म्यानमार मध्ये ओलिस ठेवलेल्या बीडच्या तरुणासह महाराष्ट्रातील तरुणांची सुटका करा – धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

केंद्र सरकारच्या मदतीने सर्वांची सुरक्षित सुटका करण्याची मुंडेंची विनंती

तरुणांना फसवून मानवी तस्करी करणाऱ्या महाराष्ट्रातील एजंटांच्या जाळ्याचा शोध घेऊन कठोर कारवाई करा

मुंबई —  बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील नांदूर घाट येथील रहिवासी स्वप्नील काळुंके यांसह अनेक तरुणांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून म्यानमार – थायलंड सीमेवर एका छळ छावणीत ओलिस ठेऊन त्यांच्या कडून जबरदस्तीने सायबर गुन्हे घडवले जात असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेत केंद्र सरकारच्या मदतीने या सर्व तरुणांची सुखावून सुटका करावी, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी लेखी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री महोदयांची विधानभवन येथे भेट घेत विनंतीचे पत्र दिले आहे.

बीड जिल्ह्यातील स्वप्नील काळुंके सह महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे २०-२५ तरुण तर देशातून तब्बल ७००-८०० तरुण म्यानमार – थायलंड सीमेवरील गोल्डन ट्रँगल नामक छळछावणीत ओलिस असून त्यांना शारीरिक यातना देऊन त्याच्याकडून सायबर गुन्हे घडवले जात असल्याची तक्रार बीड सायबर पोलिसात दाखल करण्यात आलेली आहे, तसेच याप्रकरणी तपासाची चक्रे थेट देशाच्या गुप्तचर विभागापर्यंत पोचले असून, आपला बचाव व सुटका होण्यासाठी ही सर्व तरुण प्राणांची बाजी लावत असून सध्या ते मृत्यूच्या दाढेत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी तातडीने लक्ष घालून केंद्र सरकार तसेच विदेश मंत्रालयाची मदत घेऊन या तरुणांच्या सुखरूप सुटकेसाठी प्रयत्न सुरू करावेत तसेच मोठ्या पगाराचे आश्वासन देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळे विणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी तस्करी करणाऱ्या या टोळीतील महाराष्ट्रामध्ये सक्रिय असणाऱ्या एजंटांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles