मुंबई — देशभरात यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीच्या केवळ 90 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी महाराष्ट्रासाठी तुलनेने दिलासादायक चित्र समोर आले आहे. राज्यात सरासरीच्या सुमारे 98 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. मात्र पावसाचे वितरण असमान राहण्याची आणि अनेक भागांत पावसाचे खंड पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. साबळे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी असला तरी अत्यंत कमी पावसाची परिस्थिती निर्माण होणार नाही. तथापि, पावसाचे स्वरूप विस्कळीत राहण्याची शक्यता असल्याने पाणी व्यवस्थापन आणि पीक नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

विभागनिहाय पावसाचा अंदाज
डॉ. साबळे यांच्या अंदाजानुसार राज्यातील विविध विभागांमध्ये पुढीलप्रमाणे पाऊस अपेक्षित आहे:
🕳️. पश्चिम विदर्भ – 97 टक्के
🕳️. मध्य विदर्भ – 100 टक्के
🕳️. मराठवाडा – 100 टक्के
🕳️. पूर्व विदर्भ – 96 टक्के
🕳️. उत्तर महाराष्ट्र – 96 टक्के
🕳️. पश्चिम महाराष्ट्र – 97.6 टक्के
🕳️. कोकण – सरासरीइतका पाऊस
पुणे, नागपूर, यवतमाळ, परभणी आणि दापोली या भागांमध्ये सरासरीइतक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यातील अनेक भागांत पडू शकतात पावसाचे मोठे खंड
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार दापोली, अकोला, पुणे आणि यवतमाळ येथे लहान स्वरूपाचे खंड पडू शकतात. कराड, पाडेगाव आणि निफाड भागात मध्यम स्वरूपाचे खंड पडण्याची शक्यता आहे.
तर राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव, परभणी आणि नागपूर परिसरात मोठे खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये आवर्षणसदृश परिस्थिती निर्माण होण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
यंदाच्या हंगामात कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचा सल्ला डॉ. साबळे यांनी दिला आहे. सोयाबीन, मूग, उडीद, मटकी, चवळी, बाजरी आणि ज्वारी यांसारख्या पिकांची निवड फायदेशीर ठरू शकते.
तसेच खालील आंतरपीक पद्धतींचा अवलंब करण्याची शिफारस करण्यात आली आहे:
बाजरी + तूर
तूर + भुईमूग
कापूस + मूग
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महाराष्ट्रासाठी यंदाचा मान्सून सरासरीच्या जवळपास राहण्याची शक्यता असली तरी पावसाचे असमान वितरण आणि दीर्घ खंड ही मोठी चिंता ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जलसंधारण, पीक विविधीकरण आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून संभाव्य जोखीम कमी करण्याची गरज आहे.

