मुंबई: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने 29 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाचे आणि उकाड्याचे संमिश्र वातावरण दिसत असताना, 29 ऑक्टोबर रोजी हवामानात मोठा बदल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. विजांचा कडकडाट आणि गडगडाट यासह या सर्व भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, तर घाटमाथा परिसरात अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस होऊ शकतो.
छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव येथे हलका ते मध्यम पाऊस, तर जालना, परभणी आणि हिंगोली येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस, तर नाशिक व घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सर्व ठिकाणी यलो अलर्ट लागू आहे.
अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि भंडारा येथे मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत वादळी वाऱ्यासह अती मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

