परळी — येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी येथे आणलेले व गेल्या 30 वर्षापासून सुरू असलेले पाटबंधारे प्रकल्पाचे सर्कल कार्यालय आता परभणी येथे स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
सर्कल कार्यालयाच्या माध्यमातून बीड, लातूर आणि परभणी या तीन जिल्ह्यांतील पाटबंधारे प्रकल्पांचा कारभार चालवला जातो. परळी हे तिन्ही जिल्ह्यांच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण असल्याने प्रशासन, शेतकरी आणि संबंधित अधिकाऱ्यांसाठी हे कार्यालय परळीत असणे अत्यंत सोयीचे मानले जात होते. मात्र, असे असतानाही प्रशासकीय आस्थापना पुनर्रचनेच्या नावाखाली हे कार्यालय परळीतून हटवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप होत आहे.काही दिवसांपूर्वीच परळीतील लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरित करण्यात आले होते. त्यानंतर आता पाटबंधारे सर्कल कार्यालयही परळीतून हलवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने परळीचे प्रशासकीय महत्त्व जाणीवपूर्वक कमी केले जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
पाटबंधारे विभागाचे कार्यालय इथून हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याआधी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे यांनी हे कार्यालय येथेच थांबवण्याचा प्रयत्न केला. पाटबंधारेचे सर्कल ऑफिस हलवण्यात येणार असल्याने परळीचे प्रशासकीय महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप होऊ लागला आहे. दरम्यान पाटबंधारे विभागाचे सर्कल ऑफिस पळवण्यात येत असल्यामुळे खळबळ माजली आहे.











