Home Blog Page 139

धनंजय मुंडे पुढे नवे संकट; ईडी चौकशीसाठी उच्च न्यायालयात याचिका!

0

मुंबई — संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या हितसंबंधावरून राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच उच्च न्यायालयात आणखी एक याचिका धनंजय मुंडे विरोधात दाखल करण्यात आली आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोलात गेले असून मुंडे यांच्या मालकीच्या अनेक शेल कंपन्या आहेत. खंडणीची रक्कम त्यांनी वळती केल्याचा गंभीर आरोप करीत या प्रकरणाचा थेट तपास उच्च न्यायाल्याच्या देखरेखेखाली करावा. त्यासोबतच याचा तपास समांतर ईडीने देखील करावा, यासाठी या प्रकरणी थेट हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
शेल कंपन्यात गुंतवणूक करण्यात आलेली रक्कम कुठून आली, याचा तपास करण्यात यावा, या प्रकरणी मनी लाँडरिंग झाला असल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आला आहे. परळी येथील व्यंकटेश्वरा सेल्स इंडस्ट्रियल प्रा. लि. मध्ये धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे व वाल्मिक कराड व अन्य काही व्यक्ती संचालक आहेत. एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या प्रकरणाचा तपास थेट उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा आणि सक्तवसुली संचालनालयानेही समांतर तपास करावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. योग्य तपास झाल्यास मंत्र्यावर मकोका अंतर्गत कारवाई होऊ शकते, असेही याचिकेत म्हटले आहे.
या प्रकरणी आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली असून, त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या याचिकेत बीडच्या पोलीस अधीक्षकांना तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, तसेच निवडणूक आयोगाला ही याचिका आणि धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगापुढे दाखल केलेले प्रतिज्ञापत्र पडताळून कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या याचिकेवरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.व्यंकटेश्वर इंडस्ट्रियलच्या कार्यालयात वाल्मीक कराडचे बेकायदा धंदे सुरू असतात. तेथूनच त्याने आवादा या पवनऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून दोन कोटी रुपयांची लाच मागितली. या कंपनीचे संचालक धनंजय मुंडें आहेत. जगमित्र साखर कारखान्याचेही संचालक वाल्मीक कराड, धनंजय मुंडे व अन्य काही जण असून, या कारखान्याच्या कार्यालयाची जागा धनंजय मुंडे यांच्या नावावर खरेदी करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.
याबरोबरच दुसरीकडे उच्च न्यायालयात काही दिवसापूर्वीच धनंजय मुंडे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन निवडणूक जिंकल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. करुणा शर्मांचा दावा आहे की, त्यांचे धनंजय यांच्यासोबत कायदेशीर लग्न झालेले आहे. त्यांनी याचिका दाखल करुन गंभीर आरोप मंत्री मुंडेंवर केले आहेत.
करुणा शर्मा यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी परळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज 30 ऑक्टोबर 2024 रोजी फेटाळला होता. मात्र, धनंजय मुंडे आणि इतरांचे अर्ज मंजूर केले होते. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 23 नोव्हेंबर 2024 रोजीच्या मतमोजणीनंतर घोषित केले होते.त्यानंतर करुणा शर्मा यांनी 4 जानेवारी 2024 रोजी खंडपीठात निवडणूक याचिका सादर केली आहे. आपण स्वतः 1996 मध्ये धनंजय मुंडे यांच्याशी कायदेशीर लग्न केले होते. अधिकृत पत्नी असताना धनंजय मुंडे यांनी दोन अपत्यांचा उल्लेख केला. मात्र, पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती दडवली, असल्याचे त्यांनी या याचिकेत म्हटले आहे.धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पुरावे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करीत मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरली जात आहे. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून राज्य सरकारवरील दबाव वाढवला जात आहे. संपूर्ण राज्यभर मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्याप्रकरणाचा मोर्चे काढून निषेध केला जात आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक एकवटले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नकली सोन्याची दोन बिस्किट रस्त्यावर टाकून महिलेला लूटले;आरोपी पकडला

0

बीड — नकली सोन्याची दोन बिस्किट रस्त्यावर टाकून वयस्कर महिलेच्या अंगावरील दागिने लुटण्याची घटना अंबाजोगाईत घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एका आरोपीला अटक करून कानातील झुंबर हस्तगत करण्यात यश मिळवले.

अंबाजोगाईच्या बस स्थानकात वयस्कर महिलेस समोर सोन्याची नकली बिस्किट एका चोरट्याने रस्त्यावर टाकली. त्यानंतर तिथे दुसरा आरोपी आला त्याने स्वतः जवळची डुप्लिकेट अंगठी पहिल्याला दिली तसेच त्याच्याकडून सोन्याचे बिस्किट घेतले त्याच वेळी महिलेला सोन्याचे बिस्किट देतो असे आमिष दाखवून तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले त्या बदल्यात सोन्याचे बिस्किट दिले मात्र हे बिस्किट बनावट असल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने पोह महेश जोगदंड, जफर पठाण यांना महिलेचे दागिने लुटणारा आरोपी आडस फाटा येथे आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला जेरबंद केले. सतीश शिवाजी जाधव वय 34 वर्ष रा. भातखेडा तालुका जिल्हा लातूर याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता मित्र बालाजी गायकवाड यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे झुंबर जप्त केले असून आरोपी बालाजी गायकवाड हा अद्याप फरार आहे.

पदोन्नती करूनच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे –आ.संदीप क्षीरसागर 

0

 शिक्षक संघटनांकडून आमरण उपोषणाचा इशारा

बीड — बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सन २०२३-२४ च्या संच मान्यतेच्या आधारे अतिरिक्त शिक्षक समायोजन करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. परंतु पदोन्नती न करताच शिक्षकांचे समायोजन करणे हे शिक्षक बंधू-भगिनींवर अन्यायकारक ठरणार आहे त्यामुळे अगोदर पदोन्नतीची प्रक्रिया राबवून नंतरच समायोजन करावे अशी विनंती आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केली आहे. दरम्यान पदोन्नती न करताच समायोजन केल्यास गुरूवार (दि.३०) रोजी पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिक्षक संघटनांकडून देण्यात आला आहे.
दि.२८ जानेवारी २०२५ रोजी बीड जिल्हा परिषदेकडून शिक्षकांच्या समायोजनाबाबत आदेश काढण्यात आला असून दि.३१ जानेवारी २०२५ रोजी शिक्षक समायोजन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. परंतु सदरील समायोजन प्रक्रिया ही पदोन्नती प्रक्रिया न करताच करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षिका बांधवांवर अन्यायकारक ठरणार आहे. सन २०२३-२४ च्या संचमान्यतेच्या आधारे बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग यावेळी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणार आहे. परंतु मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षकांची पदोन्नती अगोदर केल्यास सहशिक्षकांची पदे रिक्त होतील जेणेकरून अतिरिक्त शिक्षकांना समायोजनासाठी जागा उपलब्ध होतील आण त्यांच्यावर समायोजनाबात कुठलाही अन्याय होणार नाही. परंतु शिक्षण विभागाकडून घाई घाईने पदोन्नती न करताच समायोजन करण्याचा घाट घातल्याने जिल्ह्यातील अनेक शिक्षक-शिक्षिका बांधवांवर अन्याय होईल. त्यामुळे दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी होणारी समायोजन प्रक्रिया स्थगित करून अगोदर मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक यांची पदोन्नती करण्यात यावी अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

यंत्राच्या मदतीने माणसाच्या हृदयाची धडधड; जीवदान देणारा प्रयोग यशस्वी

0

नवी दिल्ली — आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात सर्व काही शक्य आहे. देशात पहिल्यांदाच मानवामध्ये ‘यांत्रिक ह्रदय’ यशस्वीरित्या बसवण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. होय, चकित झालात ना… एका महिला रुग्णामध्ये यांत्रिक हृदय बसवून नवीन जीवनदान देण्यात आले.

