Home Blog Page 14

पेपर लिक प्रकरणात”विद्यार्थ्यांसह पालकांची “नीट” नेटकी; सीबीआयकडून शिक्षिका आई व दोन विद्यार्थ्यांची कसून चौकशी

0

अंबाजोगाई — पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता बीड जिल्ह्यात नवे धागेदोरे मिळत असून, पालकांसह विद्यार्थ्यांची देखील “नीट ” नेटकी होताना दिसून येत आहे. अंबाजोगाईतील दोन विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षिका आईची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) तब्बल सव्वादोन तास कसून चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे पालक व दोन विद्यार्थ्यांना घरातून  दुसरीकडे घेऊन जात ही चौकशी करण्यात आली. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.

चौकशी करण्यात आलेले हे दोन्ही बहीण-भाऊ लातूरमध्ये शिक्षण घेत होते. यातील बहीण रिपीटर विद्यार्थीनी असून ती पुन्हा NEET परीक्षेला बसली होती, तर भाऊ पहिल्यांदाच परीक्षा देत होता. धक्कादायक बाब म्हणजे कथितरित्या हा पेपर या दोघांसाठीच मिळवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची चर्चा आहे.

CBI च्या चौकशीनंतर अंबाजोगाई परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, या प्रकरणातून आणखी मोठे शैक्षणिक रॅकेट समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकशीदरम्यान विद्यार्थ्यांच्या आईलाही प्रश्न विचारण्यात आल्याने तपासाची व्याप्ती केवळ विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नसून शैक्षणिक नेटवर्कसह पालकांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दरम्यान, नीट घोटाळ्याचा कथित मास्टरमाईंड म्हणून चर्चेत असलेल्या पी. व्ही. कुलकर्णी याचे बीड कनेक्शन समोर आल्यानंतर आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. बीडमधील ‘प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन’ या शिक्षक संघटनेचा शिवराज मोटेगावकर हा ‘ब्रँड अँबेसिडर’ असल्याचे समोर आले आहे. २०२४ मध्ये संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या लेटरहेडवर मोटेगावकरचा ‘ब्रँड अँबेसिडर’ असा उल्लेख आढळून आला. यामुळे संशय अधिक गडद झाला आहे.

यामुळे मोटेगावकरशी संबंधित कोचिंग क्लास चालक आणि शैक्षणिक नेटवर्कही आता तपासाच्या रडारवर आले आहेत.बीड मधील शाहूनगर परिसरात अनेक नामांकित कोचिंग क्लासेस आणि शिक्षण संकुले कार्यरत असून, या क्लास चालकांचे मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी पेपरफुटी संदर्भात काही व्यावसायिक हितसंबंध होते का, याचीही CBI कडून सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना आता बीड जिल्ह्यातील या नव्या घडामोडींमुळे शिक्षण क्षेत्रातील काळे धंदे आणि कोचिंग माफियांचे कथित जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हे जाळे केंद्रीय अन्वेषण विभागाने उध्वस्त करून टाकावे अशी मागणी केली जात आहे.

तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा! 6 आरोपी ताब्यात, 7.81 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

केज (बीड ) — जिल्ह्यातील केज पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल 7 लाख 81 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


आष्टी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, केज येथे कर्तव्यावर असताना21 मे रोजी  वेंकटराम (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांना गोपनीय माहितीदारामार्फत केज पोलीस ठाणे हद्दीतील काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. संबंधितांकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व साहित्य असल्याचेही समोर आले होते.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी तातडीने पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष दुपारी छापा टाकून तिरट जुगार खेळणाऱ्या सहा आरोपींना ताब्यात घेतले.
या धाडसी कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी तसेच चारचाकी वाहन असा एकूण अंदाजे 7 लाख 81 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. वेंकटराम (IPS) सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इनामदार, पोलीस हवालदार क्षीरसागर, पोलीस हवालदार मोरे, पोलीस हवालदार वंजारे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत. तपासाच्या दृष्टीने आरोपींची नावे गोपनीय ठेवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नीट (NEET )पेपरफुटीचा मास्टरमाईंड पी.व्ही. कुलकर्णी अडचणीत; बीडमधील विनापरवाना इमारतीवर चालणार बुलडोझर

0

बीड — देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या पी.व्ही. कुलकर्णी यांच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. सध्या सीबीआय कोठडीत असलेल्या कुलकर्णी यांच्या बीड शहरातील शाहूनगर भागात सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम विनापरवाना असल्याचे उघड झाले असून नगरपरिषदेने या बांधकामावर बुलडोझर चालवण्याची तयारी सुरू केली आहे.


देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झालेल्या नीट परीक्षा पेपर फूट( NEET Exam Paper Leak )प्रकरणाचा तपास सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) सुरू आहे. या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून पी.व्ही. कुलकर्णी याचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून पुढे आले आहे. कुलकर्णी हा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अत्यंत गोपनीय प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या राष्ट्रीय पॅनेलशी संबंधित असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
दरम्यान, बीड शहरातील शाहूनगर परिसरात कुलकर्णी यांच्या नावावर सुरू असलेल्या इमारतीबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषदेच्या नगररचना विभाग आणि मालमत्ता कर विभागाने संयुक्त पाहणी केली. या तपासात संबंधित बांधकामासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच नियमानुसार चारही बाजूंनी सोडावयाच्या जागेतही बांधकाम करण्यात आल्याचे आढळले.
नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फडसे यांनी सांगितले की, “संबंधित बांधकामाची परवानगी संचिका तपासण्यात आली. मात्र कोणतीही वैध परवानगी आढळून आलेली नाही. गंभीर अनियमितता लक्षात घेता संबंधित होल्डर्सना नोटीस बजावण्यात येणार असून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून इमारतीवर बुलडोझर चालवण्यात येणार आहे.”
सीबीआयच्या तपासानुसार, 2026 च्या नीट (NEET) पेपरफुटीमध्ये महाराष्ट्र मॉड्यूलची महत्त्वाची भूमिका होती. पी.व्ही. कुलकर्णी हे अनेक वर्षांपासून नीट ( NEET )प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या एन टी ए ( NTA )च्या राष्ट्रीय पॅनेलवर कार्यरत होते. त्यामुळे वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत त्यांची थेट पोहोच होती, अशी माहिती समोर आली आहे.
पुण्यात घरगुती शिकवणी वर्ग चालवणाऱ्या कुलकर्णीवर विद्यार्थ्यांना “संभाव्य प्रश्न” म्हणून प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्न वहीत लिहून देण्याचा आरोप आहे. या रॅकेटमध्ये मनीषा वाघमारे हिचीही भूमिका असल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

किरकोळ वादातून तरुणाला जाळण्याचा प्रयत्न; धार्मिक रंग देण्याचा डाव सपोनी दराडें मुळे फसला, तासाभरात 3 आरोपी जेरबंद

0

बीड —  तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला मारहाण करून त्याच्या अंगावर डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर काही समाजकंटकांनी प्रकरणाला धार्मिक रंग देऊन गावातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांच्या तत्परतेमुळे अवघ्या तासाभरात तीन आरोपींना अटक करण्यात आली आणि गावातील तणाव नियंत्रणात आला.

काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ मे रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास खामगाव येथील फरांडे वस्ती परिसरात रस्त्याच्या खडीकरणाचे काम सुरू होते. फिर्यादी शाहरुख रहिमान पठाण हे जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील खडी पांगवत होते. त्यावेळी आरोपी प्रल्हाद केशव भावले हा ट्रॅक्टर घेऊन त्या रस्त्याने जात होता.

“जेसीबी मशीन आडवी का लावली?” या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी प्रल्हाद भावले याने तांब्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीला धार्मिक शिवीगाळ करत डिझेलच्या कॅनमधील इंधन अंगावर टाकून पेटवण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेत शेख फैजान करीम हाही जखमी झाला असून जखमी शाहरुख पठाण यांच्यावर लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

तात्काळ गुन्हा दाखल; तीन आरोपी अटकेत

घटनेनंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी वेगाने तपास करत प्रल्हाद केशव भावले, सोमदेव भावले आणि केशव भावले या तिघांना तासाभरात अटक केली.

धार्मिक तणाव पसरविण्याचा प्रयत्न हाणून पाडला

घटनेनंतर काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर अफवा पसरवत या वादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे गावातील संभाव्य तणाव टळला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे, पोलीस हवालदार प्रसाद कदम, विजय जाधव, सतीश मुंडे आणि युवराज चव्हाण यांच्या पथकाने केली.

इतक्याच तत्परतेची गरज

पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस दलाला आधुनिकीकरणाचा फायदा कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले असले तरीही गुन्हेच दाखल केले जात नाहीत जनतेला न्यायासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन आंदोलन करावे लागते तर आधुनिकीकरणाचा काय फायदा असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात दाखवलेली तत्परता अशीच सुरू ठेवली तर बीड जिल्ह्यामधील गुन्हेगारीला आळा बसायला व धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रश्न तयार होणारच नाहीत अशी प्रतिक्रिया देऊन पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

वाघिरा फाट्यावर भीषण अपघात; सैन्यदलात भरती झालेला जवान जागीच ठार

0

लिंबागणेशअहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर वाघिरा फाट्यानजीक बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात सैन्यदलात नुकताच भरती झालेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पाटोदा तालुक्यातील वाघिरा येथील संदिपान भगवान बांगर वय २० वर्ष  हे मोटारसायकल क्र. एमएच २३ एएच ८४८१ वरून वाघिरा फाट्यावरून गावाकडे जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या सातारा येथील चारचाकी वाहनाने क्र. एमएच ११ बीके ००७९ जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत संदिपान बांगर यांचा जागीच मृत्यू झाला.

संदिपान बांगर हे नुकतेच भारतीय सैन्यदलात भरती झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यांच्या अकाली निधनामुळे गावावर शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच लिंबागणेश पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार गणेश परझने, तलाठी गणपत पोतदार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत.

खरीप २०२५ मधील प्रलंबित पीक विम्यासाठी धनंजय मुंडेंच्या मागणीनुसार २६ मे रोजी मुंबईत बैठक

0

प्रचंड अतिवृष्टी होऊनही शेतकरी पिकविम्यापासून वंचित, धनंजय मुंडेंनी तोडगा काढण्यासाठी राज्य स्तरावर बैठकीची केली होती मागणी

कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या दालनात होणार बैठक

मुंबई — मागील वर्षी सन २०२५ मध्ये खरीप हंगामात प्रचंड अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते मात्र बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा मिळालेला नाही, याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार येत्या २६ तारखेला (मंगळवार) कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व आ. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबईत बीड जिल्ह्यातील प्रलंबित पीक विम्याच्या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीस कृषी विभाग, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित विमा कंपनीचे राज्यस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मागील वर्षी बीड जिल्ह्यात विशेषकरून खरीप हंगामाच्या शेवटी पिके काढणीच्या तोंडावर सातत्याने प्रचंड अतिवृष्टी, ढगफुटी व जिल्हाभर पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते, मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा अद्याप मिळालेला नाही. विमा कंपन्यांचे धोरण आणि पीकविमा योजनेत झालेले बदल यामुळे पात्र असूनही बीड जिल्ह्यातील शेतकरी वंचित असून यावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासन स्तरावर बैठक घेऊन तोडगा काढण्याची विनंती धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या निर्देशानुसार कृषी विभागाने ही बैठक बोलावली आहे.

धनंजय मुंडे हे स्वतः मागील काळात कृषीमंत्री असताना देशात मागील दहा वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक पीकविमा महाराष्ट्रात मंजूर करण्यात आला होता. विमा कंपन्यांच्या नफेखोरी तसेच निकषांना फाटा देत तांत्रिक बाबींच्या आधारे मुंडेंनी विमा कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले होते, त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा पीकविमा मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा! आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकाराने फार्मर आयडी दुरुस्तीला वेग

0

बीड — राज्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी फार्मर आयडीमधील तांत्रिक दोष दुरुस्त करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून उर्वरित सर्व दुरुस्त्या पुढील 15 दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. ही माहिती आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित बैठकीत फार्मर आयडी संदर्भातील तांत्रिक अडचणी, डेटा अपडेट आणि महसूल व कृषी विभागातील समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेनंतर या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे.

फार्मर आयडी हा शेतकऱ्यांचा एकमेव ओळख क्रमांक मानला जात असून शासनाच्या विविध योजना, अनुदान आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे नावातील चुका, क्षेत्रातील बदल, मोबाईल क्रमांक अपडेट, आधार लिंकिंग यांसारख्या त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘ॲग्री स्टॅक’ प्रकल्पांतर्गत 2023 मध्ये तयार करण्यात आलेल्या फार्मर आयडीमधील अनेक त्रुटी आधीच दुरुस्त करण्यात आल्या असून उर्वरित कामही वेगाने सुरू असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

विशेषतः ‘पोखरा’ योजनेचा लाभ घेताना अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने समन्वयाने डेटा अपडेट करून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले.

या प्रक्रियेचा बीड जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 41 हजार शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असल्याचे आमदार विजयसिंह पंडित यांनी सांगितले.

फार्मर आयडीमध्ये नाव, क्षेत्र, मोबाईल क्रमांक किंवा आधार कार्ड संदर्भातील त्रुटी असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी तात्काळ तहसील कार्यालयात लेखी अर्ज सादर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

या बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार विजयसिंह पंडित, राज्याचे जमाबंदी आयुक्त, ॲग्री स्टॅकचे संचालक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

NEET नंतर आता MHT-CET वादात; काँग्रेसने सादर केले धक्कादायक पुरावे

0

मुंबई : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुट ( NEET Paper Leak Case) प्रकरणानंतर आता महाराष्ट्रातील MHT-CET Examination प्रवेश परीक्षेबाबतही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत ( Sachin Sawant ) यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक आरोप करत एमएच-सीईटी परीक्षेत मोठ्या गैरप्रकाराचा संशय व्यक्त केला आहे.


सचिन सावंत यांनी दावा केला की, इयत्ता १२ वीच्या परीक्षेत अवघे ३७ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला एमएच-सीईटीमध्ये थेट ९९ पर्सेन्टाईल गुण मिळाले आहेत. एवढेच नव्हे तर १० वी आणि १२ वीमध्ये ४० ते ४५ टक्के गुण मिळवणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये १०० टक्के गुण मिळवल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले, “बारावी बोर्ड आणि एमएच-सीईटीचा अभ्यासक्रम जवळपास समान आहे. एमएच-सीईटीसाठी अकरावी-बारावीच्या अभ्यासाचा सखोल पाया आवश्यक असतो. मग बोर्ड परीक्षेत कमी गुण मिळवणारे विद्यार्थी सीईटीमध्ये थेट टॉपर कसे ठरतात? हा अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रकार आहे.”
त्यांनी या संदर्भातील काही विद्यार्थ्यांची यादी आणि पुरावेही माध्यमांसमोर सादर केल्याचा दावा केला. या प्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले.
सावंत यांनी सोशल मीडियावरूनही या मुद्द्यावर आवाज उठवला होता. मात्र, राज्य सीईटी सेलने दिलेले उत्तर “उडवाउडवीचे आणि बेफिकिरीचे” असल्याचा आरोप त्यांनी केला. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित इतक्या गंभीर विषयावर सीईटी सेलने जबाबदारीने उत्तर देणे अपेक्षित होते,” असे ते म्हणाले.
दरम्यान,राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र(State Common Entrance Test Cell Maharashtra ) यांच्याकडून अद्याप या आरोपांवर सविस्तर अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांकडून जोर धरू लागली आहे.

भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक भयभीत; सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना फटकारले

0

देशभरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत राज्यांना अवमानाची चेतावणी दिली. धोकादायक कुत्र्यांवर इच्छामरणाचा विचार करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले.

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाची गंभीर दखल

नवी दिल्ली — देशभरात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव आणि नागरिकांवरील जीवघेणे हल्ले याबाबत सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of India) यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणांवरील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर राज्य सरकारांनी प्रभावी उपाययोजना न केल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मंगळवारी (१९ मे २०२६) झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशांचे अनेक राज्यांनी योग्य पालन केलेले नाही. भविष्यातही नियमांची अंमलबजावणी झाली नाही, तर त्याला थेट न्यायालयाचा अवमान मानले जाईल, असा इशारा देण्यात आला.
गंभीर आजारी आणि धोकादायक कुत्र्यांबाबत मोठे निर्देश

सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रशासनाला निर्देश

देताना म्हटले की, अत्यंत गंभीर आजारी आणि मानवी जीवनासाठी धोकादायक ठरणाऱ्या भटक्या कुत्र्यांबाबत इच्छामरणाचा पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो. हा विषय केवळ प्राणी व्यवस्थापनापुरता मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्य, मानवी सुरक्षितता आणि पर्यावरणीय संतुलनाशी संबंधित असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
न्यायालयाने सरकारला फटकारताना म्हटले की, जर सर्व राज्यांनी प्राणी जन्म नियंत्रण (‘Animal Birth Control) (ABC)’ नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली असती, तर देशात आज ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसती.

लहान मुले आणि वृद्ध नागरिक लक्ष्यावर

न्यायालयाने सुनावणीदरम्यान चिंता व्यक्त करताना म्हटले की, भटके कुत्रे आता सर्रास लहान मुले आणि वृद्ध नागरिकांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे देशातील नागरिक भयभीत झाले असून प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.
या प्रकरणावरील पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी होणार असून प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडून कारवाई अहवाल (Compliance Report) सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश

🕳️.  सर्व राज्यांनी प्राणी जन्म नियंत्रण (‘Animal Birth Control’ )आराखडा तातडीने लागू करावा
🕳️. प्रत्येक शहरात कुत्र्यांची नसबंदी आणि उपचारासाठी सुसज्ज केंद्र उभारावे
🕳️ कुत्रे पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण द्यावे
🕳️ सर्व शासकीय रुग्णालयांत रेबीज प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा ठेवावा
🕳️ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण        (National Highways Authority of India) यांनी महामार्गांवरील मोकाट जनावरे आणि कुत्रे हटवावेत
🕳️ मोकाट जनावरांसाठी गोशाळा उभारून पुनर्वसनाची व्यवस्था करावी
🕳️ न्यायालयीन आदेशानुसार कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना विनाकारण कायदेशीर त्रास देऊ नये