Home Blog Page 12

केज उपविभागीय विशेष पथकाची कारवाई; 6.53 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

0

केज — बीड जिल्ह्यातील केज उपविभागीय विशेष पथकाने मोठी कारवाई करत महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला गुटखा आणि पानमसाला जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल 6 लाख 53 हजार 945 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके तसेच सहायक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली.
दिनांक 23 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी युसुफवडगाव हद्दीत सापळा रचला. यावेळी संजय रामलिंग तपसे (वय 47, रा. चंदनसावरगाव, ता. केज) याच्या ताब्यातून प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विमल पान मसाला, दिलबाग पान मसाला, गोवा गुटखा-1000 पूडे यांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा TUV-300 (MH-46-BK-8119) या वाहनाचा समावेश आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपीने हा माल रंजीत नागनाथ आगाडे (रा. इंदिरानगर, कळंब, जि. धाराशिव) याच्याकडून आणल्याची माहिती दिली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 142/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 123, 274 आणि 275 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, पोलीस हवालदार धोंडीराम मोरे, राजू वंजारे आणि विशाल क्षीरसागर यांच्या पथकाने केली.

पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग! 10 दिवसांत चौथ्यांदा दरवाढ; दिल्लीत पेट्रोल 100 पार

0

नवी दिल्ली — मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण युद्धाच्या (Iran War) वाढत्या तणावाचा परिणाम आता भारतातील सर्वसामान्य नागरिकांवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा मोठी वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याने वाहनधारकांचे बजेट कोलमडले आहे.


सोमवार, 25 मे रोजी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपयांची तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेला आहे.

प्रमुख महानगरांमधील आजचे पेट्रोल दर

मुंबई : 111.21 रुपये (2.71 रुपयांची वाढ)
दिल्ली : 102.12 रुपये (2.61 रुपयांची वाढ)
कोलकाता : 113.51 रुपये (2.87 रुपयांची वाढ)
चेन्नई : 107.77 रुपये (2.46 रुपयांची वाढ)

प्रमुख महानगरांमधील आजचे डिझेल दर
मुंबई : 97.83 रुपये (2.81 रुपयांची वाढ)
Delhi : 95.20 रुपये (2.71 रुपयांची वाढ)
कोलकाता : 99.82 रुपये (2.80 रुपयांची वाढ)
चेन्नई : 99.55 रुपये (2.57 रुपयांची वाढ)
10 दिवसांत चौथ्यांदा इंधन दरवाढ
देशात मे महिन्यात इंधनाच्या किमती सातत्याने वाढताना दिसत आहेत.
15 मे : पेट्रोल-डिझेल दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ
19 मे : दोन्ही इंधनांच्या दरात सरासरी 90 पैशांची वाढ
23 मे : पेट्रोल 87 पैसे, डिझेल 91 पैशांनी महाग
25 मे : पेट्रोल 2.61 रुपये, डिझेल 2.71 रुपयांनी वाढ
सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम
बस आणि ऑटो भाडे वाढण्याची शक्यता
इंधन दरवाढीमुळे सार्वजनिक वाहतूक, रिक्षा, ऑटो आणि शालेय बसच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मालवाहतूक खर्च वाढणार
ट्रक आणि टेम्पोच्या इंधन खर्चात वाढ झाल्याने मालवाहतूक शुल्क वाढू शकते. त्यामुळे भाजीपाला, फळे, धान्य आणि किराणा वस्तू महागण्याची शक्यता आहे.
शेती उत्पादन खर्च वाढणार
डिझेलवर चालणारे ट्रॅक्टर, पंपिंग सेट आणि शेती उपकरणांचा खर्च वाढणार असल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढू शकतो.

आष्टीत साखळी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी जेरबंद, तीन गुन्ह्यांची कबुली

0

बीड  — बीड जिल्ह्यातील आष्टी परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींनी बीड जिल्ह्यातील तीन साखळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी पायी जात असताना दोन अज्ञात इसम मोटारसायकलवर आले आणि त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून फरार झाले. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 191/2026 दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी आष्टी परिसरात अशाच प्रकारच्या आणखी दोन घटना घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांकडून सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांनी 25 हून अधिक गुन्हेगार वस्त्यांमध्ये चौकशी केली, हिस्ट्रीशीटरांची पडताळणी केली तसेच 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना विकास गडया भोसले (वय 22, रा. चिखली ता. आष्टी) याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा गुन्हा आपल्या साथीदार अरुण बप्पा काळे (वय 23, रा. बोलेगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) याच्यासोबत केल्याची कबुली दिली.
दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी बीड जिल्ह्यातील तीन साखळी चोरीचे गुन्हे केल्याची प्राथमिक कबुली दिली आहे. पुढील तपासासाठी आरोपींना आष्टी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आणि आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, अर्जुन यादव, पोलीस अंमलदार आशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे व पोलीस ठाणे आष्टी येथील पोलीस उपनिरीक्षक शिंदे, प्रविण क्षीरसागर, सत्यवान वाणी, तागड, तांबे चालक सिध्देश्वर मांजरे यांनी केली आहे.

राहुल गांधींचा मोठा दावा; “वर्षभरात मोदी सरकार कोसळणार”

0

नवी दिल्ली —  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi ) सरकारच्या भवितव्याबाबत मोठं विधान केलं आहे. पुढील एक वर्षाच्या आत मोदी सरकार सत्तेतून जाऊ शकते, असा दावा राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या बैठकीत केला असल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून मिळाली आहे.


काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, वाढती महागाई आणि जनतेतील नाराजी या मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत देशात आर्थिक असंतोष वाढत असल्याचे म्हटले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेली आर्थिक अनिश्चितता आणि देशांतर्गत आर्थिक तणाव याचा मोठा परिणाम आगामी काळात भारतीय राजकारणावर होऊ शकतो. लोकांमध्ये सरकारविरोधात नाराजी वाढत असून त्याचा फटका भाजपला बसू शकतो, असेही राहुल गांधी यांनी बैठकीत नमूद केल्याचे सांगितले जात आहे.

अन्यायग्रस्तांसोबत काँग्रेस उभी राहील

या बैठकीत काही नेत्यांनी ‘मुस्लिम’ या शब्दाऐवजी ‘अल्पसंख्याक’ हा शब्द वापरण्याचा सल्ला दिला. मात्र, राहुल गांधी यांनी यावर असहमती दर्शवली. कोणत्याही समाजावर अन्याय होत असेल तर काँग्रेसने स्पष्टपणे त्या समाजाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“हिंदू, दलित, सवर्ण, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध किंवा जैन कोणताही समाज असो, अन्याय झाल्यास काँग्रेसने त्यांच्या अधिकारांसाठी आवाज उठवला पाहिजे,” असे राहुल गांधी म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राहुल गांधी यांच्या या विधानामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे

NEET प्रकरण: लातूरमध्ये मोठी कारवाई; कोचिंग क्लासेस, हाॅस्टेल, हॉटेल बंद करण्याचे आदेश!

0

लातूर — नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच चर्चेत आलेल्या लातूर शहरात आता आणखी एक मोठा प्रशासकीय निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे. औद्योगिक वापरासाठी राखीव असलेल्या लातूर औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, वस्त्रालयं आणि इतर व्यावसायिक उपक्रमांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर जिल्हा उद्योग केंद्राने संबंधित व्यवसाय तात्काळ बंद करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.


या निर्णयामुळे लातूरच्या प्रसिद्ध ‘क्लास संस्कृती’त मोठी खळबळ उडाली आहे. राज्यभरात ‘लातूर पॅटर्न’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षण व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

२०११ पासून सुरू होत्या तक्रारी

तक्रारदारांच्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहतीमधील जागांचा मूळ उद्देश उद्योग उभारणीचा होता. मात्र गेल्या अनेक वर्षांत उद्योगांऐवजी कोचिंग क्लासेस आणि शिक्षणाशी संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढले. जवळपास २७ एकर परिसरातील अनेक भूखंडांवर औद्योगिक प्रकल्प उभे राहण्याऐवजी ट्युशन क्लासेस, विद्यार्थ्यांची हॉस्टेल्स आणि इतर व्यावसायिक उपक्रम सुरू झाले.
या संदर्भात २०११ पासून प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. काही वेळा कारवाईची आश्वासनं देण्यात आली, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष कारवाईदेखील झाली. मात्र परिस्थितीत फारसा बदल झाला नसल्याची नाराजी तक्रारदारांकडून व्यक्त केली जात आहे.

