मुंबई — पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्यंत संतापजनक अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्यावर यापूर्वीही दोन लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल होते. तरीही तो पॅरोलवर बाहेर आल्यानेच त्याला पुन्हा गुन्हा करण्याचे धाडस मिळाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना यापुढे पॅरोल न देण्याचा कायदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कायद्यात मोठा बदल होणार
राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, अशा प्रकरणांतील 80 ते 90 टक्के आरोपी पॅरोलवर सुटल्यावर पुन्हा त्याच प्रकारचे गुन्हे करतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
2014 ते 2019 या काळातही अशा प्रकारचा कायदा लागू करण्यात आला होता, मात्र नंतर न्यायालयाने तो रद्द केला. आता पुन्हा कठोर कायदा आणण्यासाठी विधी व न्याय विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री भेट
नसरापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘सह्याद्री’ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवणार आहेत .आरोपीला कठोर शिक्षा मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल महिला सुरक्षेसाठी आणखी कठोर कायद्यांची गरज आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात प्रस्तावित शक्ती कायदा पुन्हा लागू करण्याची मागणीही केली.

