बीड — बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडलेल्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालय-२, बीड यांनी महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी पती सुरेश उर्फ चित्तेश्वर गुलाब राठोड याला भारतीय दंड संहिता कलम 304 (भाग-२) अंतर्गत दोषी ठरवत 5 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्षाचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, 19 मार्च 2023 रोजी रात्री गेवराई तालुक्यातील भेंडटकळी तांडा येथे कौटुंबिक वादातून आरोपीने पत्नी सविता राठोड हिच्या डोक्यावर मोठा दगड मारून गंभीर दुखापत केली होती. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तलवाडा पोलीस ठाण्यात खून, छळ व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वैज्ञानिक पुरावे ठरले निर्णायक
या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरून जप्त केलेला रक्तरंजित दगड, रक्तमिश्रित माती, फुटलेल्या बांगड्या, रासायनिक विश्लेषण (सीए) अहवाल तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांची अखंड साखळी न्यायालयात सादर करण्यात आली. या पुराव्यांच्या आधारे मृत्यू हा अपघाती नसून आरोपीच्या हल्ल्यामुळे झाल्याचे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला यश आले.
तपास आणि युक्तिवादाची न्यायालयाने घेतली दखल
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर श्रीराम वाघमोडे यांनी केला. सरकारी अभियोक्ता बी. एस. राख यांनी प्रभावी युक्तिवाद करत परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी न्यायालयासमोर ठोसपणे मांडली. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला कलम 304 (भाग-2) अंतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपींना भारतीय दंड संहिता कलम 302, 498-अ, 323, 506 सह 34 मधील आरोपांतून न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
पोलीस अधीक्षक नवनीत कांवत आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास व दोषसिद्धीची प्रक्रिया पार पडली. दोषसिद्धी कक्ष आणि तलवाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनीही या खटल्यात महत्त्वाची भूमिका बजावली.




