बीड जिल्ह्यातील वाढत्या नशेखोरीबाबत कठोर कारवाई करण्याची केली मागणी
कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी
मुंबई — परळीतील मयत तौहीद खान हत्या प्रकरणी आज औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून तौहीद खानच्या कुटुंबियांनी मागणी केल्याप्रमाणे यात आणखी कुणाचा समावेश आहे का, याबाबत सखोल तपास करण्याची मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी केली आहे.
तौहीद हा घरातील कर्ता असल्याने त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी सरकारने विशेष आर्थिक मदत करावी. तसेच या प्रकरणी नशेखोरी हे एक महत्त्वाचे कारण ठरले असून बीड जिल्ह्यातील नवतरुण मुलांमध्ये वाढत्या नशेखोरीबाबत कठोर कारवाई करण्यासाठी विशेष चर्चा घडवून आणण्याची मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे.
धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी परळीतील मयत तौहीद खान हत्या प्रकरणी चर्चा केली असून, तौहीद खान कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करत तात्पुरती आर्थिक मदत केली होती, तसेच त्यांच्या तीनही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.
प्रकाश सोळंकेना मुस्लिम समाजाच्या न्यायाची अडचण की द्वेष?
दरम्यान धनंजय मुंडे यांनी मयत तौहीद खान प्रकरणी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला असता माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांना बोलायला का दिले म्हणत हरकत घेतल्याने प्रकाश सोळंके यांना मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्याची अडचण आहे का मुस्लिम समाजाचा द्वेष आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान तालुका सभापती यांनी मात्र प्रकाश सोळंके यांचे म्हणणे धुडकावून लावत, स्वतः अध्यक्षांनी मुंडेना बोलण्याची परवानगी दिली असल्याचे स्पष्ट केले.




