Home Blog Page 189

सावधान!जिल्ह्यात कायद्याचं “अविनाशी”राज्य; हवाला रॅकेटचं कंबरड मोडलं

0

बीड — पोलीस अधीक्षक बारगळ यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यात कायद्याचं “अविनाशी“राज्य असल्याचं दाखवून द्यायला सुरुवात केली आहे. आज पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून 26 लाखाची रोकड जप्त करत हवाला रॅकेटचं कंबरड मोडण्यात यश मिळवलं.

बीड शहरात मोठ्या प्रमाणात हवाला व्यवहार चालत असून मोठी आर्थिक उलाढाल या मार्फत होत असते अशी खात्रीशीर माहिती पोलीसांना मिळाली होती. यामुळे अशा व्यवहारांना चाप लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचे आदेशावरून खास पथक तयार करण्यात आले. पथकाने तीन ठिकाणी छापेमारी केली.यामध्ये छापा कबाड गल्लीमध्ये पहिला तर दुसरा छापा सारडा कॅपिटल येथे, तर तिसरा छापा जालना रोड येथील वीर हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या ठिकाणावर मारण्यात आला. तिन्ही ठिकाणाहून एकूण 26 लाख रुपये जप्त केले असून सदर पैसे कुठून आले याची सखोल चौकशी बीड शहर पोलीस करित आहेत.
पैशाची कुठलीही खात्रीशीर सुरक्षितता नसतांना, यामध्ये काही जर गैरव्यवहार झाला किंवा पैशांची चोरी झाली याबद्दल सुरक्षा नसताना अशा प्रकारचे व्यवहार होत आहे आणि यामध्ये शासनाचा महसूल बुडवणे आदी कामामुळे शासनाचे नुकसान होत आहे. यासाठी सदरील छापा हा महत्त्वाचा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी दिली.
सदरील शहरात हवाला व्यवहारावर तीन ठिकाणी छापे टाकून 26 लाखाची रोकड जप्त केली पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक,सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बाळराजे दराडे, बाबा राठोड, पोलीस उपनिरीक्षक काकरवाल, कुकलारे, राठोड, शेख, निर्धार म्हेत्रे कांबळे, परजणे, शिरसाठ यांनी केली आहे.

शाळांना नव्या नियमांचे सक्तीने करावे लागणार पालन;अध्यादेश जारी

0

मुंबई — बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे जागे झालेल्या राज्य सरकारने राज्यातील सर्वच शाळांवर नव्या नियमांचा बडगा उगारला आहे. प्रत्येक शाळांना हे नवीन नियम अनिवार्य केले आहेत.

शाळांना राज्याची मान्यता, नवीन वर्गांना मान्यता, अतिरिक्त विभाग, सर्व मंडळांना शाळा सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र, राज्य अनुदानासाठी मान्यता, अध्यापन माध्यमांमध्ये बदल आदीसाठी हे नियम बंधनकारक केले आहेत. राज्य सरकारने २४ सप्टेंबर रोजी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे.

हे आहेत नवीन नियम

सीसीटीव्ही बसवणे, तक्रार पेटी बसवणे, दर आठवड्याला तक्रार पेटी उघडणे, विद्यार्थी दक्षता समिती, प्रत्येक कर्मचाऱ्याचे चारित्र्य प्रमाणपत्र सक्तीचे, शिशुवर्ग, प्राथमिक, माध्यमिक व नववीपर्यंत विद्यार्थिनींच्या प्रसाधनगृहात महिला कर्मचाऱ्यांची मदतनीस म्हणून नियुक्ती, सखी-सावित्री समितीच्या नवीन बैठका, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी बैठका घेतात का?, विद्यार्थ्यांसाठी शाळेची स्वत:ची वाहतूक व्यवस्था,वाहनांना जीपीएस नेटवर्क व पॅनिक बटण आहे का?, खासगी बसमध्ये महिला सहाय्यक शाळेने ठेवल्या का?, शाळेच्या वाहतूक समितीच्या बैठका नियमित होतात का? शाळांकडे आधार कार्डवर आधारित वर्गनिहाय यादी आहे का?, स्कूलबसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी ठेवू नयेत, असे सरकारने शाळांना बजावले आहे. शाळांनी चालक व त्यांच्या सहाय्यकांमध्ये जनजागृती करावी, आदी विविध नियमांची यादीच सरकारने जारी केली आहे.

