बीडकरांना वेठीस धरणारा मुजोर अभियंता राजेंद्र भोपळे हटाव, बीड जिल्हा बचाव – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

बीड —  बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या निकृष्ट दर्जाच्या व संथगतीने सुरू असलेल्या कामांविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.११ सोमवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

मुजोर अभियंता राजेंद्र भोपळे हटाव आणि बीड जिल्हा बचाव” ” निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत मध्ये टाका “अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. राष्ट्रीय महामार्ग उपविभाग बीडचे उपविभागीय अभियंता राजेंद्र भोपळे हे निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांची पाठराखण करत असल्याचा आरोप करत त्यांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई व छत्रपती संभाजीनगर यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात रामनाथ खोड,शेख युनुस, सादेक सय्यद, रामधन जमाले, प्रा . तांदळे डी.जी., डॉ.संजय तांदळे, बाजीराव ढाकणे, हनुमान घोडके आदी सहभागी झाले होते.

बीड शहरातील महामार्ग कामांमुळे नागरिक त्रस्त

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची गती अत्यंत संथ असल्याने शहरात वाहतूक कोंडी, धुळीचे साम्राज्य आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली.

महिनाभरात स्लॅब कोसळल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

अहमदनगर ते परळी राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान बार्शी रोडवरील सोमेश्वरनगर समोरील नालीवर टाकण्यात आलेला सिमेंट स्लॅब अवघ्या महिनाभरात कोसळल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे संबंधित कामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

“याबाबत वारंवार तक्रारी करूनही उपविभागीय अभियंता राजेंद्र भोपळे हे कंत्राटदारांचीच बाजू घेत असल्याचे दिसून येत आहे,” असा आरोप डॉ. ढवळे यांनी केला.

भेगाळलेल्या महामार्गांमुळे अपघातांचे सत्र

खामगाव–पंढरपूर, अहमदपूर–अहिल्यानगर आणि पैठण–पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गांवर मोठमोठ्या भेगा पडल्या असून अनेक ठिकाणी दुचाकीस्वारांचे चाक अडकून अपघात घडले आहेत. काही नागरिकांना जीवही गमवावा लागल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

सध्या कंत्राटदारांकडून केवळ डांबर टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जात असून सिमेंट ब्लॉक कट करून दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी, तसेच निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles