Home Blog Page 22

अ’विनाशी’भूसंपादन घोटाळ्याचा “पा” ठका ला 7 दिवसाची पोलीस कोठडी

0

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन घोटाळ्यात माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक. २४१ कोटींच्या वाढीव मोबदला प्रकरणात न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

बीड — धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील वाढीव मोबदल्याच्या प्रकरणात तब्बल २४१ कोटी ६२ लाख रुपयांच्या कथित घोटाळ्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक याला बीड पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. जिल्हा न्यायाधीश एस. आर. शिंदे यांनी त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.


या प्रकरणात भूसंपादनासाठी देण्यात आलेल्या वाढीव मोबदल्यातील सुमारे ७२ कोटी रुपयांच्या अपहाराचा आरोप आहे. बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात या संदर्भात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान वाढीव मोबदल्याच्या आदेशांवरील स्वाक्षऱ्यांची पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी लातूर येथून अविनाश पाठकला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि नंतर त्याला अटक करण्यात आली.
दुपारी न्यायालयात हजर करताना पोलिसांनी आरोपीची दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. आरोपीचा लॅपटॉप जप्त करणे, आवाजाचे नमुने घेणे, कॉल रेकॉर्डिंगची तपासणी करणे तसेच लातूर, पुणे आणि मुंबई येथील घरांची झडती घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
तपासादरम्यान १५४ पैकी १४८ संचिका पोलिसांना मिळाल्या असून सहा संचिका अद्याप गायब असल्याचे समोर आले आहे. त्या शोधण्यासाठी अधिक तपासाची गरज असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध करत सर्व कागदपत्रे कार्यालयीन स्वरूपाची असल्याचा दावा केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर उशिराने अटक करण्यात आली असल्याने पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अ ‘विनाशी’ पा ‘ठका’ला सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
आरोपीच्या वतीने अॅड. के. पी. ठिगळे आणि अॅड. मिलिंद वाघिरकर यांनी बाजू मांडली, तर सरकारच्या वतीने अॅड. अजय सरवदे यांनी काम पाहिले.

केजमध्ये अवघ्या काही तासांत टेम्पो चोरीचा छडा; दोन सराईत आरोपी जेरबंद

0

बीड — जिल्ह्यातील केज येथे आयशर टेम्पो चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत छडा लावत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. चोरीस गेलेला टेम्पो धारूर येथील एमआयडीसी परिसरातून जप्त करण्यात आला असून आरोपींवर यापूर्वीही चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

फिर्यादी नसीर कुरेशी, रा. रोजा मोहल्ला, केज यांनी केज पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांचा मालकीचा आयशर टेम्पो क्रमांक एम एच -१५ – डी के ४२४१ हा ५ मे २०२६ रोजी रात्री घराच्या मागील मोकळ्या जागेत उभा केला होता. मात्र ६ मे रोजी सकाळी टेम्पो भाड्याने नेण्यासाठी गेले असता वाहन जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाला तपासाचे आदेश दिले.
तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये दोन संशयित व्यक्ती टेम्पो चोरी करताना स्पष्ट दिसून आले. पोलिसांनी माहिती संकलित करून संशयितांची ओळख उमेर ऊर्फ पाप्या मुस्ताक फारुकी, रा. रोजा मोहल्ला, केज आणि आवेश ऊर्फ आवड्या खाँजा शेख, रा. कोकीजपरी, केज अशी पटवली.
दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. आरोपींनी चोरी केलेला टेम्पो धारूर येथील एमआयडीसी परिसरात लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो जप्त करून आरोपींसह पुढील कारवाईसाठी केज पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर चोरी आणि जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, बप्पासाहेब घोडके, जफर पठाण, महेश जोगदंड, दिलीप गित्ते आणि गणेश मराडे यांच्या पथकाने केली.

‘ देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम विरोधात हरकती; धार्मिक व्यवस्थेला धक्का,आंदोलनाचा इशारा

0

“महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६” विरोधात बीडमध्ये तीव्र  हरकती घेण्यात आल्या आहेत. अधिनियमामुळे सामाजिक व धार्मिक व्यवस्थेला धक्का निर्माण झाला आहे. धार्मिक संस्था, पुजारी आणि भाविक आक्रमक झाले आहेत. देवस्थानांच्या जमिनींचे संरक्षण करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’ मागे घेण्याची मागणी

बीड — महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित “महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६” विरोधात राज्यभरातून नाराजी व्यक्त होत असताना बीडमध्येही धार्मिक संस्था, देवस्थान ट्रस्ट, पुजारी आणि भाविकांनी तीव्र हरकती नोंदवल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे आणि रामनाथ खोड यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी बीड आणि पोलिस अधीक्षक बीड यांना लेखी निवेदन देत या कायद्याबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. तसेच, लवकरच व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील अनेक प्राचीन मंदिरे, मठ, देवस्थाने, दर्गे आणि धार्मिक संस्थांचे दैनंदिन व्यवस्थापन हे देवस्थान इनाम जमिनींच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. अन्नदान, महाप्रसाद, यात्रोत्सव, वेदपठण, भजन-कीर्तन, वारकरी सेवा, धर्मशाळा व्यवस्था तसेच गरजू भक्तांना मदत यांसारखे धार्मिक आणि सामाजिक उपक्रम याच उत्पन्नातून चालविले जातात. त्यामुळे इनाम जमिनींचे निर्मूलन किंवा हस्तांतरण झाल्यास हे सर्व उपक्रम गंभीर संकटात सापडतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील अनेक देवस्थानांकडे उत्पन्नाचे अन्य कोणतेही स्थिर साधन नसल्याने मंदिरांची दुरुस्ती, पूजाअर्चा, वीज बिल, स्वच्छता आणि पुजारी मानधन यांसारखे खर्च भागविणे कठीण होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. “एकरावरील मंदिरे आता गुंठ्यावर आली आहेत,” अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा उल्लेख करत अनेक ऐतिहासिक देवस्थानांची जागा वर्षानुवर्षे कमी होत गेल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
देवस्थाने ही केवळ पूजा-अर्चेची केंद्रे नसून धर्मप्रसार, संस्कृती संवर्धन, समाजजागृती आणि सामाजिक एकात्मतेची केंद्रे आहेत. अशा संस्थांची आर्थिक पायाभूत व्यवस्था कमकुवत करणे हे सार्वजनिक हिताच्या विरोधात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
प्रस्तावित अधिनियमामुळे देवस्थानांच्या मालमत्तेवर अतिक्रमण, अनधिकृत हस्तांतरण आणि व्यापारीकरण वाढण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले. भविष्यात प्रभावशाली जमीनस्वार्थी घटकांच्या ताब्यात या जमिनी जाण्याचा धोका असून त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांपेक्षा आर्थिक आणि राजकीय प्रभाव असलेल्या घटकांना होऊ शकतो, अशी भीती डॉ. गणेश ढवळे आणि रामनाथ खोड यांनी व्यक्त केली.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, अनेक देवस्थानांच्या जमिनी या ऐतिहासिक दान, राजाश्रय किंवा धार्मिक उद्देशाने देण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांचे हस्तांतरण करणे हे मूळ दानाच्या उद्देशालाच विरोध करणारे ठरेल. राज्यातील लहान देवस्थानांची आर्थिक स्थिती आधीच कमकुवत असून इनाम जमिनी संपुष्टात आल्यास अनेक मंदिरे निष्क्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
भारतीय राज्यघटनेतील कलम २५ आणि २६ नुसार धार्मिक संस्थांना स्वतःचे धार्मिक व्यवहार आणि संपत्ती व्यवस्थापनाचे अधिकार संरक्षित आहेत. त्यामुळे प्रस्तावित अधिनियमामुळे घटनात्मक अधिकारांवर परिणाम होऊ शकतो, असा दावाही निवेदनातून करण्यात आला आहे.

प्रमुख मागण्या

🕳️ “महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६” तात्काळ मागे घ्यावा.
🕳️. देवस्थान इनाम जमिनींचे हस्तांतरण,                   निर्मूलन किंवा खासगीकरण करू नये.
🕳️.   देवस्थानांच्या उत्पन्न स्रोतांना स्वतंत्र                     कायदेशीर संरक्षण द्यावे.
🕳️.   राज्यातील सर्व देवस्थानांच्या जमिनींचे                संरक्षण आणि अतिक्रमण                              हटविण्यासाठी  विशेष मोहीम राबवावी.
🕳️.   अंतिम निर्णयापूर्वी देवस्थान ट्रस्ट, पुजारी,            भाविक आणि धार्मिक संस्थांची                         सार्वजनिक सुनावणी घ्यावी.

सोलापूरच्या निकिताची अनोखी कामगिरी! दहावीच्या प्रत्येक विषयात @ 35 गुण, सोशल मीडियावर चर्चा

0

महाराष्ट्र दहावी निकाल 2026 मध्ये सोलापूरच्या निकिता अमोल कुचेकर हिने प्रत्येक विषयात नेमके 35 गुण मिळवत अनोखी कामगिरी केली आहे. ‘Perfect 35’ निकालाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

