Home Blog Page 12

जंतर मंतर’ सीझन -2 लवकरच; शिक्षणाच्या प्रश्नावर देशव्यापी मोहिमेची घोषणा

0

नवी दिल्ली — कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ‘जंतर मंतर’ या उपक्रमाचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर ‘जंतर मंतर’चा दुसरा सीझन कधी सुरू होणार, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात होता. त्यावर प्रतिक्रिया देताना दीपके यांनी दुसरा सीझन लवकरच सुरू होईल, असे स्पष्ट केले. मात्र, यावेळी नेमका कोणता मुद्दा केंद्रस्थानी असेल, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिलेली नाही.

दरम्यान, सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी या आगामी मोहिमेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या सीझनमध्ये सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीविरोधात आवाज उठवण्याबरोबरच जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाणार आहे.

‘श्रवण दौऱ्या’तून जनतेचा आवाज ऐकणार

सौरभ दास यांनी सांगितले की, देशभरातील नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ‘श्रवण दौरा’ सुरू करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनापासून या मोहिमेला सुरुवात करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

या मोहिमेत शिक्षणाच्या प्रश्नाला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. पालक आणि नागरिकांनी आपल्या परिसरातील सरकारी शाळांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करावी, शाळांमधील समस्या समोर आणाव्यात आणि आवश्यक सुधारणांसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दास यांनी केले.

सरकारी शाळांच्या स्थितीची पाहणी करण्याचे आवाहन

सरकारी शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती नागरिकांनी जाणून घ्यावी, अशी भूमिका सीजेपीकडून मांडण्यात आली आहे. या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेतील समस्या लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे दास यांनी सांगितले.

देशातील तरुण मोठ्या प्रमाणात सामाजिक प्रश्नांमध्ये जबाबदारी स्वीकारत असून, त्यांच्या सहभागातून भविष्यात ‘विकसित भारत’ घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बैठकीसाठी हॉल मिळवताना दबावाचा आरोप

दरम्यान, अभिजीत दीपके यांनी दिल्लीतील स्वयंसेवकांच्या बैठकीसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. बैठकीसाठी हॉल शोधत असताना अनेक हॉल मालकांनी जागा देण्यास नकार दिला. आपल्यावर दबाव असल्याचे काही हॉल मालकांनी सांगितल्याचा दावा दीपके यांनी केला.

मोठ्या प्रयत्नांनंतर एका हॉलची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, बैठकीच्या दिवशी सकाळी हॉलच्या मालकांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. बैठक होऊ दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आल्याचे दीपके यांनी म्हटले आहे.

या प्रकारामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोपही दीपके यांनी केला. मात्र, या आरोपाची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

‘दिल्ली पोलीस काय करत आहे?’; सीजेपीचा सवाल

या प्रकरणावर सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला. बैठकीसाठी हॉल देणाऱ्या मालकांना कथितरित्या धमक्या दिल्या जात असतील, तर दिल्ली पोलीस याबाबत काय कारवाई करत आहे, असा सवाल त्यांनी केला.

पोलीस यंत्रणा दिल्लीतील सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करणार आहे की केवळ राजकीय दबावाखाली काम करणार, असा प्रश्नही रांका यांनी उपस्थित केला.

आता ‘जंतर मंतर’च्या दुसऱ्या सीझनमध्ये नेमके कोणते मुद्दे मांडले जाणार आणि ‘श्रवण दौऱ्या’च्या माध्यमातून देशभरातील नागरिकांच्या कोणत्या समस्या समोर आणल्या जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात 15 ऑगस्टला कुठे कोण करणार ध्वजारोहण? सरकारकडून यादी जाहीर; बीडमध्ये सुनेत्रा अजित पवार

0

बीड — भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट रोजी देशभरात उत्साहात साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच विविध शासकीय संस्थांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांचे नियोजन पूर्ण झाले असून, राज्य सरकारने विविध जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण करणाऱ्या प्रमुख व्यक्तींची यादी जाहीर केली आहे.

राज्यातील प्रमुख शासकीय कार्यक्रमांमध्ये मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री ध्वजारोहण करणार असून पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. दरम्यान, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांतील ध्वजारोहणाच्या जबाबदारीवरून सत्ताधारी नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या चर्चेलाही आता पूर्णविराम मिळाला आहे.

बीडमध्ये सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

सरकारच्या जाहीर केलेल्या यादीत बीड जिल्ह्यासाठी सुनेत्रा अजित पवार यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण?

राज्य सरकारच्या यादीप्रमाणे विविध जिल्ह्यांची जबाबदारी पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे—

  1. ठाणे – एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
  2. बीड – सुनेत्रा अजित पवार
  3. नागपूर – चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
  4. अहिल्यानगर – राधाकृष्ण सिंधूताई एकनाथराव विखे-पाटील
  5. नंदूरबार – हसन सकिना मियालाल मुश्रीफ
  6. सांगली – चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चु पाटील
  7. नाशिक – गिरीष गिता दत्तात्रय महाजन
  8. पालघर – गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक
  9. जळगाव – गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
  10. अमरावती – दादाजी रेश्माबाई दगडू भुसे
  11. यवतमाळ – संजय प्रमीला दुलीचंद राठोड
  12. रत्नागिरी – उदय स्वरूपा रविंद्र सामंत
  13. धुळे – जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल
  14. जालना – पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे
  15. नांदेड – अतुल लिलावती मोरेश्वर सावे
  16. चंद्रपूर – अशोक जनाबाई रामाजी उईके
  17. सातारा – शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई
  18. मुंबई उपनगर – ॲड. आशिष मिनल बाबाजी शेलार
  19. वाशिम – दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे
  20. लातूर – शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
  21. सोलापूर – जयकुमार कमल भगवानराव गोरे
  22. हिंगोली – नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ
  23. छत्रपती संभाजीनगर – संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट
  24. धाराशिव – प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक
  25. रायगड – भरत विठाबाई मारूती गोगावले
  26. बुलढाणा – मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)
  27. सिंधुदुर्ग – नितेश निलम नारायण राणे
  28. अकोला – आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर
  29. कोल्हापूर – प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर
  30. गडचिरोली – आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल
  31. भंडारा – माधुरी मिरा सतिश मिसाळ
  32. वर्धा – डॉ. पंकज कांचन राजेश भोयर
  33. परभणी – श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर
  34. गोंदिया – इंद्रनील अनिता मनोहर नाईक

रायगड-नाशिकच्या चर्चेला पूर्णविराम

स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणावरून रायगड आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये कोणाला जबाबदारी मिळणार, याबाबत सत्ताधारी नेत्यांमध्ये चर्चा रंगली होती. अखेर सरकारने ध्वजारोहणाची जबाबदारी निश्चित करून यादी जाहीर केली आहे. त्यामुळे या विषयावरील संभ्रम दूर झाला आहे.

15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शासकीय पातळीवर स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम उत्साहात पार पडणार असून, ध्वजारोहणासोबतच राष्ट्रगीत, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

परळीत पोस्ट ऑफिसमध्ये ७० वर्षीय महिलेची ५० हजारांची रोकड लंपास

0

परळी  — पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करण्यासाठी आलेल्या ७० वर्षीय महिलेची पिशवी धक्का देऊन हिसकावून त्यातील तब्बल ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना परळी वैजनाथ येथे घडली. या प्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात अंदाजे ६५ वर्षीय अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित महिलेचा शोध सुरू आहे.

बँक कॉलनी, परळी वैजनाथ येथील पद्मिनी संदीपान सूर्यवंशी (वय ७०) या १० ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची रोकड होती.

पैसे जमा करण्यासाठी त्या पोस्ट ऑफिसमध्ये असताना त्यांच्या मागून आलेल्या एका अनोळखी महिलेने त्यांना अचानक धक्का दिला. या प्रकारामुळे सूर्यवंशी यांचा काही क्षण गोंधळ उडाला. त्याच संधीचा फायदा घेत संशयित महिलेने त्यांच्या पिशवीतील ५० हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

घटनेनंतर पद्मिनी सूर्यवंशी यांनी संभाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गु.र.नं. १८९/२०२६, कलम ३०३(२) बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोस्ट ऑफिस परिसरातील हालचाली आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून संशयित महिलेचा शोध घेतला जात आहे.

बीड: तरुणावर तीन राऊंड फायरिंग; जुन्या भांडणातून थरार, एक आरोपी ताब्यात

0

बीड — शहरातील इमामपूर रोड परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढत एका तरुणावर पिस्तुलातून तीन राऊंड फायरिंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १२) उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.