ट्युशन एरिया’ म्हणून ओळख निर्माण

एकेकाळी उद्योगांसाठी विकसित करण्यात आलेला हा परिसर आता संपूर्ण राज्यात ‘ट्युशन एरिया’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. मोठमोठे उद्योग बंद पडत गेले आणि त्यांच्या जागी खासगी कोचिंग क्लासेसचे जाळे निर्माण झाले. अनेक नामांकित कोचिंग संस्थांनी येथे आपली केंद्रे सुरू केली असून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरमध्ये दाखल होत आहेत.
दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणात प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयकडून अटक झाल्यानंतर लातूरच्या क्लास संस्कृतीवर टीकेची झोड उठली होती. पी. व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर प्रकरणानंतर ‘लातूर पॅटर्न’च्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पालकांकडून मिश्र प्रतिक्रिया

प्रशासनाच्या या कारवाईनंतर पालकांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे ही व्यवस्था अचानक बंद करू नये, अशी भूमिका घेतली आहे. तर काहींनी औद्योगिक नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
प्रशासनाच्या नव्या आदेशानंतर लातूर औद्योगिक वसाहतीतील कोचिंग व्यवसायांवर नेमका काय परिणाम होणार, याकडे आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

मुळुकवाडी हत्या प्रकरणात आरोपीला जन्मठेप; बळीराम निर्मळ हत्येचा निकाल

0

बीडच्या मुळुकवाडी येथे 2022 मध्ये झालेल्या बळीराम निर्मळ हत्या प्रकरणात आरोपी रोहिदास निर्मळ याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील अॅड. मिलिंद वाघीरकर यांनी प्रभावी बाजू मांडली.

बीडमध्ये गाजलेल्या मुळुकवाडी हत्या प्रकरणाचा निकाल

बीड —  तालुक्यातील मुळुकवाडी येथे 26 नोव्हेंबर 2022 रोजी घडलेल्या बळीराम निर्मळ हत्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत मुख्य आरोपी रोहिदास निर्मळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रथम सत्र न्यायाधीश पाटवदकर यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. मिलिंद केशवराव वाघीरकर यांनी काम पाहिले.

सकाळच्या वेळी कोयत्याने हल्ला

घटनेच्या दिवशी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास केशरबाई बळीराम निर्मळ या घरासमोर मूग पाखडत बसल्या होत्या, तर कांताबाई निर्मळ या घराच्या ओट्यावर दात घासत होत्या. त्याचवेळी आरोपी रोहिदास निर्मळ हा कोयता लपवून घरासमोर आला आणि अचानक केशरबाई यांच्या डोक्यावर व तोंडावर वार करण्यास सुरुवात केली.


आरडाओरड ऐकून बळीराम निर्मळ घटनास्थळी धावत आले असता आरोपीने त्यांच्या डोक्यावर, मानेवर आणि खांद्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या बळीराम निर्मळ यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेत केशरबाई निर्मळ गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर संभाजीनगर येथे उपचार करण्यात आले. कांताबाई निर्मळ यांच्यावर बीडमध्ये उपचार करण्यात आले.

नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी कांताबाई निर्मळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 267/2022 अंतर्गत भारतीय दंड विधान कलम 302, 307, 326, 324, 109 आणि 115 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख आणि हजारे यांनी केला. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सरकारी पक्षाने एकूण 13 साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी, जखमी महिला, पंच, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरकारी पक्षाने सादर केलेल्या भक्कम पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी रोहिदास निर्मळ याला दोषी ठरवले. न्यायालयाने कलम 302 अंतर्गत जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंड, कलम 307 अंतर्गत 10 वर्षांची शिक्षा व 2 हजार रुपये दंड, तर कलम 326 अंतर्गत 3 वर्षांची शिक्षा व 10 हजार रुपये दंड सुनावला.
दरम्यान, आरोपीचे आई-वडील विठ्ठल आणि कौसाबाई यांना सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

खटल्यात विशेष सरकारी वकिलांची भूमिका महत्त्वाची

या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड. मिलिंद वाघीरकर यांना अॅड. संदीप जोगदंड, अॅड. सोंडगे, विधी विद्यार्थी अभिषेक अवताडे आणि पैरवी अधिकारी गव्हाणे यांचे सहकार्य लाभले.