सोलापूर — (Maharashtra) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये सोलापूर ( Solapur) जिल्ह्यातील ज.रा. चंडक प्रशाला, बाळे येथील विद्यार्थिनी निकिता अमोल कुचेकर हिने एक अनोखी नोंद करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
निकिताला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या सर्व विषयांमध्ये प्रत्येकी 35 गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक विषयात समान गुण मिळाल्याने तिचा निकाल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
दहावीच्या परीक्षेत सर्व विषयांत नेमके 35 गुण मिळणे ही अत्यंत दुर्मिळ बाब मानली जाते. त्यामुळे अनेक जण या निकालाला “Perfect 35” किंवा “काठावर पास” असे संबोधत आहेत. विद्यार्थिनीच्या या वेगळ्या निकालाचे शिक्षक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
(Bale ) बाळे परिसरात निकिताच्या निकालाची जोरदार चर्चा सुरू असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्या गुणपत्रिकेचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेकांनी हा निकाल “नशिबाचा योगायोग” तर काहींनी “परफेक्ट बॅलन्स” असे म्हणत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, यंदाच्या दहावी निकालात राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असताना सोलापूरच्या निकिताच्या ‘परफेक्ट 35’ निकालाने वेगळेच आकर्षण निर्माण केले आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी साई संस्थानकडून मोफत शिक्षणाची घोषणा

0

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शिर्डी साईबाबा संस्थानचा महत्त्वपूर्ण निर्णय. 10 वीमध्ये 80% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 11वी-12वीचे मोफत शिक्षण, निवास आणि CET फीची सुविधा मिळणार.

10 वीमध्ये 80% गुण मिळवा आणि 11वी-12वीचे शिक्षण मोफत; शिर्डी साई संस्थानचा मोठा निर्णय

शिर्डी —  साईबाबा संस्थान यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्यात वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून, मुलांचे शिक्षण अर्धवट राहण्याची समस्या गंभीर बनली आहे. हीच बाब लक्षात घेऊन संस्थानने पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
या विशेष योजनेअंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत निवास, शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, दहावी परीक्षेत 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 11 वी आणि 12 वीचे संपूर्ण शिक्षण मोफत दिले जाणार आहे.
इतकेच नव्हे, तर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाणारी CET परीक्षेची फी देखील संस्थानकडून भरली जाणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबण्याची शक्यता कमी होणार आहे.
भविष्यात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्यासाठी NEET आणि JEE सारख्या परीक्षांसाठीही मोफत मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी संस्थानने दर्शवली आहे.
गोरक्ष गाडीलकर यांनी या योजनेची माहिती देताना सांगितले की, “शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत थांबू नये, हा संस्थानचा मुख्य उद्देश आहे

महाराष्ट्र SSC निकाल 2026 उद्या जाहीर; दुपारी १ वा.ऑनलाइन पाहता येणार

0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा SSC Result 2026 उद्या ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव वापरून अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार असून डिजीलॉकरवर डिजिटल मार्कशीटही उपलब्ध होणार आहे.

मुंबई — महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळाने याबाबत अधिकृत घोषणा केली असून राज्यभरातील सुमारे १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्या स्पष्ट होणार आहे.
विद्यार्थ्यांना आपला निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर रोल नंबर आणि आईचे नाव टाकून पाहता येणार आहे. निकाल जाहीर होताच वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढण्याची शक्यता असल्याने सर्व्हर स्लो होऊ शकतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

SSC निकाल 2026 पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स

results.digilocker.gov.in
mahahsscboard.in
sscresult.mkcl.org
results.targetpublications.org
results.navneet.com

डिजीलॉकरवरही उपलब्ध होणार डिजिटल मार्कशीट

यंदा विद्यार्थ्यांना डिजीलॉकरवरून डिजिटल मार्कशीट डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकालाची अधिकृत डिजिटल प्रत सहज मिळणार आहे.

गुणपडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज

निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना गुणांबाबत शंका असेल, त्यांना गुणपडताळणी तसेच उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ही प्रक्रिया निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुरू होणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.

पुनर्परीक्षेची संधी

जे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी राज्य मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट महिन्यात पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

निकाल पाहिल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी किंवा PDF स्वरूपात सेव्ह करून ठेवावी. ही प्रत पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपयोगी ठरू शकते

उन्हाळ्याची सुट्टी मुळावर; 29 वर्षीय भाच्याचा अल्पवयीन मामे-बहिणीवर अत्याचार

0

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उन्हाळी सुट्टीसाठी मामाच्या गावाला आलेल्या 29 वर्षीय भाच्याने 10 वर्षांच्या मामेबहीणीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून युसुफ वडगाव पोलिसांनी पाॅक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

केज — सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असून सुट्टीसाठी मामाच्या गावाला आलेल्या 29 वर्षीय भाच्याने दहा वर्षाच्या आपल्याच चिमुकल्या मामी बहिणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ माजली आहे.

केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 29 वर्षीय नराधम भाच्याने आपल्या अवघ्या 10 वर्षांच्या लहान बहिणीवर (मामाच्या मुलीवर) अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या तीन दिवसांतील ही अत्याचाराची तिसरी घटना असल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

नेमकी घटना काय?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आपल्या मामाच्या गावी आला होता. ज्या घरात आश्रय घेतला, ज्या मामाने प्रेम दिले, त्याच घराचा विश्वासघात केला. घटनेच्या रात्री मामा आणि मामी शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. घरात दहा वर्षांची चिमुकली एकटीच असल्याचे पाहून आरोपीची वाईट नजर गेली. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने या चिमुकलीवर अत्याचार केला आणि मामा घरी परतण्यापूर्वीच तिथून पळ काढला.

आई-वडील घरी परतल्यानंतर पीडित मुलीने आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला. पोटच्या पोरीची अवस्था पाहून पालकांनी तातडीने युसूफ वडगाव पोलीस ठाणे गाठले. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पाॅक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने चक्रे फिरवून आरोपीचा माग काढला आणि त्याला ईटकूर येथून बेड्या ठोकल्या.

बीड, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा यलो अलर्ट

0

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा; बीड, सोलापूर, लातूरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी. उष्णतेच्या लाटेनंतर हवामानात मोठा बदल, IMD चा महत्त्वाचा अंदाज.

मुंबई — भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) राज्यातील अनेक भागांसाठी पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढलेला उकाडा, तीव्र उन्हाचा चटका आणि बदलते वातावरण यामुळे पूर्वमोसमी पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान कायम राहणार आहे.

दरम्यान, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी, प्रवासी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.

राज्यातील तापमान ४२ अंशांच्या पुढे

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील अनेक भागांत उष्णतेची लाट कायम होती. वर्धा, अमरावती, गडचिरोली, अकोला, वाशीम, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला. तर सोलापूर, परभणी आणि यवतमाळ येथे तापमान ४१ अंशांहून अधिक नोंदवले गेले.

दुसरीकडे, महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी १५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार शनिवारनंतर राज्यातील हवामान पुन्हा कोरडे होण्याची शक्यता आहे.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, उघड्यावर जाणे टाळावे तसेच हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बीड भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात

0

बीड जिल्ह्यातील भूसंपादन मोबदला घोटाळा प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. 154 बनावट मोबदला आदेश प्रकरणात तपासाला वेग.

बीड — बीड जिल्ह्यातील बहुचर्चित भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी लातूर येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना लातूर न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील चौकशीसाठी बीडकडे आणले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांना ताब्यात घेऊन रवाना होणार असल्याची माहिती मिळताच महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.


बीड जिल्ह्यातील कथित भूसंपादन मोबदला घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरीचा वापर करून तब्बल 154 भूसंपादन प्रकरणांमध्ये बनावट मोबदला आदेश तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी भूसंपादन उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात सहाय्यक महसूल अधिकारी संजय हांगे, अविनाश चव्हाण, शेख अजहर शेख बाबू, त्रिंबक पिंगळे, पांडुरंग पाटील, श्री. राऊत तसेच अॅड. एस. एम. नन्नवरे, अॅड. नरवडकर, अॅड. पिसूरे आणि अॅड. प्रवीण राख यांचा समावेश आहे. यापैकी संजय हांगे, त्रिंबक पिंगळे आणि शेख अजहर शेख बाबू या तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. उर्वरित सात आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांच्याकडे होता. मात्र त्या रजेवर गेल्यानंतर तपासाची जबाबदारी एम. व्यंकटराम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तपासादरम्यान आता तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनाही ताब्यात घेण्यात आल्याने या घोटाळ्याचा तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव समोर आल्याने जिल्हाभरात चर्चेला उधाण आले असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घाटनांदुरात कुलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का; 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू

0

अंबाजोगाई – तालुक्यातील घाटनांदूर येथे मंगळवारी सकाळी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुलरमध्ये पाणी भरत असताना विजेचा तीव्र धक्का लागून नजीर खदीर सय्यद या २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली असून यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा कर्ता पुरुष अचानक गेल्याने सय्यद कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला गेला आहे. नजीर हा नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जाण्याच्या तयारीत असताना घरातील लोखंडी कुलरमध्ये पाणी टाकत होता. यावेळी अचानक कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो कोसळला. पत्नी आणि वडिलांनी तातडीने वीजपुरवठा बंद करून त्याला उपचारासाठी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. नजीरच्या पश्चात पत्नी, अवघ्या आठ महिन्यांची मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. घरातील एकमेव कमवता आधार गेल्याने या कुटुंबावर उपजीविकेचे मोठे संकट उभे राहिले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून विद्युत उपकरणे वापरताना नागरिकांनी विशेषतः कुलरमध्ये पाणी भरताना वीजपुरवठा बंद ठेवण्याची काळजी घ्यावी असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.