गेवराई — गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी वाळू चोरीचे सिंडिकेट चालवले जात असल्याची तक्रार केली होती. दरम्यान गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रेती घाटातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या सिंडिकेट प्रकरणातला बडा मासा तहसीलदार खोमणे याच्या विरोधात मात्र अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गठीत चौकशी समितीच्या अहवालानंतर तहसील कार्यालयातील शासकीय कर्मचारी, खाजगी व्यक्ती आणि इतर संबंधित अशा एकूण 19 जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी नायब तहसीलदार (महसूल-2) संजय दत्तात्रय सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा क्रमांक 199/2026 असून आरोपींवर बी.एन.एस.च्या विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायदा, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि लोकसंपत्ती नुकसान निवारण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) गोविंद ढाकणे, किरण दांडगे, खाजगी संगणक चालक विश्वजीत शेंबडे पाटील, महसूल सेवक(कोतवाल) शुभम गायकवाड या चार महसूल कर्मचाऱ्यांसह खाजगी 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या खाजगी व्यक्तींची नावे
1) गोविंद दिलीप मगर (रा. धुमेगाव)
2) योगेश दिलीप मगर (रा. धुमेगाव)
3)अशोक चौकार
4) मुकेश उद्धव बोराडे (गंगावाडी)
5) दादासाहेब रमेश माळी (बेलगाव)
6) यासिन तांबोळी (रा. हिरापूर)
7) अमोल अप्पासाहेब लाखे (एरंडगाव)
8) शीतल शिवाजी धोंडरे (जातेगाव)
9) भागवत राधाकिसन जाधव (बेलगूडवाडी)
10) कल्याण पवार (उमापूर)
11) के. एम. पवार
12) सोहेल सौदागर (उमापूर)
13) शाहरुख मुसा पठाण (गढी)
14) अजय चाळक
15) बाबासाहेब तुकाराम आंधळे (भायाळा) यांचा समावेश आहे.
चौकशी समितीच्या अहवालानुसार राक्षसभुवन रेती घाटातून ऑगस्ट 2025 पासून अवैध रेती उत्खनन व वाहतूक केल्याचा आरोप आहे. तसेच शासकीय खनिज संपत्तीची चोरी, बेकायदेशीर उत्खनन, डिजिटल डेटामध्ये फेरफार करून फसवणूक, गोदावरी नदीपात्राचे पर्यावरणीय नुकसान आणि शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणात बी.एन.एस. कलम 61(2)(अ), 305(ई), 316(5), 318(4), 336(3), 340(2), 3(5) तसेच आय.टी. ॲक्ट कलम 66(c), 66(d), पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 15 आणि पी.डी.पी.पी. ॲक्ट कलम 3(1) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हा 16 जून 2026 रोजी रात्री आठ वाजता दाखल करण्यात आला असून पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.
बडे मासे अजून बाहेरच;आ.पंडीत अधिवेशनात मुद्दा उचलून धरणार
गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे याच्या नेतृत्वात घरकुलाच्या नावाखाली वाळूचे सिंडिकेट बिनधास्त चालू होते. तहसीलदार संदीप खोमणे चौकशीला सामोरे गेल्यानंतर सध्या दीर्घ रजेवर गेले आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी मंत्र्यांच्या संपर्कात ती असल्याची माहिती मिळत आहे. या सिंडिकेट प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर संदीप खोमणे याचं नाव वगळण्यात आलं असलं तरी “बकरे की अम्मा कब तक खैर मनायेगी” या म्हणीप्रमाणे बडे मासे वगळले गेले असले तरी आ. विजयसिंह पंडित हे प्रकरण 22 जून रोजी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात उचलून धरणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या प्रकरणात बड्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न झाला असला तरी ते देखील लवकरच जेलमध्ये गेलेले दिसतील. अधिवेशनाच्या तोंडावर जिल्हाधिकारी आणखी कुठली पावले उचलतात ?. 90 कोटीहून अधिकची दंडासह होणारी रक्कम संदीप खोमणे व इतर आरोपींकडून वसूल करणार का? या प्रकरणात आणखी किती जणांवर गुन्हे दाखल केले जाणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