बीडमध्ये महिलेवर अत्याचार करून ब्लॅकमेलिंग; आरोपी अमर बांगरचा पोलिसांकडून शोध

0

बीड —  जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून, कायद्याचा धाक उरला आहे का? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अशातच बीड शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३१ वर्षीय महिलेला लक्ष्य करत आरोपीने तिच्यावर अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि खंडणीसारखे गंभीर प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरी एकटी असल्याची संधी साधून आरोपी अमर बांगर याने तिच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार केला. यानंतर आरोपीने पीडितेला सातत्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपीने महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत पाशवी अत्याचार केले.
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना बदनामीची धमकी देत मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी केली. कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला मोठी रक्कम दिली, मात्र त्यानंतरही छळ सुरूच राहिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणातील अत्याचाराच्या घटना 23 एप्रिल 2025 रोजी बीड येथे तसेच 15 सप्टेंबर 2025 रोजी नंदुरबार येथे घडल्याचे समोर आले आहे. अखेर पीडित महिलेनं धाडस दाखवत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंद करून आरोपी अमर बांगरचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, आरोपी अमर बांगर हा काही गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित असल्याची चर्चा असून त्याचे नाव वाल्मिक कराड गँगशी जोडले जात असल्याचेही बोलले जात आहे. तसेच आरोपीचे वडील किरण बांगर हे पंचायत समितीचे माजी सभापती राहिले असून त्यांचे राजकीय क्षेत्राशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या आरोपी फरार असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली आहेत. मात्र अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम:2.51 कोटींचा घोटाळा उघड; बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई, 81 लाखांची रक्कम फ्रिज

0

बीड  — मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजनेअंतर्गत तब्बल 2 कोटी 51 लाख 51 हजार 692 रुपयांच्या कर्ज अनुदान रकमेच्या अपहारप्रकरणी बीड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करून बँकेच्या पोर्टल लॉगिनचा गैरवापर करत शासनाच्या अनुदानावर डल्ला मारण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.


या प्रकरणी उद्योग सहसंचालक विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील अधिकारी बाळासाहेब त्रिबंक यशवंते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपास सायबर पोलीस ठाणे बीडकडे वर्ग करण्यात आला.
गुन्हा क्रमांक 139/2024 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 467, 468, 471, 409, 34 तसेच आयटी अॅक्टच्या कलम 66(D) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. या प्रकरणात अपहार झालेल्या रकमेपैकी आतापर्यंत 81 लाख 78 हजार 289 रुपये फ्रिज करण्यात तसेच रक्कम आरोपींकडून वसूल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि संदीप आराक, पोउपनि स्वाती लहाने तसेच सायबर पोलीस ठाण्यातील पथकाने केली.
सायबर पोलिसांनी नागरिकांना ऑनलाईन व्यवहार करताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी लिंक, APK फाइल्स, संशयास्पद SMS किंवा फोन कॉलवर विश्वास ठेवू नये, OTP शेअर करू नये तसेच सोशल मीडिया खाती सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सायबर फसवणुकीसंदर्भात तक्रार

नोंदवण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

महापारेषणमधील नोकरीचे आमिष; तरुणाची ८ लाखांची फसवणूक, जालना जिल्ह्यातील दोघांवर गुन्हा

0

परळी —  सरकारी नोकरीचे आमिष दाखवत तरुणांची आर्थिक फसवणूक करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, परळी तालुक्यातील एका तरुणाची तब्बल ८ लाख रुपयांनी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महापारेषण विभागात सहाय्यक अभियंता पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत जालना जिल्ह्यातील दोघांनी ही फसवणूक केल्याचा आरोप असून, या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तळेगाव (ता. परळी) येथील प्रतीप पांडुरंग मुंडे (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बी.ई. इलेक्ट्रिकलचे शिक्षण घेत असताना त्यांची ओळख जालना जिल्ह्यातील ऋषिकेश सुनील खराटे याच्याशी झाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही दोघांमध्ये संपर्क कायम होता. दरम्यान, ऋषिकेश खराटे याने महापारेषण विभागात ओळखीच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवून देतो, असे सांगत पैशांची मागणी केली.
फिर्यादीनुसार, २९ डिसेंबर २०२४ रोजी सहाय्यक अभियंता पदाची परीक्षा दिल्यानंतर आरोपीने संपर्क साधत इतर उमेदवारांकडून २५ लाख रुपये घेत असल्याचे सांगितले. मात्र मैत्री असल्याने १५ लाखांत काम करून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर जानेवारी २०२५ मध्ये फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी जालना जिल्ह्यातील आरोपींच्या कार्यालयात भेट घेतली. चर्चेनंतर ८ लाख रुपये आगाऊ देण्याचे ठरले. त्यानुसार रोख रक्कम तसेच बँक व्यवहाराद्वारे आरोपींना पैसे देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोपींनी बनावट निकाल यादी दाखवत फिर्यादीचे नाव निवड यादीत असल्याचा दावा केला. तसेच “पार्टी”साठी आणखी दोन हजार रुपये ऑनलाइन घेतल्याचाही आरोप आहे. मात्र अधिकृत निकालात नाव नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फिर्यादीने आरोपींकडे विचारणा केली असता “वेटिंग लिस्टमध्ये नाव येईल” असे सांगत वेळकाढूपणा करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, पैसे परत मागण्यासाठी गेल्यानंतर आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आली. तसेच पुन्हा पैसे मागण्यासाठी आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी ऋषिकेश सुनील खराटे (वय २८) आणि सुनील वायुराव खराटे (वय ५०, रा. एकलहरा, ता. अंबड, जि. जालना) यांच्याविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. २३) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

पीएसआयला लग्नास नकार देत वर्दी उतरवण्याची धमकी;२५ लाखाची मागणी

0

बीड  — जिल्ह्यात एका पोलिस उपनिरीक्षकाला (पीएसआय) लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक आणि खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साखरपुडा झाल्यानंतर मुलीने लग्नास नकार दिला. त्यानंतर संबंधित पीएसआयला “२५ लाख रुपये द्या, नाहीतर वर्दी उतरवू आणि हातपाय तोडू,” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


चकलांबा येथील अंगद शाहूराव निंबाळकर (वय ३०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे भाऊ पवन निंबाळकर हे बीड येथे पीएसआय म्हणून कार्यरत आहेत. मातोरी (ता. शिरूर कासार) येथील गीतांजली जरांगे हिच्याशी त्यांचा विवाह ठरवण्यात आला होता. १४ डिसेंबर २०२५ रोजी दोघांचा साखरपुडा पार पडला.
फिर्यादीनुसार, साखरपुड्यासाठी सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल आणि कपड्यांवर सुमारे ४ लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र, १५ मार्च २०२६ रोजी गीतांजली हिने पवन निंबाळकर यांना फोन करून “माझ्या इच्छेविरुद्ध हे लग्न ठरवण्यात आले असून माझ्या मनात कोणत्याही भावना नाहीत,” असे स्पष्ट सांगितले.
यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये चकलांबा येथे बैठक घेण्यात आली. बैठकीत गीतांजली हिने सर्वांसमोर लग्नास नकार दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यावेळी काही नातेवाईकांनी पीएसआय पवन निंबाळकर यांना धमकावून २५ लाख रुपयांची मागणी केली. “रस्त्यात गाठून हातपाय तोडू, ड्युटी करू देणार नाही,” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
तसेच, साखरपुडा आणि लग्नाच्या नावाखाली एकूण १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी चकलांबा पोलिसांनी सरसराम जरांगे, आसाराम जरांगे, रामप्रसाद जरांगे, प्रकाश जरांगे, ज्ञानेश्वर जरांगे, तात्याराम जरांगे, गीतांजली जरांगे, मीना जरांगे, रुक्मिणी जरांगे यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.