्त करून कामात हलगर्जीपणा करणा-या संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असली तर रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या आदेशाला कंत्राटदारांकडून सुद्धा केराची टोपली दाखवली जाते. बीड तालुक्यातील अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी मार्गावर लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयासमोरील अपघात प्रवणक्षेत्राची दि.२६ जुन २०२५ रोजी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि रस्ता सुरक्षा समितीचे सचिव कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रविंद्र तोंडे यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली होती.या अनुषंगाने दि.६ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने गतिरोधक बसविण्याबाबत लेखी आदेश काढले होते. ६ महिने उलटुनही अद्याप गतिरोधक बसविण्यात आले नसुन कंत्राटदाराने या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे त्यामुळे एकंदरीतच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि कंत्राटदार दोघांवरही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई; गेवराईच्या१५ वाळू माफियांवर गुन्हा दाखल

0

वडीगोद्री/अंबड (जालना) अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून ‘केणी’ आणि दोरखंडांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्या गेवराई तालुक्यातील १५ प्रमुख वाळू माफियांवर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रशासकीय तपासात असे उघड झाले की, नदीपात्रात पाणी असल्याचा फायदा घेत बीड जिल्ह्याच्या हद्दीतून लांब अंतरावर दोरखंड टाकून अंबडच्या हद्दीतील वाळू ओढून नेली जात होती. महसूल पथक नदीत पोहोचू शकणार नाही, या अंदाजावर तस्करांकडून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी सुरू होती.


१८ ते २२ एप्रिल दरम्यान प्रशासनाने वारंवार धाडी टाकून केण्यांचे दोरखंड कापून नष्ट केले होते. मात्र, तरीही तस्करांनी जेसीबी, पोकलेन आणि हायवा यंत्रसामग्रीच्या मदतीने शासकीय मालमत्तेची लूट सुरूच ठेवली. त्यामुळे प्रशासनाने अखेर कठोर पावले उचलत गुन्हे दाखल केले.
तहसीलदार विजय चव्हाण यांच्या सूचनेनुसार तलाठी पथकाने गोपनीय माहिती गोळा करून आरोपींची ओळख पटवली.

गुन्हा दाखल आरोपी (मुख्य)

माळस पिंपळगाव (ता. गेवराई)  हरी रघुनाथ सुखदेव, अंकुश पवार, वैभव डाके, शिवाजी पंडित डाके, रमेश सुखदेव, राजेंद्र बाबुराव डाके, किरण डाके, अशोक सुखदेव, रवी टेकाळे, पवन पठाडे, अजय पठाडे, प्रवीण राऊत
सावळेश्वर (ता. गेवराई), बंटी उदे, मुकेश कुटे
भांबेरी (ता. अंबड): शाहरुख अनवर शेख
तसेच राक्षसभुवन व सुरळेगाव येथील इतर साथीदारांचा समावेश
ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ आणि उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 प्रशासनाचा इशारा

“पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासकीय मालमत्तेची संघटित चोरी करणाऱ्यांना कोणताही थारा दिला जाणार नाही. गुन्हे दाखल केल्यानंतरही तस्करी सुरू राहिली, तर आणखी कठोर कारवाई केली जाईल. आमची पथके २४ तास पाळत ठेवून आहेत,” असा इशारा तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिला आहे.

पळवून नेलेल्या दोन अल्पवयीन चुलत बहिणींची सुखरूप सुटका; आरोपी उत्तर प्रदेशातून अटक

0

बीड — जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथून दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींना 5 एप्रिल 2026 रोजी पळवून नेल्याची घटना घडली होती. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली होती. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात कलम 137(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या गंभीर प्रकरणाचा तपास करताना आरोपी विजय महादेव कव्हळे (रा. पळशी, ता. मुदखेड, जि. नांदेड) ह.मू. उमापूर ता. गेवराई याने मुलींना अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचे समोर आले. पोलिसांसमोर आरोपीसह मुलींचा शोध घेणे हे मोठे आव्हान होते.

 तांत्रिक तपासाने दिला मोठा धागा

तपासादरम्यान आरोपी पूर्वी भिवंडी (जि. ठाणे) येथे काम करत असल्याची माहिती मिळाली. परंतु तेथे शोध घेतला असता आरोपी व मुली सापडल्या नाहीत. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे मुली बिहार-उत्तर प्रदेश सीमाभागात असल्याचे स्पष्ट झाले.

 उत्तर प्रदेशात धाडसी कारवाई

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार चकलांबा पोलिसांचे विशेष पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. बलीया जिल्ह्यातील शिवपुर दियार येथे शोध घेतल्यानंतर आरोपी सिकंदरपुर येथे असल्याची माहिती मिळाली. दरम्यान स्थानिक पोलिसांच्या मदतीने केलेल्या संयुक्त कारवाईत
आरोपी विजय कव्हळे याला अटक करण्यात आली. यावेळी दोन्ही अल्पवयीन मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली.
महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी मुलींना पुढील काही दिवसांत छत्तीसगड येथे घेऊन जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी मोठी कारवाई करत हा कट उधळून लावला.

