बीड — मुस्लिम समाजाला शिक्षण व शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी उद्या बीड शहरात भव्य एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये जिल्हाभरातून हजारो मुस्लिम बांधव सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
गेल्या १५ ते २० दिवसांपासून या मोर्चाची जोरदार तयारी सुरू असून, विविध भागांमध्ये कॉर्नर बैठका घेऊन नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या नेते-कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत
तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, हे आरक्षण नंतर रद्द करण्यात आले. न्यायालयाने शिक्षणात आरक्षणासंदर्भात सकारात्मक भूमिका दर्शविली होती, परंतु त्यावर या सरकारने कुठलीच पावलं उचलली नाही, असा आरोप आयोजकांनी केला आहे.
मागासलेपणाचा मुद्दा
मुस्लिम समाज शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचे सांगत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आवश्यक असल्याची भूमिका मोर्चा आयोजकांनी मांडली आहे.
मोठ्या संख्येने सहभाग
या मोर्चामध्ये केवळ शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने प्रशासनाकडूनही योग्य ती तयारी करण्यात येत आहे.