दिल्ली कॅन्टमधील आर्मी हॉस्पिटलने पहिल्यांदाच लेफ्ट वेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस (LVAD) बसवून इतिहास रचला. ही प्रक्रिया हार्टमेट 3 डिव्हाइस वापरुन करण्यात आली. हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यातील रुग्णांसाठी हे डिव्हाइस वरदानापेक्षा कमी नाही, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. महिला रुग्णामध्ये यांत्रिक हृदय बसवून एका निवृत्त सैनिकाची पत्नी असलेल्या 49 वर्षीय महिलेला जीवनदान देण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून त्या हृदय प्रत्यारोपणाचा प्रतिक्षेत होत्या.

मानवांमध्ये यांत्रिक हृदय कसे कार्य करते?

तज्ञांनी सांगितले की, महिला रुग्णाच्या डाव्या वेंट्रिकलने ब्लड पंप करणे जवळजवळ बंद केले होते. तिचा जीव वाचवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे हृदय प्रत्यारोपण होते. मात्र, हार्टमेट डिव्हाइसच्या मदतीने ब्लड पंपिंग पूर्ववत करता आले. तिचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयाने हे करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, इम्प्लांटेशननंतर महिलेला हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता भासणार नाही कारण हे डिव्हाइस दीर्घकाळ काम करेल आणि तिला निरोगी ठेवेल.
रुग्णाची प्रकृती आता कशी आहे?

यांत्रिक हृदय शस्त्रक्रियेनंतर, महिला रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. लवकरच त्या ठणठणीत होतील असेल डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. आर्मी हॉस्पिटल (आर अँड आर) मधील तज्ञ डॉक्टरांच्या टीमची ही महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे. यामुळे भविष्यात हृदय उपचारांसाठी अनेक पर्याय खुले होऊ शकतात.
यांत्रिक हृदय आधीपासून जगभरात वापरात आहे का?

भारतात पहिल्यांदाच यांत्रिक हृदय बसवण्यात आले आहे. तथापि, असे प्रयोग यापूर्वी जागतिक स्तरावर केले गेले आहेत. हे डिव्हाइस अमेरिकेसह अनेक देशांमध्ये आधीपासून वापरले जात आहे. जगभरातील 18,000 हून अधिक लोकांमध्ये हे डिव्हाइस बसवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ते पूर्णपणे ठणठणीत आहेत. हे डिव्हाइस सर्व वापरकर्त्यांसाठी चांगले काम करत आहे.

पोलीस ठाण्याच्या आवारातच गोरक्षकाला बेदम मारहाण

0

बीड — कत्तलीसाठी गाई घेऊन जाणाऱ्यांना विरोध केल्याच्या कारणावरून गोरक्षकाला पोलीस ठाण्याच्या आवारातच बेदम मारहाण केल्याची घटना चकलांबा येथे घडली. मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी यासाठी गाव बंद ठेवून आंदोलन करण्यात आले.

चकलांबा येथील गोरक्षक गोपाल मधुकर उनवणे वय 24 वर्षे रा.चकलांबा यास दि. 27 जानेवारी रोजी रात्री 10 ते 15 समाजकंटकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे या तरुणाचा जीव वाचला. पोलीस आल्याचे पाहिल्यानंतर मारहाण करणारे तरुण तिथुन निघून गेले. गोपाळ उनवणे याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिहाण सय्यद, पिंटू सय्यद, अफसर चंदू शेख, असलम मेहबुब कादरी यांचसह 10 ते 15 जणांनी शिवीगाळ करत जबर मारहाण केली. रिहाण सय्यद याने खाली पडलेला दगड हातात धरुन डोक्यावर मारला. ओरडण्याचा आवाज ऐकुन लगेच पोलीस स्टेशन चकलांबा येथील पोलीस पळत आल्याने वरील लोक पोलीसांना पाहून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. उनवणे यांना डोळ्याजवळ मोठी जखम झाल्याने पोलिसांनी उपचारासाठी उनवणे यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.मारहाण करणाऱ्या वरील लोकांविरुध्द तक्रार दिली असून पुढील तपास चकलांबा पोलिस करत आहेत. गोरक्षकावर झालेल्या हल्ल्यामुळे चकलांबा गावात आरोपींना अटक करण्यात यावी यासाठी गावात कडकडीत पाळून पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले.

… तर एप्रिल मे मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार?

0

मुंबई –विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. एकीकडे ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. तर राज्यातील इतर पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

दरम्यान, आज गेल्या 4 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात सुनावणी पार पडली.

सर्वाच्च न्यायालयात आज 23 व्या नंबरवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ओबीसी आरक्षण यांच्यातील याचिकेवर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पुन्हा एका तारीख पे तारीख. राज्य सरकारच्या वतीने तुषार मेहता यांनी बाजू मांडली. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी नवी तारीख दिली असून पुढील सुनावणी २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यातच, आज न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात काही जणांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला ओबीसी आरक्षण असो की नसो पण निवडणुका व्हाव्यात अशी मागणी या याचिकाकर्त्यांनी केली.

या प्रकरणी आज सुनावणी झाली असून न्यायालयाने 25 फेब्रुवारी ही नवी तारीख दिली आहे. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी काही काळ पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार, जर 25 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीत स्थगिती उठल्यास एप्रिल-मे मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं या निवडणुकांच्या भविष्यासाठी 25 फेब्रुवारी ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

राज्यातील 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळणार बूस्टर डोस

0

उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध विषयांवर बैठकीचे आयोजन

मंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीवरून बैठकीचे आयोजन, सहकारमंत्री यांच्यासह मंत्री पंकजाताई मुंडे राहणार उपस्थित

मुंबई — मागील काही वर्षांपासून अडचणीत असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला आर्थिक मदत करून गतवैभव प्राप्त करून देण्याच्या अनुषंगाने बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध विषयांवर बुधवारी (ता.२९) रोजी सकाळी ११.१५ वा. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार विभागाने बैठकीचे आयोजन केले आहे.

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला आर्थिक मदत करून गतवैभव प्राप्त करून देणे त्याचबरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला कर्ज पुरवठा करणे यांसह विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होऊन जिल्हा बँकेला बूस्टर डोस मिळणे अपेक्षित आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीवरून या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीस सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांसह नियोजन व सहकार विभगाचे वरिष्ठ अधिकारी तसेच व्हिसी द्वारे बीड जिल्हाधिकारी आणि जिल्हा बँकेचे प्रशासकीय मंडळ उपस्थित राहणार आहेत.

मागील काही वर्षांपासून अडचणीत असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला या बैठकीच्या माध्यमातून आर्थिक बूस्टर मिळण्याची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. दरम्यान बीड सोबतच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या देखील विविध विषयांवर याच बैठकीत चर्चा होणार आहे.

बीडच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आ.क्षीरसागर अजितदादांकडे

0

तातडीने कार्यवाही करण्याचे प्रधान सचिवांना अजितदादांचे निर्देश

बीड — बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याचसंदर्भात मंगळवारी (दि.२८) रोजीही आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांची भेट घेतली. यावर अजितदादांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.


मुबलक प्रमाणाय पाणीसाठा उपलब्ध असून देखील बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. पंधरा-पंधरा दिवसांतून एकदा पाणी बीड शहरवासीयांना मिळत आहे. याचे कारण म्हणजे सध्या जी पाणीपुरवठ्याची योजना कार्यरत आहे ती अपुरी पडत आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीनुसार पुरेशी असणारी अमृत अटल योजना काम पूर्ण होऊन उपलब्ध देखील आहे. परंतु बीड नगरपालिकेकडे ३६ कोटी रूपयांचे वीजबिल थकलेले असल्याने महावितरण विभाग या नवीन पाणीपुरवठा योजनेला वीज कनेक्शन देत नाही. परिणामी पाणी आणि योजना हे दोन्ही उपलब्ध असताना बीडकरांना पाण्यासाठी पंधरा-पंधरा दिवस वाट पहावी लागते. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आणि तो आताही सुरूच आहे. आ.क्षीरसागर यांनी अनेक वेळा अधिवेशनात हा प्रश्न मांडला आहे. अनेकवेळा सरकारदरबारी मंत्री महोदयांकडे बैठका घेऊन हा प्रश्न लावण्यासाठी विनंती केली आहे. यासोबतच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडेही याबाबतच्या बैठका घेऊन यात मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शेवटी या विषयात आ.संदीप क्षीरसागर यांनी माजी आ.सय्यद सलीम यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल केली होती.
आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न विधिमंडळ, मंत्रालय, प्रशासन आणि न्यायालय अशा सर्वच स्तरावर मांडला आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. आताही‌ याच प्रश्नावर आ.संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांची भेट घेतली आहे. त्यावर ना.अजिदादांनीही लगेचच, बीड शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करा, असे निर्देश नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांना दिले आहेत. आता ना.अजित दादा पवार यांच्या माध्यमातून बीड शहराचा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेलच अशी अपेक्षा आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान याप्रसंगी ना.हसन मुश्रीफ साहेब तसेच वरिष्ठ स्तरावरील प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते.

