निर्णय अचानक नाही, चार महिन्यांपासून तयारी होती’; ओमराजे प्रकरणावर अंधारेंचा दावा”

मुंबई — धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रविवारी (दि. २१) जोरदार प्रतिक्रिया दिली. दिल्ली दौऱ्यानंतर सह्या देण्याच्या घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी ओमराजेंनी आधी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट करायला हवी होती, असे म्हटले.


“दिल्लीला जाण्यापूर्वी मेळावा घ्यायला हवा होता. आता जाऊन आले आणि सह्या दिल्या. गेल्या चार महिन्यांपासून हा निर्णय शिजत होता,” असा दावा अंधारे यांनी केला. तसेच ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर निर्माण झालेल्या परिस्थितीला त्यांनी ‘चक्रव्यूह’ संबोधत ते कसे भेदणार, असा सवाल उपस्थित केला.
ओमराजे निंबाळकर यांनी वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात २० वर्षे न्यायासाठी लढा दिला आहे. मात्र न्यायालयाचा निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसल्याचे अंधारे यांनी सांगितले. “त्यांच्या संघर्षाबद्दल आमच्या भावना आणि सद्भावना आहेत,” असेही त्या म्हणाल्या.

खासदारांच्या कुटुंबीयांवर विश्वास ठेवणार नाही : अंधारे

ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या आणि नगरसेविका राजुल पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावर बोलताना अंधारे यांनी सावध भूमिका घेतली.
“खासदारांची मुलं आमच्यासोबत आहेत म्हणून आम्ही भ्रमात नाही. लोकसभा अध्यक्षांसोबत झालेल्या बैठका आणि हॉटेलमधील चर्चांचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत,” असा दावा त्यांनी केला.

नागेश आष्टीकर यांच्या कारणांवरही प्रश्नचिन्ह

खासदार नागेश आष्टीकर यांच्या भूमिकेवरही सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. “मान मिळत नव्हता, असे सांगितले जाते. मग उमेदवारी कशी मिळाली?” असा सवाल त्यांनी केला.
दिल्लीत झालेल्या बैठकीत कोण-कोण सहभागी होते याची माहिती असल्याचे सांगत त्यांनी काही बैठका आणि चर्चांचा उल्लेख केला. तसेच आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिल्याचेही त्यांनी सांगितले.

ओमराजेंची मनधरणी करण्याचे ठाकरे गटाचे प्रयत्न

दरम्यान, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील न्यायालयीन निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांच्याशी संवाद साधण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत.
ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी पुण्यात ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली होती. या भेटीत सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे.
याच काळात उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात फोनवरून संवाद झाल्याचेही सांगण्यात आले. “आपणच मला मोठं केले आहे. आज मी खासदार आहे ते पक्षामुळे आणि तुमच्यामुळे. कोणताही निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढची भूमिका ठरवेन,” अशी भूमिका ओमराजेंनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सगळ्या गोष्टी माध्यमांसमोर सांगणे योग्य नाही”

वरुण सरदेसाई यांनी भेटीबाबत बोलताना सांगितले की, ओमराजे यांच्या कुटुंबाला न्यायालयीन निकालामुळे मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर काही विषयांवर चर्चा झाली.
“ज्या-ज्या गोष्टींची चर्चा झाली, त्या माध्यमांसमोर सांगणे योग्य नाही. चर्चा करायची असती तर आम्ही उघडपणे भेटलो असतो,” असे सरदेसाई म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles