बीड — शेतीच्या वादातून महिलेवर भावकीतील चार जणांनी प्राणघातक हल्ला करत तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न केल्याची खळबळ जनक घटना चौसाळा जवळील अंजनवती येथे घडली आहे.
अश्विनी येडे असं मारहाण झालेल्या पीडित महिलेचं नाव आहे. तिच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघण्याची सुरू झालेली मालिका अजूनही चालूच आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती गावात राहणाऱ्या आश्विनी येडे या महिलेला निर्दयीपणे मारहाण करून तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही मारहाण भावकीतील चार जणांनी केल्याचे उघड झाले आहे. तसेच शेतीच्या वादातून आश्विनी येडे या महिलेवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आश्विनी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
विशेष म्हणजे आरोपीकडून याआधीही तीन महिलांवर अशाच पद्धतीने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यापूर्वी इतर महिलेला मारहाण करतानाचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला आहे. महिलांना अमानुष मारहाण करतानाचा हा व्हिडिओ तीन महिन्यापूर्वीचा असून बीड जिल्ह्यातील या घटनेने पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेकनूर पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणामुळे कुटुंब मोठ्या दहशतीत असून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करून आरोपींना जेरबंद करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