प्रवाशाने काढले नाही तिकीट; निलंबित बसवाहकाने संपवलं जीवन

0

बीड — एसटी महामंडळाच्या माजलगाव आगारात वाहक म्हणून काम करणारे दत्ता अंबलकर यांना प्रवाशांने तिकीट न काढल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. दरम्यान अंबलकर यांनी चिंचाळा येथील शेतात 26 जानेवारी च्या मध्यरात्री लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

एका वाहकाने तिकीट न काढल्याने केलेल्या कारवाईत वाहक अंबलकर यांना निलंबित करण्यात आले होते, या तणावातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला, हा महामंडळाच्या चुकीच्या व्यवस्थेचा बळी आहे, असा आरोप अंबलकर यांच्या नातेवाइकांनी केला आहे. दत्ता आंबळकर हे गेल्या दहा वर्षापासून परिवहन महामंडळाच्या माजलगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. महिना भरापूर्वी एका प्रवाशाने तिकीट न घेता प्रवास केल्याचे उघडकीस आल्यानंतर वाहक अंबलकर यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे वाहक अंबलकर हे तणावात होते. यानंतर ते 12 जानेवारीपासून कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. अंबलकर यांच्या वडिलांनी माजलगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली होती. दरम्यान, 26 जानेवारीच्या मध्यरात्री अंबलकर यांनी आपल्या शेतात येत शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी यांचे वडील शेतात गेल्यावर ही बाब उघडकीस आली. वडवणी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी कुप्पा येथील आरोग्य केंद्रात पाठवले. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने दवाखान्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर माजलगाव बस स्थानकाचे आगार प्रमुख कोळपकर यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन नातेवाईकांची समजूत काढली. कुटुंबातील एका व्यक्तीला महामंडळात नोकरीला घेता येईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. चिंचाळा येथे दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले

आठवले टोळीवरही आता मकोका

0

बीड — संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या वाल्मीक कराड गॅंगवर मकोका लावल्यानंतर आठवले गॅंग वर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी शितल बल्लाळ यांच्यावर आरोप करत ऑडिओ क्लीप व्हायरल करणाऱ्या सनी आठवलेची ही आठवले गँग आहे.

बीड पोलिसांनी मागील महिनाभरात जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या दोन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. सुदर्शन घुले याच्या गँगवर मकोका लावल्यानंतर आज बीड पोलिसांनी आठवले गँगवर देखील मकोकाची कारवाई केली आहे. दि.13 डिसेंबर 2024 मध्ये पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत गोळीबाराची घटना घडली होती. त्यातील सहा आरोपींवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई यांचा समावेश आहे. या आरोपींनी आतापर्यंत 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आता आठवले गँगवर मकोका कारवाई करण्यात आली आहे.या सहा आरोपींवर कारवाई
अक्षय आठवले, सनी आठवले ,आशिष आठवले, मनीष क्षीरसागर प्रसाद धिवार, ओंकार सवई यांचा समावेश आहे.
दरम्यान जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आवश्यकतेनुसार मकोकाचे प्रस्ताव तसेच एम पी डी ए अंतर्गत कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी म्हटलं आहे.