सुदर्शन घुले ला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी; मोबाईल डाटा हस्तगत
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून मोठे पुरावे हाती सापडल्याचा दावा कोर्टात करण्यात आला आहे.
अजित दादा मुख्यमंत्र्यांना भेटून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय घेणार!
मुंबई — धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड हा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने मुंडे आणि कराडवर गंभीर आरोप करत आहेत आज त्यांनी याच संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
दमानिया यांनी २५ ते ३० मिनिटे त्यांना भेटली. हे माणुसकीला काळिमा फासण्याचे कृत्य झालं आहे, असे त्यांचं म्हणणं होतं. मग त्यावर मी त्यांना तुम्ही राजीनामा का घेत नाहीत, असे विचारले. मी त्यांना सर्व पुरावे दिले. आज त्यांना मी धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र बिझनेस कसे आहेत. त्यांच्या कंपनीत आर्थिक नफा कसा मिळतो. ऑफिस ऑफ प्रॉपर्टीमध्ये हे सर्व कसं बसतंय, त्यामुळेच तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुम्ही राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
“धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडविरोधात अजित पवार यांना पुरावे दिले आहेत. या दोघांचेही आर्थिक संबंधांची त्यांना माहिती दिली आहे. याबाबत अजित पवार उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेदरम्यान ते मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतील. जर अजित पवार यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर कोर्टात जाणार, असा इशारा दमानिया यांनी दिला आहे.
त्यामुळे आता या पुराव्यांवरून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर त्यांचे राजकीय वर्चस्व संपुष्टात येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
डॉ. विलास डांगरे, मारुती चितमपल्ली, चैत्राम पवारांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली — प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा महाराष्ट्रातील तिघांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. विलास डांगरे, चैत्राम पवार, मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

विजेत्यांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर, मार्च किंवा एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना पद्म पुरस्कार प्रदान केले जातात. पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात. शनिवारी पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये गोव्यातील 100 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई, पश्चिम बंगालमधील ढाक वादक गोकुल चंद्र दास, कुवेतमधील योगसाधक शेखा ए जे अल सबा आणि उत्तराखंडमधील ट्रॅव्हल ब्लॉगर जोडपे ह्यू आणि कॉलीन गँटझर यांचा समावेश आहे. याशिवाय, गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान, प्रतिबंध आणि व्यवस्थापन या विषयात तज्ज्ञ असलेल्या दिल्लीतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीरजा भटला यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले येणार आहे.
पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची यादी – सफरचंद सम्राट – हरिमन शर्मा ड्रग्ज व्यसनमुक्तीची नायिका – जुमदे योमगम गॅमलिन दिमा हासाओ नृत्य – जॉयनाचरण बथारी नेपाळी गाण्यांचे गुरु – नरेन गुरुंग होमिओपॅथ – विलास डांगरे योग- सैखा एझ अल सबा निर्मला देवी मुशहरचे मसीहा – भीम सिंग भावेश गांधी ऑफ द हिल्स – राधा बहन भट्ट साबरकांठा नो कोऑर्डिनेटर – सुरेश सोनी निमारी कादंबरीकार – जगदीश जोशिला कैथलचा एकलव्य – हरविंदर सिंग भेरू सिंह चौहान भटकंती गुरु – वेंकप्पा अंबाजी सुगतकर थविल थलैवा-पी दच्नमूर्ती गर्भाशयाच्या कर्करोगावरील लढवय्या- डॉ नीरजा भाटला महाराष्ट्राचे अरण्य ऋषी-मारुती भुजंगराव चितमपल्ली ग्रैंड मदर ऑफ गोंबियाता – भीमव्वा दोड्डाबलप्पा सिल्कायतारा होल्कर वीवर ऑफ होप – सॅली होळकर भजनांची बेगम – बतूल बेगम जंगलाचा मित्र – चैत्रम देवचंद पवार
पद्म पुरस्कार पुरस्कारांचे तीन प्रकार –
कला, समाजसेवा, सार्वजनिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यवसाय आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विशेष व्यक्तींना पद्म पुरस्कार दिले जातात. पद्मविभूषण हा अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. पद्मभूषण पुरस्कार हा उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी दिला जातो.
माजी न्यायमूर्ती, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचे निधन
छत्रपती संभाजी नगर — ज्येष्ठ साहित्यिक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे शनिवारी (25जानेवारी) पहाटे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी साहित्यविश्व आणि न्यायव्यवस्थेतून मोठं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी सन 1961 ते 62 मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. वर्धा येथे झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही त्यांनी भूषवले. मराठवाडा, मराठवाड्यातील सामाजिक वास्तव उर्वरित महाराष्ट्रात पोहोचवण्यात नरेंद्र चपळगावकर यांचा मोठा सहभाग होता. नरेंद्र चपळगावकर यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या गेल्या काही पिढ्या बीड येथे गेल्यामुळे ते मूळचे बीडचेच झाले. बीडमधून केसरी, सकाळ, मराठवाडा, लोकसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांसाठी त्यांनी लेखन केलं आहे. 16 वर्षे वकिली केल्यानंतर मुंबईत काही काळ वकिली केली. औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायपीठ स्थापन झाल्यावर त्यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
चपळगावकर यांनी 1962 ते 1978 या काळात बीडमध्ये वकिली केली. त्यानंतर 1979 ते 1881 दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. आणि 1981 पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे न्यायाधीश म्हणून काम केले. मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची 19 जानेवारी 1990 मध्ये नियुक्ती झाली आणि कायमचे न्यायाधीश म्हणून 20 नोव्हेंबर 1990 रोजी नियुक्ती झाली. 10 एप्रिल 1999 रोजी ते निवृत्त झाले. मराठी साहित्यातला मोठा विचारवंत आणि अभ्यासक असणाऱ्या नरेंद्र चपळगावकरांनी मराठी साहित्यविश्वात मोलाची भर टाकली आहे.
