Home राजकीय राहुल गांधींचा मोठा दावा; “वर्षभरात मोदी सरकार कोसळणार”

राहुल गांधींचा मोठा दावा; “वर्षभरात मोदी सरकार कोसळणार”

0
5

नवी दिल्ली —  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi ) सरकारच्या भवितव्याबाबत मोठं विधान केलं आहे. पुढील एक वर्षाच्या आत मोदी सरकार सत्तेतून जाऊ शकते, असा दावा राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या बैठकीत केला असल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून मिळाली आहे.


काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, वाढती महागाई आणि जनतेतील नाराजी या मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत देशात आर्थिक असंतोष वाढत असल्याचे म्हटले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेली आर्थिक अनिश्चितता आणि देशांतर्गत आर्थिक तणाव याचा मोठा परिणाम आगामी काळात भारतीय राजकारणावर होऊ शकतो. लोकांमध्ये सरकारविरोधात नाराजी वाढत असून त्याचा फटका भाजपला बसू शकतो, असेही राहुल गांधी यांनी बैठकीत नमूद केल्याचे सांगितले जात आहे.

अन्यायग्रस्तांसोबत काँग्रेस उभी राहील

या बैठकीत काही नेत्यांनी ‘मुस्लिम’ या शब्दाऐवजी ‘अल्पसंख्याक’ हा शब्द वापरण्याचा सल्ला दिला. मात्र, राहुल गांधी यांनी यावर असहमती दर्शवली. कोणत्याही समाजावर अन्याय होत असेल तर काँग्रेसने स्पष्टपणे त्या समाजाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“हिंदू, दलित, सवर्ण, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध किंवा जैन कोणताही समाज असो, अन्याय झाल्यास काँग्रेसने त्यांच्या अधिकारांसाठी आवाज उठवला पाहिजे,” असे राहुल गांधी म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राहुल गांधी यांच्या या विधानामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here