बीड — धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर समनापूर शिवारातील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात दुचाकीस्वाराला अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून लुटीची 23 हजार रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
16 जून 2026 रोजी रात्री सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास राधेशाम नंदलाल पारीख (वय 42, रा. विप्रनगर, पेठबीड) हे दुचाकीवरून पाली येथून बीडकडे येत होते. यावेळी समनापूर शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर चार अनोळखी इसमांनी त्यांना अडवून चापटांनी मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील 23 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली होती.
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 222/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 309(6) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने सुरू केला होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली.पोलीस अंमलदार अशफाक सय्यद यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या लुटीमागे आवेजखान परवेजखान व त्याचे साथीदार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने बार्शीनाका परिसरातून चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये —
आवेजखान परवेजखान (वय 25, रा. हिना पेट्रोल पंपामागे, बार्शीनाका, बीड),अनिकेत ऊर्फ चिक्या विश्वास डोंगरे (वय 23, रा. प्रकाश आंबेडकर नगर, बार्शीनाका, बीड),अविनाश शैलेंद्र ससाणे (वय 22, रा. पंचशीलनगर, बीड)
विवेकानंद दिलीप गलांडे (वय 26, रा. पंचशीलनगर, बीड) यांचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींकडून 23 हजार रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. आरोपींना मुद्देमालासह बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सपोनि श्री. सोनवळे हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि श्रीराम खटावकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, अर्जुन यादव, राहुल शिंदे, अशफाक सय्यद, मनोज परजणे, अश्वीन सुरवसे, व नितीन वडमारे यांनी केली आहे.

