नवी दिल्ली — लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्याबाबत केलेल्या दोन विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय आदिवासी व्यावसायिक परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी देशासमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहण्याचा इशारा दिला असून, आगामी काळात देशात ‘आर्थिक त्सुनामी’ येऊ शकते, असा दावा केला.
राहुल गांधी म्हणाले की, भारताकडे पूर्वी जागतिक आर्थिक संकटांचा प्रभाव कमी करण्यासाठी सक्षम यंत्रणा होती. मात्र, भाजप सरकारने ही यंत्रणा कमकुवत किंवा निष्प्रभ केल्यामुळे महागाई, वाढत्या किमती आणि आर्थिक अस्थिरता वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे देशासमोर अभूतपूर्व आर्थिक आव्हाने निर्माण होऊ शकतात, असे ते म्हणाले.
देशातील आर्थिक परिस्थिती, वाढती महागाई आणि सामान्य नागरिकांमधील असंतोष यांचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जनतेचा दबाव वाढत असून तो नियंत्रित करण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जाऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही मोठा राजकीय दावा केला. देशातील परिस्थितीमुळे आगामी एका वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून बाजूला होतील, असे विधान त्यांनी केले. तसेच, “आतील यंत्रणांकडून आम्हाला माहिती मिळत आहे,” असेही त्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यांनंतर राजकीय चर्चांना वेग आला असून सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, या विधानांवर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.