आ.क्षीरसागरांनी घेतली जलसंधारण, जलसंपदा, जलजीवन व पाटबंधारे विभागाची बैठक

0

प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना

बीड — बीड मतदारसंघात जलसंधारण, जलसंपदा, जलजीवन मिशन विभागाशी संबंधित कामांच्या बाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी सदरील विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध सूचना दिल्या. तसेच फुलसांगवी येथील आंदोलनच्या अनुषंगाने जिल्हा जलसंधारण अधिकारी व जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निर्देश दिले.
बीड मतदारसंघातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत. परंतु ही कामे अनेक ठिकाणी प्रलंबित आहेत. तसेच मतदारसंघात जलसंधारण, जलसंपदा विभाग यांच्याशी संबंधित नागरीकांच्या काही अडचणी आणि मागण्या होत्या याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.२४) रोजी बीडमध्ये शासकीय विश्रामगृह येथे जलसंधारण, जलसंपदा, पाटबंधारे विभाग, जलजीवन मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी नागरिकांच्या समोरच अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यासोबतच बीड मतदारसंघ क्षेत्रात शिरूर-कासार तालुक्यातील फुलसांगवी व इतर गावातील ग्रामस्थांचे काही दिवसांपूर्वी जलसंधारण विभागाशी संबंधित कामांच्या अनुषंगाने आंदोलन सुरू होते. या आंदोलनातील मागण्या मार्गी लावण्यासाठी आ.क्षीरसागर यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी‌ व जायकवाडी पाटबंधारे प्रकल्प कार्यकारी अभियंता तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना सूचना दिल्या. या बैठकीसाठी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित नागरिक, शेतकरी बांधव उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटलांचे उपोषण नवव्या दिवशी स्थगित !

0

अंतरवली सराटी — आरक्षणाची मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 16 सप्टेंबरपासून उपोषणाला सुरूवात केलं होतं. मात्र, नवव्या दिवशी कोर्टानं उपचार घेण्याचे आदेश दिल्यामुळे जरांगेंनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली.

गावातील महिला आणि नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत जरांगे यांनी पाणी पित उपोषण सोडलं. ‘त्यांच्या हाताने त्यांनी सरकार पाडून घेऊ नये, मी त्यांना जाहीरपणे सांगतो’ असा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला. जर आरक्षण दिलं नाही, सगळ्या मागण्या मंजूर नाही केल्या तर माझ्या नावाने बोंबलत बसायचं नाही आणि मला विचारायचं नाही की 2024 ला पाडापाडी कशामुळे ही झाली हे मला विचारायचं नाही. आता सत्तेत बसून आरक्षण घेणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान; राजाभाऊ फड करणार शरद पवार गटात प्रवेश

0

बीड – लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार दणका दिला. त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार सिद्ध झाले आहेत.

महायुतीत परळी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अजित पवार यांचे अतिशय जवळचे आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असणार याची कित्येक दिवसांपासून उत्सूकता आहे.

अजित पवार गटाकडून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे परळीत मोठे आव्हान शरद पवार गटासमोर असणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यामुळे शरद पवार गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र धनंजय मुंडेंना टक्कर देणारा उमेदवार मैदानात उतरवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.

बीड मधील परळीच्या जागेसाठी अनेक जण इच्छूक आहेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे. राजाभाऊ फड उद्या (बुधवार) मुंबईत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. राजाभाऊ हे परळीचे आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. परळी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ते इच्छूक आहेत. शरद पवारांनी पाठीवर हात ठेवण्याची फक्त ते वाट पाहात असल्याचे सांगितले जाते. राजाभाऊ फड यांचा परळी विधानसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. रासपच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची फळीही त्यांची तयार आहे.

लोकसभा निवडणूक निकालाने महाविकास आघाडीमध्ये इच्छूकांची भाऊगर्दी आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, बबन गित्ते, सुदामती गुट्टे यांची देखील निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्यामुळे उद्या प्रवेश होणारे राजाभाऊ फड हे उमेदवार असणार की, महाविकास आघाडीतील जुण्या नेत्यांना संधी मिळणार,यासंबंधी शरद पवार काय उलटफेर करतात ते पाहावे लागेल.

मल्टीस्टेट घोटाळ्याचा आरोपी बबन शिंदे ची मथुरा पाण्यात; वृंदावन मध्ये पकडला

0

बीड — जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेटच्या घोटाळ्याचा प्रमुख आरोपी असलेला बबन शिंदे यास बीड पोलिसांना पकडण्यात यश आले आहे.उत्तर प्रदेशमधील मथुरा वृंदावन परिसरातून बबन शिंदेला अटक करण्यात आली आहे. जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून बबन शिंदे पोलिसांना चकमा देत फरार होता.

बीडमध्ये जिजाऊ मॉ साहेब मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी बीड जिल्ह्यात 3 तर धाराशिव जिल्ह्यात 2 गुन्हे बबन शिंदे याच्या विरोधात दाखल आहेत. मुख्य आरोपी असलेला बबन शिंदे गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून फरार झाला होता. गुन्हे दाखल असल्यापासून पोलीस त्याचा ठिकठिकाणी शोध घेत होते. सिम कार्ड बदलत राहण्याची ठिकाणे देखील बदलल्याने पोलिसांना त्याला पकडण्यात अपयश येत होते.मात्र पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यावरून पडताळणी केल्यानंतर बबन शिंदे हा मथुरा वृंदावन भागामध्ये वेश बदलून राहत असल्याचे दिसून आले. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफिने शिंदे ला पकडले.

मनोज जरांगे यांची प्रकृती बनली नाजूक;आरोग्य तपासणीस नकार

0

जालना — मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अन्न, पाणी, औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.

आज (दि.२४) सकाळी त्यांनी आरोग्य पथकातील डॉक्टरांना तपासणी करण्यास नकार दिला. त्यामुळे समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

डॉक्टरांचे पथक तपासणी न करता परत गेले. तर दुपारच्या सत्रातील आरोग्य पथक आरोग्य तपासणी करू द्या, अशी विनंती करत होते. मात्र, तपासणीसाठी जरांगे यांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे आता त्यांचा बीपी किती आहे? शुगर किती आहे? ताप किती आहे? पल्स किती आहेत? याबाबत मराठा समाजासह सर्वांच्या मनात धाकधूक वाढली आहे. आंदोलक महिलांकडून जरांगे यांना पाणी आणि आरोग्य तपासणी करून उपचार घेण्याची विनंती केली.आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. महिलांच्या डोळ्यात अश्रू असून पोटतिडकीने त्या उपोषण मागे घेण्याची विनंती करीत आहेत. परंतु मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत
मराठा आंदोलक संतप्त झालेले असून वडीगोद्री येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. दुसरीकडे बीडमध्ये तर एसटी प्रशासनाने बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलक संतप्त असून सरकारने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
जरांगे यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आज सकाळी ९ वाजता जिल्हा आरोग्यपथक व्यासपीठावर दाखल झाले. केवळ बीपी तपासणी तरी करून देण्याची विनंती आरोग्य पथकातील डॉक्टरांनी केली. मात्र, त्यांनी त्यास विरोध केला. दरम्यान, उपोषणाच्या सातव्या दिवशी सोमवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास जरांगे बाथरूममध्ये जात असताना भोवळ येवून कोसळले होते. त्यांचा बीपी कमी झाला होता. मात्र, उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला होता.

रेल्वे मार्गाच्या अडचणींसंदर्भात आ.क्षीरसागरांनी घेतली बैठक

0

तक्रारी असलेल्या मार्गावर तात्काळ पाहणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना

बीड — बीड मतदारसंघातुन जाणाऱ्या रेल्वे मार्गावर नागरिकांना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. रेल्वे मार्गाच्या कामात अनेक त्रुटी असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच काही ठिकाणी अपघात होत आहेत. या भागातील नागरिकांनी यासंदर्भात अनेकवेळा रेल्वे विभागाशी अनेकवेळा संपर्क केला आहे. परंतु रेल्वेकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद नागरिकांना मिळाला नाही. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवार (दि.२३) रोजी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्यक्ष, सविस्तर चर्चा करून तक्रारी असलेल्या ठिकाणांची तात्काळ पाहणी करून येथील अडचणी दूर करण्यासंदर्भात सत्वर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
बीड मतदारसंघातून नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग मोठ्या प्रमाणात गेलेला आहे. याचे कामही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. परंतु या कामांमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे पुलांच्या खाली पावसामुळे नेहमीच खूप जास्त पाणी साचून राहते. त्यामुळे येथून वाहतूक करणे अवघड होते. ऊस वाहतूक करणारी वाहने याठिकाणाहून जाऊ शकत नाही. वाहतुकीची अडचण होत असल्याने या परिसरात रहिवाशी असलेले १५ ते २० हजार लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी रोड तिरका झाल्याने अपघात होत आहेत. या होत असलेल्या अडचणींमुळे येथील नागरिकांनी आतापर्यंत रेल्वे विभागाकडे अनेकवेळा संपर्क केला. परंतु नागरिकांना याबाबत रेल्वेकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२३) शासकीय विश्रामगृह, बीड येथे रेल्वे विभागाचे संबंधित अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या अडचणी संदर्भात अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून अडचणी दूर करण्यासाठी संबंधित ठिकाणच्या प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय स्तरावर तात्काळ कार्यवाही सुरु करण्याच्या सूचना आ.क्षीरसागर यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीस आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम, रेल्वे विभागाचे सर्व संबंधित अधिकारी व या भागातील नागरिक उपस्थित होते.

पत्रकार रवी उबाळे यांना पितृशोक; सुरेश उबाळे यांचे निधन

0

बीड — एस.टी. महामंडळ बीड आगार येथील सेवावृत्त वाहतूक नियंत्रक सुरेश उबाळे यांचे अल्पशा आजाराने सोमवारी दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १ .५५ वाजता उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मंगळवारी दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता शहरातील अमरधाम मोंढा रोड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उबाळे कुटुंबीयांच्या दुखात “सह्याद्री माझा” परिवार सहभागी आहे.

केज मध्ये भर दिवसा विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न!

0

केज — शहरातील मुख्य रस्त्यावर सोनार गल्लीत चार चाकी मधून आलेल्या तिघांनी शाळेत चाललेल्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही तरुणांनी हा प्रयत्न हाणून पाडला. अपहरण करणारा एक जण हाती लागला असून दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

पकडलेल्या त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले असून नेमका हा प्रकार काय ? हे तपासातून समोर येईल. मेन रोडने सकाळी १० च्या सुमारास एक विद्यार्थी सोनार गल्लीतून शाळेला जात होता. त्यावेळी अचानक एक चारचाकी वाहन आले. ते वाहन मुलाजवळ येऊन थांबले काही समजण्याच्या आत अकरा वर्षे वयाच्या विद्यार्थ्याला उचलून वाहनात टाकण्याचा प्रयत्न केला असता घडलेल्या या अनुचित प्रकाराने विद्यार्थी घाबरुन ओरडू लागला हे पाहून बाजुला उभी असलेल्या महिलेनेही आरडाओरडा केली.यावेळी नागरिकांनी धाव घेतली तर दोघांनी दुचाकी चारचाकीच्या समोर लावली असता त्यांना पळता आले नाही. परंतु झटापटीत दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले तर एकजण जमावाच्या हाती लागला. त्यास जमावाने चांगलाच चोप दिला. दरम्यान पकडलेला आरोपी हा गेल्या चार-पाच दिवसापासून पाळतीवर असल्याचं विद्यार्थ्याच्या पालकानी म्हटलं आहे.
भरदिवसा रहदारीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने केज शहरात खळबळ उडाली आहे. या पकडलेल्या एका अपहरणकर्त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा प्रकार नेमका काय ? हे पोलीस तपासात निष्पन्न होईल. पण शहरात मूल चोरणारी टोळी पकडल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मात्र पोलिसांनी हा सिंधी विकणारा असून मुलं चोरणारा नसल्याचं खाजगीत सांगत असल्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केज पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.