Home Blog Page 40

अजित पवार व मुलांच्या 69 कंपन्यांचा पर्दाफाश — अंजली दमानिया

0

मुंबई — महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा  अजित पवार विरोधात वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यामधील वादग्रस्त जमीन व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांच्या कार्यक्षेत्रातच हा गैरव्यवहार झाला असल्याने चौकशी निष्पक्ष होणार नाही,” असा ठाम आरोप करत त्यांनी प्रशासनालाही धारेवर धरले आहे.

दमानिया म्हणाल्या, “मुंढवा येथील जमीन ही गायकवाड कुटुंबाची महार वतन जमीन होती. नोंदणी न झालेल्या पॉवर ऑफ ॲटर्नीवरून शितल तेजवानीने केलेला व्यवहार बेकायदेशीर आहे. या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली होती, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे निलंबन व्हायला हवे.त्यांनी पुढे सांगितले की, “खोट्या कागदपत्रांच्या आधारे व्यवहार करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकरणात सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. ‘आमेडिया’ ही लिमिटेड लायबलिटी पार्टनरशिप कंपनी असून पार्थ पवार यांचा त्यात ९९ टक्के हिस्सा आहे. त्यामुळे त्यांना सर्व माहिती असणे स्वाभाविक आहे. मात्र एफआयआरमध्ये त्यांचे नावच नाही, हे त्यांना वाचवण्याचे डावपेच असल्याचे स्पष्ट दिसते.

आता या प्रकरणावरून राज्यात राजकीय तापमान चांगलेच वाढले असून, दमानिया यांनी अजित पवार-पार्थ पवार यांच्या ६९ कंपन्यांच्या सर्व जमीन व्यवहारांचा तपशील “मालिका स्वरूपात” उघड करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ‘पवार विरुद्ध दमानिया’ अशी नवी राजकीय लढाई पेटण्याची चिन्हे दिसत आहेत

 

ठाकरे पवारांचा पक्ष चिन्हाचा निकाल पुढच्या वर्षी

0

मुंबई — खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची तसेच  राष्ट्रवादी शरद पवार यांची की अजित पवार यांची हा प्रश्न प्रलंबित असताना सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांमधील निवडणूक चिन्हाच्या वादावरील अंतिम सुनावणी 21 जानेवारी 2026 पर्यंत पुढे ढकलली आहे.

21जानेवारी 2026 रोजी या प्रकरणाची सुनावणी होईल असे खंडपीठाने सांगितले. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी असेही निर्देश दिले की दुसऱ्या दिवशी इतर कोणत्याही तातडीच्या बाबींची यादी करू नये, जेणेकरून आवश्यक असल्यास 22 जानेवारी रोजी सुनावणी सुरू राहू शकेल. शिवसेना (यूबीटी) कडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत उपस्थित राहिले तर दुसऱ्या बाजूने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि एन.के. कौल उपस्थित राहिले.

शिवसेना (UBT) या याचिकेत एकनाथ शिंदे यांच्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. 2022 मध्ये शिवसेनेतील राजकीय संकटानंतर, निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने आदेश जारी केला.

उद्धव ठाकरे गटाचा असा युक्तिवाद आहे की केंद्रीय निवडणूक आयोग पक्षातील बहुमत निश्चित करण्याची खरी चाचणी घेण्यात अयशस्वी ठरला आणि निवडून आलेल्या आमदारांमध्ये शिंदे गटाची संख्या जास्त होती. सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला हे प्रकरण प्रलंबित असताना शिवसेना (UBT) आणि मशाल जाळण्याचे चिन्ह वापरण्याचे निर्देश देणारी नोटीस जारी केली.

त्याचप्रमाणे, शरद पवार गटाने फेब्रुवारी 2024 मध्ये अजित पवारांना घड्याळ चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले. या प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला तुतारी असलेल्या व्यक्तीला चिन्ह म्हणून वापरण्याची अंतरिम व्यवस्था दिली. अजित पवारांना त्यांच्या निवडणूक चिन्ह घड्याळाच्या वापराबद्दलचा खटला न्यायालयात प्रलंबित असल्याचा प्रचार करण्यास सांगितले होते.

