धनंजय मुंडे पुढे नवे संकट; ईडी चौकशीसाठी उच्च न्यायालयात याचिका!
मंत्री धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोलात गेले असून मुंडे यांच्या मालकीच्या अनेक शेल कंपन्या आहेत. खंडणीची रक्कम त्यांनी वळती केल्याचा गंभीर आरोप करीत या प्रकरणाचा थेट तपास उच्च न्यायाल्याच्या देखरेखेखाली करावा. त्यासोबतच याचा तपास समांतर ईडीने देखील करावा, यासाठी या प्रकरणी थेट हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
नकली सोन्याची दोन बिस्किट रस्त्यावर टाकून महिलेला लूटले;आरोपी पकडला
बीड — नकली सोन्याची दोन बिस्किट रस्त्यावर टाकून वयस्कर महिलेच्या अंगावरील दागिने लुटण्याची घटना अंबाजोगाईत घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एका आरोपीला अटक करून कानातील झुंबर हस्तगत करण्यात यश मिळवले.
अंबाजोगाईच्या बस स्थानकात वयस्कर महिलेस समोर सोन्याची नकली बिस्किट एका चोरट्याने रस्त्यावर टाकली. त्यानंतर तिथे दुसरा आरोपी आला त्याने स्वतः जवळची डुप्लिकेट अंगठी पहिल्याला दिली तसेच त्याच्याकडून सोन्याचे बिस्किट घेतले त्याच वेळी महिलेला सोन्याचे बिस्किट देतो असे आमिष दाखवून तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले त्या बदल्यात सोन्याचे बिस्किट दिले मात्र हे बिस्किट बनावट असल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने पोह महेश जोगदंड, जफर पठाण यांना महिलेचे दागिने लुटणारा आरोपी आडस फाटा येथे आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला जेरबंद केले. सतीश शिवाजी जाधव वय 34 वर्ष रा. भातखेडा तालुका जिल्हा लातूर याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता मित्र बालाजी गायकवाड यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे झुंबर जप्त केले असून आरोपी बालाजी गायकवाड हा अद्याप फरार आहे.
पदोन्नती करूनच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे –आ.संदीप क्षीरसागर
शिक्षक संघटनांकडून आमरण उपोषणाचा इशारा
बीड — बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सन २०२३-२४ च्या संच मान्यतेच्या आधारे अतिरिक्त शिक्षक समायोजन करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. परंतु पदोन्नती न करताच शिक्षकांचे समायोजन करणे हे शिक्षक बंधू-भगिनींवर अन्यायकारक ठरणार आहे त्यामुळे अगोदर पदोन्नतीची प्रक्रिया राबवून नंतरच समायोजन करावे अशी विनंती आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे केली आहे. दरम्यान पदोन्नती न करताच समायोजन केल्यास गुरूवार (दि.३०) रोजी पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिक्षक संघटनांकडून देण्यात आला आहे.
दि.२८ जानेवारी २०२५ रोजी बीड जिल्हा परिषदेकडून शिक्षकांच्या समायोजनाबाबत आदेश काढण्यात आला असून दि.३१ जानेवारी २०२५ रोजी शिक्षक समायोजन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. परंतु सदरील समायोजन प्रक्रिया ही पदोन्नती प्रक्रिया न करताच करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षिका बांधवांवर अन्यायकारक ठरणार आहे. सन २०२३-२४ च्या संचमान्यतेच्या आधारे बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग यावेळी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणार आहे. परंतु मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षकांची पदोन्नती अगोदर केल्यास सहशिक्षकांची पदे रिक्त होतील जेणेकरून अतिरिक्त शिक्षकांना समायोजनासाठी जागा उपलब्ध होतील आण त्यांच्यावर समायोजनाबात कुठलाही अन्याय होणार नाही. परंतु शिक्षण विभागाकडून घाई घाईने पदोन्नती न करताच समायोजन करण्याचा घाट घातल्याने जिल्ह्यातील अनेक शिक्षक-शिक्षिका बांधवांवर अन्याय होईल. त्यामुळे दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी होणारी समायोजन प्रक्रिया स्थगित करून अगोदर मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक यांची पदोन्नती करण्यात यावी अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
यंत्राच्या मदतीने माणसाच्या हृदयाची धडधड; जीवदान देणारा प्रयोग यशस्वी
नवी दिल्ली — आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात सर्व काही शक्य आहे. देशात पहिल्यांदाच मानवामध्ये ‘यांत्रिक ह्रदय’ यशस्वीरित्या बसवण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. होय, चकित झालात ना… एका महिला रुग्णामध्ये यांत्रिक हृदय बसवून नवीन जीवनदान देण्यात आले.
दिल्ली कॅन्टमधील आर्मी हॉस्पिटलने पहिल्यांदाच लेफ्ट वेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस (LVAD) बसवून इतिहास रचला. ही प्रक्रिया हार्टमेट 3 डिव्हाइस वापरुन करण्यात आली. हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यातील रुग्णांसाठी हे डिव्हाइस वरदानापेक्षा कमी नाही, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. महिला रुग्णामध्ये यांत्रिक हृदय बसवून एका निवृत्त सैनिकाची पत्नी असलेल्या 49 वर्षीय महिलेला जीवनदान देण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून त्या हृदय प्रत्यारोपणाचा प्रतिक्षेत होत्या.
मानवांमध्ये यांत्रिक हृदय कसे कार्य करते?
तज्ञांनी सांगितले की, महिला रुग्णाच्या डाव्या वेंट्रिकलने ब्लड पंप करणे जवळजवळ बंद केले होते. तिचा जीव वाचवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे हृदय प्रत्यारोपण होते. मात्र, हार्टमेट डिव्हाइसच्या मदतीने ब्लड पंपिंग पूर्ववत करता आले. तिचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयाने हे करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, इम्प्लांटेशननंतर महिलेला हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता भासणार नाही कारण हे डिव्हाइस दीर्घकाळ काम करेल आणि तिला निरोगी ठेवेल.
रुग्णाची प्रकृती आता कशी आहे?
यांत्रिक हृदय शस्त्रक्रियेनंतर, महिला रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. लवकरच त्या ठणठणीत होतील असेल डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. आर्मी हॉस्पिटल (आर अँड आर) मधील तज्ञ डॉक्टरांच्या टीमची ही महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे. यामुळे भविष्यात हृदय उपचारांसाठी अनेक पर्याय खुले होऊ शकतात.
यांत्रिक हृदय आधीपासून जगभरात वापरात आहे का?
भारतात पहिल्यांदाच यांत्रिक हृदय बसवण्यात आले आहे. तथापि, असे प्रयोग यापूर्वी जागतिक स्तरावर केले गेले आहेत. हे डिव्हाइस अमेरिकेसह अनेक देशांमध्ये आधीपासून वापरले जात आहे. जगभरातील 18,000 हून अधिक लोकांमध्ये हे डिव्हाइस बसवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ते पूर्णपणे ठणठणीत आहेत. हे डिव्हाइस सर्व वापरकर्त्यांसाठी चांगले काम करत आहे.