शेख मोहम्मद साद शेख हारुण (वय २२, रा. जुना बाजार, हत्तीखाना, बीड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सफवान खान महेबुब खान, सय्यद साद, फरदीन, अखलाख (सर्व रा. पेठ, बीड) यांच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात काठ्या घेत सलीम पेट्रोलपंप परिसरात फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना धमकावल्याचा आरोप आहे. याचवेळी आरोपी क्रमांक एकाने पिस्तुलातून फिर्यादीच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फायरिंगनंतर आरोपीने लाकडी दांड्याने फिर्यादीच्या उजव्या कानावर मारहाण करून त्याला जखमी केल्याचाही आरोप आहे. घटनेनंतर ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सपोनि दराडे पुढील तपास करीत आहेत.

बीड शहरातील वाढती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आ.संदीप क्षीरसागरांनी केली रिंग रोडची मागणी

0

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची भेट; डीपीआर तयार करण्याचे दिले निर्देश

बीड — बीड शहरात वाढणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भविष्यातील विकासाचा विस्तार लक्षात घेता, शहराच्या पश्चिम भागाला जोडणाऱ्या नवीन बाह्यवळण (रिंग रोड) बायपास रस्त्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर‌ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. मंगळवारी (दि.११) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. या मागणीची तातडीने दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित यंत्रणेला या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.आ.क्षीरसागर यांनी मागणी केलेला रिंग रोड बाह्यवळण रस्ता शहराच्या पश्चिम भागाला जोडणारा असून, तो नामलगाव फाटा (NH-52) ते म्हसोबा फाटा (NH 361F) ते पाली (NH-52) असा असणार आहे.
सध्या बीड शहरात अवजड आणि बाहेरील वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासात नाहक त्रास सहन करावा लागत असून अपघातांचा धोकाही वाढला आहे. हा बायपास रस्ता पूर्ण झाल्यास शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल. तसेच बीडच्या आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. बीड शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांची होणारी गैरसोय पाहता हा बायपास होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे केवळ प्रवास सुरक्षित आणि सुलभ होणार नाही, तर बीड शहराच्या आणि परिसराच्या आर्थिक गतिविधींना मोठी चालना मिळणार असल्याचे आ.क्षीरसागर म्हटले आहे. या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी या भेटीदरम्यान केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रशासनाला तातडीने पुढील पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. बीडच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करत राहू आणि शहराच्या विकासाच्या वाटचालीत कोणतीही कमतरता राहू देणार नाही, असा विश्वास आ. संदीप क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

मुलांसमोरच पतीने पत्नीला पेटवले; बीडमध्ये खळबळ

0

बीड — तालुक्यातील पिंपळनेर येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा संतापजनक प्रकार त्यांच्या निष्पाप मुलांच्या डोळ्यांसमोर घडला. आईला वाचवण्यासाठी मुलांनी ‘पप्पा, मम्मीला मारू नका’ अशी विनवणी केली; मात्र आरोपी पतीने मुलांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.

या घटनेत अनुष्का शिरसाट या गंभीररित्या भाजल्या असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मिलिंद शिरसाट याच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारित्र्याच्या संशयातून पत्नीला त्रास?

मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का शिरसाट या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती मिलिंद शिरसाट हे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांना वारंवार त्रास देत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, अनुष्का यांना अंगणवाडीतून मिळणारा पगारही पतीकडून जबरदस्तीने स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतला जात असल्याचा आरोप आहे.

घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर गंभीर हिंसक प्रकारात झाले. आरोपानुसार, संतापलेल्या मिलिंदने घरात ठेवलेले पेट्रोल पत्नीच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिले.

पप्पा, मम्मीला मारू नका…’

आईच्या अंगावर पेट्रोल ओतल्याचे पाहून मुलांनी वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. ‘पप्पा, मम्मीला मारू नका,’ अशी आर्त विनवणी करत मुलांनी मध्यस्थी केली. मात्र त्यानंतरही अनुष्का यांना पेटवून दिल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

घाटीत उपचार; कठोर शिक्षेची मागणी

घटनेत गंभीर भाजलेल्या अनुष्का यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी रुग्णालयात अनुष्का यांचा जबाब नोंदवला. या जबाबात त्यांनी आरोपी पतीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. ‘या नराधमाला कठोर शिक्षा करा आणि जन्मठेप द्या,’ अशी मागणी त्यांनी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या घटनेनंतर पिंपळनेर परिसरात संताप व्यक्त होत असून आरोपीविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पिंपळनेर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

‘मुख्य नेता’ कुठून आला? सिब्बलांचा शिंदेंना सुप्रीम कोर्टात थेट सवाल!

