अंबाजोगाई — जन्म घेताच नवजात बालकाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं दुःखी कुटुंब बाळाला घेऊन गावाकडे गेले अंत्यसंस्काराची तयारी केली. त्याचवेळी बाळाने अचानक टाहो फोडला. उपस्थितां मध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झालं. ही घटना अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आली पण वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
केज तालुक्यातील होळ येथील रहिवासी घुगे कुटुंबाच्या नवजात बाळाला मृत घोषित केल्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच बाळ अचानक रडू लागल्याने नातेवाईकही थरथर कापले.
मिळालेल्या माहितीनुसार,केज तालुक्यातील होळ येथील रहिवासी घुगे कुटुंबातील
महिलेला प्रसुतीसाठी अंबाजोगाई च्या स्वामी रामानंद वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रसुतीनंतर डॉक्टरांनी बाळ मरण पावल्याचं सांगितलं. कुटुंबीय बाळाला आपल्या गावी घेऊन गेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.मात्र या तयारी दरम्यान बाळाने अचानक रडायला सुरुवात केली. हा प्रकार पाहून नातेवाईक आश्चर्यचकित झाले. त्यांनी तत्काळ परत अंबाजोगाई येथील रुग्णालय गाठलं आणि बाळाला तातडीने अति दक्षता कक्षात दाखल केलं. ही घटना घडल्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं बाळ जिवंत निघणं, ही बाब केवळ धक्कादायक नसून संतापजनकही आहे. हा अक्षम्य दुर्लक्षाचा प्रकार आहे की उपचार प्रक्रियेत काही चूक झाली होती, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. विशेष म्हणजे, बाळाच्या कुटुंबीयांनी अद्याप रुग्णालय प्रशासनाकडे कुठलीही तक्रार दाखल केलेली नाही. या घटनेनंतर रुग्णालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नवजात बाळांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

