बीड–पुणे रेल्वेला 17 सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे नियोजन

बीड — बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. बीड–पुणे रेल्वे सेवा 17 सप्टेंबर 2026 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली असून, या रेल्वेसाठी आवश्यक तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्याचबरोबर डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

अहिल्यानगर–बीड–परळी’ रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा आणि बीड–पुणे तसेच बीड–मुंबई रेल्वे सेवांच्या नियोजनासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत रेल्वे प्रकल्पातील प्रलंबित कामे आणि पुढील टप्प्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

17 सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे सुरू करण्याचे नियोजन

बीडकरांची तब्बल 40 वर्षांची रेल्वे प्रतीक्षा संपवत 17 सप्टेंबर 2025 रोजी बीड–अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू झाली होती. त्यानंतर आता याच ऐतिहासिक दिवशी बीडला पुण्याशी थेट जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बीड–पुणे रेल्वे सुरू झाल्यानंतर बीड जिल्ह्याची पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी रेल्वे जोडणी अधिक मजबूत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, शेतकरी तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

शेती, उद्योग आणि व्यापाराला मिळणार चालना

पुण्याशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण झाल्याने बीडच्या कृषी, उद्योग, शिक्षण, व्यापार आणि रोजगार क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रवासामुळे वेळ आणि खर्चाची बचत होणार असून जिल्ह्याच्या आर्थिक विकासालाही याचा फायदा होईल.

डिसेंबरअखेर बीड–मुंबई रेल्वेचे लक्ष्य

बीड–पुणे रेल्वेनंतर आता बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्यावरही प्रशासनाचा भर आहे. डिसेंबर 2026 अखेर ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामांसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले.

तांत्रिक, प्रशासकीय आणि सुरक्षाविषयक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून सर्व कामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. तसेच 17 सप्टेंबरच्या बीड–पुणे रेल्वेच्या शुभारंभ कार्यक्रमाची तयारीही नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे निर्देश देण्यात आले.

बीड–पुणे आणि बीड–मुंबई या दोन्ही रेल्वे सेवा बीडच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या ठरणार आहेत. त्यामुळे अनेक दशकांपासून रेल्वे कनेक्टिव्हिटीची प्रतीक्षा करणाऱ्या बीड जिल्ह्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles