एस.पी. नवनीत ची संकल्पना ठरतेय प्रभावी; ‘पोलीस आपल्या बांधावर’ने 20 वर्षांचा वाद मिटवला!

पोलीस ठाण्यात तक्रार घेण्याऐवजी पोलीस थेट शेताच्या बांधावर; कावळ्याची वाडीतील दोन भावांमध्ये समेट

बीड — शेतीच्या बांधावरून सुरू होणारे छोटे वाद पुढे मोठ्या भांडणात आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नात रूपांतरित होऊ नयेत, यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत यांनी मांडलेली ‘पोलीस आपल्या बांधावर’ ही संकल्पना आता ग्रामीण भागात प्रभावी ठरत आहे. नागरिकांच्या समस्या पोलीस ठाण्यात येण्याची वाट न पाहता थेट त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन समजून घेणे आणि संवादातून वाद मिटविणे, हा या उपक्रमाचा गाभा आहे.

या उपक्रमांतर्गत सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कावळ्याची वाडी येथे तब्बल 20 वर्षांपासून सुरू असलेल्या दोन भावांमधील शेतीच्या बांधाचा वाद अखेर मिटविण्यात आला.

याप्रकरणी Public NC No. 247/2026 आणि 248/2026 दाखल झाल्यानंतर सिरसाळा पोलिसांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शेतीचा बांध नुकसानग्रस्त करण्यात आल्याचे तसेच बांधावरील दगड तक्रारदाराच्या शेतात टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले.

यानंतर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी दोन्ही पक्षांशी प्रत्यक्ष संवाद साधला. दोन्ही भावांची बाजू ऐकून घेत वादाची पार्श्वभूमी समजून घेण्यात आली. केवळ कारवाई करण्याऐवजी संवाद, समन्वय आणि कायदेशीर मार्गाचा आधार घेत दोन्ही पक्षांमध्ये तोडगा काढण्यात आला. परिणामी गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेला शेतीच्या बांधाचा वाद अखेर संपुष्टात आला.

नवनीत यांच्या संकल्पनेचा उद्देश काय?

ग्रामीण भागात शेतीची हद्द, बांध, शेतातील वाट, पाण्याचा वापर किंवा अन्य शेतीविषयक कारणांवरून वाद निर्माण होतात. अनेकदा हे वाद वर्षानुवर्षे सुरू राहतात आणि किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होण्याची शक्यता असते.

हीच बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नवनीत यांनी ‘पोलीस आपल्या बांधावर’ ही नागरिककेंद्री संकल्पना पुढे आणली. या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांच्या समस्या त्यांच्या ठिकाणी जाऊन समजून घ्याव्यात, वाद वाढण्यापूर्वी त्यावर संवादातून तोडगा काढावा आणि गावातील शांतता अबाधित ठेवावी, हा या उपक्रमामागील हेतू आहे.

पोलिसांचा थेट बांधावर संवाद; दोन दशकांचा वाद संपला

कावळ्याची वाडीतील प्रकरण हे या संकल्पनेचे प्रत्यक्ष उदाहरण ठरले आहे. 20 वर्षांपासून सुरू असलेला वाद पोलिसांनी शेताच्या बांधावर जाऊन दोन्ही पक्षांशी चर्चा करून मिटवला. त्यामुळे संबंधित कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून भविष्यात या वादातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही टळली आहे.

‘पोलीस आपल्या बांधावर’च्या माध्यमातून पोलीस आणि ग्रामीण नागरिकांमधील संवाद अधिक मजबूत करण्याबरोबरच शेतीविषयक वाद वेळीच सोडविण्यावर भर दिला जात आहे. पोलीस अधीक्षक नवनीत यांच्या या संकल्पनेची अंमलबजावणी ग्रामीण भागात अशाच पद्धतीने प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न बीड जिल्हा पोलिसांकडून सुरू आहे.

वाद झाला तर कायदा हातात घेऊ नका!

शेतजमिनीची हद्द, बांध, वाट, पाणी अथवा अन्य कारणांवरून वाद निर्माण झाल्यास नागरिकांनी परस्पर भांडण करून परिस्थिती चिघळवू नये. कायदा हातात न घेता पोलिसांशी संपर्क साधावा आणि ‘पोलीस आपल्या बांधावर’ या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीड जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles