इस्लामाबाद — पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला.या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले असल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. भारताने केलेल्या या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनांचा खात्मा करण्यात आला. यानंतर दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानी लष्करी अधिकारी देखील सहभागी झाले. दरम्यान याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्याच्या लष्कराचे वरिष्ठ कमांडर हाफिज अब्दुला दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले आहेत
https://x.com/SupriyaShrinate/status/1920077447305031895
. या अत्यंयात्रेदरम्यान मृत दहशतवाद्यांसाठी नमाज पठण करण्यात आले. तसेच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोलिस महासंचालक देखील अंत्ययात्रेसाठी उपस्थित होते. पाकिस्तान माध्यमांद्वारे हे प्रसिद्ध करण्यात आले आहे. सध्या याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.
भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील मुरिदके, बहावलपूर, कोटली, मुजफ्फरबाद, आणि सियालकोट येथील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केले. भारताची ही कारवाई केवळ दहशतवाद्यांवरच नाही, तर त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवरही आहे. भारतीय सैन्याच्या या कारवाईत जैशचे बहावरपूर येथील मरकज सुभान अल्लाह, कोटलीचे मरकज अब्बास, तेहरा कलां आणि मुजफ्फरबादमधील सैयदन बिलाल कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आला.
या कारवाईनंतर पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा जगासमोर आला आहे. स्वत:ला दहशतवादाचा बळी म्हणून घेणारा पाकिस्तान प्रत्यक्षात दहशतवाद्यांना पोसत असल्याचे समोर आले आहे. या घटनेतून भारताची दहशतवादविरोधी भूमिका स्पष्ट होते.
भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात २८ जणांचा निष्पाप बळी गेला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली. भारताने सुरुवातील वॉटर स्ट्राईकने धक्का दिला. याच दरम्यान भारत लष्करी कारवाईच्या तयारीत होती. अखेर बुधवारच्या पहाटे १.३० वाजता भारताच्या नौदल, भू-दल, आणि वायू-दलाने संयुक्तपणे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला. भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते केली.
दरम्यान भारताने या हल्ल्याद्वारे हेही स्पष्ट केले आहे की, भारताची ही कारवाई पाकिस्तानविरोधात नव्हे, तर दहशतवाद, दहशतवादी आणि दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांविरोधात आहे.