४ दिवसांच्या सलग प्रवासानंतर यश

चकलांबा पोलिसांच्या पथकाने सलग चार दिवस प्रवास करून ही मोहीम यशस्वी केली. दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,
अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर
उपविभागीय पोलीस अधिकारी‌अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, कल्याण पवार, हनुमान इंगोले आणि टेक्निकल अॅनालिसिस सेलचे शेखर औटे व विकी सुरवसे यांनी ही कारवाई पार पाडली.

नसरापूर प्रकरण: बलात्कार आरोपींना आता पॅरोल नाही!

0

मुंबई — पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्यंत संतापजनक अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्यावर यापूर्वीही दोन लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल होते. तरीही तो पॅरोलवर बाहेर आल्यानेच त्याला पुन्हा गुन्हा करण्याचे धाडस मिळाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना यापुढे पॅरोल न देण्याचा कायदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 कायद्यात मोठा बदल होणार

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, अशा प्रकरणांतील 80 ते 90 टक्के आरोपी पॅरोलवर सुटल्यावर पुन्हा त्याच प्रकारचे गुन्हे करतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

2014 ते 2019 या काळातही अशा प्रकारचा कायदा लागू करण्यात आला होता, मात्र नंतर न्यायालयाने तो रद्द केला. आता पुन्हा कठोर कायदा आणण्यासाठी विधी व न्याय विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

 खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री भेट

नसरापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘सह्याद्री’ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवणार आहेत .आरोपीला कठोर शिक्षा मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल महिला सुरक्षेसाठी आणखी कठोर कायद्यांची गरज आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात प्रस्तावित शक्ती कायदा पुन्हा लागू करण्याची मागणीही केली.

नसरापूर अत्याचार प्रकरणी बीडमध्ये निदर्शने

0

बीड — पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे घडलेली अल्पवयीन मुलीवरील अत्यंत निंदनीय आणि संतापजनक लैंगिक अत्याचाराची घटना संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी आहे. अशा विकृत मानसिकतेच्या नराधमांना समाजात मुळीच स्थान नाही.

या घटनेच्या निषेधार्थ आज बीड शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने एकत्र येऊन काढलेला मोर्चा हा केवळ निषेध नसून, न्यायासाठीचा ठाम आवाज आहे. हा जनआक्रोश शासनापर्यंत पोहोचला पाहिजे आणि यावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे.

अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर फक्त निषेध पुरेसा नाही, तर आरोपीला जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी जनतेची ठाम मागणी आहे.

आज वेळ आली आहे ती केवळ बोलण्याची नाही, तर ठोस कृतीची. समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येत अशा गुन्ह्यांविरोधात एकजुटीने लढा दिला पाहिजे.

अतिक्रमण धारकांना तात्काळ पीटीआर वाटप करून घरकुल योजनेचा लाभ द्या – आ.विजयसिंह पंडित

0

अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत पीटीआर प्रश्नावर बैठक

बीड — गेवराई शहरातील संजयनगर, इस्लामपूरा, साठेनगर, संतोष नगर, संघमित्रनगर, भिमनगर, कोरबू गल्ली, चिंतेश्वर गल्ली, अचानकनगर आदी भागांतील अतिक्रमण धारकांना विनाविलंब पीटीआर वाटप करून घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी दि.१५ मे पूर्वी अतिक्रमण धारकांना हक्काचे पीटीआर वाटप करा असे निर्देश आ. विजयसिंह पंडित यांनी दिले. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी पीटीआर वाटपास झालेल्या विलंबाबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली. निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचे महायुती सरकारचे धोरण असताना प्रशासन याकामी विलंब का करत आहे ? असा सवालही आ. विजयसिंह पंडित यांनी उपस्थित केला. शासनाच्या नवीन धोरणानुसार पात्र होणाऱ्या अतिक्रमण धारकांनी पुराव्यासह नव्याने अर्ज करण्याचे आवाहन यानिमित्ताने आ. विजयसिंह पंडित यांनी केले आहे.