घराच्या बांधकामासाठी बँकेतून काढलेले अडीच लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले

0

गेवराई — घराच्या बांधकामासाठी बँकेत जमा केलेली अडीच लाख रुपयाची रक्कम काढून घेऊन जात असताना हातातली पिशवी हिसकावून घेत अज्ञात चोरट्यांनी मोटार सायकल वरून पळ काढला या घटनेने गेवराई शहरात खळबळ माजली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
गेवराई तालुक्यातील सेलू येथील रहिवासी दादासाहेब प्रभाकर यादव हे मंगळवारी घराच्या बांधकामासाठी दुपारी स्टेट बँक ऑफ इंडियामधून 2 लाख 50 हजार रुपये काढून घेऊन जात होते. ते रस्त्याने जात असताना, त्यांच्या पाठीमागून एका स्पोर्ट्स बाइकवरून दोन जण भरधाव वेगाने आले. या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने दादासाहेब यादव यांच्या हातातील पैसे असलेली पिशवी हिसकावून दोघांनी बीडच्या दिशेने सूसाट पळ काढला. भरदिवसा आणि मुख्य रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे गोंधळ उडाला. हातातील पिशवीची चोरी होताच दादासाहेब यादव यांनी तातडीने गेवराई पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पोलिस ठाणे हद्दीत नाकाबंदी केली आहे. बीडकडे पळून गेलेल्या चोरट्यांचा आणि त्यांच्या स्पोर्ट्स बाइकचा शोध पोलिस घेत आहेत. भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे गेवराई शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे हत्येचा कट रचल्या प्रकरणी कांचन साळवीला अटक

0

जालना — मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी कांचन साळवी याला पोलिसांनी अटक केली आहे. दादा गरड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन नावाच्या व्यक्तीचा सबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता याच प्रकरणाचा अधिक तपास करत रात्री (11 नोव्हेंबर) उशिरा कांचन साळवी याला जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन, चौकशी अंती त्याला अटक केलं आहे.
अटकेपूर्वी कांचन साळवीने आपली बाजू मांडली होती, ‘गरडसाहेब माझा अर्था अर्थी संबंध नाहीये. जे पण काही चौकशी असेल, नार्कोटिक्स असेल, त्याला मी पूर्णपणे समोर जायला तयार आहे.’ या अटकेमुळे आता पोलीस तपासात साळवी, गरड आणि अमोल खुने यांच्यातील संबंधांची चौकशी केली जाईल.दरम्यान, कालच माध्यमांसमोर येऊन कांचन साळवी याने आपण अमोल खूनेला ओळखतो. मात्र दादा गरडशी आपला कसलाही संबंध नव्हता, तोच आपल्याला काही रेकॉर्डिंग देण्याच्या बदल्यात पैसे मागत होता, असा आरोप कांचन साळवी याने केला होता.मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना यांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी, गोंदी पोलिसांनी गेवराईतून अमोल खुणे आणि विवेक उर्फ दादा गरुड या दोघांना अटक केली. कोर्टाने या दोन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन आरोपींपैकी अमोल खुणे हा मनोज जरांगेंचा समर्थक असल्याचं सांगितलं जातं आहे.

तिरुपती लाडूसाठी २५० कोटींचं बनावट तूप! दिल्लीतील व्यापारी अजय कुमार सुगंधा अटकेत

0

मुंबई — तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या प्रसिद्ध लाडूसाठी वापरले जाणारे तूप शुद्ध नसून बनावट असल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भोले बाबा डेअरी नावाच्या कंपनीने तब्बल पाच वर्षांपासून (२०१९ – २०२४) तिरुमला तिरुपती देवस्थानला  २५० कोटींचे बनावट तूप पुरवल्याचं सीबीआय – एसआयटी तपासात स्पष्ट झालं आहे.याप्रकरणी दिल्लीतील व्यापारी अजय कुमार सुगंधा याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या डेअरीने खऱ्या दुधाऐवजी पाम ऑईल आणि केमिकल्सपासून बनवलेलं मिश्रण तूप म्हणून पुरवलं. हे मिश्रण सुगंध आणि रंगासाठी कृत्रिम पदार्थ वापरून तूपासारखं दिसेल अशा पद्धतीने तयार केलं जात होतं. सीबीआय – एसआयटीने केलेल्या लॅबोरेटरी चाचणीत उघड झालं की तूपामध्ये दुधातील कोणतंही फॅट नव्हतं. त्यामुळे हे पूर्णपणे बनावट असल्याचं सिद्ध झालं.

सध्या या प्रकरणात भोले बाबा डेअरीचे मालक, पुरवठा साखळीतील काही अधिकारी आणि तिरूमला तिरूपती देवस्थानच्या  खरेदी विभागातील काही कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला जात आहे. सीबीआय – एसआयटीने आर्थिक अनियमितता, फसवणूक आणि धार्मिक भावनांचा अपमान या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

या घोटाळ्यामुळे लाडू प्रसादाची शुद्धता आणि श्रद्धाळूंचा विश्वास दोन्ही प्रश्नचिन्हाखाली आले आहेत. तिरूमला प्रशासनाने सांगितलं की, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि पुढे सर्व तुपाच्या बॅचेसची स्वतंत्र लॅबमध्ये चाचणी केली जाईल.सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या एस आय टे ने सत्य समोर आणले आहे. दोषींना कायद्याचा फटका बसणार आहे. हे केवळ भेसळ प्रकरण नाही, तर हिंदूंच्या श्रद्धेवर थेट प्रहार आहे, आपल्या विश्वासाचा अपमान आहे आणि भारताच्या आत्म्याविरुद्धचा गुन्हा आहे. पवित्रतेशी खेळ करणाऱ्यांना आता त्याची किंमत चुकवावीच लागेल.

शिवसेना अन् धनुष्यबाणाचा निकाल निवडणुकी पूर्वीच — असीम सरोदे

0

मुंबई — शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात दाखल याचिके संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही याचिका दाखल केली आहे.मागील काही महिन्यांपासून ही याचिका सुनावणीच्या प्रतिक्षेत आहे. आता त्यावर 12 नोव्हेंबरला बुधवारी सुनावणी होणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बाजू लढविणारे वकील असीम सरोदे यांनी ही माहिती सोशल मीडियातून दिली आहे. सरोदे यांची सनद महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनने तीन महिन्यांसाठी रद्द केली आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही कोर्टात केस लढता येणार नाही. कोर्टाविषयी केलेल्या विधानावर ठपका ठेवत असोसिएशनने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, सरोदे यांनी सोशल मीडियातून दिलेल्या माहितीनुसार, धनुष्यबाण पक्षचिन्ह प्रकरणी 12 नोव्हेंबरला 19 नंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या बेंच समोर सुनावणी होईल, असे कामकाज यादीवरून दिसते. पक्षचिन्ह आणि अपात्रतेबाबत याचिकांची सुनावणी एकत्र होईल, असेही दिसते.
असीम सरोदे यांनी याचिकेवरील सुनावणी लांबत असल्याने नाराजीही व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुन्हा पुन्हा तारीख मिळणे व या संविधानिक विषयांवरील सुनावणी पुढे ढकलली जाणे दुःखद आहे. सर्वोच्च न्यायालयात वारंवार तारीख मिळणे याचा अर्थ कोणतीच न्यायिक-शिस्त नसणे असा आहे.