0

मुंबई — शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरील वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, या सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे गटाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ‘एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता हे पद नेमके कुणी दिले?’ असा थेट सवाल सिब्बल यांनी न्यायालयात केला.


शिवसेनेच्या १९९९ च्या पक्षघटनेत ‘मुख्य नेता’ या पदाची तरतूदच नव्हती, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. त्यामुळे शिंदे यांनी स्वतःला हे पद कोणत्या पक्षघटनेच्या आधारे बहाल करून घेतले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

विधिमंडळातील फूट म्हणजे पक्षातील फूट नाही

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षात फूट पडली होती. मात्र, विधिमंडळ पक्षातील फूट म्हणजे संपूर्ण राजकीय पक्षातील फूट ठरत नाही, असा महत्त्वाचा मुद्दा सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर मांडला.
राजकीय पक्षाच्या संघटनेत फूट पडल्यास पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह याबाबत निर्णय घेण्याची भूमिका निवडणूक आयोगाची असते. मात्र, शिवसेनेच्या प्रकरणात विधिमंडळातील फूट हीच राजकीय पक्षातील फूट मानून निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्याचा दावा सिब्बल यांनी केला.

पक्षघटना चुकीची होती तर शिंदे गटाला फायदा कसा?’

निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर उद्धव ठाकरे गटाची पक्षघटना लोकशाहीविरोधी किंवा चुकीची होती, तर त्याच पक्षघटनेच्या आधारे निर्माण झालेल्या शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा अधिकार कसा मिळू शकतो? असा सवाल त्यांनी केला.
पक्षघटना अलोकतांत्रिक असल्याचे आढळल्यास त्याचा परिणाम संबंधित पक्षाच्या नोंदणीवर होऊ शकतो; मात्र त्याचा थेट फायदा दुसऱ्या गटाला कसा देता येईल, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

निवडणूक आयोगाच्या अधिकारांवरही सवाल

पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की अलोकतांत्रिक, याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का, यावरही सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते, आयोगाची भूमिका या प्रकरणात न्यायाधिकरणासारखी असली तरी पक्षघटनेच्या वैधतेबाबत अंतिम निर्णय देण्याच्या अधिकाराची मर्यादा तपासणे आवश्यक आहे.

२०१८ च्या पक्षघटनेवरूनही शिंदे गटाला घेरले

सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी २०१८ च्या शिवसेना पक्षघटनेचा मुद्दाही उपस्थित केला. शिंदे गटातील काही पदे आणि नियुक्त्या याच पक्षघटनेच्या आधारे झाल्या. मात्र, नंतर त्याच पक्षघटनेला लोकशाहीविरोधी असल्याचे आव्हान देण्यात आले, असा दावा त्यांनी केला.
‘जर २०१८ ची पक्षघटना लोकशाहीविरोधी होती, तर त्या घटनेनुसार झालेल्या नियुक्त्यांचे काय?’ असा सवाल करत सिब्बल यांनी शिंदे गटाच्या भूमिकेतील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

धनुष्यबाण वादाचा निकाल कधी?

शिवसेना पक्षाचे नाव, धनुष्यबाण निवडणूक चिन्ह, पक्षघटनेची वैधता, ‘मुख्य नेता’ पद आणि विधिमंडळातील फूट हे मुद्दे या कायदेशीर लढाईच्या केंद्रस्थानी आहेत. सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद सुरू असून, या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

माजलगावात डीपी बसवताना वीजप्रवाह सुरू; ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू

0

माजलगाव —  शहरातील बायपास रोडवर नवीन डीपी बसविण्याचे काम सुरू असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून ३२ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. आवेज पाशा देशमुख (रा. केसापुरी, ता. माजलगाव) असे मृत कामगाराचे नाव आहे. रविवारी (दि. ९) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.

बायपास रोडवरील चाऊस यांच्या तबेल्यासमोर नवीन डीपी बसविण्याचे काम कॉन्ट्रॅक्टर धैर्यशील भागवत ठोंबरे यांच्याकडे देण्यात आले होते. रविवारी चार मजूर हे काम करत होते. काम सुरू करण्यापूर्वी महावितरणकडून दुपारी चार वाजेपर्यंतचे शटडाऊन अथवा परमिट घेण्यात आल्याचे सुपरवायझरकडून मजुरांना सांगण्यात आले होते.

मात्र, काम सुरू असतानाच दुपारी एकच्या सुमारास अचानक वीजप्रवाह सुरू झाला. त्यावेळी खांबावर अथवा डीपीजवळ काम करत असलेल्या शेख आवेज पाशा देशमुख यांना विजेचा जोरदार धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की ते खाली कोसळले.

घटना लक्षात येताच सहकारी कामगार आणि नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत कामगाराच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून महावितरणचे सहायक अभियंता, संबंधित लाईनमन, कॉन्ट्रॅक्टर धैर्यशील भागवत ठोंबरे आणि सुपरवायझर दयानंद नामदेव कांबळे यांच्याविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अचानक वीजपुरवठा कसा सुरू झाला, शटडाऊन किंवा परमिटच्या प्रक्रियेत नेमकी काय त्रुटी झाली आणि या दुर्घटनेसाठी कोणाची जबाबदारी निश्चित होते, याचा पोलीस तपास सुरू आहे.

या घटनेमुळे माजलगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वीज विभागाच्या कामांदरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

भ्रष्टाचाराच्या डासांनी हिवताप विभागाला हुडहुडी; डॉ. शिंदे निलंबित तर इतर भ्रष्टाचार-यांवर पांघरूण

0

बीड — जिल्हा हिवताप विभागाला भ्रष्टाचाराच्या डासांनी 89 लाखांना अक्षरशः फोडून खाल्लं की वरिष्ठ अधिकाऱ्यांना अक्षरशः चांगलीच हुडहुडी भरली यामध्ये मात्र हिवताप अधिकारी डॉ.विजयसिंह शिंदे हा मोठा मच्छर निलंबित झाला. भ्रष्टाचाराच्या डासांचं मोहोळ इतकं जोरात उठलं की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाज झाकण्यासाठी भ्रष्टाचारावर पांघरून घातलं. पण पांघरून घालण्याच्या नादात अख्ख्या व्यवस्थेची अवस्था हिजड्यासारखी झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.


जिल्हा हिवताप विभाग नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहत आलेला आहे. जनतेला हिवताप भरू नये म्हणून सतर्क असलेल्या या विभागातील पैशाच्या गटारात भ्रष्टाचारी डास पैदा झाले. याच डासांनी जनतेसह प्रशासनाला ही फोडून खाण्यात मागे पुढे पाहिले नाही. हा सगळा भ्रष्टाचाराचा खेळ डाॅ. विजयसिंह शिंदे याने खेळातला मास्टरमाइंड असलेल्या सानप व इतर कर्मचाऱ्यांच्या संगणमातांने
बोगस वेतन देयकाच्या माध्यमातून 89लाख 53 हजार158 रक्कम हडपण्याचा डाव मांडला. हा खेळ मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळाला. हिवताप विभागातून वेतन फरक देयके दाखल करताना अधिकचे वेतन दिले गेले असल्याची बाब औरंगाबाद येथील लेखा आणि कोषागार कार्यालयाच्या सहसंचालकांच्या लक्षात आली.या झालेल्या भ्रष्टाचारात सामाजिक कार्यकर्ते इंजी.सादेक इनामदार यांनी तब्बल आठ महिने पाठपुरावा केला. या प्रकरणात तक्रारी झाल्यानंतर तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. बोगस प्रमाणपत्र वाटप असो अथवा एम पी डब्ल्यू ची बोगस भरती असो हा सगळा भ्रष्टाचाराचा खेळ राजरोस आज पर्यंत चालू राहिला. त्यामुळे निर्ढावलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या नावावर 89 लाखाहून अधिकची रक्कम काढण्यासही हयगय केली नाही.आरोग्य कर्मचारी जीवन शाहूराव सानप याच्या नावावर 15 लाख 79 हजार 256 रुपये, हिवताप अधिकारी डॉ विजयसिंग शिंदे यांच्या नावावर 15 लाख 79 हजार 256 रुपये, आरोग्य निरीक्षक अशोक सुखदेव राख याच्या नावावर दोन वेळा वेगवेगळी बिले ज्याची रक्कम 14 लाख 86 हजार 472 आणि 14 लाख 10 हजार 851, आरोग्य कर्मचारी संजय धनोबा सानप याच्या नावावर 14 लाख 10 हजार 851 रुपये, आरोग्य निरीक्षक सुनील मोतीराम गायकवाड याच्या नावावर 14 लाख 86 हजार 472 रुपये अशी तब्बल 89 लाख 53 हजार 158 रुपये इतकी अधिकची रक्कम या कर्मचाऱ्यांना एरियर्स च्या नावाखाली वाटप करण्यात आली. ही बाब उघडकीस आल्यानंतर लातूर च्या उपसंचालकांनी डॉ विजयसिंह शिंदे यांना तात्काळ निलंबित केले. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सहभागी असलेले जीवन सानप, अशोक राख, संजय सानप, सुनील गायकवाड यांच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. या कर्मचाऱ्यांवर मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पांघरून घातला असलं तरी या सगळ्या खेळात व्यवस्थेची अवस्था “एक साला मच्छर आदमी को हिजडा बना देता है” या चित्रपटातील डायलॉग सारखी अवस्था झाली आहे.

भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सादेक इनामदार यांची मागणी

कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन देयकात केवळ वेतनाची रक्कम असताना, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय बीड येथील सुमारे 89 लाख 53 हजार रुपयांची संशयास्पद रक्कम देयकात समाविष्ट करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात जिल्हा हिवताप अधिकारी शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली; मात्र लेखा विभागातील संबंधित कर्मचारी थोरात व सांगळे यांच्यावर अद्याप कारवाई का झाली नाही? .
या प्रकरणातील सर्व दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, तसेच जीवन सानप याने आंधळे नामक अधिकाऱ्याच्या सहीने दिलेल्या बोगस प्रमाणपत्रांची तसेच जीवन सानपच्या बेकायदेशीर संपत्तीचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी देखील इनामदार यांनी केली आहे.

तलाव भूसंपादन घोटाळा : तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अव्वल कारकून श्रीनिवास मुळे, यांच्यावर कारवाईची टांगती तलवार!

0

उच्च न्यायालयाचा दणका; चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर – भूसंपादन घोटाळ्यातील संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करा : डॉ. गणेश ढवळे

बीड —  जिल्ह्यातील मेंगडेवाडी (ता. पाटोदा) येथील तलाव भूसंपादन प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहारामुळे तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अव्वल कारकून श्रीनिवास मुळे तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि वकील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बनावट कागदपत्रे, खोटे अहवाल व बनावट सही-शिक्क्यांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून १ कोटी ४६ लाख ३५ हजार ७७७ इतक्या रकमेचा अपहार करण्यात आला असून, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

या प्रकरणी प्रशासनाने कारवाई टाळल्याने शेतकरी बाबासाहेब रावसाहेब मेंगडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात रिट याचिका क्रमांक १८०४/२०२६ दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर भूसंपादन प्रशासनाने सखोल चौकशी करून २९ मे २०२६ रोजी आपला अहवाल बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता निर्माण झाली असून महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

मेंगडेवाडी तलाव भूसंपादनातील कथित गैरव्यवहार

पाटोदा तालुक्यातील मौजे मेंगडेवाडी येथील गट क्रमांक १०० मधील बाबासाहेब मेंगडे यांची सुमारे दीड एकर जमीन गाव तलाव क्रमांक ५ (लमाणतळ) प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. नियमानुसार प्रत्यक्ष संयुक्त मोजणी होणे आवश्यक असताना ती न करताच कार्यालयात बसून बनावट मोजणी अहवाल तयार करण्यात आला. त्यानंतर खोट्या सही-शिक्क्यांच्या आधारे अंतिम निवाडा करून शासनाची १.४६ कोटींहून अधिक रक्कम परस्पर हडप करण्यात आली.

या प्रकरणी डॉ. गणेश ढवळे यांनी मेंगडे कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन तलावाची स्थळ पाहणी करून कागदपत्रांची पडताळणी करून त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

भूसंपादन घोटाळ्यात मोठे रॅकेट कार्यरत”

डॉ. गणेश ढवळे यांनी बीड जिल्ह्यात भूसंपादनातील अशा प्रकारचे मोठे रॅकेट कार्यरत असुन केवळ मेंगडेवाडीच नव्हे तर जिल्ह्यातील इतर भूसंपादन प्रकरणांचीही सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संपूर्ण रॅकेट नेस्तनाबूत करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, तक्रारदार शेतकरी बाबासाहेब मेंगडे यांनीही बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अपहाराची रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर सादर झालेल्या चौकशी अहवालावर आता जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.