गेवराई नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करून त्यांना हक्काचा पीटीआर वाटप करण्याचा शुभारंभ राज्याचे तत्कालीन लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्याहस्ते गेवराई येथे करण्यात आला होता. नगर परिषद निवडणुकीपूर्वी अतिशय वेगाने सुरु असलेले हे काम निवडणुकीनंतर थांबल्यामुळे अतिक्रमण धारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. या बाबत आ. विजयसिंह पंडित यांनी मंगळवार, दि.५ मे रोजी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला माजी आमदार अमरसिंह पंडित, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, नायब तहसिलदार संजय सोनावणे, नगररचनाकार आकाश राठोड, भुमिअभिलेखचे उपअधिक्षक जाधव, नगर परिषदेचे अभियंता रामेश्वर कर्डिले, प्रदिप पुरी, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, नगर परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते शेख खाजा, नगरसेवक दादासाहेब गिरी, झोपडपट्टी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष कडूदास कांबळे, श्रीकृष्ण मुळे, सतिष प्रधान, सदाफुले पाटील, जफर पटेल, प्रकाश गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गेवराई नगर पालिका हद्दीतील संजयनगरसह इतर भागातील अतिक्रमण धारकांच्या हक्काच्या पीटीआरचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. विधानसभा निवडणुकीनंतर आ. विजयसिंह पंडित यांनी याप्रश्नी लक्ष घालून संबंधितांना हक्काचा पीटीआर देण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यांच्या प्रयत्नामुळे २२२० भूखंड धारकांचे सर्व्हेक्षण पूर्ण करून त्यांना पात्र म्हणून समितीने घोषित केले. यापैकी अनेकांना भोगवटदार प्रमाणपत्रासह पीटीआरचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूलाचा लाभ संबंधितांना मिळावा यासाठी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ. पंडित यांनी प्रयत्न केले. नगर परिषद निवडणुकीची आचार संहिता लागल्यामुळे याविषयीची पुढील कार्यवाही स्थगित झाली. निवडणुकीनंतर ही सर्व प्रक्रिया स्थगित झाली. अतिक्रमण धारक वारंवार या बाबत पाठपुरावा करत असल्यामुळे संबंधितांच्या मागणीवरून आ. विजयसिंह पंडित यांनी मंगळवार, दि. ५ मे रोजी या बाबतची बैठक घेऊन पुन्हा या प्रक्रियेला गती दिली आहे. दि. १५ मे रोजी गेवराई येथे राजस्व अभियान राबविण्यात येणार असून तोपर्यंत सर्व अतिक्रमण धारकांना पीटीआरचे वाटप करावेत असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले.

राज्य शासनाने दि. २५ मार्च रोजी नवीन शासन निर्णय निर्गमित करून निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेतला. नवीन शासन निर्णयातील निकषाप्रमाणे जे अतिक्रमण धारक पात्र होणार आहेत त्यांनी पुराव्यासह नगर परिषदेकडे अर्ज करण्याचे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. या प्रक्रियेसाठी विशेष कॅम्प आयोजित करून सर्व अर्ज निकाली काढण्यात येतील असा विश्वास प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी या बैठकीत व्यक्त केला. अनेक अतिक्रमण धारकांनी आपली नावे वगळण्यात आली असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ज्यांची नावे यापूर्वीच्या पात्रता यादीत आहेत आणि आत्ता त्यांना पीटीआर नाकारला जात असेल तर सकारण लेखी उत्तर संबंधितांना द्यावे लागेल अशी सूचना आ. पंडित यांनी यावेळी केली. आ. विजयसिंह पंडित यांनी घेतलेल्या बैठकीमुळे गेवराई शहरातील अतिक्रमण धारकांना हक्काचा पीटीआर मिळण्याची स्थगित झालेली प्रक्रिया पुन्हा एकदा सुरु झाली असून अतिक्रमण धारकांना पीटीआर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हक्काच्या पीटीआर मुळे अतिक्रमण धारकांना घरकुला योजनेचा लाभ मिळणार आहे.

धारूरजवळ पोलिसांवर हल्ला;कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

0

बीड — जिल्ह्यातील धारूर शहराजवळील घाटपाटी परिसरात पोलिसांवर झालेल्या धक्कादायक हल्ल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना मद्यधुंद टोळक्याने पोलिसांवर थेट जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर हे आपल्या पथकासह नियमित गस्त घालत असताना अचानक काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले असून, घटनेमुळे पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, या हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींपैकी एक व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचा आरोप केला जात आहे. “आम्हाला कोणी काही करू शकत नाही,” अशी उघड दादागिरी करत आरोपींनी पोलिसांनाच लक्ष्य केल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून, तीन जण फरार आहेत. इतर संशयितांचा शोध सुरू आहे. धारूर पोलिस या घटनेचा अधिक तपास करत असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे.
दरम्यान, “पोलिसच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय?” असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

बीडमध्ये वाहन चोरी प्रकरण उघड; दोन आरोपी अटक, चोरीचा टेम्पो जप्त

0

बीड – पेठ बीड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चारचाकी वाहन चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
पेठ बीड येथील मोमीनपुरा परिसरातील रहिवासी अश्पाक अनिमोद्दीन जुलहा यांचा टेम्पो दि. १० एप्रिल २०२६ रोजी बार्शी रोड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याबाबत पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी लातूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व पथकाने लातूर येथे सापळा रचून तैबाज सलीम शेख (वय २५) आणि रेहान इलाही शेख (वय १९) या दोन आरोपींना ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीत आरोपींकडून चोरीस गेलेला टेम्पो जप्त करण्यात आला असून त्यांनी विवेकानंद पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नं. 207/2026 अंतर्गत पिकअप चोरी केल्याची कबुली दिली आहे.
दोन्ही आरोपींना मुद्देमालासह पेठ बीड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत श्रीराम खटावकर, मारुती कांबळे, बाळु सानप, सोमनाथ गायकवाड, युनुस बागवान, अश्पाक सय्यद, मनोज परजणे, आश्विन सुरवसे व चालक अतुल हराळे यांनी सहभाग घेतला.