‘तारीख पे तारीख’ च्या ऐवजी ‘तारीख पे न्याय’ असे झाले तर न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास टिकून राहील. काय द्यायचा तो निर्णय द्या. निकाल देतांना सकारण आणि स्पष्टीकरणांसह द्यावा, हे न्याय तत्व नक्की पाळा, अशी अपेक्षा असीम सरोदे यांनी सोशल मीडियातील पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.
दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेबाबतही उद्याच सुनावणी होण्याची शक्यता सरोदे यांनी व्यक्त केली आहे. ही याचिका ठाकरेंच्या सेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पात्र ठरविल्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. शिंदेंच्या सेनेकडूनही ठाकरेंच्या आमदारांना पात्र ठरविल्याविरोधात नार्वेकरांच्या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.

सर्वसामान्य लोकांची कामे करायचीत असा निर्धार करून निवडणुकीला सामोरे जा — आ.संदीप क्षीरसागर

0

नगरपालिकेच्या अनुषंगाने आ.क्षीरसागरांनी घेतली पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक

बीड —  सर्वसामान्य लोकांची कामे करण्यासाठीच आपण निवडणूक लढत आहोत. शहरातील नागरिकांचे अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर आपल्याला काम करायचे आहे. निवडून आल्यानंतरही आपल्याला लोकांची कामे करायचे आहेत, असा निर्धार करून निवडणुकीला सामोरे जा. आपल्या पक्षाच्या पुरोगामी विचारधारेनुसार आपल्याला काम करायचे. असे आ.संदीप क्षीरसागर यांनी आपले पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सांगितले. मंगळवारी (दि.११) रोजी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. यावेळी संवाद साधताना ते बोलत होते.


नगरपालिका निवडणूक प्रक्रिया चालू झाली आहे. या निवडणुकीतील रणनीती आखण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.११) रोजी राष्ट्रवादी भवन बीड, येथे आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार यांनी आपापली मते मांडली. दरम्यान हि बैठक केवळ चर्चा करण्यासाठी असतानाही, या बैठकीला अक्षरशः सभेचे स्वरूप आले. या बैठकीत गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून आले. जनतेच्या आशा-अपेक्षांचा वेध घेत, विकास आणि पारदर्शकतेचा नवा अध्याय लिहिण्याची तयारी सर्वांना सोबत घेऊन केली आहे असे आ.क्षीरसागर यांनी सांगितले. या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

न.प. निवडणुकीतच भाजपच्या नौकेला पाडलं भोक; अशोक लोढांच धार्मिक गोष्टीत नाक खूपसून दिसलं माणुस की धरून‌ ठोक

0

बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल

बीड — शांतीचा संदेश देत “जिवो जीवस्य जीवनम्” म्हणजेच मानवी जीवनात समानता, सहाय्य आणि परस्पर आदराचे महत्त्व शिकवत सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या जैन धर्मगुरू समोरच भाजपचे शहराध्यक्ष अशोक लोढा यांनी गुंडगिरी करत एकाला मारहाण केल्याची खळबळ जनक घटना घडली याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न.प‌.निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप शहराध्यक्षांने धार्मिक कार्यक्रमात घातलेल्या धुडगुसामूळे चर्चेला उधाण आले आहे.
सत्ता, पद, पैसा आला की माणूस किती मस्तवाल होतो. याची प्रचिती आज आली गेली.जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या जैन धर्मगुरूंचा प्रवचन कार्यक्रम बीड शहरात सध्या सुरू आहे. मंगळवार दि 11 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास फुलाई नगर भागात जैन मुनिं च्या प्रवचन कार्यक्रमास जवळपास 50 ते 60 लोकांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम मंगलमय वातावरणात शांततेत सुरू होता. एका संस्थेच्या माध्यमातून गरीब व गरजू व्यक्तींना मदत करण्याच्या कामासंदर्भात चर्चा सुरू झाली.या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष अशोक लोढा देखील उपस्थित होते.यावेळी अशोक लोढा यांचा कुठलाही संबंध नसताना तुम्ही फार मोठे लागून गेला का? तुम्ही लोकांना मदत काय करता? यासारखे प्रश्न उपस्थित करून अरेरावी ची भाषा वापरण्यास सुरुवात केली. यावेळी जितेंद्र सुखराज बोरा वय 50 वर्ष व्यवसाय व्यापारी रा. सारडा रेसिडेन्सी यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. धार्मिक कार्यक्रमात असा मारहाणी सारखा प्रकार नको कार्यक्रम शांततेत व्हावा यासाठी म्हणून जितेंद्र बोरा यांचे मोठे बंधू पारस बोरा हे देखील हस्तक्षेप केला. पारस बोरा यांना देखील ढकलून देत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी जितेंद्र बोरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात अशोक लोढा विरोधात बीएनएस कलम 115(2), 351(2), 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भारती करत आहेत.दरम्यान भाजप सारख्या संस्कारक्षम पक्षाच्या शहराध्यक्षांनीच धार्मिक कार्यक्रमात असा धुडगूस घातला या बातमीनेच सर्वत्र खळबळ माजली आहे.ऐनन.प निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षा घेण्यास नकार

0

मुंबई — सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतः दमानिया यांनीच ही बाब उघड सांगितली. त्या म्हणाल्या की, काही विश्वसनीय सूत्रांकडून “माझा गेम केला जाणार” असा गंभीर इशारा मिळाल्याची माहिती त्यांना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, “मी अमेरिकेत असताना मला एका सीनियर अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की त्यांच्या हाताला काही इनपुट मिळाले आहेत की तुमचा गेम केला जाणार आहे. काही लोकांना वाटतंय की ‘यांच अति होतोय, यांचा गेम करायचाच’, अशा चर्चा त्यांच्या कानावर आल्या आहेत.” त्या पुढे म्हणाल्या की, “मला सांगण्यात आलं की तुम्ही प्रवासादरम्यान गाड्या बदलून वापरा, गाडी चालवताना फोन बंद ठेवा. फोन स्विच ऑफ ठेवलात तर चांगलं, असे स्पष्ट निर्देश मला देण्यात आले.”

या प्रकरणाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दिली असून त्यांनी तत्काळ राज्य सरकारला याबाबत सावधगिरीचे निर्देश दिल्याचे दमानिया यांनी सांगितले. त्यांनी पुढे उघड केले की, “सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी मिळाली त्या फोनच्या आदल्या दिवशीच मला हा इशारा मिळाला होता.”

धमकीचे गांभीर्य लक्षात घेता अधिकाऱ्यांनी त्यांना सुरक्षा घेण्याचा सल्ला दिला असला तरी दमानिया यांनी ती नाकारली आहे. त्या म्हणाल्या, “मला सिक्युरिटी घ्यायला सांगितलं आहे. मी एकदा नाही, दोनदा लिहून दिलं आहे की मला सिक्युरिटी नको आहे. मी सिक्युरिटी घेणार नाही. मी माझं काम सुरू ठेवणार.”

दिल्लीचा लाल किल्ला परिसरात कार मध्ये स्फोट; नऊ जणांचा मृत्यू

0

नवी दिल्ली — राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कार मध्ये झालेल्या भीषण स्फोटाने परिसर हादरला गेला. बाजूला उभ्या असलेल्या सात ते आठ कारला यामुळे आग लागली. त्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले. ही घटना सायंकाळी 6:45 च्या सुमारास घडली.


या स्फोटामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलं आहे. दिल्ली पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

मिळालेली माहिती अशी, की दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ सोमवारी (10 नोव्हेंबर ) संध्याकाळी लाल किल्ला परिसरातील मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर उभ्या असलेल्या कार मध्ये .
भीषण स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की जवळपासच्या दुकानांचे दरवाजे आणि खिडक्या फुटल्या आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की स्फोटानंतर या पार्किंगमध्ये असलेल्या सात ते आठ गाड्यांनी पेट घेतला, कार जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्ली पोलिस आणि बॉम्ब शोध पथक त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. तपास सुरू करण्यात आला आहे. गॅस सिलिंडरचा किंवा कारच्या बॅटरीचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे सध्या स्फोटाचे कारण अस्पष्ट आहे.