अनंत भालेराव: काळ आणि कर्तृत्त्व
आठवणीतले दिवस
कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)
कायदा आणि माणूस
कहाणी हैदराबाद लढ्याची
तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ
तुमच्या माझ्या मनातलं (ललित)
त्यांना समजून घेताना (ललित)
दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
नामदार गोखल्यांचं शहाणपण
न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा)
मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे)
महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
राज्यघटनेचे अर्धशतक
विधिमंडळे आणि न्यायसंस्था: संघर्षाचे सहजीवन
संघर्ष आणि शहाणपण
समाज आणि संस्कृती
संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)
सावलीचा शोध (सामाजिक)
हरवलेले स्नेहबंध
सरकारची अडचण वाढली! मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरू
जालना — ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करेल, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील शनिवारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.सगेसोयरे अध्यादेश काढून 26 जानेवारी रोजी एक वर्ष होत आहे. परंतु, अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आजवर कधी झाले नाही ते मराठ्यांच्या बाबतीत घडत आहे. त्यामुळे आपण पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठ्यांना ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणत्र देण्याचा शासनादेश काढावा, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करावी, ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना मिळालेल्या सगे सोयऱ्यांच्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावे, न्या. शिंदे यांच्या समितीला मुदतवाढ द्याची, प्रमाणपत्र वाटपासाठी कक्ष सुरू करावे, शिंदे समितीला उर्दू, फारशी, मोडीलिपीचे अभ्यासक द्यावेत, ज्यांच्या नोंदी असूनही प्रमाणपत्र दिलेले नाही त्यांना तातडीने प्रमाणपत्र द्यावे, आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत. हैदराबाद संस्थानचे गॅझेट, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे आदी विविध मागण्यांसाठी पुन्हा उपोषण सुरू केल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाल्मीक कराडची करोडो रुपयांची संपत्ती एसआयटी करणार जप्त
बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराडला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विशेष तपास पथकाने वाल्मिक कराडची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
वाल्मिक कराड यांच्या मालकीच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकाने एसआयटी दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा संकलित करण्यात आला असून त्यांचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त केल्या जातील, असे सांगितले जात आहे. हा वाल्मिक कराडसाठी प्रचंड मोठा धक्का ठरु शकतो.
गेल्या काही दिवसांमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावावर पुणे, बीड यासह विविध भागांमध्ये जमीन, फ्लॅट अशा वेगवेगळ्या मालमत्ता असल्याची माहिती समोर आली होती. या संपत्तीचे आकडे डोके चक्रावणारे होते. वाल्मिक कराड याने बीड जिल्ह्यात दहशतीच्या जोरावर मोठे आर्थिक साम्राज्य उभे केल्याची चर्चा होती. याचे तपशील गेल्या काही दिवसांमध्ये समोर आले होते. मात्र, आता एसआयटीने वाल्मिक कराडची ही सर्व मालमत्ता जप्त करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी बीड येथील विशेष न्यायालयात एसआयटीकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम 107 (मालमत्तेची जप्ती, जप्ती किंवा पुनर्संचयित करणे) अंतर्गत अर्ज आधीच न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला आहे.
वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख यांची हत्या आणि आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. वाल्मिक कराड याला या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी त्याच्यावर महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका लावण्यात आला होता. गेल्या सुनावणीवेळी एसआयटीने वाल्मिक कराड याने 2 कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा उल्लेख केला होता. या संपत्तीचा शोध घ्यायचा असल्याचे एसआयटीने न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार आता एसआयटीने वाल्मिक कराड याच्या संपत्तीची पाळेमुळे खणायला सुरुवात केली आहे. यापूर्वी सीआयडीने वाल्मिक कराड याची परदेशातही संपत्ती असू शकते, असा संशय व्यक्त केला होता.मात्र, आता एसआयटीने वाल्मिक कराडच्या मालकीच्या राज्यातील मालमत्तांवर टाच आणल्यास त्याच्या अडचणी वाढू शकतात. वाल्मिक कराड याच्यासोबत त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे असलेल्या जमिनी आणि फ्लॅटसवरही जप्तीची कारवाई होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
वाल्मिक कराडच्या अडचणीत भर, महादेव मुंडे खून प्रकरणाची चौकशी होणार
महादेव मुंडे खून प्रकरण तपास परळी पोलीस ठाण्याकडून काढून अंबाजोगाई डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. 14 महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांचा खून झाला होता, अद्यापही याचे आरोपी पकडले गेले नाहीत. महादेव मुंडे यांच्यापत्नीने याबाबत सवाल उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनीही शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्याचे आदेश काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ! अनेक अधिकारी येणार गोत्यात; हायकोर्टाच्या सुनावणीकडं लक्ष
- नागपूर — धनंजय मुंडे यांना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं झटका दिला आहे. यापूर्वीच्या मंत्रीमंडळाच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यामुळं ते गोत्यात आले आहेत.












