खरीप २०२५ मधील प्रलंबित पीक विम्यासाठी धनंजय मुंडेंच्या मागणीनुसार २६ मे रोजी मुंबईत बैठक

प्रचंड अतिवृष्टी होऊनही शेतकरी पिकविम्यापासून वंचित, धनंजय मुंडेंनी तोडगा काढण्यासाठी राज्य स्तरावर बैठकीची केली होती मागणी

कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या दालनात होणार बैठक

मुंबई — मागील वर्षी सन २०२५ मध्ये खरीप हंगामात प्रचंड अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते मात्र बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा मिळालेला नाही, याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार येत्या २६ तारखेला (मंगळवार) कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व आ. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबईत बीड जिल्ह्यातील प्रलंबित पीक विम्याच्या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीस कृषी विभाग, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित विमा कंपनीचे राज्यस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मागील वर्षी बीड जिल्ह्यात विशेषकरून खरीप हंगामाच्या शेवटी पिके काढणीच्या तोंडावर सातत्याने प्रचंड अतिवृष्टी, ढगफुटी व जिल्हाभर पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते, मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा अद्याप मिळालेला नाही. विमा कंपन्यांचे धोरण आणि पीकविमा योजनेत झालेले बदल यामुळे पात्र असूनही बीड जिल्ह्यातील शेतकरी वंचित असून यावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासन स्तरावर बैठक घेऊन तोडगा काढण्याची विनंती धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या निर्देशानुसार कृषी विभागाने ही बैठक बोलावली आहे.

धनंजय मुंडे हे स्वतः मागील काळात कृषीमंत्री असताना देशात मागील दहा वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक पीकविमा महाराष्ट्रात मंजूर करण्यात आला होता. विमा कंपन्यांच्या नफेखोरी तसेच निकषांना फाटा देत तांत्रिक बाबींच्या आधारे मुंडेंनी विमा कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले होते, त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा पीकविमा मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles